दै. महाराष्ट्र टाइम्स
सार्वत्रिक आरोग्यसेवेचे काय?
डाॅ. अमोल अन्नदाते
तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर धर्मदाय रुग्णालये, वैद्यकीय क्षेत्राची नितीमत्ता अशा अनेक प्रश्नांवर चर्चा होते आहे व ती व्हायलाच हवी. पण एक माता मृत्यू झाल्यावर जो मूळ प्रश्न देशाच्या , राज्याच्या प्रत्येक नागरिकाला पडायला हवा त्या बद्दल मात्र कुठे ‘ब्र’ ही काढला जात नाही आहे व तो प्रश्न म्हणजे युनिवर्सल हेल्थ केअरचे काय? युनिवर्सल हेल्थ केअर म्हणजे सार्वत्रिक समान मोफत आरोग्य सेवा. एव्हाना आपण शासनाने सर्वांना मोफत आरोग्य सेवा देणे हा प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक स्तरापलीकडे त्याचा अधिकार आहे, हेही विसरुन गेलो आहोत.
या निमित्त्ताने आज एकूण आरोग्य सेवेचा आढावा घेतला तर दिसून येते की जवळपास ८० % आरोग्य सेवा ही खाजगी रुग्णालये , धर्मदाय रुग्णालये देत आहे व जेमतेम २० % रुग्ण सेवा हि पूर्णपणे शासकीय सेवेच्या माध्यमातून देण्यात येते आहे. खर तर हे नेमके उलटे असायला हवे. खाजगी – धर्मदाय रुग्णालयांचे उत्तरदायित्व कसे वाढवता व सुधारता येईल हा प्रश्न महत्वाचा आहेच . पण हे समजून घ्यायला हवे कि राज्याच्या तेरा कोटी जनतेच्या आरोग्याची जबाबदारी या घटकावर झटकून चालणार नाही. धर्मदाय संस्था , रुग्णालये , खाजगी रुग्णालये हे शासकीय आरोग्य सेवेसमोर तसे पाहिल्यास छोटा घटक आहेत. पण सर्व जनतेच्या आरोग्य सेवेचे – सार्वत्रिक समान मोफत आरोग्य सेवा हे निश्चित उत्तर शोधायचे असल्यास मोडकळीला आलेल्या शासकीय सेवेचे पुनरुज्जीवन करणे हेच असणार आहे. आज अस्तित्वात असलेली शासकीय आरोग्य सेवा ही २००१ च्या जनगणने नुसार आहे व आहे ती ही अनेक त्रूटींमुळे आरोग्य सेवा देण्यास सक्षम नाही.
ज्या तनिशा भिसे या मातेच्या मृत्यू मुळे सगळे राज्य ढवळून निघाले आहे , त्या गरोदर मातांची सुश्रुषा व माता मृत्यू हा मुलभूत आरोग्य सुविधेचा प्रश्न बघितल्यास काय दिसते ? राज्यात एका शासकीय रुग्णालयात प्रसूती दरम्यान रक्तस्त्राव झाल्यास तो थांबवण्यासाठीचे कार्बिटोसीन हे मुलभूत औषध ही उपलब्ध नाही. एवढ्या वर्षात या औषधाची खरेदी करावी हे एका ही आरोग्य मंत्र्यांना वाटले नाही. गरोदर मातांच्या सुश्रूशेसाठी स्त्रीरोग तज्ञ , भूल तज्ञ , ९ महिन्यात किमान तीन सोनोग्राफी व्हावी म्हणून एक रेडीओलॉंजिस्ट व एक बालरोग तज्ञ असे किमान चार तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. आज मोठ्या संख्येने असलेली उपकेंद्र , उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालये , सिव्हील हॉस्पिटल मध्ये अशी किती रुग्णालये आहेत जिथे यातील किमान दोन तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत तर याचे उत्तर निराशाजनक आहे. शासकीय आरोग्य सेवेचे स्वरूप बघितले तर उप केंद्रावर नॉर्मल प्रसूती , उप जिल्हा व ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन सेक्शन , गुंतागुंतीच्या केसेस साठी जिल्ह्यात असलेली सिविल व वूमन्स हॉस्पिटल अशी रचना केलेली आहे. पण गरोदर महिला या एकएका रुग्णालयातून केवळ पुढे पाठवण्याचे काम केले जाते. यात गरोदर मातेचे गोल्डन आवर्स ( उपचाराचे सुरुवातीचे महत्वाचे तास ) निघून जातात व ती शेवटी वाटेतील खाजगी किंवा वैद्यकीय महाविद्यालयात जाते. तो पर्यंत माता व नवजात बाळाच्या तब्येतीची गुंतागुंत निर्माण झालेली असते.
खाजगी , धर्मदाय रुग्णालयांना सुधारवण्यासाठी उपाय करताना बहुतांश मातांना आज खाजगी रुग्णालयात का जावे लागते ? हा प्रश्न शासनासह प्रत्येक नागरिकाला पडायला हवा . हीच स्थिती नवजात शिशुंची आहे. आज नवजात शिशु कक्ष व बालरोगतज्ञ अत्यंत कमी शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. तुलनेने वैद्यकीय महाविद्यालय बरी कामगिरी करत आहेत पण तिथे ही रुग्णांची संख्या एवढी जास्त व मनुष्यबळ एवढे कमी आहे कि बहुतांश वेळा वैद्यकीय महाविद्यालयांना सलंग्न रुग्णालयात खाटाच उपलब्ध नसतात. नांदेड वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू व ठाण्याच्या शिवाजी हॉस्पिटल येथे २४ तासात १८ मृत्यू हे विसरण्या एवढे जुने नाहीत. सर्वाना समान मोफत सेवेची सुरुवात ही खर तर माता व बाल आरोग्या पासून केली तरी ते एक मोठे पाउल ठरेल. त्यांनतर इतर सर्व विभागांमध्ये हे प्रारूप राबवता येईल.
सार्वत्रिक आरोग्य सेवेचा मूळ गाभा केवळ मोफत सेवा नव्हे तर सर्व आर्थिक स्तरांना त्याच दर्जाची सेवा देणे हा आहे. आज गर्भ श्रीमंत , उच्च मध्यम वर्ग , मध्यम वर्ग व निम्न स्तरातील वर्ग त्यांना जी परवडेल त्या दर्जाची सेवा घेतात. या सर्व वर्गांना समान दर्जाच्या सेवा मिळणे अपेक्षित आहे. आज महाराष्ट्रातील नागरिकाचा आरोग्य सेवेवर खिशातून होणारा खर्च ६० % एवढा आहे. हा खर्च सार्वत्रिक आरोग्य सेवेच्या माध्यमातून शून्यावर आणण्याचे ध्येय ठेवायला हवे. याची सुरुवात ही आरोग्य क्षेत्रासाठी आर्थिक तरतुदी पासून होते. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागाला सर्व विभागात सर्वात कमी म्हणजे ३८२७ कोटी तरतूद एकूण अर्थ संकल्पाच्या केवळ ४ % एवढी कमी आहे. त्यातही राज्याच्या आरोग्याच्या कुठेही नेमक्या समस्या व प्राधान्य ओळखून खर्चाचे नियोजन केलेले नसते. मनुष्यबळाच्या उपलब्धतेचा प्रश्न गेली अनेक वर्षे आरोग्य विभागाला भेडसावत आहे. त्यावर दूरगामी उत्तर शोधण्यासाठी किती आर्थिक तरतूद करून कायमचा प्रश्न कसा सोडवता येईल यावर कधीही गांभीर्याने विचार होत नाही. त्यासोबत औषधांच्या तुटवड्याची समस्या गंभीर आहे. औषध खरेदी साठी अनेक वेळा तामिळनाडू मॉडेलचा अभ्यास झाला पण त्याची अंमलबजावणी काही होत नाही. राज्यात औषध खरेदीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजली पण औषध खरेदी अजून ही सुरळीत झाली नाही. शासनाने डॉक्टरांचा तुटवडा दूर करण्यासाठी बी.ए.एम.एस व बीएस्सी नर्सिंग साठी कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून मोठ्या प्रमाणावर भरती केली. पण यापैकी अनेकांना वेळेवर वेतन मिळत नाही. काम करण्याची इच्छा असून ही औषधे, यंत्र सामुग्री नसल्याने बऱ्याच ठिकाणी मनुष्यबळ असून ही त्याचा उपयोग नाही. एकूण आरोग्य सेवेच्या बाबतीत शासनाला केवळ खाजगी व धर्मदाय रुग्णालयांवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणून नव्हे तर त्या तोडीची किंबहुना त्यापेक्षा दर्जेदार सेवा देणारी यंत्रणाही उभी करावी लागेल.
युएचसी अस्तित्वात नसल्याने करोनाच्या साथीत कशा प्रकारे लोक मृत्यू मुखी पडले, हे आपण अनुभवले. त्यातही अनेक कुटुंब आर्थिक दृष्ट्या देशोधडीला लागली. तेव्हा ही ‘रुग्णालये ताब्यात घेऊ’ याच जप करत व खाजगी , धर्मदाय रुग्णालयांकडे बोट दाखवत शासनाने वेळ मारून नेली. कोविड नंतर तरी दूरगामी पर्याय ठरेल अशी सार्वत्रिक मोफत आरोग्य सेवेची किमान प्रक्रिया सुरु होईल असे वाटले होते. पण हा विषयच कोणाच्या ध्यानीमनी आला नाही. आज जगातील ४० % देश हे युएचसी अर्थात सर्वांना समान आरोग्य सेवा देतात. यात इंग्लंड मध्ये एनएचएस येऊन आता ८० वर्षे उलटून गेली. सार्वत्रिक सेवा देताना क्युबा, इंग्लंड सारखी सरकार हे सेवा स्वतः निर्माण करते किंवा युरोप , कॅनडा, जपान , थायलंड प्रमाणे खाजगी डॉक्टरांच्या सेवा विकत घेते. मार्ग कुठला ही असो युएचसी हे राज्याचे निश्चित धोरण आहे हे ठरवून त्या दिशेने वाटचाल आवश्यक आहे.
आरोग्य व शिक्षण ही दोन सरकारची आद्य कर्तव्ये आहेत. पण या विषयांना राजकीय महत्व नसल्याने ती कुठल्याही सरकरच्या प्राधान्य यादीत नाहीत. तनिशा भिसे यांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले व आरोग्य क्षेत्राविषयी , रुग्णालयांविषयी चर्चा होते आहे. अधून मधून अशा मोठ्या घटना घडल्या की तेवढ्या पुरती चर्चा करण्याचा व तात्पुरत्या समित्या नेमून चौकशा करण्याचा हा विषय नाही. १९८८ साली जे.जे रुग्णालयात सदोष ग्लीसरॉल मुळे १४ रुग्णांचे मृत्यू झाले. यानंतर ऐतिहासिक लेनटीन आयोगाने शासनाला सूचना करणारा अहवाल सादर केला ज्याची अमलबजावणी आज ही झालेली नाही. म्हणून आरोग्य व्यवस्था सुधारण्याची चर्चा व पाउले ही 'युनिवर्सल हेल्थ केअर'च्या माध्यमातून कायमस्वरूपी असायला हवी.
डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
9421516551