Articles

पेपरफुटीचा अमानुष खेळ – डॉ. अमोल अन्नदाते

By Admin

May 17, 2026

दै. महाराष्ट्र टाइम्स – संवाद पुरवणी

पेपरफुटीचा अमानुष खेळ

डॉ. अमोल अन्नदाते

‘नीट’ परीक्षा घेण्याचा खर्च हा २०० कोटी रुपये आहे व ‘एनटीए’कडे अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून जमा होणारे एकूण शुल्क ३०० कोटी रुपये असते. ‘नीट’ परीक्षा सुरू झाल्यापासून आजवर ‘एनटीए’कडे ३,५१३ कोटी रुपये रुपये शुल्क म्हणून म्हणून जमा झाले आहेत व ३,०६५ कोटी रुपये खर्च झाले आहेत. नफा म्हणून कमावलेले ४४८ कोटी रुपये हे आता ‘नीट’ची प्रक्रिया सुधारण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. खरे तर ही परीक्षा म्हणजे पैसे कमावण्याचे साधन नाही.

पेपर फुटणे हा गैरप्रकाराचा केवळ एकच मार्ग झाला. तो उघड झाला म्हणून कळला. अजून असे अनेक मार्ग निश्चितच असतील, जे अद्याप कुणालाच माहीत झालेले नाहीत. २०२४ साली राजस्थानमध्ये चुकीचा पेपर वाटला गेला. दुसरा पेपर देण्यास उशीर लागला म्हणून विद्यार्थ्यांना चक्क ग्रेस मार्क्स देऊन टाकण्यात आले होते. इतक्या तीव्र स्पर्धेच्या व महत्त्वाच्या परीक्षेत असा प्रशासकीय गोंधळ होणे हा सर्वसामान्यांच्या जीवाशी आणि जीवनाशीही खेळ आहे. या परीक्षेतून डॉक्टर म्हणून थेट लोकांच्या जीवाचा ताबा आपण या विद्यार्थ्यांना देत असतो. यातले गांभीर्य केंद्र सरकारने लक्षात घेणे गरजेचे आहे.

खासगी कोचिंग क्लासची लिंक

‘नीट’ परीक्षेतील पेपर फुटी आणि अन्य गैर प्रकारांचा संबंध हा खासगी कोचिंग क्लासेसशी आहे. ‘लातूर’, ‘कोटा’ यांच्या धर्तीवर अनेक ठिकाणी मोठी कोचिंग इंडस्ट्री उभी राहिली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात हमखास प्रवेशाची खात्री देत या क्लासेसमध्ये लाखो रुपयांचे शुल्क भरून प्रवेश घेतला जातो. या इंडस्ट्रीत आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी व क्लासमधील अधिकाधिक मुलांना वैद्यकीय प्रवेश मिळावा यासाठी कोचिंग क्लासेसमध्ये प्रचंड स्पर्धा असते. त्यातून अशा गैरप्रकारांचा आधार घेतला जातो. या क्लासेसचे नीट परीक्षा यंत्रणेशी असलेले संबंध आता या तिसऱ्या पेपरफुटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. ही भ्रष्ट ‘छिद्रे’ बुजवायची असतील तर परीक्षेशी सबंधित प्रक्रियेतील पारदर्शकतेची पातळी राखणे हेच उत्तर आहे. पेपरफुटीच्या आधीच्या प्रकरणांतील आरोपींवर काय कारवाई झाली, याचे उत्तरही सरकारला संतापलेल्या विद्यार्थी आणि आणि पालकांना द्यावे लागणार आहे. एनटीए घेत असलेल्या चौदा पैकी पाच परीक्षांमध्ये आतापर्यंत गैरप्रकार आढळून आले आहेत. यावरून एनटीए प्रशासनामध्येच त्रुटी आहेत, हे स्पष्ट होते. पेपरफुटीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा एनटीएला स्वतःमध्येच सुधारणा कराव्या लागणार आहेत. गैरमार्गाचा अवलंब कसा केला जातो, याची चाचपणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक थर्ड पार्टी अंडर कव्हर इंटेलिजन्स स्लीपर सेल स्थापन करण्याची गरज आहे. या परीक्षेविषयीची विश्वासार्हता आता रसातळाला गेली आहे, त्यामुळे जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून यश मिळवतात, त्यांच्या यशावरही प्रश्नचिन्ह उभे राहत आहे आणि तसे होणे हे अन्यायकारक आहे.

कुठलीही वेळेची मर्यादा न पाळता चालणारी दीर्घ प्रवेश प्रक्रिया हा या परीक्षेचा आणखी एक मोठा दोष आहे. विद्यार्थी व पालकांच्या मानसिक छळाचे तेही एक कारण आहे. ‘नीट’ची परीक्षा होते मे महिन्याच्या पहिल्या रविवारी, मात्र प्रवेश प्रक्रिया संपण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडतो. ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असूनही ती पूर्ण होण्यास १० महिने का लागावे ? फार तर एका महिन्यात ती संपायला हवी. चांगल्या बुद्धिमत्तेची १८ ते २० वयोगटातील लाखो मुलांची एक पूर्ण पिढी १० महिने घरी रिकामी बसवून आपण किती मानवी क्रयशक्ती वाया घालवतो? याचे कारण असे की नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी देण्यासाठी कुठलीही तारखेची मर्यादा केंद्र व राज्य सरकार पाळत नाही. प्रवेश परीक्षा असो की प्रवेश प्रक्रिया यातील गोंधळाच्या मुळांचा शोध घेतला तर अशा अनेक गोष्टी लक्षात येतील.

डॉ. अमोल अन्नदाते

*dramolaannadate@gmail.com

9421516551