‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे? – डॉ. अमोल अन्नदाते

medical students

दै. महाराष्ट्र टाइम्स

‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे?

-डॉ. अमोल अन्नदाते

मागील पाच वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एक हजार ११७ व एमबीबीएस पदवी करत असताना १५३ विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडल्याची आकडेवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ( नॅशनल मेडिकल कमिशन ) दिली. अर्ध्यावर शिक्षण सोडून जाण्याचे प्रमणात इतर अभ्यासक्रमातही असते. पण ज्या प्रवेश परीक्षेत १ लाख जागांसाठी २५ लाख विद्यार्थी स्पर्धा करत असतात व हुशार मुले ज्या अभ्यासक्रमाला पसंती देतात तो अभ्यासक्रम इतक्या विद्यार्थ्यांनी सोडणे हे चिंताजनक आहे.

                         खरेतर एकदा एमबीबीएस ला प्रवेश मिळाला की विद्यार्थी डॉक्टर होणारच हे गृहीत धरलेले असते. सन २००० पर्यंत एमबीबीएस  तृतीय वर्ष परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नव्हते. आता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात तसेच देशभर ही एमबीबीएस परीक्षा पूर्वी इतकी अवघड ठेवलेली नाही. तरीही अभ्यासक्रमाचा भार न झेपल्याने काही प्रमाणात मुले कोर्स सोडतात. महाराष्ट्रात पहिल्या वर्षी उत्तीर्ण होण्यासाठी चार परीक्षांची संधी दिली जाते. त्यानंतर विद्यार्थी बाहेर जातो. उशिराने सुरु होणारे प्रवेश , न्यायालयीन खटले यामुळे ऑगस्ट  मध्ये सुरु होणे अपेक्षित असलेले वर्ग हे सुरु होण्यास जानेवारी , डिसेंबर उजाडते व ऑक्टोबर मध्ये परीक्षा असते. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात नवख्या असलेल्या विद्यार्थ्याना अवाढव्य अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यास जेमतेम १० महिने मिळतात. त्यातही संक्रांत , जयंत्या , दसरा , दिवाळी या महाविद्यालयाला सुट्ट्या सुरूच असतात. म्हणून पहिल्या वर्षात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यास सोप्या असल्या तरी त्यांचा तणाव नुकतेच वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या वयासाठी मोठा असतो. त्यामुळे मानसिक समस्या , तणाव व त्यातून व्यसनाधीनतेचे प्रमाण वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालले आहे. या सर्व नैराश्येतून अभ्यासक्रम सोडणारे काही विद्यार्थी असतात.

                              सहसा वर्गात पहिल्या पाच मध्ये असलेले विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला येतात. शालेय जीवनापासून सतत हे विद्यार्थी शैक्षणिक यश अनुभवलेले असतात. वर्गात मधल्या फळीतील मुलाना फार शैक्षणिक प्रगती ही नाही व घसरण ही नाही अशा स्थिर मानसिकतेत रहायची सवय असते पण पहिल्या फळीतील विद्यार्थ्यांची जराही शैक्षणिक घसरण पचवण्याची मानसिक क्षमता कमी असते. पडून परत उसळी मारण्याच्या मानसिक प्रक्रियेला रेसिलंस ( resilience ) असे म्हंटले जाते. या आघाडीवर वैद्यकीय विद्यार्थी काहीसे कमकुवत असतात. म्हणून एमबीबीएस व त्यानंतर जराही शैक्षणिक अपयश आले कि अभ्यासक्रम सोडण्याचे टोकाचे पाउल काही विद्यार्थी उचलतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व त्यातच विदर्भातील काही महाविद्यालयात रॅगींगचे  प्रमाण खूप आहे. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात एका वैद्यकीय विद्यार्थ्यांची महाविद्यालय प्रांगणात हत्या झाल्या नंतर हे विषय काहीसे पुढे आले. घरापासून लांब असलेले विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक दृष्ट्या स्थिर राहतील व त्यांना वसतिगृह, महाविद्यालय हे दुसरे घर वाटावे असे आवर्जुन प्रयत्न होत नाहीत.

                        अनेकांना आपण या अभ्यासक्रमाला का आलोय हेच माहित नसते. त्यातील काही जण पालकांच्या हट्टापायी या अभ्यासक्रमाला आलेले असतात. बर्याच जणांना हे क्षेत्र म्हणजे आर्थिक मिळकत  व सामाजिक स्थैर्याची खात्री वाटते पण या क्षेत्रात आल्यावर त्यातील संघर्ष कळतो. वैद्यकीय प्रवेश घेऊन नंतर इतर क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण ही त्यामुळे वाढले आहे. 

              पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्पर्धा पदवी परीक्षे एवढीच तीव्र आहे. तरीही तिथे ही अभ्यासक्रम सोडण्याचे प्रमाण आहे. भारतातील निवासी डॉक्टरांची काम करण्याची पद्धत जगात सर्वात सदोष व गैर व्यवस्थापनाने ग्रासलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न रुग्णालयात हजारो रुग्णांची गर्दी असते पण एका कक्षात बोटावर मोजण्या इतपत  निवासी डॉक्टरांवर सगळा भार असतो. त्यामुळे अनियमित कामाचे तास व निवासाच्या अस्वच्छ व अपुर्या सोयी ही समस्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असाध्य कॅन्सर  सारखी झाली आहे. एक आठवड्या पूर्वी आजारी असलेल्या सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा वसतिगृहातील खोलीतच मृत्यू झाला. नांदेड व ठाणे  वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू होऊनही परिस्थिती बदललेली नाही . अपुऱ्या वैद्यकीय साधनांमध्ये अपेक्षांचे ओझे झेलत होणारे पदव्युत्तर शिक्षण हे आनंदात नव्हे तर  फरफटत,  अपमान सोसत पूर्ण करण्याचे शिक्षण झाले आहे. यातून ही बरेच निवासी डॉक्टर हे तणावाखाली असतात व प्रसंगी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. काही विद्यार्थी हे शिक्षण चालू असताना इतर ठिकाणी व अभ्यासक्रमात संधी मिळाली म्हणून ही शिक्षण सोडतात. वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत अभ्यासक्रमाची लांबी जास्त असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिशी उजाडते . त्यातच लग्न व इतर कौटुंबिक जबाबदार्या राहून जातात. स्त्री डॉक्टरांसाठी तर तारुण्य, लग्नाचे वय व पदव्युत्तर  शैक्षणिक संधी हे नेमके एकाच वेळी येते म्हणून हे गणित जुळवत असताना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. 

वैद्यकीय शिक्षणात आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग शिक्षण घेत आहेत. त्यात शासकीय महाविद्यालय व खाजगी वैदकीय महाविद्यालयातील कमी फीच्या कोट्यातील विद्यार्थी हे निम्न व मध्यम वर्गातील आहेत . अभिमत व खाजगी महाविद्यालयात उच्च मध्यम वर्ग व अभिजन वर्ग शिक्षण घेतो. दुर्दैवाने असे म्हणावे लागते कि आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती शिक्षण व विद्यार्थ्यांचे मानसिक व्यवस्थापन याबाबत चिंताजनक आहे. भरघोस फी आकारणारे अभिमत विद्यापीठे व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये यांच्यावर तुलनेने फी भरणाऱ्या वर्गाचा दबाव जास्त आहे व म्हणून मुलाला सुखरूप अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व त्याला उत्तीर्ण करण्यास काळजी घेतली जाते. म्हणून शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हे तुलनेने जास्त तणावा खाली असतात . खरे तर अभ्यासक्रम सोडून जाण्याची इच्छा ही तात्कालिक असते पण काही विद्यार्थी या तणावाच्या काळात आधार न मिळाल्यामुळे अभ्यासक्रम सोडतात. बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील फार्माकोलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ पद्माकर पंडित यांनी अशा अभ्यासक्रम सोडून गेलेल्या व सोडण्याच्या बेतात असलेल्या अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना समुपदेशन व शैक्षणिक पाठबळ देऊन त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत केली. अशा मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात क्रोनिक असे म्हंटले जाते. आश्चर्य म्हणजे हेच क्रोनिक त्यांना पडत्या काळात आधार मिळाल्यास पुढे केवळ यशस्वी डॉक्टरच नाही तर प्रशासन , राजकारणा अशा अनेक क्षेत्रात नाव कमवतात. म्हणून डॉ पद्माकर पंडित यांच्या सारखे विद्यार्थ्यांना आधार देणारी बेटे ही प्रत्येक महाविद्यालयात असणे गरजेचे आहे. सैन्याच्या प्रशिक्षणात आपल्या सोबतचा जवान युद्धात जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेऊन धावण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्येकाला मानसिक आधार देण्याच साठी एक बडी जवान अर्थात मित्र ठरवून दिला जातो. आपल्या मित्र जवानाची मानसिकता ढासळत असेल तर त्वरित वरिष्ठांना सांगण्याचे आदेश दिले जातात. वैद्यकीय शिक्षणात ही सोबतचा मानसिक रित्या जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेण्याचे अर्थात आधार देण्याचे प्रशिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांना गरजेचे आहे.

जी एस वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षी ‘शिदोरी’ नावाचा उपक्रम राबवला जातो. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी दोन सिनियर विद्यार्थी व एका शिक्षका कडे दिली जाते. परदेशातील अनेक विद्यापीठात असा मेंटर – मेंटी प्रोग्राम अर्थात विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थी व शिक्षक वाटाड्या म्हणून ठरवून दिले जातात. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम कागदावरच राहतो. मानसिक समस्या हा समाजातील येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्या बर्या करण्याची, टाळण्याची जबाबदारी ही मुख्यतः वैद्यकीय क्षेत्रावरच असणार आहे. पण यासाठी आधी त्यांनी आपले विद्यार्थी तेवढे सक्षम असतील व एक ही विद्यार्थी अभ्यासक्रम सोडून जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. कणखर वैद्यकीय विद्यार्थीच कणखर समाज घडवेल.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

शस्त्रक्रिया शाखेला वळसा – डॉ.अमोल अन्नदाते

दै.महाराष्ट्र टाईम्स

शस्त्रकीया शाखेला वळसा

-डॉ.अमोल अन्नदाते

लेखक व तत्त्ववेत्ते इडेवू कोयिनिकान म्हणतात – “ देशातील तरुण काय विचार करतोय व कोणाला आदर्श म्हणून पाहतोय हे मला सांगा व त्यावरून मी त्या देशाचे भवितव्य सांगू शकतो “. त्याच धर्तीवर देशातील वैद्यकीय विद्यार्थी काय विचार करतोय हे बघा व त्यावरून वैद्यकीय क्षेत्राचे व एकूण रुग्ण सेवेच्या पुढील काही वर्षांचे भवितव्य काय असेल हा अंदाज बांधता येऊ शकेल. देशातील पहिले शंभर एमबीबीएस विद्यार्थी पदव्युत्तर शाखेसाठी कुठली शाखा निवडतात याच्या अभ्यासातून डोळ्यात अंजन घालणारी अनेक निरीक्षणे नोंदवता येतील. पहिल्या १०० पैकी बहुतांश विद्यार्थ्यांना रेडीओलॉजी , त्वचारोग ( डरमॅटॉलॉजी ) व जनरल मेडिसिन या शाखांना पसंती दिली आहे. बालरोग ( एक टक्के), जनरल सर्जरी ( चार टक्के) व स्त्रीरोग ( दोन टक्के) या शाखांकडे केवळ सात टक्के विद्यार्थी वळताना दिसत आहेत. एकेकाळी सर्वाधिक पसंतीच्या शाखा या विद्यार्थ्यांना नकोशा का वाटू लागल्या हा फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेतील बदल नसून समाजिक बदलाचा ही संकेत आहे.
सहसा समाजातील बुद्धिवान विद्यार्थ्यांचा सर्वात वरचा थर हा वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरतो. त्यातही एमबीबीएस व पदव्युत्तर जागांमध्ये एवढी तफावत आहे की पदव्युत्तर प्रवेश परीक्षा ही जवळपास युपएससी परीक्षे एवढीच तीव्र स्पर्धेची परीक्षा असते. त्यासाठी लागणारे अटेम्प्ट , शासकीय बॉंड हे पूर्ण करताना जवळपास तिशी उजाडलेली असते. शस्त्रक्रिये सारख्या शाखेत एवढ्यावर शिक्षण थांबून चालत नाही. पुढे अजून सराव व सुपर स्पेशलायजेशन करणे आवश्यक असते. एवढे संपून वयाच्या पस्तिसाव्या वर्षी प्रॅक्तीस सुरु करण्यास भांडवल अवाढव्य असते. त्यामुळे प्रचंड अंगमेहनीतीच्या या शाखांमध्ये अर्धे अधिक आयुष्य शिक्षणात खर्च होऊन हाती काय लागेल तर त्यासोबत अनिश्चितता . इमर्जन्सी , प्रचंड मेहनत असण्याचा काही प्रमणात विद्यार्थ्यांचा विचार असला तरी एवढा एकच विचार शाखा नाकारण्या मागे आहे असे नाही. कारण ३५ टक्के विद्यार्थी हे मेडिसिन शाखा निवडत आहेत ज्याठी मेहनत व इमर्जन्सी असतेच. पहिली पसंती असलेल्या रेडीओलॉजी शाखे मध्ये मात्र काही प्रमाणात रुग्णांशी कमीत कमी संवाद व ठरवलेल्या वेळेत काम संपवून घरी जाण्याची मुभा आहे. पण या शाखेत अंगमेहनत नसली तरी मेंदूची कसरत इतर सर्व शाखेच्या तुलनेत अधिक आहे जी कुठल्याही टॉपर विद्यार्थ्यला जास्त सोपी वाटते. आपल्या सोबतचे इतर शाखेतील टॉपर विद्यार्थी हे कौशल्याच्या जोरावर तिशी आधी परदेशात बंगले विकत घेताना व सुखासीन आयुष्य जगत असताना पाहून आपण किमान त्या तुलनेत सुखासीन नसले तरी आयुष्य सुकर करणारे पर्याय का निवडू नये ? हा विचार वैद्यकीय क्षेत्रात पहिल्या ५० विद्यार्थ्यांच्या मनात येणे सहाजिक आहे.


शाखा स्वीकारणे व नाकारणारण्याला वैद्यकीय क्षेत्रातील काही बदल व रुग्ण – डॉक्टर संबंधातील स्थित्यांतरे ही जबाबदार आहेत. भारत हा असंसर्गजन्य आजार म्हणजेच ह्र्दय रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब , लठ्ठपणाची जागतिक राजधानी बनत चालला आहे. देशातील दर चौथ्या व्यक्तीला या पैकी एक आजार जडला आहे. या आजारांच्या उपचारासाठी साधा बाह्यरुग्ण विभाग पुरेसा असतो. तसेच सरासरी आयुर्मान वाढल्या मुळे अतिदक्षता विभागात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ही खूप वाढले आहे. यामुळे जनरल मेडिसिन शाखेला प्रचंड मागणी आहे. रुग्णालयातील सर्व शाखा या मेडिसिन शाखे भोवती फिरतात. म्हणून या शाखेला विद्यार्थ्यांची पसंती असणे हे नैसर्गिक व गरजेचे ही आहे. १९९५ साली वैद्यकीय क्षेत्र हे ग्राहक संरक्षक कायद्याच्या कक्षेत आले. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कारणांसाठी रुग्ण डॉक्टरांना कोर्टात खेचू लागले. त्यासाठी प्रत्येक आजाराचा पुरावा असणे हे डॉक्टरांना स्वतःच्या कायदेशीर संरक्षणासाठी गरजेचे वाटू लागले . त्यासाठी प्रत्येक रुग्णाचा आजार सिद्ध करण्यासाठी रेडीओलॉजिस्टची गरज भासू लागली. अर्थात कायदेशीर संरक्षणापलीकडे लवकर निदान होऊन योग्य उपचार देण्यास ही या शाखेची उपयुक्तता आहेच. त्यातही या शाखेत तंत्रज्ञान इतके प्रगत आहे कि एका मिलीमीटरच्या थरातील बदल ही सोनोग्राफी , सिटी स्कॅन व एमआरआय मशीन टिपू शकतात. त्यातच सिटी व एमआरआय चे रिपोर्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जगात कुठेही बसून रिपोर्ट करू शकतात.

एवढ्या सर्व बाजूने फुलून आलेल्या शाखे कडे गुणवत्ता आकर्षित न झाली असती तरच नवल होते. पण या शाखेचे काही सुप्त दोष अजून ही शाखा निवडणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेले नाही . ही शाखे एखाद्या गर्भ श्रीमंत घरातील जन्माला आलेल्या टॉपर विद्यार्थ्या साठी आदर्श आहे पण हलाखीत शिक्षण पूर्ण केलेल्या टॉपरला या शाखेत तग धरणे वाटते तितके सोपे नाही. कारण सोनोग्राफी सोडले तरी सिटी व एमआरआय मशीन्स या पांढऱ्या हत्ती प्रमाणे असतात व गुंतवणूक – मिळकत गणित जुळवणे हे खूप जिकीरीचे आहे. त्यातच या शाखेत रुग्ण रेफर करणारे डॉक्टर हेच तुमचे भवितव्य ठरवतात म्हणून तुम्ही किती ही हुशार असला तरी व्यवसायिक दृष्ट्या तुम्ही परावलंबी असता. रेफर करणाऱ्या डॉक्टरांची मर्जी सांभाळणे , गुंतवणूक ही व्यावसायिक कसरत जमली नाही तर कुठल्याशा कॉर्पोरेट रुग्णालयात नोकरी करण्यावाचून पर्याय नसतो. त्वचारोग व त्यातच कोस्मेटॉलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्र ही शाखा गेल्या दोन दशकात आर्थिक दृष्ट्या सर्वात समृद्ध शाखा झाली आहे. यासाठी समाजातील एक मोठा बदल जबाबदार आहे. आज जिथे पाणी , रस्ते , वीज नाही अशा अगदी डोंगराच्या टोकावर असलेल्या छोट्या टपरी वर दोन गोष्टी आवर्जुन मिळतात. बिस्कीटचा पुडा आणि गोरे करणारे फेअरनेस क्रीम. गोरे, सुंदर , छान दिसण्याच्या आंतरिक भावनेने आर्थिक स्तिथी , वय , धर्म, लिंग , प्रदेश या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत . म्हणून आज अगदी ग्रामीण भागातही सर्वधिक गर्दी असते ती कोस्मेटॉलॉजीस्ट च्या बाह्यरुग्ण विभागात. आपण जे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही म्हणून शक्य नसलेल्या परफेक्ट लुक मध्ये स्वतःला बसवण्याची समाजातील घुसमट यातून अधोरेखित होते. लेझर तंत्रज्ञानातील मोठ्या बदला मुळे आज कोस्मेटॉलॉजीस्ट साठी या लेझर मशीन्स कामधेनु व कल्पवृकक्षाचे काम करत आहेत.


शास्त्रक्रिया व स्त्रीरोग या शाखा दिवसेंदिवस कायदेशीर दृष्ट्या जोखमीच्या झाल्या आहेत. यात प्रसिद्धी व पैसे तसे पहायला गेल्यास इतर शाखांपेक्षा जास्त आहे. पण या शाखेमध्ये रुग्णांच्या जीवाला धोका व अनिश्चीतता सर्वाधिक आहे. एकही छोटीशी चूक किंवा अति रक्तस्त्रावामुळे माता मृत्यूची एक केस तुमचे पूर्ण आयुष्य व करिअर बेचिराख करू शकतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शस्त्रक्रियेत अनिश्चितता जास्त असल्याने हल्ल्यांचे प्रमाण या क्षेत्रात वाढले आहे. त्यामुळे रूग्णासोबत स्वतः चा जीव वाचवणे ही डॉक्टरांना गरजेचे वाटू लागले आहे. त्यामुळे जास्त जोखमीच्या शस्त्रक्रिया निगडीत शाखा नकोच हा विचार जोर धरतो आहे.
या सगळ्या ट्रेंड्स मध्ये बालरोग शाखेकडे न वळण्याचे कारण म्हणजे बहुतांश डॉक्टर हे शहरी भागात स्थायिक होतात व शहरांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे या शाखेत काम कमी झाले आहे व बालरोगतज्ञांची संख्या ही वाढली आहे. ग्रामीण भागात मात्र बालरोग क्षेत्रातील समस्या, बालमृत्यूचे प्रमाण खूप आहे. म्हणून या शाखेकडे डॉक्टरांचे न वळणे व त्यातच ग्रामीण भागात न येणे ही सामाजिक समस्या आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे आरोग्य विभागात व शासकीय सेवेत बालरोगतज्ञांच्या जागा रिक्त असून व त्यांची गरज असून ही शासन त्यांना चांगला मोबदला देण्यास उदासीन आहे. ग्रामीण भागात हिच समस्या स्त्रीरोग तज्ञांच्या बाबतीत आहे. कुठल्या ही राष्ट्राच्या प्रगतीचे मापक हे दर डोई उत्पन्न नसते तर त्या राष्ट्राचा माता मृत्यू व बाल मृत्यू दर असतो. व याच शाखांकडे जर डॉक्टर वळत नसतील तर सर्व दोष डॉक्टरांवर न ढकलता यावर सामाजिक संशोधन होणे गरजेचे आहे.


शस्त्रक्रिया व बालरोगशाखेकडे पहिले येणारे विद्यार्थी वळत नाहीत म्हणजे या जागा अगदी रिकाम्या जात आहेत असेही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील क्रीम व हुशार विद्यार्थी या शाखेकडे वळत नाही व या शाखांकडे एकेकाळी असणारा ओढा ओसरत चालला आहे असा त्याचा अर्थ आहे. शस्त्रक्रियाच कशाला पण मानसशास्त्र , कर्करोग, लहान मुलांच्या मानसिक समस्या, अॉर्थोपेडिक अशा अनेक शाखा आहेत ज्यांची गरज वाढत जाणार आहे. शाखा निवडीचे पर्याय हे वैद्यकीय क्षेत्रात दर ३० वर्षांनी बदलत असतात. कारण दर तीन दशकांनी समाजात ही वैचारिक स्थित्यंतर घडत असते. शेवटी वैद्यकीय विद्यार्थी याच समाजातून आले आहेत व पुढे काय घडणार याचा अंदाज बांधून विद्यार्थी हा निर्णय घेतात. ग्रामीण – शहरी विकासाची दरी व समाजात बुद्धिवंतांना मिळणारी वागणूक याचा ही शाखा निवडीशी थेट संबंध आहे. यश तुम्हाला बरेच काही देते पण त्याची पुरपूर किंमत वसूल ही करते असे म्हंटले जाते. कदाचित याचा ताळेबंद वैद्यकीय विद्यार्थीही बांधत असावेत. एका बौद्धिक वर्गाने समाजिक समस्या समोर ठेवून त्याग करावा व आपल्या करिअरचे निर्णय घ्यावे हा विचार आजच्या काळासाठी अति आदर्शवादी आहे. आजची पिढी त्यागाच्या रोमँटीसिझम मध्ये जगून करिअरचे भावनिक निर्णय घेणारी नाही. त्याग करायचा असेल सोपा व मोबदला देणारा वाटावा असे बदल समाज व धोरण आखणाऱ्यांना करावे लागतील. आता होणारे बदल त्याचेच निदर्शक आहेत.

  • डॉ अमोल अन्नदाते
    dramolannadate@gmail.com
    www.amolannadate.com