कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी

कलम १४४ संसर्ग रोखण्यासाठी काळजी

कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी –

१. जीवनावश्यक वस्तू आणायला बाहेर जाण्यापेक्षा ते १० घरांनी एक यादी करून एकाच प्रतिनिधी ने त्या वस्तू आणाव्या. २. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला नसावा. ३. बाहेर जाणाऱ्या व्यक्तीने सामान आणायला गेल्यावर १ मीटर पेक्षा जास्त अंतरावरून बोलावे व व्यवहार करावा. ४. नोटा, नाणी, पैसे हे अशा वेळी संसर्गाची महत्वाची वाहन असतात . म्हणून दुकानात पैसे देऊन झाल्यावर लगेचच हात धुवून घ्यावे. ५. परत घरात येताना घरा बाहेरच हात, पाय धुवूनच घरात यावे.

https://www.youtube.com/watch?v=YHBY4FWQTrw
Effective Hand Washing Techniques by Dr. Amol Annadate

६. बाहेर जाल तेव्हा शक्यतो इकडे तिकडे हात अनावश्यक हात लावणे टाळावे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

७. या काळात कुठल्याही औषधाचा साठा करू नये कारण औषधे उपलब्ध राहणार आहेत. ८. बाहेरून आल्यावर आपला मोबाईल स्पिरीट / हँड व कापसाचा वापर करून स्वच्छ करावा. ९. बाहेर जाण्यासाठीचे कपडे शक्यतो वेगळे ठेवावे आणी बाहेर जाऊन आले कि आल्या आल्या पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवावे. १०. फक्त जीवनावश्यक सेवा देणाऱ्यांनी व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच बाहेर पडावे, इतर कुठल्या ही कारणाने बाहेर पडू नये. ११. जीवनावश्यक सेवेतील ताप, खोकला असणाऱ्यांनी बाहेर पडू नये. १२. कलम 144 संसर्ग रोखण्यासाठी काळजी आपल्या सोसायटीत किंवा शेजारी कोणी एकटे वृध्द व्यक्ती राहात असतील व त्यांच्या कडे येणारे स्वयंपाकी व इतर सेवा देणारे येणार नसतील तर त्यांची काळजी घ्या व त्यांना तब्येतीचा त्रास असल्यास मदत करा.

Watch Amol Annadate Interviews on CoronaVirus Prevention and Care

https://www.youtube.com/playlist?list=PL9bO6h-fFoNgMdrfWBGtXtP0uLD3KC5yl
Amol Annadate’s videos on CORONAVIRUS Disease in India COVID-19

हात धुण्याचे नियम

हात धुण्याचे नियम

हात धुण्याचे नियम सध्या हात धुणे हे कोरोना टाळण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे. वारंवार हात धुवावे म्हणजे नेमके किती वेळा धुवावे व कसे धुवावे हे समजून घेतले पाहिजे. हात धुण्यासाठी साबण आणि पाणी पुरेसे आहे. त्यासाठी हँड सॅनीटायझर किंवा अल्कोहोल बेस्ड सॅनीटायझरची मुळीच गरज नाही.

त्यातच लिक्विड सोप असल्यास बरे पण नसल्यास साधा साबण ही पुरे. याउलट असे काही विषाणू आहेत जे साबण आणि पाण्याने प्रभावी पणे हातावर निष्प्रभ होतात पण सॅनीटायझरने होत नाहीत. हात कसे धुवावे यासाठी आदर्श ७ स्टेप्स आहेत. त्या नेमक्या काय आहेत हे खाली क्युआर कोड स्कॅन करून व्हिडीओ मध्ये बघता येतील. या सगळ्या स्टेप्स पूर्ण करायला किमान १ मिनिट लागायला हवा. हात धुताना प्रत्येक वेळेला ते एकमेकांवर घासले जाणे महत्वाचे असते. शक्य असल्यास हात धुवून झाल्यावर नळ त्याच धुतलेल्या हाताने नव्हे तर कोपराने बंद करावा. हात धुतल्यावर तो स्वच्छ नॅपकीन ला पुसावा. घरात प्रत्येकाचा शक्यतो वेगळा छोटा नॅपकीन ठेवावा. रोज तो गरम पाण्यात ठेवून, पिळून वळवायला ठेवावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

हात धुण्याचे नियम समजून घेणे महत्वाचे आहे हात बाहेर जाऊन आले तेव्हा, घरात एखादी नवीन व्यक्ती येऊन गेली असल्यास, जेवणा आधी व शौचानंतर धुवायचे आहेत. अगदी घरात असताना दर अर्ध्या एक तासाला हात धुण्याचीही गरज नाही. तसेच हात धुवून झाल्यावर जिथे शक्य आहे तिथे हाता ऐवजी कोपराचा वापर करावा, उदाहरणार्थ दरवाजा ढकलणे, लाईट चालू , बंद करणे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ अजून तरी मास्क हा ज्यांना काही त्रास नाही त्यांना वापरण्याची गरज नाही. मास्कचा वापर हा सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्तीला काही होऊ नये म्हणून नाही तर आजारी व्यक्ती कडून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून आहे. मास्क फक्त खालील लोकांनीच वापरायचा आहे


– जे कोरोना पाॅजिटिव्ह आहेत. – जे अशा निदान निश्चित झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत व ज्यांना होम क्वारंटाइन चा सल्ला दिला आहे.- ज्यांना सर्दी खोकला आहे. – अशा रुग्णांचे उपचार करणारे व त्यांच्या संपर्कात असणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ अशा मास्कची गरज असणाऱ्यांना घालताना त्याच्या बाजूला दोरीने धरून घालावा व काढताना मध्ये हात न लावता काढावा. घातलेला मास्क काढल्यावर इतरत्र कुठे ही टाकू नये व मुलांनी त्याला हात लावू नये याची काळजी घ्यावी. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलला पाहिजे. त्यानंतर मास्क ब्लिचिंग सोल्युशन मध्ये थोडा वेळ ठेवून थोड्या वेळाने जाळावा किंवा पुरावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा


सध्या मास्क हँकरचीप यांचा गोंधळ सुरु आहे बाजारात उपलब्ध असलेले कॉटन चे मास्क, साधे मास्क व तोंडाला लावलेला हातरुमाल हा काहीही उपयोगाचा नाही. जो मास्क तीन पदरांचा म्हणजे तीन लेयर्स चा असतो तोच उपयोगाचा असतो. सध्या रस्त्यावर एक पदरी मास्क विकले जाऊन खूप लोकांची फसवणूक होते आहे. हे मास्क विकत घेऊ नये. बरेच जन कपड्याचे मास्क वापरून ते रोज धुऊन वापरत आहेत. हे चुकीचे आहे व उपयोगाचे नाही. – अनेक जन एन ९५ मास्क मिळवण्यासाठी ही धडपडत आहेत. पण हा फक्त डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ साठीच गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

होम क्वारंटाइन म्हणजे काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय? कोरोना व्हायरस च्या साथीमध्ये सध्या अनेकांना होम क्वारंटाइन सांगून ही ते दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत. ज्यांना हा सल्ला दिला आहे त्यांनी होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी पुढील गोष्टी करायच्या आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

– शक्यतो वेगळी शौचालयाची सोय असलेल्या आणि वाऱ्याचे चांगले सर्क्युलेशन असलेल्या रूममध्ये राहणे व कुटुंबातील इतर सदस्यांना न भेटणे. – इतर सदस्यांना त्याच खोलीत राहणे आवश्यक असल्यास त्यांच्या पासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवणे व त्यांना स्पर्श न करणे. – होम क्वारंटाइन मध्ये असेलेल्या व्यक्तीचे जेवणाचे भांडे, कपडे वेगळे ठेवणे व वेगळे धुणे. – ६० वर्षा पेक्षा जास्त वय, कुठल्याही वयाची मधुमेह, डायबेटीस चे रुग्ण, लहान मुले, गरोदर माता यांच्याशी या व्यक्तीचा थेट संपर्क यायला नकोच. – घराचा उंबरठा हा १४ दिवस ओलांडायचा नाही. – कुठे ही हात लागल्यास लिक्विड सोप / साबण व पाण्याने हात धुवावे. – पूर्णवेळ मास्क वापरावा व तो दर ६ तासाने बदलावा. जुना मास्क ५ % ब्लिचिंग सोल्युशन मध्ये टाकून नंतर जाळावा किंवा जमिनीखाली पुरावा. मास्क जळताना काळजी घ्यावी. – ताप, खोकला अशी कुठलीही लक्षणे दिसल्यास सरकारी यंत्रणेशी संपर्क करावा. – होम क्वारंटाइन मध्ये असलेल्या व्यक्तीला जेवण देणे किंवा इतर गोष्टी देण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीने पार पाडावी. – या व्यक्तीला जेवण किंवा इतर गोष्टी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, ग्लोज घालावे. – या घरात शक्यतो एकाही बाहेरच्या व्यक्तीला येऊ देऊ नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ

कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आता आलीये.

मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोना साथीच्या नियोजनाविषयी व उपाययोजनांविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांचे दै. लोकमत मधील खुले मा. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी कृपया ते पत्र जास्तीत जास्त शेअर करा.

प्रती,
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि
आरोग्यमंत्री राजेश टोपे,

कोरोना विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ ती हीच!

राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची व मृतांची संख्या वाढत असताना आता २६/११ च्या हल्ल्या प्रमाणे ही स्थिती आहे. त्यासाठी आपण दोघे प्रयत्नशील आहातच. पण तरीही कोरोनाला सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आम्ही अनेक वर्षे शिकत, वैद्यकीय अभ्यासक्रमात वाचत आलेल्या गोष्टी ग्रास रूटला तशा राबवलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवून त्यावर एका दिवसाचा ही विलंब न होता अमलबजावणी झाली तरच आपण येत्या दोन आठवड्यात या साथीच्या तिसऱ्या स्टेजला रोखू शकतो. नंतर जर ग्रामीण भागात ही साथ पसरली तर मोठा अनर्थ होऊ शकतो. तसेच या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी चीन, कोरिया, सिंगापूर मॉडेल चा अभ्यास करून यातील प्रत्येकाच्या चांगल्या उपायांची गोळाबेरीज महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या केस ट्रेसिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन व क्वारंटाइन या चार शब्दांभोवती सगळी यंत्रणा प्रत्येक मिनिटा गणिक हलली पाहिजे. पण असे कुठे ही होताना दिसत नाही. आयसोलेशन कक्षांची संख्या अजून ही खूप कमी आहे. तालुका पातळीवरून रुग्ण सापडल्यास तो नेमका कसा व कोणी जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जायचा याचे कुठले ही नियोजन अजून दिसत नाही. कुठल्या ही वयक्तिक सुरक्षेच्या साधना शिवाय रुग्ण नेणाऱ्या ड्रायव्हरलाच लागण झाल्याची उदाहरण समोर आहे. संशयित रुग्णाला प्रवास करत नेणेही मोठे जोखमीचे ठरणार आहे. म्हणून प्रत्येक तालुक्याला एक आयसोलेशन कक्ष तातडीने उभा करावा लागणार आहे. आयसोलेश साठी १०० खाटा तयार आहेत या गोष्टींना काही अर्थ नाही. फक्त आयसोलेशन कक्ष असे कुठल्या ही कक्षाला पाटी लावून तो तयार होणार नाही. हा कक्ष कसा असला पाहिजे व यातील ७ महत्वाची मार्गदर्शक तत्वे कुठली याचा अभ्यास होऊन त्या होत आहेत की नाही याचे व्हिडीओ प्रुफ मुख्य सचिव, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांनी रोज तपासले तरच यंत्रणा हलेल. ग्रामीण भागात रुग्ण स्वतः उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉजिटिव्ह व रुग्णाशी संपर्क आल्याचे सांगून ही त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची चिठ्ठी देऊन पाठवले जात आहे. अजूनही परदेशी प्रवाशांचे वर्गीकरण व स्क्रिनिंग बाबत गोंधळ सुरूच आहे. अशाने परदेशातून येणाऱ्या इंडेक्स केसेस कशा रोखल्या जाणार. तसेच यांच्या बॅग्स चे निर्जंतुकीकरणही अजूनही विमानतळावर होत नाही. औरंगाबाद ला एका रशियन प्राध्यापिका कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे समजून ही तिने दिवसभर परीक्षा घेतलेल्या विद्यार्थ्यांना काही तास एकत्र ठेवून, त्यातील तीन चार जणांचे स्वॅब घेऊन या विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले. अशी अनेक अनागोंदीचे प्रकार रोज घडत आहेत.मुळात होम क्वारंटाइन हा शब्द आपला सर्वांचा मोठा घात करणार आहे हे समजून घेतले पाहिजे. हातावर शिक्के मारून लोक स्वतःच्या घरी स्वयंप्रेरणेने एका खोलीत १४ दिवस राहतील हे अशक्य आहे. म्हणून आताच्या घडीला क्वारंटाइन साठी मुंबईत ओसाड व रिकामी असलेली सर्व कामगार हॉस्पिटल, सर्व शासकीय गेस्ट हाउस, ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, गरज असल्यास खाजगी दवाखाने व अगदी या पुढे जाऊन मुंबईतील ७२००० रिकामे फ्लॅट, या पलीकडे जाऊन इतर भागातील हॉटेल्स अशी एक क्वारंटाइन साठी मोठी व्यवस्था आपण निर्माण केली व अति सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक केसच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस क्वारंटाइन केले तरच या घडीला केसेस व मृतांची संख्या कमी होईल. हे आपल्याला फार काळ नाही तर फक्त पुढील दोनच आठवडे करायचे आहे. मुख्यमंत्री येतात तेव्हा रात्रीतून रस्ते आणी हेलीपॅड तयार होतात मग या सुविधा यंत्रणेने मनावर घेतले तर या कुठल्या ही विलंबा शिवाय का उभ्या राहू शकत नाहीत. यात कुठे ही चीनने १० दिवसात ४५०० खाटांचे रुग्णालय बांधले तसे करायचे नाही तर शासनाच्याच तयार वास्तूंमध्ये नियोजन करून त्या कार्यरत करायच्या आहेत.

पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, कोरोना व्हायरस विरोधात चाबूक हातात घेण्याची वेळ आली आहे , केरळ या राज्याने प्रत्येक पॉजिटिव्ह रुग्णाच्या दर तासाच्या प्रवासाचे मॅपींग केले व सर्व संपर्कात आलेल्यांची पूर्ण माहिती मिळवली. हीच तत्परता आपल्याकडे आणावी लागणार आहे. होम क्वारंटाइन सध्या तरी अपयशी होताना दिसत असले तरी ते करयचे असल्यास फक्त हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून हे साध्य होणार नाही. त्यांना यंत्रणेने घरी सोडून त्यांच्यावर जीपीएस द्वारे निगराणी ठेवण्यासाठी गृह विभागाची यंत्रणा कामाला लावावी लागेल. यासाठी सिंगापूर मॉडेलचा अभ्यास करून त्याची पूर्ण नक्कल केली तरी यश येईल. २८ फेब्रुवारी रोजी लॅन्सॅटने लक्षणांनंतर जितक्या लवकर आयसोलेश व तातडीने संपर्कात आलेल्यांचे क्वारंटाइन तितके प्रभावी साथ नियंत्रण हे इतर देशांच्या अनुभवा वरून सांगितले आहे. दक्षिण कोरियाने जास्तीत संशयितांच्या तपासण्या व युध्द पातळीवर आदर्श व्यवस्थेत आयसोलेशन, क्वारंटाइनकवर ( होम क्वारंटाइन नाही ) हे प्रारूप राबवले व साथ नियंत्रित करून मृत्यू दर ०.२ टक्के इतका कमी ठेवला.

आताच्या घडीला ही साथ पसरण्याचे A,B,C,D चेन समजली तर सगळ्या उपाय योजनांचे नियोजन सोपे जाईल पण हे आपण दोघां पर्यंत कदाचित पोचतच नाही आहे. म्हणून प्राधान्य कशाला द्यावे या विषयी सर्व यंत्रणेचा गोंधळ उडालेला आहे. आपण जाहीर केलेले कोरोना साथीचे ४५ कोटी अजून पोहोचलेलेच नाही. त्याचा खर्च कसा करायचा याचे कुठले ही सूक्ष्म नियोजन जिल्हा पातळीवर झालेले नाही. उपजिल्हा रुग्णालयांना दीड दोन लाखांपर्यंत हवी ती खरेदी करा असे संदेश केवळ पोहोचले आहेत . यात त्याच त्या सर्वसामन्यांच्या सूचनांचे बोर्ड लावण्यात हा निधी वाया जाण्याची दाट शक्यता आहे. केस ट्रेसिंग व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे करायचे याचे प्रशिक्षण अजून नाही, आशा सेविका, हेल्थ वर्कर्सला आपली काय भूमिका असेल या बाबत काहीही माहिती नाही. सरकारी रुग्णालयात डॉक्टरांना रुग्ण तपासताना वापरायचे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट पोहोचण्याची अजून लक्षणे दिसत नाहीत.

लोकसंख्येच्या प्रमाणात व सर्वाधिक केसेस असून ही आपल्या राज्याची टेस्टिंग क्षमता खूप कमी आहे. तसेच टेस्टिंग साठी परदेश प्रवास व कोविड पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

पॉजिटिव्ह शी संपर्क एवढा मर्यादित निकष ठेऊन आता चालणार नाही व तो विस्तारीत करावा लागणार आहे. टेस्टिंग सेन्टर्स वाढवणे हे केंद्राच्या अखत्यारीत असले तरी सर्वाधिक केसेस असल्याचे कारण सांगत केंद्राला टेस्टिंग सेन्टर्स साठी सतत तगादा करून एका आठवडा थांबणे ही या घडीला संकटात भर घालणारे ठरणार आहे. पॉजिटिव्ह रुग्ण व गंभीर रुग्णांसाठी उद्या वेन्टीलेटर्स चा ही मोठा तुटवडा जाणवणार आहे. तसेच सध्या दाखल असलेल्या पॉजिटिव्ह रुग्णांवर इतर देशात नेमके काय उपचार केले जात आहेत ही माहिती घेऊन त्या प्रमाणे उपचारात कुठलेही अपग्रेडेशन दिसत नाही. क्लोरोक्वीन, जिंक, हाय डोस विटामिन सी सारखे उपचार परदेशात यशस्वी होताना दिसत आहेत व आपल्या पेक्षा मोठ्या संकटात असून ही ते उत्तम पुरावे व उपचाराच्या आधारा साठी डेटा जगाला देताना दिसत आहेत. आपल्या यंत्रणेला मात्र याचे कुठले ही सोयरसुतक नाही.

निवडणुकीच्या प्रचारात जसे घरो घरी जाऊन प्रचार होतो त्या पद्धतीने केसेस शोधणे व सरकार स्थापने साठी गतीने हालचाली होतात तशाच आयसोलेशन व क्वारंटाइन ची सोय उभारणे या क्षणाला गरजेचे आहे. आपण प्रयत्न करतच आहात व छत्रपती शिवाजींचे मावळे म्हणत आपण सगळ्यांचे मनोबल ही वाढवले. पण आदरणीय मुख्यमंत्री, शिवाजी महाराजांप्रमाणे आता मावळ्यांना वाचवण्यासाठी आपणच तलवार उपसून कोरोना व्हायरस विरोधात, या युद्धात उतरून सूक्ष्म नियोजन करण्याची ही वेळ आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय?

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय

सोशल डीस्टन्सिंग म्हणजे नेमके काय? सध्या आपण कोरोनाच्या स्टेज २ मध्ये म्हणजे जिथे एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो अशा स्टेज मध्ये आहोत. या घडीला आपल्याला स्टेज ३ मध्ये जायचे नसेल तर सोशल डीस्टन्सिंग म्हणजे काय हे समजून ती पार पाडणे समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे गरज नसताना घराबाहेर न जाणे आणि उगीचच प्रवास न करणे. जर कामावर जायचे असेल तर ठीक आहे पण मौज म्हणून बागेत, हॉटेल मध्ये जायचे नाही. बाहेर जायचे असल्यास अगदीच गरजेचे आहे आणि तेव्हा ही एखाद्याच व्यक्तीने बाहेर जाणे. शक्यतो २० पेक्षा जास्त लोक एका खोलीत एकत्र येणार नाहीत याची काळजी घेणे. मोठे समारंभ, कार्यक्रम हे टाळावे व शक्यतो आयोजन केले असल्यास रद्द करावे. येत्या दोन आठवड्यात पाहुणे म्हणून कोणाकडे जाऊ नका आणि कोणी पाहुणे उगीचच येणार असतील तर त्यांना प्रेमाने नकार देत सध्या सोशल डीस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

बाहेर जाण्याची गरज पडल्यास इतरांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर राखा. घरात वावरताना ही शक्यतो एकमेकांपासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवा. हात मिळवण्याऐवजी नमस्कार करावा. लिफ्ट मध्ये किंवा इतरत्र एकमेकांकडे तोंड करून उभे राहण्यापेक्षा एकमेकांकडे पाठ करून उभे राहावे. या काळात आपण काय करू शकता तर सकाळी मोकळ्या हवेत चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जाऊ शकता. किंवा घराच्या छतावर फिरायला जाऊ शकता.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता


COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID-19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स

१. आपली झोप ही प्रतिकारशक्ती साठी महत्वाची असते. म्हणून रोज ७ ते ८ तास शांत झोप खूप महत्वाची आहे.
२. आहारामध्ये विटामिन सी युक्त सिट्रस फळे म्हणजे लिंबू , मोसंबी, संत्रे, आवळा, टमाटे यांचा समावेश करा.
३. प्रथिने युक्त आहार प्रतिकारशक्ती साठी गरजेचा असतो. त्यामुळे नाष्ट्या मध्ये मोड आलेले कडधान्य, जेवणात डाळी, सोयाबीन, नाचणीची भाकरी याचा समावेश करावा.
४. सूर्यप्रकाशातून मिळणारे ‘ड’ जीवनसत्व प्रतिकारशक्ती वाढवते. घरात राहयचे असले तरी सकाळी घराच्या छतावर थोडा वेळ ध्यान केल्यास ‘ड’ जीवन सत्व मिळेल व ताणतणाव कमी होईल .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

५. रोजच्या आहारात एखाद फळ आणि भाज्या असायला हव्या.
६. आपल्या आतड्यातील बॅक्टेरिया खूप महत्वाचे असतात. यासाठी आहारात दही, ताकाचा समावेश करा. पण दही, ताक रात्रीच्या जेवणात नको.
७. चहा मध्ये अद्रक आणि जेवणात अधून मधून लसुनाचा वापर करा.
८. जास्त ताण घेतल्याने प्रतिकारशक्ती वर त्याचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे भीतीच्या छायेत राहू नका.
९. व्यायाम, योग, प्राणायाम किंवा चालण्याचा व्यायाम रोज अर्धा तास तरी करा.
१०. शरीरातील पाण्याची पातळी प्रतिकारशक्तीसाठी महत्वाची आहे त्यामुळे रोज तहान लागल्यावर आणि किमान ६ ते ८ ग्लास पाणी प्यायला हव.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

मुलांना कोरोना झाला तर काय?

मुलांना कोरोना झाला तर

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरु असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय? तो मुलांमध्ये टाळायचा कसा? आणि मुलांना कोरोना झाला तर काय हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. कोरोनाच्या बाबतीत एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की लहान मुलांना याचा धोखा कमी आहे. लहान मुलांना कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो. पण लहान मुलांमध्ये याची लक्षणे ही सौम्य स्वरुपाची आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

ताप, कोरडा खोकला, काही प्रमाणात सर्दी एवढीच फ्लू सारखी लक्षणे कोरोना व्हायरस COVID-19 मध्येही लहान मुलांमध्ये दिसू शकतात. याची तीव्रता मोठ्या व्यक्तीं एवढी नाही. अगदी तुरळक स्वरूपाचा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच सर्व वयोगटा मध्ये लहान मुलांमध्ये हा मृत्युदर कमी म्हणजे ०.२ टक्के इतकाच आहे. तो ही कुपोषित, ह्र्दय रोग, जन्मजात फुफुसाचा आजार अशा लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरस टाळण्यासाठी काय करता येईल? जर घरात किव्हा आजूबाजूला कोरोना व्हायरस चा रुग्ण असेल तर मुलांना कोरोना व्हायरस च्या रूग्णापासून लांब ठेवावे. ३१ मार्च पर्यंत सर्व शाळा बंद असे पर्यंत शाळेत पाठवू नये. त्यानंतर शाळा सुरु झाल्यावर मुलाला खोकला व ताप असल्यास आठवडा भर शाळेत पाठवू नये. कोरोना टाळण्याचा सर्वोत्तम उपाय हा हात धुणे आहे. त्यासाठी साबण व पाण्याचा वापर करावा. लहान मुलांसाठी अल्कोहोल युक्त हँन्ड सॅनीटायझर वापरू नये. मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवावी.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

देशभरातील व राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुढील काही काळ न घाबरता सतर्क मात्र राहावे लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे, पण या उपायांच्या प्रचारापलीकडे आता शासनालाही महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. आता पर्यंत परदेशातील ज्या देशांनी कोरोनाचा सामना केला त्यात सिंगापूर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशातील कोरोनाच्या उपायांचे प्रारूप हे सध्या आदर्श व अभ्यासण्याजोगे आहे. खरेतर आपण ही तयारी चीन मधून इतर देशांत साथ पसरली तेव्हाच करायला हवी होती. कोरिया आणि सिंगापूर या देशांनी पहिला रूग्ण निश्चित होण्याअगोदरच प्रत्येक शहरात स्क्रीनिंग व निदान करण्यासाठी मुबलक प्रमाणात डायग्नोस्टीक किट्स उपलब्ध करून दिल्या. एवढेच नव्हे तर ट्रॅवल थ्रू म्हणजे गाड्या थांबतात तिथेही तुम्हाला तातडीने करोनाची चाचणी करण्याची सोय होती.

कोरोना प्रतिबंध आणि शासन- आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आधीच गाळात असताना एवढी मोठी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण सध्या असलेली कोरोना तपासणी केंद्रे आणि आयसोलेशन वॉर्ड्स कमी पडण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबई शहरासाठी कस्तुरबा रूग्णालयातील ५८ खाटा व इतर ३० खाटाही खूपच कमी आहेत. राज्यात ३९ ठिकाणी असलेले आयसोलेशन कक्ष ही अपुरे आहे व संख्या वाढवण्याची गरज आहे, कारण कोरोना बाधितांची संख्या अचानक वाढू शकते. आयसोलेशन वॉर्ड नेमका कसा असला पाहिजे याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही गरजेचा आहे. अगदीच प्रत्येक वॉर्ड वातानुकुलीत असण्याच्या आदर्श व्यवस्थेची अपेक्षा आधीच मोडकळीला आलेल्या आणि अनेक आजारांचा ताण असलेल्या आरोग्य व्यवस्थेकडून करता येणार नाही. पण किमान दोन बेड मधील १ मीटरचे अंतर , दोन बेड मध्ये पार्टीशन नाही तर किमान स्क्रीनने त्यांचे विलगीकरण, प्रत्येक रुग्णाला तपासताना डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफसाठी वेगळे प्रतिबंधक साहित्य, रुग्णाचा केसपेपर वॉर्डच्या बाहेर ठेवणे या प्राथमिक मार्गदर्शक तत्वांचा अवलंब होणे आवश्यक आहे. तसेच या आयसोलेशन वॉर्ड मध्ये कार्यरत असणाऱ्यांचे या विषयी प्रशिक्षणही गरजेचे आहे. ज्यांचे निदान निश्चित झाले आहे त्यांच्यासाठी आयसोलेशन व ज्यांचा अशा रुग्णांशी संपर्क आलाय पण अजून काही त्रास नाही व निदानही निश्चित नाही अशांसाठी विलगीकरणाचाही (क्वारनटाइन) गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. आयसोलेशन व क्वारानटाइन या दोन्हीसाठी एकच वॉर्डच नव्हे तर एकच रुग्णालय वापरणेही घातक ठरू शकते. ‘होम क्वारनटाइन’ म्हणजे संपर्क असलेल्यांनी घरीच थांबा हे सांगितले जात असले तरी यावर कोणाचेही नियंत्रण नाही. म्हणून साथ पसरण्याआधीच विलगीकरणासाठी वेगळी समांतर यंत्रणा निर्माण करता येते का याचा विचार होणे गरजेचे आहे. आयसोलेशन किती दिवसांसाठी आवश्यक आहे यावरही तज्ज्ञांचे मत घेऊन शासनाने निर्णय घ्यायला हवा. परदेशातील अभ्यासानुसार कोरोनाचे रुग्ण श्वासाद्वारे ३० दिवसांपर्यंत आणी सरासरी २० दिवसांपर्यंत विषाणू सोडत होते. सध्या आयसोलेशन १४ दिवसांचे आहे ते २० दिवसांचे तरी करायला हवे. हे सगळे आता साथीच्या सुरुवातीच्या पातळीवरच गरजेचे व शक्यही आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना प्रतिबंध आणि शासन -किती रूग्ण सापडेस्तोवर नेमक्या कुठल्या उपाय योजनांना प्राधान्य व भर द्यायचा या विषयी शासन सध्या गोंधळून गेलेले दिसते आहे. दक्षिण कोरियाने ‘स्क्रीन, टेस्ट, ट्रीट आणि आयसोलेट’ या चार गोष्टींवर एक महिना पूर्ण भर दिला व देशातील आधीच सज्ज असलेल्या आरोग्य यंत्रणेने एका दिवसात २५,००० तपासण्या आणि किमान ६ व कमाल २४ तासात टेस्टचा रिपोर्ट हा नियम पाळला. आज महाराष्ट्रात केवळ तीन ठिकाणीच तपासणीची सोय आहे, उद्या ग्रामीण भागात ही साथ पसरली तर तेथील डॉक्टरांनी या रुग्णाला आयसोलेशनसाठी नेमके कुठे पाठवायचे याची निट माहिती कोणालाही नाही. तालुका पातळीवर जिथे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे आयसोलेशन वॉर्ड व किमान प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रक्त तपासणी करून निदान निश्चित करण्याची सोय करण्याची हीच वेळ आहे. साथ पसरली तर सगळ्यात मोठी समस्या ही असेल की सर्दी , खोकला , ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाला मला कोरोना झालाय का हे तपासून पाहण्याचा आग्रह होणार आहे. यासाठी सर्वसामान्यांनी ही गोष्ट समजून घ्यावी की सर्दी खोकला म्हणजे प्रत्येकवेळी कोरोना असेल असे नव्हे. कोरोना मध्ये सर्दी हे मुख्य लक्षण नसून कोरडा खोकला , ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही मुख्य लक्षणे आहेत. ज्यांचा कोरोनाबाधित रुग्णाशी थेट संपर्क आला आहे आणि ज्यांनी कोरोनाची साथ असलेल्या देशात १ जानेवारी नंतर प्रवास केला आहे त्यांनाच चाचणीची गरज आहे. कोणाची चाचणी करायची हे ठरवण्यासाठी तालुकानिहाय लक्षणांचे स्क्रीनिंग केंद्र उभारणे गरजेचे ठरू शकते. सध्या कोरोना रुग्ण सापडलेल्या भागात आम्ही बळजबरीने लोकांना आयसोलेट किमवा क्वारनटाइन करू असे विधान आरोग्य मंत्री किंवा अन्य कुठल्याही मंत्र्यांनी करणे लोकांमध्ये अजून घबराट पसरवणारे ठरेल. चीनमध्ये अशा बळजबरीमुळे भयभीत होऊन लोक पुढे आले नाहीत व त्याचा साथीचे नियंत्रण करण्यावर अनिष्ट परिणाम झाला. त्यापेक्षा, ‘त्रास होत असल्यास व कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला असल्यास तुम्ही बिनदिक्कत पुढे या, आम्ही तुमची काळजी घेऊ’ हे वारंवार सौम्यपणे शासनाने सांगावे. नागरिकांनीही आयसोलेशनला मुळीच घाबरू नये, कारण शासन हे आपल्या व इतरांच्या भल्यासाठीच करते आहे. या आजारावर उपचार नाही अशी सरसकट विधाने केली जात आहेत. हा आजार व्हायरल असल्याने तो इतर व्हायरल आजारांसारखा आपोआप वेळेत बरा होणारा आहे. ज्या केसेस गंभीर होतील त्यांच्या उपचारांसाठीची मार्गदर्शक तत्वे आहेत व त्यासाठी काही औषधे यशस्वीरित्या वापरली गेली आहेत. औषध नाही असा टाहो फोडण्यापेक्षा, बाधा झालेल्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन, इनविट्रो क्लिनिकल ट्रायल ( रुग्णांवर नव्हे! ) का सुरु करत नाहीत? सध्या मास्कचाही मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे, परंतु अशा स्थितीत मास्क हा धो धो पावसातील छोट्या छत्रीसारखा कुचकामी आहे. मास्क हा निरोगी व्यक्तीला इतरांनाकडून संसर्ग होऊ नये या साठी नसून आजारी व्यक्तीकडून तो इतरांना होऊ नये यासाठी असतो. मास्कची जागा खरे तर ‘हात धुण्याने’ घ्यायला हवी. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी पाणी व लिक्विड साबण उपलब्ध करणे व लोकांना हात धुण्याची पद्धत शिकवण्याची गरज आहे.

या साथीची निष्पत्ती नेमकी काय असेल हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. सुरुवातीच्या काळात बऱ्याच लोकांना संसर्ग होऊन आणि कदाचित थोडी हानी होऊन कोरोना विरोधात हळूहळू सामुहिक प्रतिकारशक्ती विकसित होईल. शासन जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. त्यामुळे, ‘घाबरू नका’ असे सांगताना सोबत शासनाकडून ठोस कृती होणेही गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाइम्स मध्येही वाचू शकता.


सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

सर्दी खोकला किंवा इतर कुठल्याही कारणाने ताप आला तर कोरोनामुळे आहे का अशी भीती आपल्याला प्रत्येकाला वाटणे सहाजिक आहे. पण कोरोनाची मुख्य लक्षणे समजून घेतल्यास लक्षात येईल की साधा सर्दी-खोकला म्हणजे कोरोना नाही.

प्रत्येक सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही

कोरोना व्हायरस (COVID-19) ची मुख्य लक्षणे –

कोरडा खोकला, तीव्र स्वरुपाचा ताप त्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी श्वास घेण्यास त्रास . यासोबत 1 जानेवारी नंतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये प्रवास किंवा सध्या भारतातील कोरोनाचे निदान निश्चित झालेल्या रुग्णांची संबंध हा रिस्क फॅक्टर महत्त्वाचा आहे. ताप आणि खोकला  इतर कारणांनी असू शकतो. पण कोरोनाग्रस्तांशी संबंध आल्यास व ही लक्षणे असल्यास मात्र आपण सरकारी यंत्रणेशी तपासणी साठी संपर्क साधायला हवा. अंगदुखी ही कोरोनामध्ये कमी प्रमाणात सर्दी खोकला, फ्लू मध्ये जास्त प्रमाणात असतात तसेच शिंका येणे, नाक गळणे, जुलाब हे कोरोनामध्ये नसते पण  सर्दी खोकला व फ्लू मध्ये असते.

सर्दी-खोकला-ताप म्हणजे कोरोना नाही
कोरोना व इतर आजारांमधील फरक

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना व्हायरसची सविस्तर लक्षणे – कोरोनाची तीव्र ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास हा आपल्याला माहित आहे. पण हा त्रास तीव्र किंवा गंभीर कोरोनाच्या रुग्णालाच होतो. ८५ टक्के लोकांना कोरोना संसर्ग झाला तरी एक तर साधा ताप आणि थोडा खोकला असा सौम्य स्वरुपाची लक्षण दिसतील. त्यातही काहींना असे ही होऊ शकते की काहीच लक्षणे आली नाहीत. म्हणून साधा खोकला, ताप, सर्दी असली तरी आपल्याला इतरांपासून लांब रहायचे आहे हे समजून घ्यावे.

COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? कारण कोरोना व्हायरस शी लढताना आपले सगळ्यात मोठे हत्यार असणार आहे आपली प्रतिकारशक्ती. त्यातच ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि मधुमेह असणाऱ्यांनी प्रतिकारशक्ती वाढवण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. COVID -19 प्रतिकारशक्ती कशी वाढवावी? यासाठी काही टिप्स.

कोरोना प्रतिबंध आणि शासन कोरोना संदर्भात स्वच्छतेच्या मुलभूत नियमांचा आता पुरेसा प्रचार झाला आहे. शासन आता जितक्या आक्रमकपणे आणि विचारपूर्वक साथ नियंत्रणाचे, प्रतिबंधाचे काम करील तेवढे नुकसान कमी होईल. ‘घाबरू नका’ असे सांगताना शासनाकडून ठोस कृती होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

https://www.youtube.com/playlist?list=PL9bO6h-fFoNgMdrfWBGtXtP0uLD3KC5yl
Dr. Amol Annadate’s Videos on Prevention and Cure of CORONAVIRUS Disease COVID-19

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.