डॉ. पायल ला हवा होता आधाराचा हात!

डॉ. पायल तडवी

डॉ. पायल या घटनेला जातीय भेदाचे एक उदाहरण मानण्याइतके तिचे स्वरूप मर्यादित नाही. यातील जातीय भेदाच्या मुद्द्याबद्दलचा निष्कर्ष नोंदवण्याचा हक्क सध्या न्यायालयालाच आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रात अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेद मात्र नक्कीच चर्चिले जायला हवे. नव्हे इतर क्षेत्रांतही असलेला भेदभाव संपवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रानेच बौद्धिक नेतृत्व करावे.

डॉ. पायल तडवी चे प्रकरण बाजूला ठेवले तरी या वर्षी पहिल्यांदाच वैद्यकीय प्रवेशामध्ये आरक्षित व अनारक्षित वर्गाला मिळणाऱ्या जागांमध्ये मोठी तफावत दिसून आली. मराठा आरक्षण, समाजिक, आर्थिक वर्गासाठी आरक्षण यांमुळे अनारक्षित खुल्या वर्गासाठी त्वचारोग, रेडिओलॉजी अशा शाखांसाठी राज्यात एकेक जागा शिल्लक राहिली. एमबीबीएसच्या प्रवेशातही तेच झाले. यामुळे असमाधानाची व अस्वस्थतेची मोठी ठिणगी खुल्या वर्गात पडली. खरे तर अशा बौद्धिक क्षेत्रात असा जातीय कारणावरून भेद निर्माण होणे हे घातक आहे. १९९३ पासून २०१९ पर्यंत याबद्दलची नाराजी धुमसत असली तरी ती एवढी तीव्र कधीच झाली नव्हती. याच्या चर्चा दबक्या आवाजात व्हायच्या.

वैद्यकीय शिक्षणक्षेत्रात काही भेदभाव खूप आधीपासून होते, पण फारच तुरळक प्रमाणात. ते फक्त जातीयच नव्हे तर इतर स्वरूपाचेही असायचे. ते आजही आहेत. एमबीबीएसचे शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांना काही भेदभाव जाणवतात. स्थानिक–परके (म्हणजे मुंबई, पुण्याचे आणि बाहेरचे), ऑल इंडिया कॅटॅगरीतील म्हणजे परप्रांतीय आणि प्रांतीय, मराठी–अमराठी, होस्टेलला राहणारे–घरी राहणारे, अशा प्रकारच्या भेदभावांना सामोरे जावेच लागते. मुंबईबाहेरच्या काही महाविद्यालयांत तर जातींनुसार वेगळ्या खानावळीही असायच्या.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असतानाची तऱ्हा आणखी वेगळीच असते. कामाचा प्रचंड ताण, इतर निवासी डॉक्टर व सिनिअरचे दडपण, लेक्चरर, प्राध्यापक यांचा दरारा, त्यांचा इगो सांभाळण्याचा मानसिक ताण अशी सगळी तारेवरची कसरत करावी लागते. त्यातच रुग्णांच्या नातेवाईकांची आणि अपुऱ्या सुरक्षेची धास्ती वेगळीच. यावर कळस म्हणजे हल्ली चर्चेत येत असलेला जातीय भेद. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे ऐन तारुण्यात, मौजमजा करण्याच्या काळात, रोमॅंटिसीझम असण्याच्या काळात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी मुले हे सारे ताण सहन करत असतात.

वैद्यकीय क्षेत्र असे सेवाक्षेत्र आहे, की येथे आस्था, जिव्हाळा या भावना मनात असणे महत्त्वाचे असते. प्रेम हा ज्या क्षेत्राचा गाभा आहे, त्या क्षेत्रात काम करणारी माणसे मात्र एकमेकांना माणूस म्हणून प्रेमाने जोडलेली दिसत नाहीत. निवासी डॉक्टर असताना बऱ्याचदा आपल्या प्राध्यापकाला आपले नावही माहीत नाही हे जाणवते, तेव्हा त्या निवासी डॉक्टरला ‘आयडेंटीटी क्रायसिस’ होतो. अशा मन:स्थितीत एखादा सौम्य टोमणासुद्धा मनाला जखम करतो.

पूर्वीही हे सगळे असायचे, पण कुठे ना कुठे शिक्षकांमधील एखाद्याशी भावनिक नाते जुळायचे. अगदी आधारवड नाही तर एखादी पारंबी तरी हाती लागायची. बाहेरून येणाऱ्या आमच्यासारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. शरदिनी डहाणूकर, डॉ. रवी बापट यांच्यासारखे शिक्षक आई–बाप व्हायचे. अत्यंत व्यग्र व मोठे वलय असलेल्या या डॉक्टरांची केबिन म्हणजे कॅम्पसमधल्या शिकाऊ डॉक्टरांचे घर व्हायचे. डॉ. संजय ओक हे डीन असतानाही मुलांसोबत क्रिकेटची अख्खी मॅच खेळायचे. आजही आम्ही आमचे मन मोकळे करायला, जे अडेल ते विचारायला या शिक्षकांकडे जातो.

आता विद्यार्थी–शिक्षक नाते तसे राहिलेले नाही. अर्थात, नक्राश्रू ढाळत बसण्यात अर्थ नाही, पण पायलसारख्या डॉक्टरला आधाराची दोरी कॅम्पसवर न मिळाल्याने गळफासाची दोरी जवळ करावीशी वाटत असेल तर काहीतरी चुकतेय, काहीतरी न्यून राहतेय. निवासी डॉक्टरच्या मनातील भावनिक आंदोलने शांत करणारी व्यवस्था आपल्याला नक्कीच उभारावी लागणार आहे.

आज महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने नियम केलेले असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगविरोधी कमिटी, विशाखा समिती अशा व्यवस्था असतात. परंतु त्यांच्या बैठका कितपत गांभीर्याने होतात, याबद्दल साशंकता आहे. या समित्यांद्वारे विद्यार्थ्यांना भावनिक आधार मिळतो, अशा नोंदी ‘मिनिट्स ऑफ मीटिंग’ मध्ये बंदिस्त होतात. प्रत्यक्षात भावनिक आधार वगैरे द्यायला वेळ आहे कोणाला? अशा मानसिक गरजा भागवायला फार वेळ लागतो, हा गैरसमज आहे. या सहज चालताबोलता होणाऱ्या गोष्टी आहेत. क्लिनिकलच्या शिक्षकांवर भरगच्च भरलेल्या रुग्णालयांतील रुग्णांना सेवा देण्याचा ताण आहे. नॉन–क्लिनिकल विभागांतील मंडळींनी ही जबाबदारी घ्यायला हरकत नाही.

कुटुंबात एखाद्याचा मूड चांगला नसेल तर आपण लगेच विचारपूस करतो; त्यासाठी घरात कोणी औपचारिक बैठक घेत नाही. तसेच वातावरण वैद्यकीय महाविद्यालयात असायला हवे. वैद्यकीय सेवेसारख्या तणावाच्या क्षेत्रात दोन व्यक्तींमध्ये भावनिक ताणाताणी होणे सहाजिक आहे, मात्र ती मिटल्यावर हसत एकत्र चहा घेतला तरी विषय मार्गी लागतात. आपण कोणी कनिष्ठ, वरिष्ठ नाही तर सगळे मिळून वैद्यकीय सेवेसाठी काम करतोय, हे सर्वांना उमजले की सगळे प्रश्न संपतील.

डॉ. पायल तडवी संबंधित इतर लेख वाचू शकता.

आरक्षण असणे हा व्यवस्थेचा भाग आहे. तो स्वीकारण्याला पर्याय नाही. एकमेकांवर रोष ठेवून त्या स्थितीत काही फरक होणार नाही. डॉ. पायल तडवीसारखी एखादी तरुणी जग सोडून गेल्यावरच काय चुकतेय याचा विचार होतो, हे दुर्दैव आहे. साध्या माणुसकीच्या गोष्टी लक्षात ठेवून वागले, एकमेकांना समजून घेतले, तर एकमेकांना आधार देणारे दोर भक्कम होतील. एखादा गटांगळ्या खाणारा जीव त्या दोराला धरून स्वत:ला सावरेल… गळफास नाही लावून घ्यावासा वाटणार त्याला!

सदरील लेख झी मराठी दिशा या साप्ताहिकात प्रकाशित झाला आहे.

डॉ. अमोल अन्नदाते | वेबसाईट: amolannadate.com
ई-मेल: reachme@amolannadate.com

डॉ. पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने…

Amol Annadate Articles

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातीवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का , यावर अजून चौकशी सुरु आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

डॉ. पायल तडवी
डॉ. पायल तडवी साठीचा जनआक्रोश

जर डॉ. पायल तडवी च्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे. पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरु असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे टाकणार नाहीत याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्या वरून उभी फुट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रा सारख्या थेट जगण्या मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकरे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्का साठी लढा यातून कधी नव्हे ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते. आरक्षण हवे नको हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत , आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवी सारख्या तरूण डॉक्टरचा जीव जातो तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मा पलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये. तसेच कुठला ही बदल आणताना तो अचानक आणला तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडा ही शासनाने यातून घ्यायला हवा.

Amol Annadate Aticles
डॉ. अमोल अन्नदातेंचे वैद्यकीय क्षेत्रावरील इतर लिखाण वाचण्यासाठी क्लीक करा.

या पलीकडे जाऊन या घटने मध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कांगोरे ही तपासून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येत जाती चा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला तरी तिच्यावरील ताण ही नाकारला जाऊ शकत नाही. तसेच काहीही कारण असले तरी सोबत काम करणार्या कनिष्ठ , वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले हा सगळ्या कारणां पलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक , शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दर वर्षी केईम, सायन, नायर येथील तीन – चार निवासी डॉक्टरांना टी.बी चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दर वर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणा पायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधून मधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सिनियर – ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी ही भावना असली तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातीवाचक शेरे म्हणा, किव्हा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायल सारख्या निरागस डॉक्टरच्या अत्म्हत्यातून कधीतरी समाजा पुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्या मोठ्या डिग्रीची रांग नवा मागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे तर चांगला संवेदनशील माणूस व समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्व ही तयार करायचे आहे हे वूसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे , मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन ही करावे लागणार आहे. तसेच काही ही झाले तरी समोर आलेल्या आपल्या कनिष्ठ – वरिष्ठ, जात – धर्म हे भेदभाव सोडून आपल्या सहकारी डॉक्टरशी प्रेमाने व सह –वेदनेची ( एमपथी ) भावना ठेवून वागण्याचे धडे गिरवावे लागणार आहेत. आपल्या सहकार्यासाठी माणुसकीची भावना हीच रूग्णा साठी प्रेमाची आणी पुढे आपल्या व्यक्तिगत, व्यवसायिक यशाची पहिली पायरी आहे.

आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत डॉ. पायल तडवी सारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच नव्हे तर समाजाचा या क्षेत्रा विषयीचा दृष्टीकोन हि पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचार पूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे. तसेच या वर केवळ तात्पुरत्या मलम पट्ट्या नव्हे तर याच्या मुलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता मानसिक दृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायल च्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे .

सदरील लेख ३० मे, २०१९ रोजी लोकमत च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

Amol Annadate

डॉ.अमोल अन्नदाते | www.amolannadate.com
reachme@amolannadate.com

‘पायल तडवी’ च्या मृत्यू मधून आपण काही शिकणार आहोत का ?

'पायल तडवी' चा मृत्यू

डॉ. पायल तडवी या नायर रुग्णालयातील रेसिडेंटचा सिनिअर्सच्या मानसिक छळा पायी मृत्यू झाला. याला रॅगिंगही म्हणता येत नाही कारण, सहसा रॅगिंग हे एम.बी.बी.एस करतानाचा टाईमपास, गमती यात मोडते. यावरून एक महत्वाचा प्रश्न आपण स्वतःला आणी एकमेकांना विचारायला हवा. खर तर आपण डॉक्टर्स हे व्यवसायिक दृष्ट्या संख्येने सगळ्यात कमी आणि सगळ्यात बुद्धिमान वर्गात मोडतो. पण तरीही आपण डॉक्टर आहोत आणि डॉक्टर हा आपला सगळ्यांचा धर्म आहे या एका अस्मितेवर आपण मनाने एकमेकांशी का बांधले जात नाही.

डॉ. पायल तडवी

डॉ. पायल तडवी

पायल तडवी ला आलेला अनुभव आपल्याला प्रत्येकाला कधी न कधी कुठल्याना कुठल्या पायरीवर व्यवसाय करताना येत असतो. मग तो व्यवसायिक द्वेष असो, सरकारी डॉक्टरकडून झालेली अडवणूक असो, पी.जी. करत असताना सिनिअर लेक्चरर , हेड ऑफ डिपार्टमेंट कडून झालेला अपमान असो कि आपला सहव्यवसायाकडून झालेला व्यावसायिक त्रास असो. डॉक्टर असला तरी तो शेवटी माणूसच असतो हे मान्य केले तरी इतक्या उच्च प्रतीच्या व्यवसायात, उच्च बुद्धिमतेच्या कामात ,त्या मानाने आता ‘मानाचे नसले’ तरी समृद्ध व्यवसायात असून ही आपण असे का वागतो? इतके कडवट का होत जातो कि, आपल्या सम व्यवसायिकाला, बंधूला आपण टोकाचा मानसिक त्रास देण्यापर्यंत आपली मजल जाते. व्यवसायात प्रत्येकाच्या वाट्याची प्रॅक्टीस त्याला मिळणारच आहे. कोणीही ती हिरावून घेऊ शकत नाही हे माहित असूनही काही प्रमाणात दुसऱ्याला नामोहरम करण्याची संधी आपण सोडत नाही. शासकीय, प्रशासकीय कामातही एखादा डॉक्टर, दुसऱ्या डॉक्टरच्या समोर येतो तेव्हा आपण एकाच आईची पोरं आहोत, या भावनेने मोकळ्या मनाने तो कधी मदत करत नाही. आता डॉक्टर, पेशंट म्हणून आला तर त्याच्या कडून फी न घेण्याचे इथिक्स ही इतिहास जमा झाले आहेत. अर्थात हा प्रत्येकाचे वैयक्तिक निर्णय असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण त्या पलीकडे आय.ए,एस, आय.पी.एस, आय.आय.टी. ही सर्व मंडळी जशी आपल्या शैक्षणिक अस्मितेवर त्यांची पक्की ‘फेवर बँक’ तयार करतात, तशी आपल्या डॉक्टरांची का होत नसेल? याला ‘लॉबी’ असा एक नकारार्थी व क्रूर शब्द प्रयोग केला जातो. अगदी ‘लॉबिंग’ च्या पातळीवर नाही तरी ‘डॉक्टर आहे’ म्हणून आपण दुसऱ्या डॉक्टरला चंगले वागवण्याचे सत्व तरी नक्कीच जपू शकतो! मी हे जवळून अनुभवलेले आहे कि, कुठला ही आय.ए.एस. दुसऱ्या आय.ए.एस. ने सांगितलेले काम शक्यतो टाळत नाही. मनोहर पर्रीकर दर वर्षी आय.आय.टी कॅम्पस मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. त्यांना सांगायचे कि कधी या आयआयटीयनचे दार मदती साठी अगदी मध्य रात्री वाजवा, हा आयआयटीयन तुमच्या पाठीशी आहे. असे आपल्या मध्ये का होत नाही? हार्वर्ड सारख्या संस्थेचेही ‘अल्युमनाय नेटवर्क’ इतके सशक्त आहे आणि इतक्या पातळ्यांवर सगळे एकमेकांना मदत करत असतात कि, त्यामुळे या संस्थेच्या अनेकांना नोबेल मिळाले. अगदी राजकारणात विरोधी पक्षाच्या खासदाराला सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने घर मिळवून द्यायला मदत करताना मी पहिले आहे. पायल तडवीचा तीन डॉक्टरांमुळे होणाऱ्या मृत्यू मध्ये समाजात डॉक्टरची एवढी कुचंबणा का होते आहे, याची बरेच उत्तरे सापडतील!

डॉ अमोल अन्नदातेंचे इतर लेख वाचण्यासाठी

अगदीच उजळ नैतिक प्रतिमेचा टेंभा मिरवण्यासाठी नव्हे, पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे रोज दुःख, वेदना, इतरांच्या जीवनाच्या तीव्र भावना बघत असताना आपल्यावर ‘देवाची आवडती मुले’ होण्याची जबाबदारी टाकली आहे, हे आपण का विसरतो! आपल्याला देवाने त्याच्याशी थेट निगडीत कामासाठी निवडले आहे, यात काही तरी प्रयोजन असले पाहिजे . हे तत्वज्ञान बाजूला ठेवून, परमार्थ सोडा, पण व्यवसायिक यशापलीकडे चांगली माणसे होणे आपल्या स्वतःच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यासाठी ही गरजेचे आहे, हे ही आपण विसरून गेलो! आज आपल्याला मदत केलेल्या अनेक डॉक्टरांमुळे, शिक्षकांमुळे आपण आपल्या आयुष्यात जे काही थोडे थोडके यश मिळवू शकलो, मी तरी अशा डॉक्टर मित्रांच्या मदतीवर आणि त्यांच्या खांद्यावरून हे जग पहिले आहे. आपल्या इतर डॉक्टर ज्यूनिअर सिनियर्सशी चांगले वागुनच आपल्याला त्याची परतफेड करायला हवी. जेव्हा कोणी डॉक्टर आपल्याशी माणूस म्हणून वागत नाही तेव्हा, आपण इतर कोणाशीच असे वागायचे नाही, एवढाच धडा त्यातून आपण घ्यावा! आज डॉक्टरांना मुळे जीव गमवावा लागलेल्या पायल तडवी च्या आई-वडीलांप्रमाणे प्रत्येक डॉक्टरच्या डोळ्यात तिच्या साठी अश्रू यायला हवे. आणि प्रत्येकाने यातून काही तरी शिकायला हवे.

डॉ.अमोल अन्नदाते | www.amolannadate.com
reachme@amolannadate.com