कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको

कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको

कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको सध्या मुंबईत व राज्यात इतरत्र ही कोरोनामधून बरे झालेले, संपर्क आलेल्यांना घरीच विलगीकरण (होम क्वारंटाइन) किंवा विलगीकरण (आयसोलेशन) सांगितले आहे. पण अशा अनेकांना राहत्या घराजवळ सोसायटीमध्ये सामाजिक बहिष्काराचे वाईट अनुभव आले. एकदा बऱ्या झालेल्या रुग्णांकडून किंवा विलगीकरणाचा कालावधी संपल्यावर इतरांना या व्यक्तीकडून संसर्गाचा कुठला ही धोका नसतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

फिजिकल डिस्टन्सिंग म्हणजे बहिष्कार नव्हे
कोरोनाग्रस्त किंवा बरे झालेल्यांवर सामाजिक बहिष्कार नको आपल्या सोसायटी किंवा निवासी जागेतील एखादा रुग्ण परत आल्यावर तो दिसला कि लगेच घाई घाईने लांब जाणे, त्याच्याशी न बोलणे, जाताना त्याच्याकडे न बघणे असे वर्तन करू नका. फिजिकल डिस्टन्सिंग जरूर ठेवावे. पण ते ठेवत असताना लांबून संवाद साधता येतो. तसेच अशा कुटुंबाला किंवा घरात एकट्याने विलगीकरणात असलेल्यांना काय हवे ते बाहेरून आणून देण्यासाठी मदत करा. तसेच त्यांच्याशी खिडकीतून, गॅलरीतून, फोनवरून बोलून त्यांना मानसिक आधार द्या.

रुग्णांबद्दल बोलताना, समाज माध्यमांवर व्यक्त होताना भान ठेवा
एखादा रुग्ण आपल्या भागात सापडला की त्याला रुग्णवाहिकेतून नेतानाचे फोटो टाकणे, त्याला नेत असताना पार्श्वसंगीत किंवा गाणी टाकून व्हिडीओ बनवून फोनवर शेअर करणे असे करू नये व हे वैद्यकीय नीतीमूल्यांच्या विरोधात आहे. रुग्णाचे नाव घेऊन त्याला उचलले, पकडले, धरून नेले असे शब्द वापरून रुग्णांबाबत चर्चा करू नये.

सहवेदना बाळगा
आपण स्वत: सोडून इतर सर्वांना कोरोना होण्याची शक्यता आहे, असे कोणीही वागू नये. ही महामारी असल्याने प्रत्येक नागरिकाला संसर्गाची समान जोखीम आहे. म्हणून प्रत्येक कोरोनाग्रस्तांसाठी सहवेदना म्हणजे त्याचा त्रास हा जणू आपला ही त्रास आहे, असे समजून वागले पाहिजे. साथीच्या या वातावरणात कोरोनाचा संसर्ग कोणाला ही होऊ शकतो. म्हणून चांगुलपणाची देवाणघेवाण ही गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत ‘ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली…

त्याच चुका परत नको ७ मे पासून भारतात परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘वंदे भारत’ या मोहिमे अंतर्गत आणण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे परदेशात भारतीय मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जवळपास १.५ लाख भारतीयांनी परतण्यासाठी परदेशात नाव नोंदणी केली आहे. आता पर्यंत १५००० भारतीय मायदेशी परतले आहेत आणि वंदे भारतच्या दुसऱ्या टप्प्याला २२ मे पासून सुरुवात झाली आहे. आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यास काहीच हरकत नाही पण हे नागरिक भारतात व त्यातच मुंबई विमानतळावर उतरल्यावर त्यांच्या आयसोलेशन व क्वारंनटाइनचा जो गोंधळ उडाला आहे तो आधी जानेवारी महिन्यात जागतिक साथ सुरु झाल्याची घंटा वाजत असताना ज्या चुका झाल्या त्याचीच पुनरावृत्ती आहे व ती तत्काळ रोखायला हवी. एवढेच नव्हे तर यापुढे परदेशातून भारतात आणल्या जाणाऱ्या व त्यातच मुंबईत येणाऱ्या प्रवाशांबद्दल काय धोरण असेल हे निश्चित करावे लागेल. एकीकडे मुंबई व महाराष्ट्राच्या इतर भागात कोरोना ज्या झपाट्याने वाढत आहेत, त्यावरून समूह संसर्ग सुरु झाला आहे असे मानण्यास मोठी जागा असताना कोरोना संसर्ग भारता पेक्षा जास्त असलेले देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांच्या नियोजनाचा बोजवारा हा जून महिन्यात राज्यात दुसऱ्या कोरोना रुग्णांच्या लाटेला जबाबदार ठरू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

त्याच चुका परत नको सध्या मुंबई विमानतळावर येणाऱ्या या प्रवाशांची मुंबईचे व मुंबई बाहेरील अशी विभागणी केली जाते आहे. यात मुंबईतील रुग्णांना विमानतळा जवळील हॉटेल्समध्ये प्रती दिवस सहा हजारांपासून पुढे आकारून क्वारंटाइनची सोय केली जाते आहे. पण मुंबई बाहेरील प्रवाशांना मात्र गाड्यांनी त्यांच्या गावी जाऊन होम क्वारंटाइन होण्यास सांगितले जाते आहे. यात काहींना नागपूर, अकोला, गोंदिया, कोल्हापूर असा १० ते २० तासाचा प्रवास करून जावे लागले व पुढे ही असे प्रवासी असतील. हे रुग्ण परदेशाहून आले असल्याने त्यातील काही कोरोना बाधित असल्याची दाट शक्यता आहे. पण तरीही वाटेत ते थांबतील तिथे व पोहोचल्यावर ही नेमके कोणाला भेटून व कुठे रिपोर्टिंग करायचे हे न सांगता मध्य रात्रीच अनेकांना गाडीत बसवून मुंबई बाहेर धाडण्यात आले. या पैकी काही क्वारंटाइनसाठी पैसे भरण्याची तयारी असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना हॉटेल मध्ये क्वारंटाइनची परवानगी देण्यात आली नाही. एकदा होम क्वारंटाइनने हात पोळून घेतलेली असताना परत एकदा माहित असलेल्या इंडेक्स केसेस ( निश्चित संसर्ग करतील अशा माहित असलेल्या सुरुवातीच्या केसेस ) बाबतही जोखीम आपण का करत आहोत? मुंबई मध्ये खाटा उपलब्ध नाही आणि आधीच आकडा वाढत असताना मुंबईवरच सर्व केसेसचा ताण नको हे एक वेळ गृहीत धरले . तर मग महाराष्ट्रात सर्व परदेशातून येणारी विमाने मुंबई विमानतळावर उतरवायची कशाला? यासाठी शिर्डी विमातळावर विमान उतरवून शिर्डीला रिक्त असलेल्या भक्त निवासांमध्ये एका वेळेला किती ही लोकांना क्वारंटाइन सुविधा पुरवता येईल. १४ दिवसांचा क्वारंटाइन संपला कि यांना घरी सोडता येऊ शकते. जर कोणाला लक्षणे आलीच तर शिर्डीचे भव्य सुपर स्पेशालिटी रुग्णालय आहेच. हा पर्याय शक्य नसला तर नाशिक किंवा इतर कुठल्या ही विमानतळ असलेल्या शहराचा विचार करता येऊ शकतो. या परदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या विलगीकरणाचे नियोजन गांभीर्याने घेण्याचे कारण म्हणजे परदेशातील अधिक घातक कोरोना स्ट्रेन्स परत राज्यात मिसळण्यास ही संधी ठरू शकते. कोरोनाची संक्रमित होण्याची शक्यता जास्त आहे आणि भारता सारख्या उष्ण देशातील स्ट्रेन ही इतर देशांच्या मानाने कमी घातक ठरल्याचे दिसून येते आहे. अगदी महाराष्ट्र व पंजाब अशा राज्यांतर्गतही स्ट्रेन्स मध्ये फरक आहे. अशात परत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना इस्टीट्युशनल क्वारंटाइन न करता घरीच क्वारंटाइन करणे परदेशी कोरोनाच्या स्ट्रेन साठी आपले अंगण दुसऱ्यांदा मोकळे करण्यासारखे आहे. एरवी सगळी कडे होम क्वारंटाइन केले जातच असल्याने यासाठी निर्माण केलेल्या सुविधा रिकाम्या आहेत. त्यांचा वापर करून हे धोरण तातडीने शासनाने राबवायला हवे. दुसरी सध्या होत असलेली चूक म्हणजे आता होम क्वारंटाइन सारखे होम आयसोलेशन म्हणजेच तुम्ही कोरोना पोझीटीव असून तुम्हाला सौम्य लक्षणे असल्यास किंवा लक्षण विरहीत असल्यास तुम्ही घरीच राहायचे हे मुंबईत केले जाते आहे. होम क्वारंटाइन अपयशी झाल्याने आज असलेली स्थिती ओढवली मग परत होम आयसोलेशनची चूक कशासाठी? पूर्ण राज्यात सौम्य व मध्यम लक्षणे असल्यास निचित निदान झालेल्या रुग्णांना दहाव्या दिवशी सुट्टी देऊन उर्वरित ७ दिवस घरीच आयसोलेशन हे निकष पाळले जात आहे. आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत हे मान्य पण साथीच्या वाढत्या प्रमाणासोबत सुविधांच्या उपलब्धते प्रमाणे निकष मर्यादित करत नेऊन अपुऱ्या सुविधांना अनुरूप निकष आकसण्याची प्रक्रिया सुरु करायची. की निकष अधिक व्यापक करत आरोग्य सुविधा वाढवायच्या हे ठरवावे लागेल. सध्या तरी दिवसेंदिवस निकष आकसत असून त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आहे. किमान लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे नाकारताना त्यांनी कधी रुग्णालयात जायला हवे अशा ११ रेड फ्लॅग साईन्स म्हणजे धोका दर्शवणारी लक्षणे कोणती याचे सविस्तर समुपदेशन व लिखित माहिती घरी असलेल्या रुग्णांना दिली जात नाही आहे. यामुळे अनेक ‘सायलेंट हायपॉक्सिया’ किंवा ‘हॅप्पी हायपॉक्सिया’ म्हणजे इतर काहीही लक्षणे नाही पण शरीरातील ऑक्सिजनची पातळी मात्र घसरलेली आढळून आलेल्या व पुढे गंभीर झालेल्या केसेस लक्षात न येण्याचा धोका आहे.त्याच चुका परत नको यासाठी घरी असलेल्या लक्षण विरहीत किंवा सौम्य लक्षणे असून दाखल न करून घेतलेल्या रुग्णांना घरी बोटावर मावणारे पल्स ऑक्सिमीटर वापरून दिवसातून तीन वेळा ऑक्सिजनची पातळी तपासण्यास सांगता येईल का? आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत म्हणून रुग्णांना घरी थांबा असे सांगून हा विषय संपवता येणार नाही कारण याची परिणीती मृत्यू दर वाढण्यात होऊ शकते. देशातील एकूण मृत्यू पैकी ४० टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. हा आकडा कमी करण्यासाठी एक तर घरी रुग्ण ठेवणे टाळावे किंवा ठेवत असल्यास होम मॉनीटरींगचे निकष व रोज या रुग्णांशी ऑनलाईन संवाद व निरीक्षण करायला हवे. घरी लवकर पाठवणाऱ्यांच्या बाबतीत ज्यांना होम आयसोलेशन साठी वेगळी खोली आहे की नाही हे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. अनेक रुग्ण कुटुंबासह एक दोन खोल्यात राहतात. किमान अशांसाठी तरी होम आयसोलेशन चे निकष बदलून त्यांना पूर्ण चौदा दिवस रुग्णालयात ठेवावे. कारण अपुऱ्या खाटांचे कारण पुढे करत रुग्णांना घरी पाठवून त्यांच्या कुटुंबाला बाधा करण्याचा मार्ग मोकळा करून उलट आरोग्य यंत्रणेवरील ताण पुढे वाढणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही. हा विषाणू नवीन असल्याने साथ व प्रतिबंधाचे नियोजन करताना चुका होणे सहाजिक आहे. पण आधी केलेल्या चुकांमधून अपरिमित नुकसान झालेले स्पष्ट असताना त्याच चुका पुन्हा करणे मूर्खपणाचे ठरेल.

सदरील माहिती आपण  महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता

क्वारंटाइन न समजल्याने घात

क्वारंटाइन न समजल्याने घात कोरोना ची साथ महाराष्ट्रात प्रवेश करून आता २ महिने होऊन गेले तरी अजून साथ शास्रातील, इपिडीमीऑलोजीतील काही मुलभूत व्याख्या धोरण आखणी करणारे शासन, प्रशासन आणि सर्व सामान्य समजून घेण्यास तयार नाही हा वैद्यकीय अज्ञानाचा कळस आहे. या साठी सर्व प्रथम क्वारंटाइनचा इतिहास आणि या शब्दाचा नेमका अर्थ समजून घेऊ. चौदाव्या शतकात प्लेग ची साथ आली व जेव्हा बहुतांश प्रवास हा जहाजाने व्हायचा तेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जहाजाने येणाऱ्या प्रवाशांना ४० दिवस वेगळे व एकत्र ठेवून त्यांची राहण्या, जेवणाची सोय केली जायची. ४० ला ग्रीक मध्ये quaranta giorni म्हणतात म्हणून क्वारंटाइन. ४० दिवस का तर प्लेग सह इतर सर्व आजार बाधित व्यक्ती पासून होण्यास किमान १ व कमाल ४० दिवस लागतात म्हणून तो पर्यंत या प्रवाशांपैकी कोणाला लक्षणे आली तर उपचारार्थ पुढे त्याला वेगळे ठेवून उपचार करता यायचे व तसेच इतर देशातील आजार पसरायचे नाही. चौदाव्या शतकात आजारांचे उपचार, औषधे अजून विकसित झालेले नव्हते. म्हणून आजार आपल्या देशात येऊ न देणे हाच मुख्य उपाय होता. पुढे एखाद्या प्रांतात हा आजार झाला तर इतर प्रांता साठी व त्या पुढे गावासाठी ही क्वारंटाइन ही संकल्पना रुजली.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१८७८ ची यलो फिवर व एकोणिसाव्या शतकातली कोलेरा ची साथ रोखण्यात गांभीर्याने राबवलेल्या क्वारंटाइनचा मोठा वाटा होता. पुढे तर अनेक देशात ही साथ सुरु असे पर्यंत क्वारंटाइनच्या सुरक्षेच्या जबाबदारी साठी पोलिसांची वेगळी तुकडीच निर्माण करण्यात आली. पण चौदाव्या शतकात जे कळले ते आज कोरोना या निश्चित उपचार नसलेल्या व जगभर थैमान घालत असलेल्या आजारा विषयी आपल्याला कळेनासे झाले आहे. इतर देशात जिथे अर्धे देशच्या देश शासकीय क्वारंटाइन मध्ये ठेवून काळजी घेण्यात आली तिथे आधी पासूनच हे आपल्याला शक्यच नाही म्हणून हात टेकले व होम क्वारंटाइन ही संकल्पना आपल्या सोयीसाठी आपण जन्माला घातली. खर तर होम क्वारंटाइन हा शब्दच एक विरोधाभासी शब्द आहे. होम क्वारंटाइन हा शब्द रागीट, शांत गृहस्थ किंवा विवाहित लिव्ह इन जोडपे या सारखा आहे. जो व्यक्ती बाधित देशातून आला आहे त्याला वेगळे ठेवण्यासाठी आपण ” जा तुझ्या घरी तू वेगळा राहा ” असा हातावर शिक्का मारून सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करत आपण परत पाठवतो या सारखा दुसरा विनोद या देशाच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या इतिहासात घडणार नाही. क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे बरे होम क्वारंटाइन मध्ये नेमके काय करायचे आहे या विषयी नेमकी माहिती आपण संबंधित व्यक्तीला देतो आहे का ? या व्यक्तीचे घर कशाने पुसायचे हे ही ठरलेले आहे. तरच कदाचित ही होम क्वारंटाइनची संकल्पना काही प्रमाणात यशस्वी होऊ शकली असती. त्या पलीकडे ज्या लोकशाहीला एवढ्या वर्षात शिस्त लागू शकली नाही, तिथे एक स्वस्थ व्यक्ती स्वतःला एका खोलीत चौदा दिवस कोंडून घेईल ही अपेक्षा करणे भाबडेपणाचे आहे. होम क्वारंटाइन पाळला जातोय का यासाठी सिंगापूर सारखी लक्ष ठेवणारी सक्षम व्हिजिलन्स आपल्या कडे आहे का ? मुंबई सारख्या ठिकाणी काही प्रमाणात ती सुरु झाली आहे पण ती ही सदोष आणि जुजबीच आहे. हातावर शिक्का दिसल्यास पोलिसांना फोन करा एवढ्या वर विषय संपायला ही काही रात्री वाजणाऱ्या डी जे एवढी साधी गोष्ट आपल्याला वाटते आहे का? याची परिणीती अशी झाली कि विद्यापीठांचे कुलगुरू, कॉलेजेस चे अधीक्षक,आय.ए.एस अधिकारी अशा शिक्षित उच्चभ्रू लोकांनी कोण कुठला होम क्वारंटाइन म्हणून ही संकल्पना धुडकावून लावली. पुण्यात होम क्वारंटाइनचे शिक्के असलेल्यांनी मुलांचे वाढदिवस गर्दी बोलवून साजरे केले . या पुढे ग्रामीण निम्न शिख्सित लोकांकडून तरी काय अपेक्षा करता येईल ? झाले ही तसेच . सांगली, इस्लामपूर मध्ये तर परदेश व धार्मिक स्थळांवरून आलेल्या काहींनी जेवणावळी दिल्या आणि आज पुणे, मुंबई, नागपूर नंतर सांगली, इस्लामपूर च्या रूपाने कोरोनाची नवी राजधानी निर्माण होताना दिसते आहे.

खरेतर अजून ही वेळ गेलेली नाही. आज घडीला ११ हजार लोकांना होम क्वारंटाइनचे हातावर शिक्के मारून त्यांना घरी सोडून आपण एक प्रकारे कोरोना पसरवण्याचे लायसन्सच दिले आहे क्वारंटाइन न समजल्याने घात झाला आहे . साडेबारा कोटी लोकसंख्येच्या राज्याला ११ हजार लोकांना वेगळे ठेवून त्यांची १४ दिवस व्यवस्था ठेवणे एवढे अवघड आहे का ? खरे तर सव्वाशे कोटीच्या देशात परदेशातून येणाऱ्या सगळ्यांना जानेवारी , फेब्रुवरी महिन्यात शिस्तबद्ध क्वारंटाइन केले असते तर आज आपण जगा पुढे एक उदाहरण घालून दिले असते. पण अजून ही महाराष्ट्राला ही संधी आहे. प्रत्येक जिल्ह्यात १०८ शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, शासकीय विश्राम गृहे, धार्मिक तीर्थ क्षेत्रांचे भक्त निवास अशा किती तरी वास्तू सहज उपलब्ध होतील. यांच्या आहार व्यवस्थेसाठी शासनाकडे पैसे नसतील तर स्वयंसेवी संस्था पुढे येतील. लाखांच्या सभांचे उत्तम नियोजन करणारे राजकीय पक्ष सत्तेत असताना इथे त्यांचे नियोजन कौशल्य का दिसत नाही. एवढ्या मोठ्या राज्यात हे शक्य व प्रॅक्टीकल नाही अशी उत्तरे दिली जात आहेत.

क्वारंटाइन मधील व्यक्तीला कुठली ही लक्षणे नसतात. त्याचा फक्त कोरोना बाधित देशात प्रवास झालेला असतो किंवा सध्या देशातील कोरोना ग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क आलेला असतो. कोरोना चा संपर्क येऊन त्याचा संसर्ग होतो पण काहीच लक्षणे दिसत नाहीत असा हा कोरोना पसरवणारा छुपा घटक या साखळीत सगळ्यात महत्वाचा असतो. कोरोना ग्रस्तांची संख्या सांखिक पद्धतीने ( exponentially ) म्हणजे एकाचे चार, सोळा, बत्तीस अशी झपाट्याने वाढवण्यासाठी कोरोना पोझीटीव नव्हे तर हा कोरोना असून ही लक्षणे नसल्याने समजून न येणारा घटक जबाबदार असतो. कारण कोरोना निश्चित निदान झालेला आयसोलेशन मध्ये असतो. एकीकडे हा घटक आपण क्वारंटाइन मोडीत काढत समाजात कोरोना पसरवण्यासाठी मोकळे सोडत आहोत तसेच जास्तीत जास्त टेस्ट करून कोरोना बाधित व्यक्तीचा शोध ही आपण घेत नाही आहोत. या पुढे जाऊन कॉन्टॅक्ट म्हणजे थेट संपर्कात आलेले आणि कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे या संपर्कात आलेल्यांच्या संपर्कात आलेले अशी सगळी साखळी एक केस सापडल्यावर शोधावी लागते.

आपण मात्र अजून ही कमी टेस्टिंग मुळे कोरोना चे आपले आकडे त्या मानाने कमी आहेत या आनंदात स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. हे सर्व कॉन्टॅक्ट शोधण्याची प्रक्रिया करण्यासाठी एक यंत्रणा कार्यरत असायला हवी . ही सगळी प्रक्रिया केवळ पुढील एक महिन्यासाठी राबवायची आहे. सध्या लॉक डाऊन मुळे तशी ती सोपी ही आहे. पण ही यंत्रणेला थकवणारी असल्याने होम क्वारंटाइनची फसवी पळवाट शासनाने स्वीकारलेली दिसते आहे. एक तर शासकीय इमारती आरोग्य खात्याने अधिग्रहीत करून तातडीने होम क्वारंटाइन मोडीत काढून थेट क्वारंटाइन सुरु करावे. किंवा किमान सिंगापूर प्रमाणे होम क्वारंटाइन मध्ये प्रत्येका ला थोड्या थोड्या वेळाने मेसेज करून त्याचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करणे, त्यांच्या घरी भेटी देऊन ते घरी आहेत का याची चाचपणी करणे व होम क्वारंटाइन चे नियम मोडल्यास स्पेन मध्ये ३०,००० डॉलर चा दंड आहे तसा दंड आकारणे अशा गोष्टी तरी कराव्या. क्वारंटाइन किंवा कडक नियमांचे होम क्वारंटाइन या दोन्ही पैकी काही ही न केल्यास पुढे आपल्या देशाचा एका साथीने कसा घात केला हा इतिहास भावी पिढी साठी तेवढा उरेल.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ

मास्क हँकरचीप यांचा गोंधळ अजून तरी मास्क हा ज्यांना काही त्रास नाही त्यांना वापरण्याची गरज नाही. मास्कचा वापर हा सर्वसाधारणपणे नॉर्मल व्यक्तीला काही होऊ नये म्हणून नाही तर आजारी व्यक्ती कडून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून आहे. मास्क फक्त खालील लोकांनीच वापरायचा आहे


– जे कोरोना पाॅजिटिव्ह आहेत. – जे अशा निदान निश्चित झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत व ज्यांना होम क्वारंटाइन चा सल्ला दिला आहे.- ज्यांना सर्दी खोकला आहे. – अशा रुग्णांचे उपचार करणारे व त्यांच्या संपर्कात असणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ अशा मास्कची गरज असणाऱ्यांना घालताना त्याच्या बाजूला दोरीने धरून घालावा व काढताना मध्ये हात न लावता काढावा. घातलेला मास्क काढल्यावर इतरत्र कुठे ही टाकू नये व मुलांनी त्याला हात लावू नये याची काळजी घ्यावी. मास्क दर ६ ते ८ तासांनी बदलला पाहिजे. त्यानंतर मास्क ब्लिचिंग सोल्युशन मध्ये थोडा वेळ ठेवून थोड्या वेळाने जाळावा किंवा पुरावा.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा


सध्या मास्क हँकरचीप यांचा गोंधळ सुरु आहे बाजारात उपलब्ध असलेले कॉटन चे मास्क, साधे मास्क व तोंडाला लावलेला हातरुमाल हा काहीही उपयोगाचा नाही. जो मास्क तीन पदरांचा म्हणजे तीन लेयर्स चा असतो तोच उपयोगाचा असतो. सध्या रस्त्यावर एक पदरी मास्क विकले जाऊन खूप लोकांची फसवणूक होते आहे. हे मास्क विकत घेऊ नये. बरेच जन कपड्याचे मास्क वापरून ते रोज धुऊन वापरत आहेत. हे चुकीचे आहे व उपयोगाचे नाही. – अनेक जन एन ९५ मास्क मिळवण्यासाठी ही धडपडत आहेत. पण हा फक्त डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ साठीच गरजेचा आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता

होम क्वारंटाइन म्हणजे काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय

होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय? कोरोना व्हायरस च्या साथीमध्ये सध्या अनेकांना होम क्वारंटाइन सांगून ही ते दिलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत. ज्यांना हा सल्ला दिला आहे त्यांनी होम क्वारंटाइन म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी पुढील गोष्टी करायच्या आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

– शक्यतो वेगळी शौचालयाची सोय असलेल्या आणि वाऱ्याचे चांगले सर्क्युलेशन असलेल्या रूममध्ये राहणे व कुटुंबातील इतर सदस्यांना न भेटणे. – इतर सदस्यांना त्याच खोलीत राहणे आवश्यक असल्यास त्यांच्या पासून १ मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवणे व त्यांना स्पर्श न करणे. – होम क्वारंटाइन मध्ये असेलेल्या व्यक्तीचे जेवणाचे भांडे, कपडे वेगळे ठेवणे व वेगळे धुणे. – ६० वर्षा पेक्षा जास्त वय, कुठल्याही वयाची मधुमेह, डायबेटीस चे रुग्ण, लहान मुले, गरोदर माता यांच्याशी या व्यक्तीचा थेट संपर्क यायला नकोच. – घराचा उंबरठा हा १४ दिवस ओलांडायचा नाही. – कुठे ही हात लागल्यास लिक्विड सोप / साबण व पाण्याने हात धुवावे. – पूर्णवेळ मास्क वापरावा व तो दर ६ तासाने बदलावा. जुना मास्क ५ % ब्लिचिंग सोल्युशन मध्ये टाकून नंतर जाळावा किंवा जमिनीखाली पुरावा. मास्क जळताना काळजी घ्यावी. – ताप, खोकला अशी कुठलीही लक्षणे दिसल्यास सरकारी यंत्रणेशी संपर्क करावा. – होम क्वारंटाइन मध्ये असलेल्या व्यक्तीला जेवण देणे किंवा इतर गोष्टी देण्याची जबाबदारी एकाच व्यक्तीने पार पाडावी. – या व्यक्तीला जेवण किंवा इतर गोष्टी देणाऱ्या व्यक्तीने मास्क, ग्लोज घालावे. – या घरात शक्यतो एकाही बाहेरच्या व्यक्तीला येऊ देऊ नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता