‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून…. – डॉ. अमोल अन्नदाते

Dr. amol annadate artical

दै. लोकमत

‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून….डॉ. अमोल अन्नदाते

सदोष रस्ता बांधणी, वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक/आदर नसणारे वाहनचालक, सदोष वाहने, अतिवेगाची नशा, अतिपाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे .

२०३ दिवसांत ४५० अपघात आणि ९७ मृत्यू ही ‘समृद्धी महामार्गाची आकडेवारी, परिस्थिती किती भीषण आहे हे दर्शवणारी आहे. सदोष रस्ता बांधणीबरोबरच वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक / आदर नसणारे वाहनचालक अशा महामार्गावरून चालण्याच्या स्थितीत नसलेली सदोष वाहने, अतिवेगाची नशा आणि अकारण घाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे.

या महामार्गावर सर्वाधिक वेग मर्यादा १२० आहे. पण, भारतीय वाहनचालकांचे गाडी चालवण्याचे सरासरी तारतम्य लक्षात घेता ही कमाल मर्यादा अपघातांमध्ये भर घालणारी ठरते आहे. ही वेगमर्यादा महामार्गाची व वाहनाची आदर्श स्थिती व वाहतुकीचे सर्व नियम पाळले जात आहेत असे गृहीत धरून ठरवलेली असते. पण, ही आदर्श स्थिती क्वचितच जुळून येते. म्हणून ठरवून दिलेली वेगमर्यादा काहीही असली तरी समृद्धीवर १०० वेग मर्यादा न ओलांडणे महत्त्वाचे आहे. ८०. १०० व १२० अशा तीन लेन मार्गिका (लेन्स) महामार्गावर ठरवून दिल्या आहेत. पण, या तीन मार्गिका आणि ओव्हरटेक करण्याची सर्वात उजवी मार्गिका ही शिस्त खूप कमी गाड्या पाळतात. स्वयंशिस्तीने हे नियम पाळणे व वेगमर्यादेवर कठोर व कायदेशीर नियंत्रण आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग बांधताना काही चुका झाल्या आहेत. खालून रस्ता असताना त्याठिकाणी सिमेंटचा रास्ता डांबरी होतो व डांबरीकरण सुरू होते. त्याठिकणी मोठे उंचवटे निर्माण झालेले आहेत.काही ठिकाणी हे उंचवटे एवढे उंच आहेत की १२० किंवा काही वेळा १०० च्या वेगाने गाडी जात असल्यास त्यावरून गतिरोधक असावा,तशी उडते. जास्त वेग असल्यास ती आपली लेन तोडून इतर वाहनांवर आदळण्याची किंवा चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या कठड्यावर आदळण्याची, प्रसंगी खाली फेकली जाण्याची शक्यता आहे. बरेच अपघात हे पुलावर किंवा पूल ओलांडून गेल्यावर गाडी उडाल्याने झाल्याचे लक्षात येईल. या सर्व पुलांआधी वेग कमी करून तो ८० करण्याचे फलक लावणे व या जोडणीचे उंचवटे कमी करणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग हा सरळ एका रेषेत असल्याने व वाहनचालकांना सतत समोर त्याच प्रकारच्या दृश्याकडे बघून बधिरता येते व ते संमोहित होतात. दर दोन तासांनी किमान पाच मिनिटांच्या विश्रांतीसाठी थांबण्याची सोय या महामार्गावर कुठेही नाही. टोलनाके येतात तेही महामार्ग चढल्यावर व उतरताना.

५४,००० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या महामार्गावर अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी ट्रॉमा सेंटर, नजीकच्या रुग्णालयांपर्यंत जाण्यासाठीची आपत्कालीन सोय, रुग्णवाहिका, त्यात प्रशिक्षित डॉक्टरची उपलब्धता याचे पुरेसे नियोजन नाही. म्हणायला काही रुग्णवाहिका उभ्या असतात. पण, आतापर्यंतच्या अपघातात त्यांचा फारसा उपयोग झालेला नाही. ९ जूनपासून महामार्गाच्या टोलनाक्यांवर टायर्सची तपासणी करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. पण प्रत्येक वाहनाची अशी तपासणी जिकिरीची आहे. प्रत्येकाने स्वतः आपल्या वाहनाची स्थिती तपासणे हाच त्यावरचा मार्ग होय!

शिर्डी, नाशिक, शनी शिंगणापूर, माहूर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर अशी देवस्थाने व धार्मिक पर्यटनाला जाताना हा महामार्ग वापरणाऱ्यांना विदर्भ आणि मुंबईकडून एका दिवसात भाड्याच्या वाहनाने सकाळी लवकर निघून रात्रीपर्यंत परतण्याची घाई असते. या विचित्र हट्टामुळे ड्रायव्हरवर अतिताण येतो व रात्रभर प्रवासात अपुऱ्या झोपेमुळे अनेक अपघात घडतात. महामार्गावर शक्यतो रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेतला प्रवास टाळायला हवा.

रस्त्यांच्या बाबतीत एक वाक्य नेहमी सांगितले जाते. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडे चांगले रस्ते आहेत असे नाही तर अमेरिकेमध्ये चांगले रस्ते आहेत म्हणून ते श्रीमंत आहेत. आपल्या ‘समृद्ध अनुभवा नंतर त्यात एक भर घालायला हवी. अमेरिकेकडे (खरेतर बहुतांश प्रगत देशांकडे) चांगल्या रस्त्यांसोबत त्यांचे चांगले नियोजन आहे, लोकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल आदर आहे आणि ते पाळण्याची सवय आहे; म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. त्यांच्या समृद्धीची वाट रस्त्याने तरी विनाशाकडे जात नाही!

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com

Where do we want to lead Maharashtra? – Dr Amol Annadate

Divya Marathi Rasik

Where do we want to lead Maharashtra?

Dr Amol Annadate

No conscientious citizen has been untouched by the social and political events in Maharashtra in the last few weeks, the actions and reactions triggered by these events and the comments and responses that have followed in their wake. Where is the social political discourse in Maharashtra headed and what lies in store for the state, are the questions facing us.

Riots broke out between two groups in Kolhapur, the city of Chhatrapati Shahu Maharaj, which has hitherto been known for its social camaraderie and has been untouched by communal tensions. At the same time, the brutal killing in Mira-Bhayandar, the rape and murder of a resident in a government hostel in Mumbai, the recent incident of a girl being abused in a running Mumbai local train, extortions at gun point and incidents of ATMs being robbed….such crimes are occurring with impunity and show no signs of abating. However, political leaders in power and in the Opposition are adopting a stance of political convenience rather than taking steps to ensure citizens’ welfare. One is tempted to question the constitutional responsibility of the positions occupied by these leaders when the state’s home minister and deputy chief minister, known for being sensible leaders, start mouthing platitudes while reacting to the events occurring in Kolhapur. Citizens belonging to all communities and classes are supposed to be equal in the eyes of those who govern us. It is surprising that these leaders should forget that, particularly in times of social and religious tensions, they aren’t just leaders of any party but ministers responsible for maintaining law and order in the state. It is equally unfortunate that leaders of the Opposition too have not taken a firm stand, but have been making statements that are merely convenient or plain wishy washy.

The real reason behind the grave discrepancies between the statements and actions of those in power and those in Opposition is the race to set the narrative for the political climate in the state. This race might help some people to come to power, but as a state, we don’t even seem to have realised that we have lost the credibility we enjoyed as being one of the most progressive states in the country. There’s stiff competition among parties to usurp the Hindutva card touted by Uddhav Thackeray’s Shiv Sena thus far, ever since the Maha Vikas Aghadi government collapsed and a new government came to power. There’s also some covert competition to own the ‘real Hindutva’ label, between the BJP and the Shiv Sena, who were once as thick friends as the legendary Jai-Veeru. The war rooms of these parties are buzzing with plans like the Jan Aakrosh Morcha and the Savarkar Gaurav Yatra to lure the Hindu vote. To top it, IIM educated election strategists are nowadays brainstorming to come up with novel strategies. The only goal of these corporate battle strategists is to get their ‘client’ parties into power. They are busy checking if the existing religious polarisation model can be exploited to their advantage and strategies are chalked up accordingly.

Those who indulge in such activities for political gain should note that the social fabric of Maharashtra has been strengthened over the years by communal harmony and progressive thought. This is the DNA of the state. It is thanks to the inclusive nature of the state that a city like Mumbai could become the financial capital of the country and make its mark on the global landscape. Right since Independence, people belonging to all communities as well as migrants have called Maharashtra home, and have contributed to the progress of the state. A girl from the Baramulla district in Kashmir is currently studying her Masters programme in gynaecology at the taluka hospital where I work. During her admission to the course, her father told me, “I don’t need to worry, my daughter will be studying in Maharashtra…” Maharashtra should ideally be recognised as the country’s premier centre of academic excellence thanks to the quality of education and the excellent facilities offered here. In light of the recent events however, we need to assess whether we would like to strengthen the state’s good image or have it maligned as one of the ‘crime states’ in north India. For years, Maharashtra has maintained its image as an industry-friendly and tolerant state. But now, thanks to the violent events and provocative statements being made by political leaders, we need to evaluate the ‘brand image’ of Maharashtra that is being propagated among industry circles as well as in the world. We should be worried that hate speech and communal tension might win votes, but this could irreparably damage the tag of ‘progressive state’ that Maharashtra has won through hard work over the years.

On this background, it is also important to understand the responsibility that lies with the voters. There are 3 kinds of voters in this country. A large chunk of these is engrossed in a struggle for daily survival, and is not concerned about the state of the nation, but is worried about their own fate. The second group no longer struggles for survival, but is content with the identity they have forged on the basis of their state, language, religion and terrain. Issues related to these topics are more important to them than human development and the global image of their country. Importantly, only these 2 classes of voters are interested in casting their votes. The third class of voters is the educated, intellectual, thinking class, which believes that the country’s politics should be development oriented rather than religion oriented. However, this remains as a belief and this class has no wish to act on this. The indifference of this class is evident from the apathy shown towards the voting process as well. This class of voters doesn’t know who their graduate MLC is, and how they are elected. The first category of voters casts its vote by checking for immediate gratification or on the promise of freebies, while the second category casts its vote driven by emotion and identity. As a result, the country’s politics is governed by emotional tides and manipulated strategies. For an inclusive, citizen-oriented state to flourish, the educated youth need to look beyond commenting on and making reels for social media and become conscious voting citizens. While there’s a new dawn of progress on the global horizon, we need to now take stock and decide whether we want Maharashtra to become a magnet of progress for the country and the world, or lock our doors with communal hate, crime and unrest.

-Dr. Amol Annadate

  • Reachme@amolannadate.com
  • www.amolannadate.com
    Contact No. :- 9421516551

हक्क रुग्णांचा: कर्तव्य सरकारचे

rights-of-patients-duty-of-the-government

दै. सकाळ

हक्क रुग्णांचा: कर्तव्य सरकारचे

डॉ. अमोल अन्नदाते

आरोग्य सेवेचा हक्क देण्यावरून सध्या रान उठले आहे. तथापि, सरकारने आपल्या आरोग्य यंत्रणेत आणि तिच्या सेवा क्षमतेत सुधारणा कराव्यात. त्यावरील तरतूद वाढवून, त्यांचे सक्षमीकरण करावे. त्यासाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य जरूर घ्यावे.

राजस्थान सरकारने २१ मार्च २०२३ रोजी आरोग्य हक्क विधेयक संमत केले. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातही तशा स्वरूपाचे आरोग्य हक्क विधेयक आणणार असल्याचे सूतोवाच केले आहे. या विधेयकांतर्गत कुठल्याही रुणाला खासगी रुग्णालय आपत्कालीन स्थितीत मोफत उपचार देण्यास बांधील असेल आणि रुग्ण बरा झाल्यावर शासनाकडे त्या बिलाची मागणी सादर करून त्याचे शुल्क मिळवणे अपेक्षित आहे. संबंधित बिलाची तपासणी करून ते शुल्क शासन रुग्णालयाला देईल. यावर देखरेख करणार अर्थातच प्रशासकीय यंत्रणा. तसेच आपत्कालीन परिस्थितीची नेमकी व्याख्या काय? हे या विधेयकात कुठेही निश्चित केलेले नाही. त्यामुळे ‘राईट टू ‘हेल्थ’ किंवा आरोग्य हक्काची जाहिरात व अर्थ शासनाकडून ‘खासगी रुग्णालयात मोफत उपचार’ असा काढला जातो आहे.

भारताची राज्यघटना] प्रत्येकाला आरोग्य सेवा मिळवण्याचा अधिकार देते. तो अधिकार प्रत्येकाला मिळावाच. यात वादच नाही. पण हा आरोग्य हक्क खासगी नव्हे तर शासकीय आरोग्य सेवेद्वारे मिळणे अपेक्षित आहे. आरोग्य हक्क देणे म्हणजे खासगी डॉक्टरच्या खनपटीवर बंदूक ठेवून त्याला मोफत सेवा द्यायला भाग पाडणे नव्हे.

अमोल अन्नदाते यांचे इतर लेख वाचा

सरकारची तुटपुंजी तरतूद

स्वातंत्र्यापासून शासकीय सेवेबाबत सर्वात दुर्लक्षित राहिलेला विषय म्हणजे आरोग्य. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली तरी आरोग्य सेवांवरील खर्च दरडोई उत्पन्नाच्या केवळ २.२% एवढाच आहे. विकसित राष्ट्र ८ ते १०% खर्च करत असताना भारतात तो किमान ५% तरी असायला हवा. पण २०२५पर्यंत जाहीर केलेले लक्ष्यच २.५% एवढे कमी आहे.

सरकार स्वतः आरोग्यावर खर्च करणार नाही आणि आरोग्य घ्यायला हवे. हमी देण्याची वेळ आली की, खासगी रुग्णालयांकडे बोट दाखवणार.अशा प्रकारे ज्या खासगी सेवेने देशाची आरोग्य व्यवस्था तोलून धरली आहे, तीही नेस्तनाबूत होईल. आज देशातील ८५% जनता खासगी रुग्णालयांची आरोग्य सेवा घेते. उर्वरित १५% जनता पर्याय नाही म्हणून शासकीय रुग्णालयांची सेवा घेते. पंतप्रधानांपासून ते नगरसेवकापर्यंत सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवेसाठी खासगी रुग्णालये निवडतात. लोकप्रतिनिधींना दर्जेदार सेवा देण्यास एकही शासकीय रुग्णालय सक्षम नाही, ही खरेतर शरमेची बाब आहे. कर भरणाऱ्या जनतेला त्यांच्या हक्काची शासकीय व्यवस्था उभारणे आणि ती सक्षम करणे सोडून खासगी रुग्णालयात जा आणि मोफत सेवा घ्या, हे सांगताना अशा प्रकारे आरोग्य हमी मिळू शकत नाही याची कुठलीही जाणीव सरकारला नाही.

देशात आज एक लाख ५७ हजार ९२१ उपकेंद्रे, ३० हजार ८१३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, पाच हजार ६४९ सामुदायिक आरोग्य केंद्रे (कम्युनिटी हेल्थ सेंटर) एवढी अवाढव्य शासकीय व्यवस्था आहे. पण डॉक्टर, यंत्रसामग्री, औषधे आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या अभावामुळे ती पूर्णपणे निरुपयोगी ठरली आहे. यावर जनतेच्या कररुपी पैशांचा अपव्यय होतो आहे. या उलट खासगी वैद्यकीय पेशामध्ये खूप स्पर्धा आहे. त्यामुळे चांगल्या सेवा दिल्या जातात. रुग्ण बरा झाला तरच खासगी डॉक्टर त्यांच्या पेशामध्ये टिकू शकतो. याउलट शासकीय आरोग्य सेवेत कोणीही उत्तरदायी नसते.

खासगी वैद्यकीय व्यवसाय करणे दिवसेंदिवस वाढत्या खर्चामुळे जिकीरीचे होत आहे. त्यातच ग्रामीण भागात चांगले मनुष्यबळ आणि तेथील रुग्णांची आर्थिक स्थिती पाहता हे रुग्णालय चालवण्याचे आर्थिक गणित अधिकच अवघड आहे. सर्व क्षेत्रात महागाई असताना ग्रामीण भागातील बहुसंख्य डॉक्टरांची फी आजही ५०-१०० रुपये आणि फार फार तर २०० रुपये आहे. तसेच खासगी रुग्णालयात उत्तम आरोग्य सेवा द्यायची असेल तर ती कधीही मोफत शक्य नाही, हेही समजून घ्यायला हवे.

जबरदस्तीचा मार्ग अयोग्य

आरोग्य हक्क विधेयकात रुग्णालयांना शासन शुल्क देणार आणि त्यात प्रशासनाचा हस्तक्षेप असेल तर ही शुल्क अदा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असेल हे म्हणणे आजवरच्या इतिहासावरून धाडसाचे ठरेल. शासनाने ठरवले तर ते काहीही करू शकते, हे आपण जाणतो. म्हणून खरेतर शासकीय रुग्णालये एवढी सक्षम आणि मनुष्यबळ व्यवस्थापन इतके कुशल असायला हवे की, खासगी डॉक्टर स्वतःची रुग्णालये बंद करून स्वेच्छेने या रुग्णालयात सेवा देण्यास यायला हवेत, ब्रिटन, अमेरिका, अखाती देश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशातील शासकीय आरोग्य सेवेत आज बहुसंख्य भारतीय डॉक्टर आहेत. भारतातील शासकीय आरोग्य सेवा मात्र शेवटच्या घटका मोजत आहे. यदाकदाचित शासकीय सेवा देण्यासाठी शासनाला खासगी डॉक्टरांचा सहभाग हवा असेल तर ती स्वागतार्ह कल्पना आहे. पण त्यासाठी जबरदस्ती करणे हा पर्याय असू शकत नाही. त्यासाठी सत्ताधाऱ्यांना लोककल्याण या एका आणि एकाच चष्म्यातून पाहून खासगी क्षेत्राला पारदर्शक, कुठलाही प्रशासकीय हस्तक्षेप नसलेली यंत्रणा निर्माण करावी लागेल. महात्मा फुले योजनेत कार्डिओलॉजी, युरोलॉजी अशा निवडक शाखांमध्ये खासगी रुग्णालयांनी हिरीरीने सहभाग नोंदवत हे दाखवून दिले आहे.

डॉक्टरांवरील हल्ले दिवसागणिक वाढत असताना आरोग्य हक्क विधेयकातील अनेक तरतुदींमुळे आधीच ताणले गेलेले रुग्ण डॉक्टर संबंध आणखी ताणले जाणार आहेत. देशभरात या विधेयकावरून डॉक्टर रस्त्यावर उतरले आहेत. त्यावरून सर्वसामान्यांना आरोग्याचा हक्क मिळावा या विरोधात डॉक्टर आहेत, असे मुळीच नाही. कारण डॉक्टरही सर्वसामान्य जनतेतीलच एक आहेत. पण हा अधिकार खासगी डॉक्टरांना बळजबरीने मोफत सेवा देण्यास भाग पाडून नव्हे तर बळकट शासकीय आरोग्य यंत्रणेतून हवा. आरोग्य हक्क विधेयकाच्या निमित्ताने खासगी डॉक्टर आभासी खलनायक रुग्णांसमोर ठेवून आरोग्यसेवा देण्याच्या स्वतःच्या जबाबदारीतून सरकारला सोयीस्कररित्या पळ काढायचा आहे. त्याऐवजी शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून ‘युनिव्हर्सल हेल्थ केअर’ यावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

सदरील लेख ०४ एप्रिल , २०२३ रोजी सकाळच्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. सकाळ वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

डॉ. अमोल अन्नदाते
Reachme@amolannadate.com
www.amolannadate.com

महत्व ठाम पालकत्वाचं

The Importance of Strong Parenting

*दै. दिव्यमराठी* (मधुरिमा)

*महत्व ठाम पालकत्वाचं*

*-डॉ.अमोल अन्नदाते*

‘स्पेस’च्या नावाखाली पाल्यांना अति स्वातंत्र्य देणं जसं चुकीचं तसंच पाल्य बिघडेल म्हणून त्याच्यावर अवाजव बंधनं घालणंही चुकीचंच… नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराच्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर, लोकशाहीवादी ठाम पालकत्वाची आवश्यकता प्रतिपादित करणारा लेख…

आपल्या मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत प्रत्येक पालकाच्या मनात धडकी भरवणाऱ्या श्रद्धा वालकरच्या हिंस्त्र हत्येची चर्चा हो या हत्येचा घटनाक्रम, त्यातील थरारकता, गुन्हेगारी मानसिकता,कौर्य या घटनेतील जातीचे संदर्भ या अंगाने होते आहे. पण याही पलीकडे ही घटना वर्णाच्या पतकत्वाशी व पालकत्वाच्या दीर्घर्कालीन प्रक्रियेशी निगडीत आहे हे समजून घेणे गरजेचे असते. पालकत्व म्हटले कि आपल्याला रांगणारे बाळ, शाळकरी मुलं किंवा कुमार वय समोर येते, पण पालकत्व, पाल्य व पालक दोहौंसाठी जन्मल्यापासून ते आयुष्यभर चालणारी ही प्रक्रिया आहे. मुलं वयात आल्यानंतरच्या पालकत्वावर तर पाल्याचे सगळे भवितव्य अवलंबून असते हा धडा श्रद्धा पालकर हत्येसारख्या घटनांतून प्रकर्षांने पुढे येतो.

जागतिकीकरणाच्या रेट्यात पालकत्वाविषयीच्या संकल्पना बदलणे अपरिहार्य होते. त्यातच लिबरल पेराटिंग म्हणजे उदारमतवादी पालकत्व असे पालकत्व जे जास्त पाल्य सहिष्णू, – पाल्यांच्या बाजूने झुकणारे, त्यांना अधिक मुक्तता, स्पेस देणारे असावे असे काहीसे पाश्चिमात्य मत प्रवाह समाजात, कुटुंबा कुटुंबात रुजू लागले. बापासमोर उभेही राहण्याची हिंमत नसणारी पिढी पालकाच्या भूमिकेत आली तेव्हा हे पचणे जड असले तरी व्यावसायिकदृष्ट्या ही पिढी आजच्या युगातील अत्यंत व्यस्त, महत्त्वाकांक्षी आणि काम करणारी जोडीदार ( वकिंग मदर ) असलेली आहे. म्हणून पाल्यांना स्पेस देणारे हे पाश्चिमात्य प्रारूप पालकांच्या पथ्यावर पडणारे व सोयीचे होते म्हणून ते पटकन स्वीकारलेही गेले. मुलांना वेळ देण्याची या पिढीची व्याख्या मुलांना अंघोळ घालणे, बापाने मुलीची वेणी घालणे अशी कधीच नव्हती म्हणून आई-बापाच्या रूपाने विरुद्ध लिंगी प्रेमाचा, वात्सल्याचा, मायेचा स्पर्श काय असतो या मानसिक स्पर्श ज्ञानाला ही पिढी पारखी राहिली. वेळ घालवण्याच्या गिल्टमधून परदेशी किंवा पर्यटन स्थळी जाणाऱ्या पालकांच्या पिढीमध्ये या स्पेसचा पुढचा टप्पा लिव्ह इनच्या रूपाने डोके वर काढू लागला. लिव्ह इन चूक कि बरोबर या नैतिक पेचात न पडता आपण पालकत्वाच्या आज आवश्यक असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी प्रारूप, पालक व पाल्य दोघांनाही स्वीकारु शकतील असा मध्यम मार्ग शोधणे व स्वीकारणे आवश्यक आहे. डेमोक्रेटिक पेराटिंग हा तो मध्यम मार्ग असू शकतो.

डेमोक्रेटिक अर्थात लोकशाहीवादी ठाम पालकत्व म्हणजे नेमके काय? लोकशाही असलेल्या देशात तुम्हाला जसे व्यक्तीस्वतंत्र्य असते पण तरी ते घटनेने आखून दिलेल्या कायद्याच्या चौकटीत असते. तसेच कुटुंबात असायला हवे. आम्ही डॉक्टर म्हणून पालकांना पाल्यावर विश्वास ठेवा असे जरुर सांगतो, पण आंधळा विश्वास ठेवा असे सांगत नाही. विश्वास ठेवताना डोळे उघडे ठेवा असेही सांगतो. स्वातंत्र्य देताना काही ठाम सीमा रेषा पाल्यांना आखून देणे हे पालक नाही तर कोण करणार? ज्या डोहामध्ये पोहताना अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत नेमके त्याच डोहात मुलाला पोहण्याची परवानगी कशी देणार? घरातील या सीमा ठरवताना काही गोष्टी वय वाढेल व मुलाची समज जोखून त्यात चर्चा करून थोडी फार शिथिलता आणता येऊ शकते, काही गोष्टींना मात्र झिरो टॉलरन्स हे पाल्यांना ठामपणे सांगणारे ठाम पालकत्व आवश्यक असते. त्यातच असुरक्षित जागा व असुरक्षित व्यक्तीपासून लांब ठेवण्याचा व्हेटो पालकांनी त्यांच्या हातात ठेवणे गरजेचे आहे.

पालकत्वाची निर्णायक भूमिका तेव्हा सुरु होते जेव्हा मुले एखाद्या नात्यात मानसिकदृष्ट्या अडकून पडतात. जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही मानसिक, भावनिकदृष्ट्या असुरक्षित (वलनरेबल) असतेच, पण हे भावनिक, मानसिक विरेचन तिथेच हवे जिथे शोषण होणार नाही. अशा सुरक्षित जागांचे, व्यक्तीचे ज्ञान हे कुटुंबातच द्यायला हवे. उपभोगापासूनच रोखण्यापेक्षा शोषण विरहित उपभोगाचे ज्ञान पाल्यांना देणे आवश्यक आहे. कुमारवयात एखादी भिन्न लिंगी व्यक्ती आवडण्याला कुमारवयीन मानसशास्त्रात काफ लव (calf love) असे म्हणतात. याची हाताळणी कशी करावी हे उपजत ज्ञान कुठल्याच पालकाला नसते. यासाठी प्रशिक्षित समुपदेशक व मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे असते. नुकतेच १६ व १७ वर्षांचे एक ओळखीचे प्रेमीयुगुल घर सोडून पळून गेले. परतल्यावर त्यांच्याशी रीतसर संवाद झाल्यावर मुलीने याचे कारण सांगितले की, ‘मला एक मुलगा आवडतो, हे घरी सांगण्याची हिंमत झाली नाही.’ तुम्हाला कोणाविषयी प्रेम वाटत असल्यास यात काही चूक नाही, पण ते तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा, त्यातील महत्त्वाच्या गोष्टी समजून घेण्यास आम्ही तुम्हाला मदत करु हा आत्मविश्वास पालकांनी पाल्यांना द्यायला हवा. आपल्या व्यक्तिगत भावनिक गोष्टी घरात सांगण्यास पाल्यांना लाज किंवा भीती वाटता कामा नये हे पुढील धोके टाळण्यास आवश्यक आहे.

मुले मोठी झाली, मग ती लग्न किंवा इतर कुठल्याही नात्यात असतील व त्यांच्यावर हिंसाचार होत असल्याचे धोक्याच्या घंटा (रेड फ्लॅग) दिसत असतील तर कौटुंबिक पातळीवर मुलांच्या मागे उभे राहत त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्व बळ मुलांनाआयुष्यभर देणे गरजेचे आहे. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही भावनिक व शारीरिक हिंसाचार इतरांवर करणे किंवा इतरांचा सहन करणे आम्हाला मान्य नाही हे धडे कुटुंबात वारंवार गिरवणे गरजेचे आहे. आई-वडिलांच्या भीतीने किंवा त्यांचे मन जपण्यासाठी हिंसाचार सहन करत आयुष्य काढण्याची गरज नाही हा स्पष्ट संदेश पालकांकडून मुलांना गेला पाहिजे.


-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com
संपर्क :9421516551

केईएम – ब्रँड नव्हे, ‘कल्ट’ ब्रँड

kem-not-a-brand-but-a-cult-brand

डोंबिवलीकर दिवाळी अंकातून…

केईएम – ब्रँड नव्हे, ‘कल्ट’ ब्रँड

  • डॉ. अमोल अन्नदाते

जसा सौंदर्य या शब्दाचा नेमका अर्थ शब्दात पकडता येत नाही तसाच ब्रँड म्हणजे काय याचा समर्पक अर्थ लावता लावता कॉर्पोरेट जगताने कित्येक क्षण, शब्द, बुद्धी संपदा खर्ची घातली, पण त्याचा अर्थ सहजपणे लावणे कुणालाच शक्य झालेले नाही. मोठमोठे ब्रँड उदयाला आले आणि लयासही गेले तेव्हा ब्रँडच्या व्याख्येच्या मर्यादा लक्षात आल्या आणि मग त्याच्याही पुढे काय असा शोध सुरू झाला. ब्रँडचा अर्थ जिथे संपतो तिथून पुढे सुरू होणारा शब्द म्हणजे ‘कल्ट ब्रँड’. ‘कल्ट ब्रँड’ म्हणजे काय हे समजून घेताना आणि सांगतानाही मोठी दमछाक होते. जो ब्रँड उभा राहताना त्याच्या छताखाली येणाऱ्यांची त्यात खोलवर दीर्घकालीन मानसिक गुंतवणूक असते, ती पिढ्या दर पिढ्या वाढत जाते, ज्याची व्याप्ती शोधताना हा ब्रँड सुरू कुठून होतोय आणि त्याचा शेवटचा धागा आहे कुठे याचा थांगपत्ता लागत नाही , ज्याच्या यशात एक गर्भित गूढता असते आणि जो सार्वकालिक असतो तो ‘कल्ट ब्रँड’. वैद्यकीयच नव्हे तर सर्वच शिक्षण क्षेत्रात कल्ट ब्रँडचे उदाहरण द्यायचे झाल्यास सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘केईएम’. केईएम हे मुख्य रुग्णालयाचे नाव असले तरी ज्या मुळे या तीन शब्दांचे गारुड अख्या जगाच्या वैद्यकीय क्षेत्रावर आहे ते केईएमचे मुकुट म्हणजे सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज अर्थात गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज.

कितीही काळ लोटला तरी घरातील हुशार मुलाने डॉक्टर व्हावे ही पालकांच्या मनातील इच्छा अबाधित राहिली आहे. प्रत्येक हुशार मुलाने डॉक्टर, इंजिनिअरच कशासाठी व्हावे अशी भले तुम्ही कितीही टीका करा, पण ही टीका करणाऱ्याच्या घरातही मुलगा चुणचुणीत वाटू लागला तर त्याच्या मनालाही हाच विचार शिवून जातो की या मुलाने डॉक्टर व्हावं. तर अशा सव्वाशे कोटीच्या देशातून प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात, गावात, शाळेतील, घरात पहिल्या येणाऱ्या मुलांना जिथे प्रवेश मिळतो अशी संस्था म्हणजे केईम.

कुठलाही ब्रँड समजून घेताना त्याचे ब्रीद वाक्य समजून घ्यावे लागते . जेव्हा वयाच्या अठराव्या वर्षी तुम्ही पहिली पासून पहिले आलेले असता आणि वैद्यकीय शिक्षण सुरू होताना तुम्ही या वास्तूत प्रवेश करता तिथे एक ब्रीद वाक्य प्रवेश द्वारावर तुमचे लक्ष वेधून घेते. ते ब्रीद आहे Genius alone lives, all else is mortal अर्थात ‘तल्लख विचारशील बुद्धिमत्ता फक्त तेवढी अमर आहे, बाकी सर्व मर्त्य आहे.’ प्रवेश करताना पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला या वाक्यापासून केईएम तुमचा नियोजनबद्ध रीतसर बौद्धिक, मानसिक जिनोसाईड घडवून आणतं. तुम्ही मराठी साहित्य शिकायला एखाद्या महाविद्यालयात गेलात आणि तिथे पू. ल. देशपांडे, आचार्य अत्रे , वी. वा. शिरवाडकर, बा. भ. बोरकर हे अध्यपनासाठी असतील तर तुमचे काय होईल? इथे येणाऱ्या विद्यार्थ्याचे तेच होते. ज्या डॉक्टर लेखकांची पुस्तके प्रमाण मानली जातात त्यातील अनेक लेखक इथले शिक्षक होऊन गेले आहेत. म्हणून स्वतःला रथी महारथी समजणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पहिल्या वर्षात जे बौद्धिक गर्वहरण होते त्यातून ‘भांड भरून घेण्यासाठी ते आधी रीतं कराव लागतं’ ही पहिली जाणीव मिसूरड फुटताना केइएम करून देतं, ती म्हातारपणी दात पडेपर्यंत तशीच राहते. म्हणूनच सतत अनलर्निंग आणि लर्निंग हा या ब्रँडचा महत्त्वाचा भाग. अलौकिक बुद्धिमत्तेचे अनेक विद्यार्थी आणि अनेक शिक्षक एकत्र आल्याने व सोबत एकाहून एक सरस्वतीपुत्रांच्या सहवासातून सूर्याचे तेज याची देही पाहिलेल्यांना कुठल्या ‘एलईडी लाइटच्या’ प्रकाशाचा सोस राहणार ? म्हणून केईएम मधून बाहेर पडलेले कधी कोणाहीमुळे प्रभावित होत नाहीत. त्यायामुळेच ‘केईमाईट्स’ उद्दाम , गर्विष्ठ अशी प्रतिमा तयार होते. मुळात ते उद्दामपणापेक्षा बौद्धिक वैराग्य असते.

कल्ट ब्रँडचा एक विशेष असतो. रजनिकांत , अॅपल , ओशो, सलमान खान अशी काही कल्ट ब्रँडची उदाहरणे बघितली तर एक लक्षात येते की अॅपल वापरणारे आणि न वापरणारे अशी जगाची विभागणीच हे ब्रँड करून टाकतात. तसेच वैद्यकीय क्षेत्रात ‘केईम वाले’ आणि ‘इतर’ असा कॉम्यून १९२६ पासून म्हणजे गेल्या ९६ वर्षांपासून निर्माण झाला आहे. या ब्रँडच्या जन्मामध्येच तो का व कसा उभा राहिला याची कारणे सापडतात. १८४५ साली जेजे रुग्णालय व ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. इथून शिकलेले भारतीय पुढे इंग्लंडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन भारतात परतले तेव्हा भारतीय प्राध्यापकांना जेजे मध्ये मज्जाव करण्यात आला. शिकायचं तर इंग्रजांकडूनच, हे भारतातील उच्चशिक्षित डॉक्टरांच्या जिव्हारी लागलं. त्यातून भारतीयांनी सुरू केलेले व जिथे भारतीयच शिकवतील असे वैद्यकीय महाविद्यालय हवे म्हणून तेव्हाच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या अखत्यारीत गोरधनदास सुंदरदास या दानशूर कपड्याच्या व्यापाऱ्याने दान दिलेल्या परळच्या जमिनीवर पाहिलं भारतीय वैद्यकीय महाविद्यालय उभं राहीलं – ते म्हणजे केईएम! स्वदेश हा शब्द अजून देशाला माहीत नव्हता तेव्हा १९२५ साली हे घडलं आणि ‘स्वाभिमान’ हा जन्माचा हेतू असलेला गुणाचा अर्क पुढे केईएमशी जोडलेल्या प्रत्येकामध्ये झिरपत गेला. एखाद्या संस्थेचा मूळ गुण अनेक वर्षानीही कसा तळपत राहतो याचा प्रत्यय केईएमच्या प्रत्येक विद्यार्थ्यात येतो. वैद्यकीय परीक्षेत सहसा परीक्षकांशी वाद घालायचा नसतो, तसे केल्यास अनुत्तीर्ण होणे निश्चित असते. पण तरीही एमडीच्या परीक्षेत आपण बरोबर आहोत, हवं तर आता पुस्तक उघडा असा ‘ मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही ‘ पद्धतीचा बाणा दाखवून नापास होण्यास आनंदाने तयार असणारे विद्यार्थी हमखास केईमचेच असतात, ते ९६ वर्षापासूनच्या याच स्वाभिमानाच्या भावनेतून. म्हणूनच परीक्षेत , नवीन ठिकाणी कामावर रुजू होताना , मुलाखतीत ‘ ओ , सो यू आर केईमाईट ? ‘ या प्रश्नामध्ये बराच गर्भितार्थ असतो. परदेशात तुम्ही केईमाईट आहात हा कुठल्याही रुग्णालयात नोकरी मिळवताना कॉलर वरील मोठा स्टार असतो. भारतातील पहिले किडनी प्रत्यारोपण , पहिले ह्र्दय प्रत्यारोपण , पहिले भारतीय इसीजी मशीन, पहिली टेस्ट्युब बेबी असे बरेच ‘पहिले’ या पहिले आलेल्यांच्या संस्थेतून जन्माला आले. म्हणून Be the first one to do it or be the best one to do it- तुम्ही जगात पहिल्यांदा करणारे असला पाहिजेत किंवा जगात सर्वोत्तम करणारे असला पाहिजेत हा विचार केईएम मधून बाहेर पडल्यावर तुमचा कधीच पिच्छा सोडत नाही.

केईएम कॅम्पस मध्ये तुम्ही डोळे , कान उघडे ठेवून काही क्षण वावरलात किंवा या संस्थेच्या एका मध्यवर्ती ठिकाणी एक रात्र काढलीत तर तुम्हाला हा ब्रँड समजून घेता येतो. निवडणुकीच्या काळात जसे राजकीय वातावरण तापून ते तुमच्या अंगाला, श्वासाला स्पर्श करू लागते तसे या आवारात शिक्षणाची , बुद्धिमत्तेची एक वेगळीच धुंदी तुम्हाला स्पर्श करते. इथले तीन मजली पूर्णतः वातानुकूलित वाचनालय हे भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोत्तम वाचनालय समजले जाते. विशेष म्हणजे ते २४ तास खुले असते आणि त्याहून विशेष म्हणजे दिवसापेक्षा ते रात्री ओसंडून वाहत असते. मध्यरात्री तीन वाजता दोनेकशे मुले वाचनालयात आणि शे पन्नास आवारात अभ्यासाचे अड्डे असलेल्या इतरत्र ठिकाणी मानेवर खडा ठेवून जाडजूड पुस्तके पेलत ज्ञान साधनेत दंग असतात. म्हणून केइएम मध्ये मध्यरात्री एवढे चैतन्य वाहत असते की ती दिवसाची कुठली वेळ आहे हे बाहेरच्या व्यक्तीला सांगता येणार नाही. ‘मुंबई कभी सोती नही’ असे म्हणतात पण ‘केइएम तुम्हे कभी सोने देता नही’ असे म्हणावे लागेल. वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी ‘नवीन काय?’ हे वाचणारे माजी विद्यार्थी इथे सर्रास आढळतात. नुकतेच प्रवेश घेतलेल्यांचा ते अजाणतेपणे राज्यभिषेक करून त्यांना ‘केइएम’ या बीज मंत्राची दीक्षा देतात. जसे सिव्हिलियन आणि सैन्यातल्या व्यक्तीची दिनचर्या , जगण्याची पद्धत वेगवेगळी असते. तशी केईएमच्या विद्यार्थ्याची दिनचर्या वेगळीच असते. देश पातळीवरील ऑल इंडिया पीजी एन्ट्रन्स ( पदव्युत्तर परीक्षेत ) भारतात दुसरा आलेला विद्यार्थीही निकाल बघून झाल्यावर चेहऱ्यावरची रेषही हलू न देता पुढच्या क्षणाला वाचनालयात लगेचच अभ्यासाला बसतो. कारण त्याला एम्स किंवा पीजीआय या पुढच्या परीक्षेत पहिला किंवा दुसरा आल्याशिवाय समाधान मिळणार नसते. हा विद्यार्थीच केईएमचा ब्रँड उभा करत आला आहे. कोणी याला वेडेपणा म्हणेल पण stay hungry stay foolish हाच केईएमचा ब्रँड आहे. हा वेडेपणा हीच केईएमची ओळख आहे. एका इंग्रजी वाहिनीच्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे त्वेषाने बोलून गेले होते – आय एम अ मॅड मॅड हिंदू ‘ यामुळेच बाळासाहेब ठाकरे हा ‘कल्ट ब्रँड’ उभा राहिला. केईएम तुम्हाला हाच madness देते आणि तुम्ही बाहेर पडता तेव्हा मॅड मॅड डॉक्टर बनून जाता. केईएम तुम्हाला केवळ हा madness च देत नाही तर तो बिनधास्तपणे मिरवण्याची सदाफटिंग वृत्ती, कला शिकवते आणि हिम्मतही देते. त्यातूनच केईएम अॅटिट्युड हे विशेषण वैद्यकीय विश्वात जन्माला आले. फास्ट लोकलच्या दारात उभं राहिलं की तुम्ही आपोआप आत खेचले जाता, तसेच ‘ब्रँड केईएम’ तुम्हाला आपोआप कवेत घेते.

जसा अॅपल वापरल्यावर तुम्ही दुसरा फोन वापरू शकत नाही तसेच केईएम मधून बाहेर पडल्यावर तुम्ही कुठेच परत तसे अॅडजस्ट होऊ शकत नाही. या ब्रँडचा मोठा धोका म्हणजे ते तुम्हाला त्याचे व्यसन लावते. तुमचे शिक्षण संपले तरी ते तुमच्या मानगुटीवर बसते आणि प्रत्येकजन शिक्षण संपल्यावरही काही तरी कारण काढून काही काळ तरी इथे रेंगाळतोच. केईएमचे शिक्षक , इथली शिक्षणाची पातळी व बौद्धिक झिंग अनुभवल्यावर तुमच्या स्वतः च्या आयुष्यात एक अस्वस्थता येते . ही अस्वस्थतेची टोचणी सतत तुम्हाला गुणवत्ता आणि नैतिकता तुमच्या वैद्यकीय व्यवसायात प्रत्येक रुग्ण तपासताना जाणवत राहते. केईएमचे विद्यार्थी वेगळ्याच विश्वात राहतात आणि अव्यवहारी असतात असा आरोपही बऱ्याचदा होतो. अध्यात्माची एक विशिष्ट पातळी ओलांडली की भोवताली काय होतंय , लौकिक विश्वात काय घडतंय याचं भान तुम्हाला राहत नाही, अस म्हणतात. केईएमचे विद्यार्थी बऱ्याचदा अशाच शैक्षणिक अध्यात्मात ढकलले जातात. हे शैक्षणिक अध्यात्म आणि त्यातून निर्माण होणारे ‘उपभोग शून्य स्वामी’ हाच ‘ब्रँड केईएम’ आहे. पहिले डीन जीवराज मेहता , डॉ पी के सेन , डॉ पुरंदरे , डॉ बालिगा , आर्थर डीसा . डॉ फडके ते डॉ रवी बापट , डॉ शरदिनी डहाणूकर , डॉ अविनाश सुपे आशा अनेक रत्नांची माळच वर्षानुवर्षे या ब्रँड भोवती गुंफली गेली.

केईएम तुम्हाला सरस्वतीचा दास बनवून सोडत असला तरी इतर अनेक क्षेत्रात केईएम तुम्हाला साथ देते. उद्योग , राजकारण , साहित्य , शिक्षण संस्था , कला , प्रशासकीय सेवा अशा अनेक क्षेत्रात केईएमचे विद्यार्थी आहेत. तुम्ही क्षेत्र बदलले तरी केईएमपण आणि सर्वोत्तमाचा ध्यास तुमचा पाठलाग करत राहते. ‘एके काळी इथे असे होते’ अशा नॉस्टॅलजियाला या ब्रँड मध्ये स्थान नाही. ‘इथे कालही असेच होते , आजही तसेच आहे , उद्याही तसेच असेल’, हा आहे ब्रँड केईएम .

आपले विद्यापीठ किंवा जिथून मुख्य शिक्षण घडले त्याला अल्मा मॅटर असा मूळ लॅटीन पण रूढार्थाने इंग्रजी शब्द प्रचलित आहे. या शब्दाचा खोलवर अर्थ आहे, ‘पोषण करणारी आई व तिची समर्पित मुले.’ ‘माझं सगळं घेऊन टाक’ म्हणणारे रामकृष्ण परमहंस आणि त्यातून परमहंसांना कैवल्यज्ञान देणारी आई भवानी यातून पुढे विवाकानंद हा ब्रँड शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत तळपला . अल्मा मॅटर चा खरा अर्थ हा आहे जो केईएम शिकवते. सूर्य कुठलाही भेदभाव न करता सर्वांना समान उर्जा देतो, तसे देशभरातील गोर गरीब रुग्णांचे उपचार व वैद्यकीय शिक्षणाचे अव्याहत ज्ञान यात स्वतःला समर्पीत करणारी आई आणि ९६ वर्षे तिच्यातून जन्मलेली डॉक्टर मुले, हाच आहे कल्ट ब्रँड – केईएम.

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com