आपल्याला काय हवे? धनशक्ती की लोकनीती…? – डाॅ. अमोल अन्नदाते

Dr Amol Annadate Artical

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

आपल्याला काय हवे? धनशक्ती की लोकनीती…?

डाॅ. अमोल अन्नदाते

सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉंडच्या मुद्द्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाला फटकारले आणि त्याबाबतचा सगळा तपशील जाहीर करण्यास सांगितले. रोजच्या जगण्याच्या संघर्षात व्यस्त असलेल्या सर्वसामान्य माणसाला इलेक्टोरल बॉंड म्हणजे काय ? आणि त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे हे ही कळायला मार्ग नाही. एखादी कॉर्पोरेट कंपनी कुठल्या ही पक्षाला हवा तितका निधी दान करू शकते व याचा तपशील तो पक्ष व दाता यांच्यातच गुप्त राहील असे या बॉंडचे स्वरूप आहे. उगाच एखाद्या पक्षा बद्दल अचानक उमाळा आला म्हणून कोणी कोट्यवधी रुपये एखाद्या पक्षाला दान करणार नाही. त्यामुळे परस्परहितासाठी केलेली एक मोठी देवाण घेवाण अशा दानामागे असते हे उघड गुपित आहे. खरे तर आपल्याकडे मते मागणारा पक्ष सत्ताधारी असेल, तर लोकशाहीच्या तत्वाला धरुन त्याने आपल्या हिताचे, कल्याणकारी राज्य चालवले आहे का आणि तो पक्ष विरोधातील असेल तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी त्याने आजवर काय काम केले आहे यावर मतदानाचा निर्णय होणे अपेक्षित असते. ही इतकी साधी प्रक्रिया आहे. मग यात पैशाचा व्यवहार येतोय कुठे ? पण साध्या वाटणारी ही प्रक्रिया आज पूर्ण पणे पैशाच्या देवान घेवाणी मुळे गुंतागुंतीची झाली आहे. मग ती पैशाची देवान घेवाण धनाढ्य कंपन्या व सरकार मध्ये असो कि मतदार व उमेदवार व त्यांच्या मागे असलेल्या पक्षा मध्ये असो. कोणाला निवडायचे हे निकषच आपण बदलले आहेत .


आज एखाद्याकडे धनसंचय झाला कि त्याला राजकारणाचे डोहाळे लागतात. याचे कारण आज राजकतीय प्रक्रियाच अर्थ केंद्रित झाली आहे व कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्यावर मनसोक्त पैसे उधळणारा नेता हवा आहे. महाराष्ट्रात असे बरेच बाहुबली नेते आहेत ज्यांची नावे अनेक आर्थिक गैर व्यवहारात गोवले गेले आहे. यातील अनेकांचा सहभाग अगदी उघड आहे व सर्व सामान्य व्यक्तींना त्याची इथंभूत माहिती आहे. पण मतदारांच्या व्यक्तिगत गरजा पूर्ण करणारे व आपल्या मतदारसंघातील जनतेवर मनसोक्त खर्च करणारे हे नेते लोकांच्या गळ्यातील ताईत आहेत व त्या त्या भागात अजिंक्य आहेत. त्यांचे सगळे गैरव्यवहार , गैरवर्तन लोक माफ करायला तयार आहेत. भ्रष्टाचारातून अमाप पैसा जमवा व त्यातील थोडा जनतेवर खर्च करा या राजकारणाच्या मॉडेल ला लोकमान्यता मिळणे हे आजच्या लोकशाहीचे सर्वात मोठे दुर्दैव आहे. ज्या पैशातून राजकीय व सत्ताधारी थातूर मातुर व्यक्तिगत लाभ आपल्याला देतात ते आपल्याच ताटातील सकस आहार काढून घेऊन त्या जागी काकडी , गाजर परत वाढण्यासारखे आहे हे वास्तव सर्व सामन्यांच्या गळी उतरवणे आवश्यक आहे.


अनेक वर्ष परकीयांनी राज्य केल्या मुळे भारतीयांच्या जनुकात राजा व त्राता शोधणे खोलवर भिनले आहे. लोकशाहीत राजा नसतो व नेता ही नसतो काही वर्षे नेमलेला लोकशाहीचा विश्वस्त असतो व त्याच्यात व सर्वसामान्य लोकांमध्ये फारसा फरक नसतो हे लोकशाहीचे सत्व आहे हा विचार अजून ही रुजलेला नाही. म्हणून सर्वसामान्य मतदार नेत्यां मध्ये राजाचा अंश शोधतात. नेत्यांचे ताफे, अंग रक्षक , उंची कपडे , प्रासाद तुल्य निवास , त्यांच्या मुलांची भव्य लग्न सोहळे हे सर्व सामन्यांचे कौतुकाचे विषय ठरतात नव्हे ते आता राजकारणात यशस्वितेचे क्वालीफीकेशन व मुख्य मापदंड ठरत आहेत. शांत मनाने सद्सद्विवेकबुद्धीने विचार केल्यास या सर्वांचा व कल्याणकारी राज्य चालवण्याचा संबंध काय ? यामुळे सर्वात मोठे नुकसान असे होते कि काही चांगले करण्याची इच्छाअसणारे किंवा राजकारणाचा पोत बदलण्याची मनीषा असणार्यांना केवळ आर्थिक ताकद नाही म्हणून या व्यवस्थेत येण्याची संधीच नाही. या व्यवस्थेला कोणी भेदू शकत नाही असे एक जाळेच विणले गेले आहे. आधी काही ही करून श्रीमंत व्हा व मग अधिक श्रीमंत होण्यासाठी राजकारणात येऊन काहीही करा व अधिक श्रीमंत व्हा यात लोकांचे राज्य तर लुप्त होतेच आहे . शिवाय सर्व समान्य माणूस स्वतः कधीच सत्तास्थानी न जाण्याची योजना स्वतःच बनवून स्वतः विणलेल्या जाळ्यात सर्व समान्य मतदारच अडकला आहे. राजा का बेटा ही राजा क्यू बनेगा ? हा प्रश्न विचारण्याची नैतिकता आपण गमावून बसल्याची जाणीव सर्व समान्य मतदारांना या निर्माण झालेल्या घातचक्रातून जितकी लवकर होईल तितकी वेगाने लोकशाहीच्या पुनुरुजीवनाची प्रक्रिया सुरु होईल .


विशिष्ट लाभ मिळावा म्हणून सरकार , राजकीय पक्ष यांच्यात वरच्या पातळीवर व्यवहार आणि मते मिळावी म्हणून उमेदवार आणि मतदार यांच्यात खालच्या पातळीवरचा व्यवहार या दोन्ही व्यवस्था लोकशाही व निवडणूक प्रक्रीये भोवती अनैतिकतेचे दोन दोर आवळणारे आहे. निवडणुकीच्या दोन दिवस आधी एका मताला किती पैसे वाटले जाणार आहेत हा दर फुटतो. तुल्यबळ उमेदवार किती अर्थशक्ती पणाला लावतात यावर शेअर मार्केट प्रमाणे हा दर निवडणूक संपे पर्यंत पुढे मागे होतो. काही शे रुपयात मत विकून आपण आपले हक्क , अधिकार , मुलांचे भवितव्य , विकासाच्या संधी सर्व विकतो याची जाणीव मतदानासाठी पैसे घेणाऱ्यांना नसते. आश्चर्य म्हणजे सुखवस्तू , सुशिक्षित मतदार ही आमचे मतदानाचे आले नाहीत म्हणून विचारणा करतात हे लाजिरवाणे आहे. असे असल्यावर ईलोक्टोरॉल बॉंड सारख्या विषयावर तुम्ही कुठल्या तोंडाने व नैतिकतेने जाब विचारणार आहात . निवडणूक खर्च , राजकारणा भोवती भरमसाठ खर्च व गुंतवणुकीवर परतावा ( रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ) हे गणित नाहीसे होत नाही तो पर्यंत विकासाच्या मूळ मुद्द्यांवर निवडणुका लढल्या जाणार नाहीत व राजकारण ढवळून निघणार नाही. प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात अशी एक निर्णायक वेळ येते जेव्हा देश एका चौरसत्यावर उभा असतो आणि तिथले नागरिक काय ठरवतात त्यावर भविष्य घडते बिघडते. राजकारण अर्थशक्ती मुक्त करण्याचा व निवडणुकित पैसा ,उमेदवाराची आर्थिक कुवत हे मुद्दे गौण ठरवण्याचा रस्ताच देशाला सशक्त लोकशाही कडे नेईल. त्यासाठी राजकीय पक्ष म्हणजे खरेदी विक्री संघ अन् निवडणूक म्हणजे बाजार समिती नव्हे, हे आधी प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

www.amolannadate.com

9421516551

‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे? – डॉ. अमोल अन्नदाते

medical students

दै. महाराष्ट्र टाइम्स

‘वैद्यकीय’ मधील गळती कशामुळे?

-डॉ. अमोल अन्नदाते

मागील पाच वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एक हजार ११७ व एमबीबीएस पदवी करत असताना १५३ विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम अर्ध्यावर सोडल्याची आकडेवारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ( नॅशनल मेडिकल कमिशन ) दिली. अर्ध्यावर शिक्षण सोडून जाण्याचे प्रमणात इतर अभ्यासक्रमातही असते. पण ज्या प्रवेश परीक्षेत १ लाख जागांसाठी २५ लाख विद्यार्थी स्पर्धा करत असतात व हुशार मुले ज्या अभ्यासक्रमाला पसंती देतात तो अभ्यासक्रम इतक्या विद्यार्थ्यांनी सोडणे हे चिंताजनक आहे.

                         खरेतर एकदा एमबीबीएस ला प्रवेश मिळाला की विद्यार्थी डॉक्टर होणारच हे गृहीत धरलेले असते. सन २००० पर्यंत एमबीबीएस  तृतीय वर्ष परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नव्हते. आता महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठात तसेच देशभर ही एमबीबीएस परीक्षा पूर्वी इतकी अवघड ठेवलेली नाही. तरीही अभ्यासक्रमाचा भार न झेपल्याने काही प्रमाणात मुले कोर्स सोडतात. महाराष्ट्रात पहिल्या वर्षी उत्तीर्ण होण्यासाठी चार परीक्षांची संधी दिली जाते. त्यानंतर विद्यार्थी बाहेर जातो. उशिराने सुरु होणारे प्रवेश , न्यायालयीन खटले यामुळे ऑगस्ट  मध्ये सुरु होणे अपेक्षित असलेले वर्ग हे सुरु होण्यास जानेवारी , डिसेंबर उजाडते व ऑक्टोबर मध्ये परीक्षा असते. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमात नवख्या असलेल्या विद्यार्थ्याना अवाढव्य अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यास जेमतेम १० महिने मिळतात. त्यातही संक्रांत , जयंत्या , दसरा , दिवाळी या महाविद्यालयाला सुट्ट्या सुरूच असतात. म्हणून पहिल्या वर्षात विद्यार्थी प्रचंड तणावाखाली असतात. परीक्षा उत्तीर्ण होण्यास सोप्या असल्या तरी त्यांचा तणाव नुकतेच वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या वयासाठी मोठा असतो. त्यामुळे मानसिक समस्या , तणाव व त्यातून व्यसनाधीनतेचे प्रमाण वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालले आहे. या सर्व नैराश्येतून अभ्यासक्रम सोडणारे काही विद्यार्थी असतात.

                              सहसा वर्गात पहिल्या पाच मध्ये असलेले विद्यार्थी हे वैद्यकीय अभ्यासक्रमाला येतात. शालेय जीवनापासून सतत हे विद्यार्थी शैक्षणिक यश अनुभवलेले असतात. वर्गात मधल्या फळीतील मुलाना फार शैक्षणिक प्रगती ही नाही व घसरण ही नाही अशा स्थिर मानसिकतेत रहायची सवय असते पण पहिल्या फळीतील विद्यार्थ्यांची जराही शैक्षणिक घसरण पचवण्याची मानसिक क्षमता कमी असते. पडून परत उसळी मारण्याच्या मानसिक प्रक्रियेला रेसिलंस ( resilience ) असे म्हंटले जाते. या आघाडीवर वैद्यकीय विद्यार्थी काहीसे कमकुवत असतात. म्हणून एमबीबीएस व त्यानंतर जराही शैक्षणिक अपयश आले कि अभ्यासक्रम सोडण्याचे टोकाचे पाउल काही विद्यार्थी उचलतात. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व त्यातच विदर्भातील काही महाविद्यालयात रॅगींगचे  प्रमाण खूप आहे. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात एका वैद्यकीय विद्यार्थ्यांची महाविद्यालय प्रांगणात हत्या झाल्या नंतर हे विषय काहीसे पुढे आले. घरापासून लांब असलेले विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात मानसिक दृष्ट्या स्थिर राहतील व त्यांना वसतिगृह, महाविद्यालय हे दुसरे घर वाटावे असे आवर्जुन प्रयत्न होत नाहीत.

                        अनेकांना आपण या अभ्यासक्रमाला का आलोय हेच माहित नसते. त्यातील काही जण पालकांच्या हट्टापायी या अभ्यासक्रमाला आलेले असतात. बर्याच जणांना हे क्षेत्र म्हणजे आर्थिक मिळकत  व सामाजिक स्थैर्याची खात्री वाटते पण या क्षेत्रात आल्यावर त्यातील संघर्ष कळतो. वैद्यकीय प्रवेश घेऊन नंतर इतर क्षेत्राकडे वळण्याचे प्रमाण ही त्यामुळे वाढले आहे. 

              पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्पर्धा पदवी परीक्षे एवढीच तीव्र आहे. तरीही तिथे ही अभ्यासक्रम सोडण्याचे प्रमाण आहे. भारतातील निवासी डॉक्टरांची काम करण्याची पद्धत जगात सर्वात सदोष व गैर व्यवस्थापनाने ग्रासलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न रुग्णालयात हजारो रुग्णांची गर्दी असते पण एका कक्षात बोटावर मोजण्या इतपत  निवासी डॉक्टरांवर सगळा भार असतो. त्यामुळे अनियमित कामाचे तास व निवासाच्या अस्वच्छ व अपुर्या सोयी ही समस्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये असाध्य कॅन्सर  सारखी झाली आहे. एक आठवड्या पूर्वी आजारी असलेल्या सायन रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा वसतिगृहातील खोलीतच मृत्यू झाला. नांदेड व ठाणे  वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू होऊनही परिस्थिती बदललेली नाही . अपुऱ्या वैद्यकीय साधनांमध्ये अपेक्षांचे ओझे झेलत होणारे पदव्युत्तर शिक्षण हे आनंदात नव्हे तर  फरफटत,  अपमान सोसत पूर्ण करण्याचे शिक्षण झाले आहे. यातून ही बरेच निवासी डॉक्टर हे तणावाखाली असतात व प्रसंगी शिक्षण अर्ध्यावर सोडतात. काही विद्यार्थी हे शिक्षण चालू असताना इतर ठिकाणी व अभ्यासक्रमात संधी मिळाली म्हणून ही शिक्षण सोडतात. वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत अभ्यासक्रमाची लांबी जास्त असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तिशी उजाडते . त्यातच लग्न व इतर कौटुंबिक जबाबदार्या राहून जातात. स्त्री डॉक्टरांसाठी तर तारुण्य, लग्नाचे वय व पदव्युत्तर  शैक्षणिक संधी हे नेमके एकाच वेळी येते म्हणून हे गणित जुळवत असताना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागते. 

वैद्यकीय शिक्षणात आहे रे आणि नाही रे असे दोन वर्ग शिक्षण घेत आहेत. त्यात शासकीय महाविद्यालय व खाजगी वैदकीय महाविद्यालयातील कमी फीच्या कोट्यातील विद्यार्थी हे निम्न व मध्यम वर्गातील आहेत . अभिमत व खाजगी महाविद्यालयात उच्च मध्यम वर्ग व अभिजन वर्ग शिक्षण घेतो. दुर्दैवाने असे म्हणावे लागते कि आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची स्थिती शिक्षण व विद्यार्थ्यांचे मानसिक व्यवस्थापन याबाबत चिंताजनक आहे. भरघोस फी आकारणारे अभिमत विद्यापीठे व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये यांच्यावर तुलनेने फी भरणाऱ्या वर्गाचा दबाव जास्त आहे व म्हणून मुलाला सुखरूप अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व त्याला उत्तीर्ण करण्यास काळजी घेतली जाते. म्हणून शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी हे तुलनेने जास्त तणावा खाली असतात . खरे तर अभ्यासक्रम सोडून जाण्याची इच्छा ही तात्कालिक असते पण काही विद्यार्थी या तणावाच्या काळात आधार न मिळाल्यामुळे अभ्यासक्रम सोडतात. बी जे वैद्यकीय महाविद्यालयातील फार्माकोलॉजी विषयाचे प्राध्यापक डॉ पद्माकर पंडित यांनी अशा अभ्यासक्रम सोडून गेलेल्या व सोडण्याच्या बेतात असलेल्या अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांना समुपदेशन व शैक्षणिक पाठबळ देऊन त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत केली. अशा मुख्य प्रवाहातून बाजूला पडलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात क्रोनिक असे म्हंटले जाते. आश्चर्य म्हणजे हेच क्रोनिक त्यांना पडत्या काळात आधार मिळाल्यास पुढे केवळ यशस्वी डॉक्टरच नाही तर प्रशासन , राजकारणा अशा अनेक क्षेत्रात नाव कमवतात. म्हणून डॉ पद्माकर पंडित यांच्या सारखे विद्यार्थ्यांना आधार देणारी बेटे ही प्रत्येक महाविद्यालयात असणे गरजेचे आहे. सैन्याच्या प्रशिक्षणात आपल्या सोबतचा जवान युद्धात जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेऊन धावण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच प्रत्येकाला मानसिक आधार देण्याच साठी एक बडी जवान अर्थात मित्र ठरवून दिला जातो. आपल्या मित्र जवानाची मानसिकता ढासळत असेल तर त्वरित वरिष्ठांना सांगण्याचे आदेश दिले जातात. वैद्यकीय शिक्षणात ही सोबतचा मानसिक रित्या जखमी झाला तर त्याला खांद्यावर घेण्याचे अर्थात आधार देण्याचे प्रशिक्षण वैद्यकीय विद्यार्थ्यांना गरजेचे आहे.

जी एस वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षी ‘शिदोरी’ नावाचा उपक्रम राबवला जातो. ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी दोन सिनियर विद्यार्थी व एका शिक्षका कडे दिली जाते. परदेशातील अनेक विद्यापीठात असा मेंटर – मेंटी प्रोग्राम अर्थात विद्यार्थ्यांना वरिष्ठ विद्यार्थी व शिक्षक वाटाड्या म्हणून ठरवून दिले जातात. भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात हा कार्यक्रम कागदावरच राहतो. मानसिक समस्या हा समाजातील येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. त्या बर्या करण्याची, टाळण्याची जबाबदारी ही मुख्यतः वैद्यकीय क्षेत्रावरच असणार आहे. पण यासाठी आधी त्यांनी आपले विद्यार्थी तेवढे सक्षम असतील व एक ही विद्यार्थी अभ्यासक्रम सोडून जाणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. कणखर वैद्यकीय विद्यार्थीच कणखर समाज घडवेल.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

समृद्ध लोकशाहीसाठी सुरुवात सर्वस्पर्शी संवादाची

The beginning of an all-encompassing dialogue for a prosperous democracy

लोकशाही म्हणजे ‘लोकांचे राज्य’ ही संकल्पना सार्थ ठरवायची असेल तर या प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्यांचे भान प्रत्येक नागरिकाला असले पाहिजे. त्या दृष्टीने केवळ या प्रक्रियेची समीक्षा करण्याचीच नव्हे, तर त्रयस्थपणे त्यातील सुधारणांचे भानही साऱ्यांना देण्याची गरज आहे. तशा स्वरूपाच्या प्रयत्नांना गती देणारे ‘राज्य आहे लोकांचे’ हे दैनिक भास्कर समूहाचे मराठी वृत्तपत्र , दै. दिव्य मराठी मध्ये आजपासून माझे नवे पाक्षिक सदर.

दै. दिव्य मराठी रसिक स्पेशल

समृद्ध लोकशाहीसाठी सुरुवात सर्वस्पर्शी संवादाची

-डॉ. अमोल अन्नदाते

भारत आणि जगाच्या दृष्टीने 2024 हे वर्ष इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि अमेरिका हे दोन बलाढ्य लोकशाही देश या वर्षात सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. म्हणजेच जगाच्या भविष्याची दिशा ठरवणारी अर्धी अधिक लोकसंख्या काय विचार करते याचे प्रतिबिंब या वर्षात उमटणार आहे. ‘भारत देश आज एका वेगळ्या वळणावर उभा आहे. एकीकडे, ज्याभोवती गेली चार दशक देशाचे राजकारण फिरत होते तो श्रीराम मंदिराचा मुद्दा मार्गी लागला आहे. देशात एक्स्प्रेस हायवे, सागरी महामार्गासारखी विकासाची प्रतीके उभी राहताना दिसत आहेत. इंटरनेट, मोबाइलसोबत आता ‘एआय’ आणि त्यावर आधारित साधने रोजच्या व्यवहारात येत आहेत. हे होत असताना दुसरीकडे जातीय अस्मिता तीव्र होत आहेत, जगण्यातील असुरक्षितता वाढत चालली आहे, मानसिक आरोग्याचे प्रश्न दिवसागणिक वाढत आहेत, गुन्हेगारीचे प्रमाण मती गुंग करणारे आहे. म्हणजे सगळे काही चांगलेच होत असून एका सुवर्णयुगाच्या पहाटेचे आपण साक्षीदार होत आहोत, असेही नाही आणि जे घडते आहे ते सारे वाईटच असून देश अराजकाच्या स्थितीला पोहोचला आहे व आता कधीही त्यातून बाहेर येऊ शकणार नाही असेही अजिबात नाही. कारण आपण कोणीही एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर देशातील एकशे चाळीस कोटींची एक सामूहिक लोकशक्ती हे ठरवत असते, जिला आपण ‘लोकशाही’ म्हणतो. समूहाची संख्या जितकी जास्त तितके तिचे सामूहिक शहाणपण कमी, असे समाजशास्त्रात मानले जाते. पण, हे विधान तेव्हा लिहिले गेले जेव्हा लोकांना शहाणे करण्याची साधने उपलब्ध नव्हती. स्वातंत्र्यानंतरची ७५ वर्षे हा बदल घडवण्यासाठीचा थोडाथोडका काळ नाही. बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट जसे एका काळानंतर दुप्पट, तिप्पट होते – मॅच्युअर होते. त्या धर्तीवर पंचाहत्तरीच्या पुढे निघालेल्या लोकशाहीतील नागरिक जसा एका प्रगल्भतेच्या शिखरावरून स्वतःकडे आणि जगाकडे बघतो तसा देश, लोकशाही आणि लोकशाहीतील सर्व प्रक्रियाही कालांतराने प्रगल्भ व्हायला हव्यात. एखादे फळ खराब होणे, सडणे स्वाभाविक असते, पण ते टिकवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजचा वापर, प्रक्रियांचा उपयोग केला जातो. पण, एखाद्या व्यक्तीचे नैसर्गिकपणे बिघडणे रोखण्यासाठी शहाणपण रुजवणे ही जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट असते. देश आणि त्याची लोकशाहीसुद्धा अशा अनेक लोकांच्या शहाणे होण्याने प्रगल्भ बनते. ‘कायझन’ या जपानी व्यवस्थापनशास्त्रात दररोज फक्त एक टक्का सुधारणा सुचवली जाते, तसे थेंबे थेंबे शहाणपण मुरवल्याने त्याचा एकत्रित परिणाम येईल.

प्राथमिक शाळेत असताना परीक्षेत पास होण्यासाठी आपण नागरिकशास्त्र, सआजशास्त्र शिकतो. त्यानंतर आपला लोकशाही, संविधान, शासन, प्रशासन, राजकारण, नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये या गोष्टींशी फारसा संबंध येत नाही. आला तरी तो तत्कालिक आणि मर्यादित असतो. त्यातही आपण जितके शिक्षित, उच्चशिक्षित होत जातो, आपले आयुष्य समृद्ध होत जाते, जितका लोकशाही प्रक्रियेपासून किंवा ती सुधारण्याच्या विचारापासून आपण लांब जातो. या गोष्टींशी कधी संबंध आलाच तरी बहुतांश वेळा आपला दृष्टिकोन तो विषय तोंडी लावण्यापुरता, अनेकदा निराशावादी सूर लावणारा किंवा तुच्छतादर्शक स्वरूपातला आणि ‘यात मी काय करणार?’ असा जबाबदारी झटकणारा असतो. सकाळी नळाला येणाऱ्या पाण्यापासून ते आपल्याला मिळणारे अन्न, औषधे, रोजगार, मुलाबाळांच्या शिक्षणापर्यंत आणि आपल्या जवळच्यांपैकी एखाद्याचा रस्ते अपघातात होणारा दुर्दैवी मृत्यू ते एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आपल्या सामाजिक पर्यावरणाचे होणारे नुकसान या सगळ्यांचा संबंध देशातील लोकशाही प्रक्रिया, राजकारण, समाजकारण आणि त्यांच्याशी निगडीत अनेक घटकांशी असतो हे आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला आपली आर्थिक स्थिती, लिंग, धर्म, जात, वर्ण अशा कुठल्याही मुद्द्यावर लोकशाहीच्या परिणामांपासून पळ काढता येत नाही. समाजातील ‘नाही रे’ वर्ग जो मतदान करून लोकशाही प्रक्रियेत किमान थोडा तरी सहभाग नोंदवतो, तो राजकीय प्रक्रिया बिघडवतो, असा त्याच्यावर दोषारोप ठेवून आणि आपल्या पलायनवादातून ना आपली लोकशाही समृद्ध होईल, ना देश प्रगती करेल, देशाची लोकशाही, त्यातील निवडणुका, त्यावर आधारित राजकारण आणि त्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या सुधारणा प्रक्रियेत आपण सहभागी झाले पाहिजे.

अमेरिकेत १९२६ ला केनडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ही रीतसर शिक्षण, प्रशिक्षण आणि पदवी देऊन राजकीय नेते घडवणारी शैक्षणिक संस्था अस्तित्वात आली. आज तेथील १८ राज्यांचे नेतृत्व आणि विविध शाखांची धुरा या संस्थेत शिकलेले लोक सांभाळत आहेत. देशाचा विचार करणारे जबाबदार नागरिक घडवून त्यांच्या माध्यमातून आपली लोकशाहीसुद्धा अशीच प्रगल्भ करणारी शैक्षणिक संस्था असावी असे मला नेहमी वाटते. लोकशाही म्हणजे ‘लोकांचे राज्य’ ही संकल्पना सार्थ ठरवायची असेल तर या प्रक्रियेशी संबंधित विविध मुद्द्यांचे भान प्रत्येक नागरिकाला असले पाहिजे. त्या दृष्टीने केवळ या प्रक्रियेची समीक्षा करण्याचीच नव्हे, तर त्रयस्थपणे त्यातील सुधारणांचे भानही साऱ्यांना देण्याची गरज आहे. तशा स्वरूपाच्या प्रयत्नांना गती देणे हेच या पाक्षिक सदराचे प्रयोजन आहे.

-डॉ. अमोल अन्नदाते

  • dramolaannadate@gmail.com
  • www.amolannadate.com

विखार नको, विवेक वाढवू… – डॉ. अमोल अन्नदाते

Dr amol Annadate Artical

दै. दिव्य मराठी रसिक

विखार नको, विवेक वाढवू…

डॉ. अमोल अन्नदाते

                 काळ हे मोठे भ्रम निर्माण करणारे व त्याच्या पोटात काय दडलेय याचा थांग लागू न देणारे एक मिथक असते. ब्रम्हांडातील  सार्वकालिक आभास हा स्वतः काळच असतो. माणसाचे जसे वय वाढते तसे त्याचे शहाणपणा वाढीस लागणे अपेक्षित असते. अगदी त्याप्रमाणे काळ पुढे सरकतो तसे  तो निर्माण करणारा हा भ्रम ओळखून तो डि-कोड करून त्यातून पुढे येणारी वेळ कशी काल सुसंगत व जगण्यास सुसह्य व्हावी यासाठी एक सार्वत्रिक शहाणपण निर्माण होणे अपेक्षित असते. ही जाणीव ठेवूनच एखादे वर्ष संपत असताना मागे गेलेल्या रस्त्यावर एक नजर टाकून पुढच्या वाटचालीसाठी आपल्या गती आणि मती ला योग्य दिशा देण्याचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर . 
        सरते वर्ष भारत व जगाच्या दृष्टीने अनेक अर्थांनी पारखण्या जोगे वर्ष होते. २०२४ चा जप तर गेली काही वर्षे सुरूच आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येत्या वर्षात भारत व अमेरिका या दोन्ही सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असा एक गेमचेंजर  टप्पा येतो जो त्याचे पुढील काही दशकांचे भवितव्य ठरते. २०२४ ची पहाट फटफटत असताना एवढी जाणीव प्रत्येकाला होणे हीच पहाट सोनेर असण्याची शाश्वती देईल. 
        २०२३ साली चांद्रयान – ३ च्या माध्यमातून भारत चंद्राच्या दक्षिण धृवार पोहोचणारा पहिला देश ठरला. ही प्रत्येक भारतीयासाठी गौरवस्पद गोष्ट असली तरी पियुष मिश्रांच्या या नज्मची आठवण करून देणारी आहे. एक बगल मे चांद होगा,  एक बगल मे रोटीयाँ, एक बगल मे नींद होगी, एक बगल मे लोरियाँ,हम चाँद पे रोटी की चादर डाल कर सो जाएँगे. हे आठवण्याचे कारण म्हणजे - भारताचा भूक निर्देशांक २९.१ व जगातिक क्रमवारी १११ आहे जी गंभीर स्वरूपाची समजली जाते . देशात २२५ दश लक्ष लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही व ४० कोटी लोक रात्री उपाशी झोपतात. कोरोनाच्या जागतिक संकटानंतर जागतिक अर्थनीतीला रशिया – युक्रेन व ईजराईल - हमास युद्धाचे जोरदार तडाखे बसले. जगाला युद्धाच्या झळा जाणवत असताना ही भारताचे सकल रष्ट्रीय उत्पन्नात २०२३ साली ७.६ % वाढ होऊन ती आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थ व्यवस्था झाली आहे. पण हे आकडे साजरीकरणासाठी पुरेसे नाहीत. भांडवलशाही नव्या युगाच्या हातात हात घालून येते तेव्हा तिला वाढ ही कुठलीही आणि कशाची ही किंमत मोजून हवी असते. ही भांडवलशाही फक्त नव भांडवलशाहीच नव्हे तर त्याचे अजून क्रूर स्वरूप घेऊन २०२४ मध्ये पुढे येऊ पाहते आहे.  कॉर्पोरेट क्षेत्रात मुल होऊ न देण्यासाठी विशेष भत्ता व महामार्ग बनवताना १७ दिवस अडकलेल्या ४१ कामगारांच्या करुण हतबल आयुष्य ही या समृद्ध  अर्थ व्यवस्थेची काळी बाजू २०२४ चे नियोजन करताना विसरता येणार नाही. अर्थव्यवस्थेचा वेग वाढवताना तो प्रगतीच्या वाहनात बसू न शकणार्यांना चिरडणारा असेल व मानवी मूल्यांच्या चिंधड्या उडवणारा असेल तर समृद्धीचे भकास कुरूप चेहरा समोर येऊ नये याचे भान २०२४ साठी तत्पर होताना ठेवावे लागेल.    

२०२३ मध्ये जगात व देशात एक सार्वत्रिक भावना वाहताना दिसते ती म्हणजे नव राष्ट्रवादाची . हा नव या साठी कारण यात फक्त राष्ट्राच्या अस्मिते सोबत फक्त मी आणि मीच आणि माझेच काय ते खरे हा अट्टहास अधिक आहे. पण मात्र मी राष्ट्रासाठी नेमके काय करू शकतो याचा लावलेश दिसत नाही. काझी साब दुबले क्यो तो बोले शहर का अंदेशा अशी एक उर्दू म्हण आहे. आपल्या शहराचे काय होणार म्हणून एका जागी बसून असलेले काझी साहेब अस्थिपंजर होत आहेत अशी अनेक देश वासियांची स्थिती दिसते आहे. तुम्ही स्वतः प्रगत झालात तर देश आपोआप प्रगती करेल . म्हणून फुकाच्या अस्मिता सोडून आधी स्व वर केंद्रित होण्याची गरज २०२४ सुरू होताना जाणवते. २०२३ मध्ये आपण व आपले कुटुंब सर्व आघाड्यांवर किती पुढे आलो याची गोळा बेरीज व २०२४ मध्ये किती मजल मारायची आहे याचे नियोजन जरूर करा . हम चले ना चले देश चल पडा है असे पंतप्रधान म्हणतात . याचा अर्थ आता काही केल्या देशाची प्रगती थांबणार नाही, असा आहे. आपण नागरिक म्हणुन देशासाठी काही करायचे नाही. असा तो अर्थातच नाही.

कला , क्रीडा , सांस्कृतिक आघाडी वर २०२३ हे वर्ष फारसे आशादायी ठरले नाही. ऑलम्पिक पदे घेणाऱ्या महिला कुस्तीपटू लैंगिक छळासाठी कित्येक दिवस रस्त्यावर आंदोलनासाठी बसून होत्या. जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देशातून बोटा वर मोजण्या इतकी ऑलम्पिक पदके मिळत नाहीत यात कशी सुधारणा होईल हे २०२४ चे उद्दिष्ट असायला हवे . लेखक , कवी व माध्यमांच्या स्वातंत्र्यावर आलेली टाच हे २०२३ मधील त्रुटी २०२४ मध्ये दूर व्हाव्या .
२०२३ मध्ये अजून तीन लक्षवेधी वास्तू पूर्ण होताना आपण पहिल्या. वाराणसीचे जगातील सर्वाधिक क्षमतेचे ध्यान मंदिर स्वरवेद मंदिर, सुरत येथील जगातील सर्वात मोठे उद्योग कार्यालय डायमंड ब्रोज व नवे संसद भवन . २०२४ ची सुरुवात अयोध्येच्या राम मंदिर खुले होऊन होणार आहे. याचा अर्थ आपण अध्यात्मिक, धार्मिक, उद्योग व लोकशाही या चार आघाड्यांवर जगातील सर्वात मोठ्या वास्तू बांधून नेतृत्व करू पहात आहोत हे कौतुकास्पद आहे. पण याला जोडून येणारी आव्हाने समजून २०२४ साठी आपल्याला सज्ज व्हायला हवे. नव्या संसद भवनात चार बेरोजगार तरुणांनी सुरक्षा कवच भेदून देशाच्या सर्वात महत्वाच्या वास्तू व लोकशाहीच्या सर्व भौमत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण केले ते ही हेच २०२३ चे वर्ष. एकीकडे समृद्धी साठी कंबर कसत असताना बेरोजगार तरुण हताश होऊन माथेफिरू व विकृती कडे झुकत चालला आहे हा धडा २०२४ साठी खूप महत्वाचा आहे. म्हणून सर्वात मोठे मंदिर जसे धर्म रक्षण करील तसे जगातील सर्वात दर्जेदार व फक्त शिक्षणच नव्हे तर कौशल्य देणारे शिक्षण देणारे सर्वात मोठे विद्यापीठ ही देशात व्हायला हवे तरच विवेक रक्षण होईल ही भीष्मप्रतिज्ञा २०२४ साठी करणे आवश्यक आहे. उद्योगाच्या प्रगतीचे मानक हे फक्त सकल राष्ट्रीय उत्पन्न नसते तर सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांकही आर्थिक प्रगतीचे मानक असतो. आरोग्य व त्यातच मानसिक आरोग्याच्या आघाडीवर बरेचसे करायचे राहून गेले असताना २०२४ हे वर्ष याला प्राधान्य देणारे वर्ष म्हणून इतिहासात नोंदेवले जायला हवे.
जशी प्रत्येक दिवसात आपल्या प्रत्येकासाठी एक भावना व्यापून राहते. तशीच एक भावना देशात ही एखाद्या वर्षात दाटून आलेली असते. अनेक हर्षवायू निर्माण करण्याजोग्या गोष्टी घडल्या असल्या तरी मणिपूर मध्ये एका स्त्रीची नग्न धिंड ही हिंसा , द्वेष व हतबलते चे गालबोट २०२३ च्या आनंदाला लावणारे ठरले. प्रत्येक व्यक्तीचे म्हणून जसे एक टेम्परामेंट असते तसे ते एका विशिष्ट काळात देशाचे ही असतें. काळाचे ही असते. त्यामुळे हिंसा , द्वेष , उपद्रव , उन्मत्तपणा अशा अनर्थकारी गोष्टीने वर्चस्व गाजवू नये यासाठी पुढच्या काळात प्रत्येकाला सजगपणे प्रयत्न करावे लागतील.
चिदानंद रुपम शिवो हम, शिवो हम असा उपदेश करताना शंकराचार्य आपल्याला तुझ्यातच विशुद्ध चेतनाचा, शिवाचा अंश आहे. असं सांगतात. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील आपली स्वयंपूर्णता , स्व प्रेरणा आणि स्व नियमातून या अंशाचे अस्तित्व दिसत असतें. त्यामुळे महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशातील प्रत्येकाने या मूल्यांचे महत्त्व ओळखले पाहिजे. ते समजून घेत पावले टाकली तर व्यक्तिगत, कौटुंबिक सामाजिक नि राष्ट्रीय पातळीवर निश्चितपणे यश मिळेल. उंबरठ्याशी आलेले नवे वर्ष साऱ्यांना अशा प्रगतीचे दान, आनंदाचे वाण अन विवेकाचे भान देणारे ठरो, याच शुभेच्छा…!

डॉ. अमोल अन्नदाते
9421516551

चक्रव्यूहातले अभिमन्यू – डॉ. अमोल अन्नदाते

Dr Amol Annadate Artical

दैनिक दिव्य मराठी रसिक 

         
  *चक्रव्यूहातले अभिमन्यू* *डॉ. अमोल अन्नदाते* 


गेल्या ८ महिन्यात कोट्यामध्ये नीट – जेईईच्या तयारी साठी गेलेल्या २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या काही वर्षात प्रवेश परीक्षांच्या ओझ्याखाली दबून नैराश्यग्रस्त होऊन प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे व दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. जेव्हा कोरोना, गॅस्ट्रो सारख्या संसर्गजन्य आजारांच्या साथी येतात तेव्हा यंत्रणा जागी होते, माध्यमे रान उठवतात व लसीकरणाच्या मोहिमा देशभर राबवल्या जातात कारण या समस्या दृश्य स्वरूपात दिसत असतात .पण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या व नैराश्य यांचा संसर्गही तेवढाच गंभीर व जीवघेणा असतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही. त्यावरचे मानसिक लसीकरण व आयुष्याचा खरा आनंद , ध्येय , जगण्याचे अन्य उद्देश शोधण्याची दृष्टी माञ कुठलेच क्लास देत नाही.  आपल्या मुलाला शैक्षणिक स्पर्धेत उतरवताना  मुलांना मानसिक स्थैर्याची लस टोचनारे नि तो यशस्वी होवो अथवा न होवो  पण आधी तो जगला पाहिजे एवढी जाणीव असणारे पालक तयार होणे ही आजची सर्वात महत्वाची निकड आहे. 


 वर्गात साधारण पहिल्या दहा मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकडून  पालक शिक्षक , समाज सगळ्यांच्याच अपेक्षा असणे सहाजिक असते. या शैक्षणिक दृष्ट्या हुशार विद्यर्थ्याना त्यांच्या स्वतः कडून असणार्या अपेक्षा व इतरांना त्यांच्या कडून असणार्या अपेक्षा पेलत दोरीवर चालण्याची कसरत ही अगदी चौथी , पाचवी पासून करावी लागते. ३० मुलांचा वर्ग गृहीत धरला तर १० ते २० म्हणजे मधल्या फळीतील विद्यार्थ्यांणा कधीच फारसे टेन्शन असते. त्यांना पहिले  येऊन पुढे सरकण्याचा ही ताण नसतो व मागे घसरून फारसे काही बिघडणार नसते.  पण त्या 10 मध्ये असलेल्या व वर्षानुवर्षे शालेय व उच्च माध्यमिक  स्पर्धेतून बर्यापैकी यशस्वी होणार्या विद्यार्थ्यांची मोठी मानसिक फसगत होते व पालक, शिक्षक व समाज त्याला अजाणतेपणाने याला हातभार लावतो कारण तो ही त्याच मानसिकतेत जगत असतो. ती फसगत अशी कि आयुष्याचा आनंद व आंतरिक समाधानाला ही मुले आयुष्यातील काहीतरी कामगिरी, उपलब्धी  किंवा यशाशी जोडू लागतात. न्युरो प्लास्टीसिटी म्हणजे सवयी प्रमाणे किंवा वारंवार एखादी गोष्ट करून वळणे व वाकणे हा  मानवी मेंदूचा एक मोठा गुण हा जो त्याला इतर प्राण्यांपासून वेगळा ठरवतो. म्हणून सतत काहीतरी मिळवणारे विद्यार्थी व व्यक्ती यांच्या मेंदूला कामगिरी , यश एवढे एका व एकाच आनंदाच्या साधनाला मन व त्यामागे  मेंदू सरावतो. यात काही गैर नाही व असा कामगिरीचा ध्यास राहिला  नाही तर जग रहाटीच चालणार नाही. पण कामगिरीच नाही तर आनंदच नाही व मग माझे अस्तित्वच कशा साठी हा प्रश्न मनाला पडणे गैर आहे. चांगली कामगिरी व शैक्षणिक  यश हे आनंदाचे एक साधन असले तरी इतर अशी अनेक साधने आहेत ज्यातून तीच भावना किंवा त्याही पेक्षा मोठ्या आनंदाची भावना निर्माण होते ही सवयच मेंदूला राहत नाही. तसेच law of Averages म्हणजे सरासरीचा नियम सांगतो कि तुम्ही प्रत्येक परीक्षेत तसेच आणि तेवढेच यश मिळवू शकत नाही. चांगल्यात चांगला खेळाडू ही प्रत्येक चेंडूवर चौकार , षटकारा मारू शकत नाही. कधी तरी तो शून्यावर ही बाद होतो. नीट – जीईई साठी कोटाच नव्हे तर इतर शहरात कोचिंगच्या कारखान्यात जाणारे विद्यार्थी नेमक्या अशाच कामगिरीच्या दडपणाखाली (performance pressure) असतात. नीट जेईई ला जाणारी मुले ही सतत शैक्षणिक यश मिळवलेली हुशार मुले असतात. आता सर्वात महत्वाची म्हणून समजली जाणार्या परीक्षेच्या एका दिवसासाठी त्यांची तयारी सुरु असते. मुळात ही परीक्षा काही प्रमाणात  त्यांच्या आयुष्याची व्यावसायिक व आर्थिक दिशा ठरवणारी असली तरी ती काही त्यांच्या आयुष्याची अंतिम दिशा व सर्वात महत्वाचे त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे , आंतरिक समाधानाचा शेवटचा निकाल लावणारी परीक्षा मुळीच नसते. पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन होत नसल्याने त्यांना या सत्याची उकल होत नाही. परिणामी  कोचिंग सुरु असतानाचे छोटेसे अपयश ही विद्यर्थ्याना मानसिक दृष्ट्या सहन होत नाही. त्यासाठी अशा तीव्र स्वरूपाचे कोचिंग सुरु करण्याअगोदर एक आठवडा पालक व विद्यार्थ्यांचे मानसिक प्रशिक्षण आवश्यक आहे. नापास होणार्या किंवा मधल्या फळीतील विद्यार्थ्यांना अपयशाचे काहीच वाटत नसते कारण असे समजाच्या दृष्टीने अपयश समजली जाणारी गोष्ट अनुभवतच तो मोठा झालेला असतो. त्याचेच कारण असते कि तो जास्त जोखीम उचलतो व पुढे मोठे व्यावसायिक यश मिळवतो. पण हुशार विद्यार्थ्यांना व प्रवेश परीक्षे साठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अपयश पचवण्यासाठी विशेष मानसिक जडण घडण मुद्दामून करावी लागते. याची सुरुवात शालेय जीवनापासूनच करावी लागते.              

मानसिक स्वास्थ्यासोबतच Resilance म्हणजेच मानसिक लवचीकपणाला मानस शास्त्रात खूप महत्व असते. एकदा पडल्यावर तुम्ही परत किती वेगाने उठून परत चालू लागता तसे तणावाच्या स्थितीत परत उसळी घेऊन मन पूर्ववत होऊ शकते याला resilance असे म्हणतात. सैन्य व खेळा मध्ये याचे प्रशिक्षण आवर्जून दिले जाते. स्वतः जखमी असलो तरी  गोळी लागलेल्या सहकाऱ्याला उचलून धावायचे कसे याचे विशेष प्रशिक्षण व प्रात्यक्षिक  सैन्यात दिले जाते. स्पोर्ट्स सायकॉलोंजी मध्ये हरलो तर काय ? यावर भर दिला जातो. आज शैक्षणिक स्पर्धा इतकी वाढली आहे कि त्यासाठी शैक्षणिक स्पर्धे साठीचे मानसशास्त्र गरजेचे झाले आहे. या साठी पालकांनाच कंबर कसून दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या उदाहरणातून मुलांच्या मनाची व मेंदूची जडण घडण करावी लागेल. गुणवत्तेचा उत्तमतेचा  ध्यास गैर नाही. तो हवाच. त्याशिवाय गुणवत्तापूर्ण गोष्टी निर्माण कशा होणार ? पण या गुणवत्तेचा अट्टहास , दुराग्रह व त्यासाठी आपले अस्तित्व पणाला लावण्या इतपत ही ते महत्वाचे नाही हा समतोल महत्वाचा आहे. शैक्षणिक गुणवत्ता व नीट जेईई चा रँक हा आनंदाचे एक साधन आहे पण ते नसले  तरी केवळ आपले अस्तित्व हे ही आपल्या समाधानी ठेवण्यास पुरे आहे हा विचार विद्यार्थ्यांमध्ये खोलवर रुजवणे आवश्यक  आहे.                      

 मानवी मन व शरीर हे प्राण्यांपासून उत्क्रांत झाले आहे. त्यामुळे धोका ओळखून त्यावर काही सेकंदात शरीरिक क्रिया करणारा अमिगडेला हा भाग मानवी मेंदूत प्राण्यांसारखा सक्रिय आहे. बर्याचदा हा धोका काल्पनिक असतो पण शरीर मात्र अतिरेकी प्रतिसाद देते. परीक्षेतील अपयशाची भीती व त्यातून घडणाऱ्या क्रिया  मेंदूच्या या  सर्किट मधून घडतात. पण मानवी मनाला एक वरदान ही मिळाले आहे. ते म्हणजे सारासार विचार करणारा फ्रंटल लोब. धोक्याचा व तणावाचा विचार मनात आला कि १० सेकंद ही थांबले तरी सरासर विचार करणारा फ्रंटल लोब ताबा घेतो व तुम्हाला शांत करतो. त्यातून तुम्ही योग्य rational व सद्सद्विवेक बुद्धीने वागून तणावावर मात करता. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांना माइंडफुलनेस म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करून सारासार विचार शक्ती विकसित करण्याचे प्रशिक्षण व सवय लावणे आवश्यक आहे.  एक तर गत काळात किंवा भविष्यात सतत रेंगाळणाऱ्या मनाला आताच्या क्षणात आणणे हा सध्याच्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे.  


प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी समाजमन हादरले आहे. लौकिक यशासाठी आपण मुलांना या चक्रव्यूहात पाठवतो खरे पण ते मिळाले नाही तर त्यातून बाहेर कसे पडायचे हे शिकवत नाही. किंबहुना ते आपल्यालाही माहित नसते. परिणामी आप्तांच्या अपेक्षांची अन बाहेरच्यांच्या नजरांशी लढता लढता आतलं बळ संपत नी दुर्दैवाने त्यातच अनेकांचा आत्मघात होतो. पालक नातेवाईक आणि समाज म्हणून अशा चक्रव्यूहात मुलांना पाठवून त्यांचे आयुष्य पणाला लावण आपण थांबवणार आहोत की नाही, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.                       

 *डॉ. अमोल अन्नदाते* 

*dramolaannadate@gmail.com*

*www.amolannadate.com**

Mo.No. 9421516551*

शस्त्रक्रिया शाखेला वळसा – डॉ.अमोल अन्नदाते

दै.महाराष्ट्र टाईम्स

शस्त्रकीया शाखेला वळसा

-डॉ.अमोल अन्नदाते

लेखक व तत्त्ववेत्ते इडेवू कोयिनिकान म्हणतात – “ देशातील तरुण काय विचार करतोय व कोणाला आदर्श म्हणून पाहतोय हे मला सांगा व त्यावरून मी त्या देशाचे भवितव्य सांगू शकतो “. त्याच धर्तीवर देशातील वैद्यकीय विद्यार्थी काय विचार करतोय हे बघा व त्यावरून वैद्यकीय क्षेत्राचे व एकूण रुग्ण सेवेच्या पुढील काही वर्षांचे भवितव्य काय असेल हा अंदाज बांधता येऊ शकेल. देशातील पहिले शंभर एमबीबीएस विद्यार्थी पदव्युत्तर शाखेसाठी कुठली शाखा निवडतात याच्या अभ्यासातून डोळ्यात अंजन घालणारी अनेक निरीक्षणे नोंदवता येतील. पहिल्या १०० पैकी बहुतांश विद्यार्थ्यांना रेडीओलॉजी , त्वचारोग ( डरमॅटॉलॉजी ) व जनरल मेडिसिन या शाखांना पसंती दिली आहे. बालरोग ( एक टक्के), जनरल सर्जरी ( चार टक्के) व स्त्रीरोग ( दोन टक्के) या शाखांकडे केवळ सात टक्के विद्यार्थी वळताना दिसत आहेत. एकेकाळी सर्वाधिक पसंतीच्या शाखा या विद्यार्थ्यांना नकोशा का वाटू लागल्या हा फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेतील बदल नसून समाजिक बदलाचा ही संकेत आहे.
सहसा समाजातील बुद्धिवान विद्यार्थ्यांचा सर्वात वरचा थर हा वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरतो. त्यातही एमबीबीएस व पदव्युत्तर जागांमध्ये एवढी तफावत आहे की पदव्युत्तर प्रवेश परीक्षा ही जवळपास युपएससी परीक्षे एवढीच तीव्र स्पर्धेची परीक्षा असते. त्यासाठी लागणारे अटेम्प्ट , शासकीय बॉंड हे पूर्ण करताना जवळपास तिशी उजाडलेली असते. शस्त्रक्रिये सारख्या शाखेत एवढ्यावर शिक्षण थांबून चालत नाही. पुढे अजून सराव व सुपर स्पेशलायजेशन करणे आवश्यक असते. एवढे संपून वयाच्या पस्तिसाव्या वर्षी प्रॅक्तीस सुरु करण्यास भांडवल अवाढव्य असते. त्यामुळे प्रचंड अंगमेहनीतीच्या या शाखांमध्ये अर्धे अधिक आयुष्य शिक्षणात खर्च होऊन हाती काय लागेल तर त्यासोबत अनिश्चितता . इमर्जन्सी , प्रचंड मेहनत असण्याचा काही प्रमणात विद्यार्थ्यांचा विचार असला तरी एवढा एकच विचार शाखा नाकारण्या मागे आहे असे नाही. कारण ३५ टक्के विद्यार्थी हे मेडिसिन शाखा निवडत आहेत ज्याठी मेहनत व इमर्जन्सी असतेच. पहिली पसंती असलेल्या रेडीओलॉजी शाखे मध्ये मात्र काही प्रमाणात रुग्णांशी कमीत कमी संवाद व ठरवलेल्या वेळेत काम संपवून घरी जाण्याची मुभा आहे. पण या शाखेत अंगमेहनत नसली तरी मेंदूची कसरत इतर सर्व शाखेच्या तुलनेत अधिक आहे जी कुठल्याही टॉपर विद्यार्थ्यला जास्त सोपी वाटते. आपल्या सोबतचे इतर शाखेतील टॉपर विद्यार्थी हे कौशल्याच्या जोरावर तिशी आधी परदेशात बंगले विकत घेताना व सुखासीन आयुष्य जगत असताना पाहून आपण किमान त्या तुलनेत सुखासीन नसले तरी आयुष्य सुकर करणारे पर्याय का निवडू नये ? हा विचार वैद्यकीय क्षेत्रात पहिल्या ५० विद्यार्थ्यांच्या मनात येणे सहाजिक आहे.


शाखा स्वीकारणे व नाकारणारण्याला वैद्यकीय क्षेत्रातील काही बदल व रुग्ण – डॉक्टर संबंधातील स्थित्यांतरे ही जबाबदार आहेत. भारत हा असंसर्गजन्य आजार म्हणजेच ह्र्दय रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब , लठ्ठपणाची जागतिक राजधानी बनत चालला आहे. देशातील दर चौथ्या व्यक्तीला या पैकी एक आजार जडला आहे. या आजारांच्या उपचारासाठी साधा बाह्यरुग्ण विभाग पुरेसा असतो. तसेच सरासरी आयुर्मान वाढल्या मुळे अतिदक्षता विभागात भरती होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ही खूप वाढले आहे. यामुळे जनरल मेडिसिन शाखेला प्रचंड मागणी आहे. रुग्णालयातील सर्व शाखा या मेडिसिन शाखे भोवती फिरतात. म्हणून या शाखेला विद्यार्थ्यांची पसंती असणे हे नैसर्गिक व गरजेचे ही आहे. १९९५ साली वैद्यकीय क्षेत्र हे ग्राहक संरक्षक कायद्याच्या कक्षेत आले. त्यानंतर अनेक छोट्या मोठ्या कारणांसाठी रुग्ण डॉक्टरांना कोर्टात खेचू लागले. त्यासाठी प्रत्येक आजाराचा पुरावा असणे हे डॉक्टरांना स्वतःच्या कायदेशीर संरक्षणासाठी गरजेचे वाटू लागले . त्यासाठी प्रत्येक रुग्णाचा आजार सिद्ध करण्यासाठी रेडीओलॉजिस्टची गरज भासू लागली. अर्थात कायदेशीर संरक्षणापलीकडे लवकर निदान होऊन योग्य उपचार देण्यास ही या शाखेची उपयुक्तता आहेच. त्यातही या शाखेत तंत्रज्ञान इतके प्रगत आहे कि एका मिलीमीटरच्या थरातील बदल ही सोनोग्राफी , सिटी स्कॅन व एमआरआय मशीन टिपू शकतात. त्यातच सिटी व एमआरआय चे रिपोर्ट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जगात कुठेही बसून रिपोर्ट करू शकतात.

एवढ्या सर्व बाजूने फुलून आलेल्या शाखे कडे गुणवत्ता आकर्षित न झाली असती तरच नवल होते. पण या शाखेचे काही सुप्त दोष अजून ही शाखा निवडणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेले नाही . ही शाखे एखाद्या गर्भ श्रीमंत घरातील जन्माला आलेल्या टॉपर विद्यार्थ्या साठी आदर्श आहे पण हलाखीत शिक्षण पूर्ण केलेल्या टॉपरला या शाखेत तग धरणे वाटते तितके सोपे नाही. कारण सोनोग्राफी सोडले तरी सिटी व एमआरआय मशीन्स या पांढऱ्या हत्ती प्रमाणे असतात व गुंतवणूक – मिळकत गणित जुळवणे हे खूप जिकीरीचे आहे. त्यातच या शाखेत रुग्ण रेफर करणारे डॉक्टर हेच तुमचे भवितव्य ठरवतात म्हणून तुम्ही किती ही हुशार असला तरी व्यवसायिक दृष्ट्या तुम्ही परावलंबी असता. रेफर करणाऱ्या डॉक्टरांची मर्जी सांभाळणे , गुंतवणूक ही व्यावसायिक कसरत जमली नाही तर कुठल्याशा कॉर्पोरेट रुग्णालयात नोकरी करण्यावाचून पर्याय नसतो. त्वचारोग व त्यातच कोस्मेटॉलॉजी म्हणजे सौंदर्यशास्त्र ही शाखा गेल्या दोन दशकात आर्थिक दृष्ट्या सर्वात समृद्ध शाखा झाली आहे. यासाठी समाजातील एक मोठा बदल जबाबदार आहे. आज जिथे पाणी , रस्ते , वीज नाही अशा अगदी डोंगराच्या टोकावर असलेल्या छोट्या टपरी वर दोन गोष्टी आवर्जुन मिळतात. बिस्कीटचा पुडा आणि गोरे करणारे फेअरनेस क्रीम. गोरे, सुंदर , छान दिसण्याच्या आंतरिक भावनेने आर्थिक स्तिथी , वय , धर्म, लिंग , प्रदेश या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत . म्हणून आज अगदी ग्रामीण भागातही सर्वधिक गर्दी असते ती कोस्मेटॉलॉजीस्ट च्या बाह्यरुग्ण विभागात. आपण जे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही म्हणून शक्य नसलेल्या परफेक्ट लुक मध्ये स्वतःला बसवण्याची समाजातील घुसमट यातून अधोरेखित होते. लेझर तंत्रज्ञानातील मोठ्या बदला मुळे आज कोस्मेटॉलॉजीस्ट साठी या लेझर मशीन्स कामधेनु व कल्पवृकक्षाचे काम करत आहेत.


शास्त्रक्रिया व स्त्रीरोग या शाखा दिवसेंदिवस कायदेशीर दृष्ट्या जोखमीच्या झाल्या आहेत. यात प्रसिद्धी व पैसे तसे पहायला गेल्यास इतर शाखांपेक्षा जास्त आहे. पण या शाखेमध्ये रुग्णांच्या जीवाला धोका व अनिश्चीतता सर्वाधिक आहे. एकही छोटीशी चूक किंवा अति रक्तस्त्रावामुळे माता मृत्यूची एक केस तुमचे पूर्ण आयुष्य व करिअर बेचिराख करू शकतो. डॉक्टरांवर होणारे हल्ले हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शस्त्रक्रियेत अनिश्चितता जास्त असल्याने हल्ल्यांचे प्रमाण या क्षेत्रात वाढले आहे. त्यामुळे रूग्णासोबत स्वतः चा जीव वाचवणे ही डॉक्टरांना गरजेचे वाटू लागले आहे. त्यामुळे जास्त जोखमीच्या शस्त्रक्रिया निगडीत शाखा नकोच हा विचार जोर धरतो आहे.
या सगळ्या ट्रेंड्स मध्ये बालरोग शाखेकडे न वळण्याचे कारण म्हणजे बहुतांश डॉक्टर हे शहरी भागात स्थायिक होतात व शहरांमध्ये लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळे या शाखेत काम कमी झाले आहे व बालरोगतज्ञांची संख्या ही वाढली आहे. ग्रामीण भागात मात्र बालरोग क्षेत्रातील समस्या, बालमृत्यूचे प्रमाण खूप आहे. म्हणून या शाखेकडे डॉक्टरांचे न वळणे व त्यातच ग्रामीण भागात न येणे ही सामाजिक समस्या आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे आरोग्य विभागात व शासकीय सेवेत बालरोगतज्ञांच्या जागा रिक्त असून व त्यांची गरज असून ही शासन त्यांना चांगला मोबदला देण्यास उदासीन आहे. ग्रामीण भागात हिच समस्या स्त्रीरोग तज्ञांच्या बाबतीत आहे. कुठल्या ही राष्ट्राच्या प्रगतीचे मापक हे दर डोई उत्पन्न नसते तर त्या राष्ट्राचा माता मृत्यू व बाल मृत्यू दर असतो. व याच शाखांकडे जर डॉक्टर वळत नसतील तर सर्व दोष डॉक्टरांवर न ढकलता यावर सामाजिक संशोधन होणे गरजेचे आहे.


शस्त्रक्रिया व बालरोगशाखेकडे पहिले येणारे विद्यार्थी वळत नाहीत म्हणजे या जागा अगदी रिकाम्या जात आहेत असेही नाही. वैद्यकीय क्षेत्रातील क्रीम व हुशार विद्यार्थी या शाखेकडे वळत नाही व या शाखांकडे एकेकाळी असणारा ओढा ओसरत चालला आहे असा त्याचा अर्थ आहे. शस्त्रक्रियाच कशाला पण मानसशास्त्र , कर्करोग, लहान मुलांच्या मानसिक समस्या, अॉर्थोपेडिक अशा अनेक शाखा आहेत ज्यांची गरज वाढत जाणार आहे. शाखा निवडीचे पर्याय हे वैद्यकीय क्षेत्रात दर ३० वर्षांनी बदलत असतात. कारण दर तीन दशकांनी समाजात ही वैचारिक स्थित्यंतर घडत असते. शेवटी वैद्यकीय विद्यार्थी याच समाजातून आले आहेत व पुढे काय घडणार याचा अंदाज बांधून विद्यार्थी हा निर्णय घेतात. ग्रामीण – शहरी विकासाची दरी व समाजात बुद्धिवंतांना मिळणारी वागणूक याचा ही शाखा निवडीशी थेट संबंध आहे. यश तुम्हाला बरेच काही देते पण त्याची पुरपूर किंमत वसूल ही करते असे म्हंटले जाते. कदाचित याचा ताळेबंद वैद्यकीय विद्यार्थीही बांधत असावेत. एका बौद्धिक वर्गाने समाजिक समस्या समोर ठेवून त्याग करावा व आपल्या करिअरचे निर्णय घ्यावे हा विचार आजच्या काळासाठी अति आदर्शवादी आहे. आजची पिढी त्यागाच्या रोमँटीसिझम मध्ये जगून करिअरचे भावनिक निर्णय घेणारी नाही. त्याग करायचा असेल सोपा व मोबदला देणारा वाटावा असे बदल समाज व धोरण आखणाऱ्यांना करावे लागतील. आता होणारे बदल त्याचेच निदर्शक आहेत.

  • डॉ अमोल अन्नदाते
    dramolannadate@gmail.com
    www.amolannadate.com

आता लोकांनीच हाती घ्याव्या निवडणुका ! – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक

आता लोकांनीच हाती घ्याव्या निवडणुका !

-डॉ. अमोल अन्नदाते

     एकीशी प्रेम, दुसरीशी लग्न, तिसरीपासून मूल आणि संसार चौथीसोबत... महाराष्ट्राच्या राजकारणात असा काहीसा अजब पॅटर्न सध्या पाहायला मिळतो आहे. समाजमाध्यमांवरील अशा विनोदांतून आपल्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणूस करतो. आहे. पण, हा पॅटन मतदारांच्या असमंजस मतदान वर्तणुकीचे फळ आहे की नेते आपल्याला मिळालेल्या मताला आणि स्वतःची पक्षाची, विचारसरणीची ओझी वाहणाऱ्या कार्यकर्त्यांला गृहीत धरून सत्तेच्या महत्त्वाकांक्षेचे सोपान चढत जात आहेत या दोन्हीचे फलित आहे, हे नेमके कळणे अवघड झाले आहे. आज राज्य चालवणाऱ्या प्रमुख पक्षांचे नेते आपल्यावर अन्याय झाला, आपल्याला इतर कुणी तरी फसवले, अशा कहाण्या सांगत सत्तेची फळ चाखत आहेत. पण, मतदारांवर अन्याय झाला असे मात्र कुणालाही वाटत नाही. यातील दुर्दैव हे की, अशा प्रत्येक नेत्याच्या अन्यायाची कहाणी ऐकून कुणाला किती सहानुभूती आहे, याची मोजदाद करून त्याप्रमाणे मतदान करण्याचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत मतदार जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार आणि कार्यकर्ते इथून पुढे काय भूमिका घेतात, यावर पुढच्या निवडणुका आणि एकूणच लोकशाहीचे भवितव्य अवलंबून आहे. कारण मतदार आणि कार्यकर्ता हे लोकशाहीतील दोन्ही महत्त्वाचे घटक आजच्या घडीला सर्वच राजकीय पक्षांकडून जितके गृहीत धरले गेले आहेत, तितकेच ते दुर्लक्षित आणि उपेक्षितही राहिले आहेत.

मतदार आणि कार्यकर्ते ज्यावर विश्वास ठेवून साथ देतात, ती तत्त्वे, विचारसरणी आणि बांधिलकी यापेक्षा सताप्राप्ती हेच राजकीय पक्षाचे ध्येय ठरले असल्याने हे दोन्ही घटक गोंधळले नि भांबावले आहेत. येत्या निवडणुकीत मतदान करायचे कुणाला या संभ्रमात मतदार आहेत. एकीकडे, ‘नोटा’ (कुणालाही मत नाही) हा पर्याय निवडून आपला असंतोष जाहीर करावा, असा मतप्रवाह मोठा होताना दिसतो आहे. दुसरीकडे, नोटा (पैसे) घेऊन मतदान करणारा एक समूह कुणाला निवडून द्यायचे, यामध्ये अजूनही निर्णायक भूमिकेत आहे. म्हणून बहिष्काराचा ‘नोटा’ आणि सहकाराच्या ‘नोटा’ वापलीकडे जाऊन मतदारांना शहाणपण दाखवावे लागणार आहे. काय पाहून मतदान करावे, याचे वस्तुनिष्ठ शिक्षण देणारी प्रशिक्षण संस्थाच सुरू व्हावी, असे वाटण्याइतपत आजची परिस्थिती निराशाजनक आहे. यातील पहिली पायरी आहे मतदानाची टक्केवारी. या वेळी मतदान करून उपयोग काय ? ही भावना इतकी बळावली आहे की, मतदानावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या चार निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचे सरासरी मतदान ६० टक्क्यांच्या आसपास होते. त्यातही साधारणपणे २० टक्के मतदान हे त्या त्या पक्षांना मानणारे मतदार, कार्यकर्ते यांचे आणि ४० टक्के मतदान कुठल्याही पक्षाचे लाभार्थी किंवा त्याच्याशी संबंध नसलेल्या मतदारांचे असते. म्हणजे एक गोष्ट सिद्ध होते की, सत्तेत येणारे सरकार हे खऱ्या अर्थाने बहुमताचे नसते. त्यातच निवडणुकीनंतर कुणाही सोबत जाण्याचा जो प्रघात गेल्या ५ वर्षांत पडला आहे, त्यात तर हे असे बहुमत आणखीच कुचकामी ठरते.

आज सर्वच सरकारे सत्तेची शक्ती हाती असूनही तीव्र असुरक्षिततेने ग्रासलेली आहेत. त्याला हे कुचकामी, तकलादू बहुमत जन्माला घालणारे निवडणूक विषयक वर्तन (Electoral Behaviour) जबाबदार आहे. मतदानाचे जनुकच सदोष असेल, तर जन्माला येणाऱ्या बहुमताकडून काय अपेक्षा ठेवणार? मतदान करणाऱ्या ४० टक्के अराजकीय जनतेमध्येही केवळ २ टक्के मतदार सुजाण असतात किंवा त्यांच्या मतदान करण्यामागे काही एक विचार असतो. बाकी ३८ टक्के मतदार मतदानापूर्वीचा आठवडा आधीचा दिवस आणि रात्र किंवा प्रचार काळातील तात्कालिक प्रभावी, भावनिक, सहानुभूतीच्या मुद्दयाच्या आधारे किंवा अगदीच विचारशून्यतेतून बटन दाबून आलेले असतात. लोकांनी निर्णायकपणे ठरवून सरकार बदलवण्याची घटना तशी दोन वेळा म्हणजे पहिल्यांदा आणीबाणीनंतर आणि पुढे २०१४ मध्ये घडली. त्यातही कुणी हवे यापेक्षा कुणीतरी नको म्हणून मतदान करण्याची भावना अधिक होती. पण, एक सातत्यपूर्ण आणि मूलभूत मतदान शहाणपण’ दाखवण्याची धमक देश अजूनही दाखवू शकलेला नाही. १८ ते २५ आणि ३० ते ५० वयोगटातील बरेचसे शिक्षित मतदार अजूनही मतदानापासून खूप लांब आहेत. कुठलेही सरकार असले, तरी आयुष्यात फारसा फरक पडणार नाही, अशी भावना असलेला हा मतदार झोपलेला राहणे ही गोष्ट लोकशाहीसाठी सर्वाधिक धोकादायक आहे. अमेरिकेत जसे वंशवाद नाकारून ओबामांना सत्तास्थानी बसवण्यासाठी आणि पुढे ट्रम्प

यांची हकालपट्टी करण्यासाठी तिथला सुजाण मतदार उभा राहिला, तसा अजूनही भारतातील मोठा निर्णायक मतदारवर्ग सक्रियपणे या प्रक्रियेत सहभागी होणे दूरच पण साधे बटण दाबण्यासाठी उत्साहाने मतदान केंद्रावर येण्यासही उद्युक्त झालेला नाही. तळागाळातील मतदाराला मुद्दयांचे भान देणे जसे आव्हानात्मक आहे, तसे मुद्दे नीट समजू शकण्याची क्षमता असणाऱ्या या दुसऱ्या वर्गाला मतदानास प्रेरित करण्याचेही आव्हान आपल्यापुढे आहे.

राजकीय पक्षांची विचारसरणी, भूमिका, नेतृत्व नेतेमंडळी आदी निकष फोल ठरल्यामुळे येत्या निवडणुकीत बऱ्याच वर्षांनी उमेदवाराची व्यक्तिगत गुणवत्ता पाहून मतदान करण्याची वेळ मतदारांवर येणार आहे. त्यासाठी पक्ष बाजूला ठेवून प्रत्येक उमेदवाराची बलस्थाने, कमकुवत बाजू, फायदे आणि धोके यांचा लेखाजोखा मांडून निर्णय घ्यायला हवा. या मंधनातून जे काही पुढे येईल, ती बदलाची प्रक्रिया आहे, हे समजून पुढे जावे लागेल. ‘आम्हाला पुन्हा गृहीत धराल तर खबरदार!’ असा इशारा सर्वच पक्ष आणि नेत्यांना खणखणीत जनमतातून द्यावा लागणार आहे. किंबहुना तशी स्थिती या राजकारणी लोकांनी निर्माण केली आहे.

एकूणच सत्तेसाठी चाललेल्या खेळात सर्वात जास्त विश्वासघात मतदार आणि सामान्य कार्यकत्यांचा झाला आहे. त्यामुळे आता या दोन घटकांना जागे व्हावे लागेल, त्यातही सर्वाधिक फरपट होतेय, ती कुठलीही महत्त्वाकांक्षा नसणारे पण तरीही आपला नेता, पक्ष, विचारसरणी यासाठी झिजणाऱ्या कार्यकत्यांची. खरे तर पक्षाचा पाया रचणारा कार्यकर्ता ज्याला कैडर असे मानाने संबोधले जायचे असा आता वर्ग फारसा उरलाही नाही. पण त्यातही जो काही टिकून होता त्याची स्थिती गुन्हेगार मुलाच्या कृत्याचे समर्थन करता येईना आणि त्याचे नातेही नाकारता येईना अशा बापासारखी झाली आहे. अशा कार्यकत्यांनी गळ्यातले उपरणे भिरकावून, ‘तुमच्या कृत्यांची जबाबदारी आम्ही घेणार नाही, हे नेत्यांना ठणकावून सांगत विचारी मतदाराच्या भूमिकेत यायला हवे. प्रत्येक नाट्याचा शेवट स्वतःच ठरवून तो तुम्ही हवा तसा लिहिणार असाल, तर ते आम्हाला मान्य नाही. तो शेवट काय असेल, हे आता आम्ही ठरवू, अशी धमक त्यांना दाखवावी लागेल. ही ‘लोकशाही वाचवायची असेल, तर आता निवडणुकाही लोकांना आपल्या हातात घ्याव्या लागतील.

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com
9421516551

‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून…. – डॉ. अमोल अन्नदाते

Dr. amol annadate artical

दै. लोकमत

‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून….डॉ. अमोल अन्नदाते

सदोष रस्ता बांधणी, वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक/आदर नसणारे वाहनचालक, सदोष वाहने, अतिवेगाची नशा, अतिपाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे .

२०३ दिवसांत ४५० अपघात आणि ९७ मृत्यू ही ‘समृद्धी महामार्गाची आकडेवारी, परिस्थिती किती भीषण आहे हे दर्शवणारी आहे. सदोष रस्ता बांधणीबरोबरच वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक / आदर नसणारे वाहनचालक अशा महामार्गावरून चालण्याच्या स्थितीत नसलेली सदोष वाहने, अतिवेगाची नशा आणि अकारण घाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे.

या महामार्गावर सर्वाधिक वेग मर्यादा १२० आहे. पण, भारतीय वाहनचालकांचे गाडी चालवण्याचे सरासरी तारतम्य लक्षात घेता ही कमाल मर्यादा अपघातांमध्ये भर घालणारी ठरते आहे. ही वेगमर्यादा महामार्गाची व वाहनाची आदर्श स्थिती व वाहतुकीचे सर्व नियम पाळले जात आहेत असे गृहीत धरून ठरवलेली असते. पण, ही आदर्श स्थिती क्वचितच जुळून येते. म्हणून ठरवून दिलेली वेगमर्यादा काहीही असली तरी समृद्धीवर १०० वेग मर्यादा न ओलांडणे महत्त्वाचे आहे. ८०. १०० व १२० अशा तीन लेन मार्गिका (लेन्स) महामार्गावर ठरवून दिल्या आहेत. पण, या तीन मार्गिका आणि ओव्हरटेक करण्याची सर्वात उजवी मार्गिका ही शिस्त खूप कमी गाड्या पाळतात. स्वयंशिस्तीने हे नियम पाळणे व वेगमर्यादेवर कठोर व कायदेशीर नियंत्रण आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग बांधताना काही चुका झाल्या आहेत. खालून रस्ता असताना त्याठिकाणी सिमेंटचा रास्ता डांबरी होतो व डांबरीकरण सुरू होते. त्याठिकणी मोठे उंचवटे निर्माण झालेले आहेत.काही ठिकाणी हे उंचवटे एवढे उंच आहेत की १२० किंवा काही वेळा १०० च्या वेगाने गाडी जात असल्यास त्यावरून गतिरोधक असावा,तशी उडते. जास्त वेग असल्यास ती आपली लेन तोडून इतर वाहनांवर आदळण्याची किंवा चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या कठड्यावर आदळण्याची, प्रसंगी खाली फेकली जाण्याची शक्यता आहे. बरेच अपघात हे पुलावर किंवा पूल ओलांडून गेल्यावर गाडी उडाल्याने झाल्याचे लक्षात येईल. या सर्व पुलांआधी वेग कमी करून तो ८० करण्याचे फलक लावणे व या जोडणीचे उंचवटे कमी करणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग हा सरळ एका रेषेत असल्याने व वाहनचालकांना सतत समोर त्याच प्रकारच्या दृश्याकडे बघून बधिरता येते व ते संमोहित होतात. दर दोन तासांनी किमान पाच मिनिटांच्या विश्रांतीसाठी थांबण्याची सोय या महामार्गावर कुठेही नाही. टोलनाके येतात तेही महामार्ग चढल्यावर व उतरताना.

५४,००० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या महामार्गावर अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी ट्रॉमा सेंटर, नजीकच्या रुग्णालयांपर्यंत जाण्यासाठीची आपत्कालीन सोय, रुग्णवाहिका, त्यात प्रशिक्षित डॉक्टरची उपलब्धता याचे पुरेसे नियोजन नाही. म्हणायला काही रुग्णवाहिका उभ्या असतात. पण, आतापर्यंतच्या अपघातात त्यांचा फारसा उपयोग झालेला नाही. ९ जूनपासून महामार्गाच्या टोलनाक्यांवर टायर्सची तपासणी करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. पण प्रत्येक वाहनाची अशी तपासणी जिकिरीची आहे. प्रत्येकाने स्वतः आपल्या वाहनाची स्थिती तपासणे हाच त्यावरचा मार्ग होय!

शिर्डी, नाशिक, शनी शिंगणापूर, माहूर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर अशी देवस्थाने व धार्मिक पर्यटनाला जाताना हा महामार्ग वापरणाऱ्यांना विदर्भ आणि मुंबईकडून एका दिवसात भाड्याच्या वाहनाने सकाळी लवकर निघून रात्रीपर्यंत परतण्याची घाई असते. या विचित्र हट्टामुळे ड्रायव्हरवर अतिताण येतो व रात्रभर प्रवासात अपुऱ्या झोपेमुळे अनेक अपघात घडतात. महामार्गावर शक्यतो रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेतला प्रवास टाळायला हवा.

रस्त्यांच्या बाबतीत एक वाक्य नेहमी सांगितले जाते. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडे चांगले रस्ते आहेत असे नाही तर अमेरिकेमध्ये चांगले रस्ते आहेत म्हणून ते श्रीमंत आहेत. आपल्या ‘समृद्ध अनुभवा नंतर त्यात एक भर घालायला हवी. अमेरिकेकडे (खरेतर बहुतांश प्रगत देशांकडे) चांगल्या रस्त्यांसोबत त्यांचे चांगले नियोजन आहे, लोकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल आदर आहे आणि ते पाळण्याची सवय आहे; म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. त्यांच्या समृद्धीची वाट रस्त्याने तरी विनाशाकडे जात नाही!

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com

Where do we want to lead Maharashtra? – Dr Amol Annadate

Divya Marathi Rasik

Where do we want to lead Maharashtra?

Dr Amol Annadate

No conscientious citizen has been untouched by the social and political events in Maharashtra in the last few weeks, the actions and reactions triggered by these events and the comments and responses that have followed in their wake. Where is the social political discourse in Maharashtra headed and what lies in store for the state, are the questions facing us.

Riots broke out between two groups in Kolhapur, the city of Chhatrapati Shahu Maharaj, which has hitherto been known for its social camaraderie and has been untouched by communal tensions. At the same time, the brutal killing in Mira-Bhayandar, the rape and murder of a resident in a government hostel in Mumbai, the recent incident of a girl being abused in a running Mumbai local train, extortions at gun point and incidents of ATMs being robbed….such crimes are occurring with impunity and show no signs of abating. However, political leaders in power and in the Opposition are adopting a stance of political convenience rather than taking steps to ensure citizens’ welfare. One is tempted to question the constitutional responsibility of the positions occupied by these leaders when the state’s home minister and deputy chief minister, known for being sensible leaders, start mouthing platitudes while reacting to the events occurring in Kolhapur. Citizens belonging to all communities and classes are supposed to be equal in the eyes of those who govern us. It is surprising that these leaders should forget that, particularly in times of social and religious tensions, they aren’t just leaders of any party but ministers responsible for maintaining law and order in the state. It is equally unfortunate that leaders of the Opposition too have not taken a firm stand, but have been making statements that are merely convenient or plain wishy washy.

The real reason behind the grave discrepancies between the statements and actions of those in power and those in Opposition is the race to set the narrative for the political climate in the state. This race might help some people to come to power, but as a state, we don’t even seem to have realised that we have lost the credibility we enjoyed as being one of the most progressive states in the country. There’s stiff competition among parties to usurp the Hindutva card touted by Uddhav Thackeray’s Shiv Sena thus far, ever since the Maha Vikas Aghadi government collapsed and a new government came to power. There’s also some covert competition to own the ‘real Hindutva’ label, between the BJP and the Shiv Sena, who were once as thick friends as the legendary Jai-Veeru. The war rooms of these parties are buzzing with plans like the Jan Aakrosh Morcha and the Savarkar Gaurav Yatra to lure the Hindu vote. To top it, IIM educated election strategists are nowadays brainstorming to come up with novel strategies. The only goal of these corporate battle strategists is to get their ‘client’ parties into power. They are busy checking if the existing religious polarisation model can be exploited to their advantage and strategies are chalked up accordingly.

Those who indulge in such activities for political gain should note that the social fabric of Maharashtra has been strengthened over the years by communal harmony and progressive thought. This is the DNA of the state. It is thanks to the inclusive nature of the state that a city like Mumbai could become the financial capital of the country and make its mark on the global landscape. Right since Independence, people belonging to all communities as well as migrants have called Maharashtra home, and have contributed to the progress of the state. A girl from the Baramulla district in Kashmir is currently studying her Masters programme in gynaecology at the taluka hospital where I work. During her admission to the course, her father told me, “I don’t need to worry, my daughter will be studying in Maharashtra…” Maharashtra should ideally be recognised as the country’s premier centre of academic excellence thanks to the quality of education and the excellent facilities offered here. In light of the recent events however, we need to assess whether we would like to strengthen the state’s good image or have it maligned as one of the ‘crime states’ in north India. For years, Maharashtra has maintained its image as an industry-friendly and tolerant state. But now, thanks to the violent events and provocative statements being made by political leaders, we need to evaluate the ‘brand image’ of Maharashtra that is being propagated among industry circles as well as in the world. We should be worried that hate speech and communal tension might win votes, but this could irreparably damage the tag of ‘progressive state’ that Maharashtra has won through hard work over the years.

On this background, it is also important to understand the responsibility that lies with the voters. There are 3 kinds of voters in this country. A large chunk of these is engrossed in a struggle for daily survival, and is not concerned about the state of the nation, but is worried about their own fate. The second group no longer struggles for survival, but is content with the identity they have forged on the basis of their state, language, religion and terrain. Issues related to these topics are more important to them than human development and the global image of their country. Importantly, only these 2 classes of voters are interested in casting their votes. The third class of voters is the educated, intellectual, thinking class, which believes that the country’s politics should be development oriented rather than religion oriented. However, this remains as a belief and this class has no wish to act on this. The indifference of this class is evident from the apathy shown towards the voting process as well. This class of voters doesn’t know who their graduate MLC is, and how they are elected. The first category of voters casts its vote by checking for immediate gratification or on the promise of freebies, while the second category casts its vote driven by emotion and identity. As a result, the country’s politics is governed by emotional tides and manipulated strategies. For an inclusive, citizen-oriented state to flourish, the educated youth need to look beyond commenting on and making reels for social media and become conscious voting citizens. While there’s a new dawn of progress on the global horizon, we need to now take stock and decide whether we want Maharashtra to become a magnet of progress for the country and the world, or lock our doors with communal hate, crime and unrest.

-Dr. Amol Annadate

  • Reachme@amolannadate.com
  • www.amolannadate.com
    Contact No. :- 9421516551

आपल्याला हा महाराष्ट्र कुठं न्यायचाय..? – डॉ.अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक

आपल्याला हा महाराष्ट्र कुठं न्यायचाय..?

  • डॉ.अमोल अन्नदाते

गेल्या एक-दोन आठवड्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात ज्या घटना, क्रिया-प्रतिक्रिया घडत आहे, विधाने-प्रतिविधाने केली जात आहेत, ते पाहता कुठल्याही सुजाण नागरिकाला या राज्याचा सामाजिक- राजकीय इतिहास नेमका कुठल्या दिशेने जातो आहे आणि या राज्याचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

कोल्हापूरसारख्या धार्मिकदृष्ट्या संवेदनशील नसलेल्या आणि कधीही सामाजिक सौहार्दाला गालबोट न लागलेल्या छ. शाहू महाराजांच्या भूमीत दोन गटांमध्ये दंगल झाली. एकीकडे हे सुरू असतानाच मीरा-भाईंदरमध्ये झालेली अत्यंत क्रूर अशी हत्या, मुंबईच्या शासकीय वसतिगृहातील बलात्कार आणि हत्या, काल-परवा मुंबईतच घडलेले धावत्या लोकलमध्ये तरुणीवरील अत्याचाराचे प्रकरण आणि दुसरीकडे दिवसाढवळ्या रिव्हॉल्व्हरच्या धाकाने होणाऱ्या लुटी, चक्क एटीएमच पळवून नेण्याच्या घटना… राजरोस होत असलेल्या अशा गुन्ह्यांची मालिका थांबायला तयार नाही. मात्र, या प्रकारच्या गंभीर प्रकरणांवर राज्यकर्ते आणि विरोधक सामान्य जनतेच्या हितापेक्षा राजकीय सोयीची भूमिका घेत आहेत. कोल्हापूरच्या घटनेसंदर्भात राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा जबाबदार पदावर असलेले व समंजस समजले जाणारे नेतेही निवडणुकीच्या सभेत बोलावे अशी उथळ विधाने करीत असतील, तर त्या पदाच्या संविधानिक दायित्वाचे काय, असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. राज्यकत्यांसाठी सगळ्या जाती-धर्मातील, वेगवेगळ्या आर्थिक स्तरांतील नागरिक एकसमान असतात. विशेषत: धार्मिक, सामाजिक संवेदनशील घटनांच्या वेळी आपण कुठल्या पक्षाचे नेते नव्हे, तर राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले मंत्री आहोत, याचे भानही नेत्यांनी गमवावे, याचे आश्चर्य वाटते. विरोधी नेतेही अशा घटनांबाबत ठाम ‘भूमिका न घेता कधी सोयीची, तर कधी बोटचेपेपणाची विधाने करीत राहतात, हेही तितकेच दुर्दैवी आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांच्या या उक्ती व कृतीमधील टोकाच्या बदलांमागे राज्याच्या संभाव्य राजकारणाचे नरेटिव्ह सेट करण्याची स्पर्धा कारणीभूत आहे.. या स्पर्धेतून कदाचित कुणाला सत्ता मिळेलही, पण देशातील पुरोगामी आणि आघाडीचे राज्य म्हणून आपण खूप काही गमावलेले असेल, याचे किमान ‘भान आपण हरपून बसलो आहोत. महाविकास आघाडी सरकार कोसळून नवे सरकार बनल्यापासून सत्ताधारी पक्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंदुत्व कार्ड कसे पळवायचे, याची तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातच सत्तेतील भाजप आणि शिवसेना या जय-वीरूच्या जोडीमध्ये खरे हिंदुत्व कुणाचे, अशी छुपी स्पर्धा सुरू आहे. हिंदू मतांवर एकगठ्ठा मालकी सांगण्यासाठी हिंदू जनआक्रोश मोर्चापासून सावरकर गौरव यात्रेसारख्या अनेक संकल्पना या पक्षांच्या वॉररूममध्ये ठरत असतात. त्यात अलीकडे ‘आयआयएम’मधील उच्चशिक्षित निवडणूक रणनीतिकार दिवस-दिवस ‘ब्रेन स्टॉर्निंग’ करून धोरणे ठरवत असतात. ‘क्लाएंट’ पक्षाला सत्ता मिळवून देणे, एवढे एकच ध्येय या कॉर्पोरेट रणनीतिकारांचे असते. यात आधीच सेट झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या मॉडेलला तसेच्या तसे राबवता येते का, हेसुद्धा पाहिले जाते आणि त्यानुसार काही धोरणे ठरवली जातात.

राजकीय लाभासाठी अशा गोष्टी करणाऱ्या सर्वांनीच एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की इतिहासापासून ते आजवर तयार होत गेलेली महाराष्ट्राची सामाजिक वीण ही जाती-धर्मातील सौहार्दाच्या, पुरोगामित्वाच्या धाग्याने आणखी घट्ट झाली आहे. हाच या राज्याचा डीएनए आहे. महाराष्ट्राच्या सर्वसमावेशकतेमुळेच मुंबईसारखे शहर देशाची आर्थिक राजधानी बनून
जागतिक नकाशावर ठळकपणे आपले स्थान निर्माण करू शकले. स्वातंत्र्यापासून सर्वधर्मीयांना आणि इतर राज्यांतील स्थलांतरितांना हे आपले घर वाटले, त्यांनी इथल्या प्रगतीत मोलाची भर टाकली. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या माझ्या रुग्णालयात काश्मीरच्या बारामुल्लाची मुलगी स्त्रीरोग विषयात पदव्युत्तर शिक्षण घेते. इथे प्रवेश घेताना या मुलीचे वडील मला म्हणाले, ‘हमारी बेटी महाराष्ट्र में है, तो फिर हमें कैसी फिक्र..?’ आपल्याकडील दर्जेदार शिक्षण आणि उत्तम सुविधांमुळे खरे तर महाराष्ट्र हे देशाचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जायला हवे. पण, सध्या घडत असलेल्या गोष्टी पाहता आपल्याला राज्याची ही प्रतिमा अधिक प्रगल्भ करायची आहे की उत्तरेतील राज्यांसारखी ‘क्राइम स्टेट’ म्हणून कलंकित करायची आहे, हे आपल्याला ठरवावे लागेल. वर्षानुवर्षे महाराष्ट्राची प्रतिमा ही उद्योगस्नेही आणि संयमी राज्य म्हणून राहिली आहे. पण, जबाबदार व्यक्तींची भडकाऊ उक्ती आणि त्याप्रमाणे समाजात घडणाऱ्या हिंसक कृती पाहता उद्योग विश्वासह जगभरातील लोकांमध्ये राज्याचा कोणता ‘ब्रँड’ प्रस्थापित होतो आहे, याचा विचार कधीतरी करावा लागेलच. जातीय-धार्मिक तेढ, द्वेषपूर्ण वक्तव्ये यामुळे कदाचित मते, सत्ता मिळेलही; पण त्यासाठी या

राज्याने कष्टातून कमावलेल्या प्रागतिकतेच्या ‘ब्रँड’ला बट्टा लागेल, याचीही चिंता वाटायला हवी.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदारांची जबाबदारी काय, हेही महत्त्वाचे आहे. या देशात तीन प्रकारचे मतदार आहेत. एक मोठा वर्ग ज्यांचा रोजचा संघर्षच संपलेला नाही आणि त्यांना देशाचे काय होईल, यापेक्षा त्यांचे स्वतःचे काय होईल, याची भ्रांत आहे. दुसरा वर्ग, ज्याचा संघर्ष संपलेला असला, तरी आपले राज्य, भाषा, धर्म आणि भूभागाच्या अस्मितेवर तो स्वार झाला आहे. त्याच्यासाठी मानवी विकास, देशाची जागतिक प्रतिमा यापेक्षा हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात. विशेष म्हणजे, हे दोनच वर्ग प्रामुख्याने मतदान करतात. तिसरा वर्ग शिकलेला, बुद्धिप्रामाण्यवादी, विचारी वर्ग आहे. देशाचे राजकारण धर्माऐवजी विकासकेंद्रित व्हावे, असे या वर्गाला वाटते. पण त्याला हे फक्त वाटते. त्यासाठी कुठलीही कृती करण्यास तो उत्सुक नाही. मतदान करण्याच्या सर्वात महत्त्वाच्या कृतीपासूनच त्याची ही उदासीनता सुरू होते. आपला पदवीधर आमदार कोण आणि त्याची निवडणूक कधी होते, तेही माहीत नसलेला हा वर्ग आहे. मतदान करून लोकशाहीचे भवितव्य ठरवणाऱ्या दोनपैकी पहिला वर्ग हा तात्कालिक फायदा किंवा मोफत काही मिळते आहे का, हे पाहून किंवा दिवाळीला धान्याच्या एखाद्या मोफत पिशवीवर हुरळून मतदान करणारा आणि दुसरा अस्मितेवर भावनिक होऊन मतदान करणारा आहे. परिणामी देशाचे राजकारण भावनिक लाट आणि ठरवून निर्माण केलेल्या धारणांवर आधारले आहे. त्यामुळे सर्वसमावेशक, लोककल्याणकारी राज्यासाठी तरुण, शिक्षित आणि बुद्धिप्रामाण्यवादी वर्गाला केवळ समाजमाध्यमांवर लिहिण्या-बोलण्या आणि रील्स तयार करण्यापलीकडे जाऊन सजग मतदार बनावे लागेल. जगात नव्या प्रगतीच्या युगाची पहाट फटफटत असताना, महाराष्ट्राच्या प्रगतीत भर घालू शकणाऱ्या देश आणि जगभरातील लोकांसाठी आपण चुंबक बनायचे आहे की आपल्या दारांना जातीय धार्मिक द्वेष, गुन्हेगारी अन् अशांततेचे कुलूप लावायचे आहे, हे आपल्याला ठरवावे लागेल.

-डॉ.अमोल अन्नदाते
Reachme@amolannadate.com
www.amolannadate.com

• संपर्क : 9421516551