गिरणगावच्या इतिहासाचे साक्षीदार – डॉ. अमोल अन्नदाते

Maharashtra times

दैनिक महाराष्ट्र टाइम्स

गिरणगावच्या इतिहासाचे साक्षीदार

डॉ. अमोल अन्नदाते

दिग्विजय मिल्स , पत्रा चाळ, खोली क्र १२, काळाचौकी... या मूळ गिरणगावच्या शेवटच्या  अवशेषात दहा बाय बाराच्या खोलीत कुठल्या ही तक्रारी शिवाय आनंदात आयुष्य घालवणारे पंढरीनाथ सावंत हे ही गेल्या ६० वर्षात बदललेल्या महाराष्ट्राचे शेवटचे प्रमाणिक साक्षीदार होते. गिरणगावात टॉवर्सच्या गर्दीतील उंच भोंगे प्राणहीन असले तरी जसे आज ही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत तसे सगळ काही बदलल पण पंढरीनाथ सावंत ही उंच मानेने , प्रामाणिकपणे नैतिकतेच्या पत्रकारितेचा दाखला शेवट पर्यंत देत राहिले. 

                        कोकणातून मुंबईतून येऊन रेडीओ लँम्प कंपनीत हेल्पर , गणपती बनवण्याच्या कामात रंगारी,  बेस्ट मध्ये कंडक्टर , चित्रकलेचे शिक्षण घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या उर्दू शाळेत चित्रकलेचे शिक्षक , शाळेत शिक्षक हा प्रवास अंगभूत शहाणपण , सुंदर हस्ताक्षर या मुळे प्रबोधनकारांच्या दारात म्हणजे मातोश्री वर कसा येऊन पोहोचला हे त्यांना ही कळले नाही. बेस्ट मध्ये कंडक्टर असताना एकदा पंढरीनाथ बेस्ट संपाची बातमी देण्यासाठी मराठाच्या कार्यालयात आचार्य अत्रे यांना भेटायला  गेले. अर्जामधील भाषेची शुद्धता आणि हस्ताक्षर पाहून पंढरीनाथ यांच्या गळ्यात लटकत असलेल्या शिट्टीला धरून “ हे काय करताय ? “ असे अत्रे ओरडत म्हणाले . मग गळ्यातील पेनाला धरून “ हे तुमचे काम आहे , हे करा , हे “ म्हणाले हा प्रसंग पंढरीनाथ अत्रेंचा आवाज काढत नक्कल करत तसाचा तसा करून दाखवत . प्रबोधनकारांचे लेखनिक आणि मुख्य सहाय्यक म्हणून  ते संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ठाकरे – अत्रे वाद , मार्मिकची स्थापना, शिवसेना पक्ष नसताना ठाकरे बंधूंचे मराठी माणसाचे संघटन , त्यातून शिवसेनेचा जन्म अशा मोठ्या काळाचे केवळ साक्षीदारच नव्हे तर या प्रत्येक घटनेतील संप्रेरकाची भूमिका त्यांनी शांतपणे बजावली .  संघटनेचे नाव काय ठेवायचे या बैठकीत प्रबोधनकार आणि बाळसाहेब , श्रीकांत ठाकरे सोडून चौथी व्यक्ती म्हणजे पंढरीनाथ सावंत. संघटनेचे नाव ठरत असताना या बैठकीत  कसे ब्रेन स्टॉर्मिंग झाले, कोण कसे कुठे बसले होते  आणि प्रबोधनकारांचे डोळ्यात एक चमक येऊन त्यांच्या तोंडून ‘शिवसेना’ हा शब्द निघाला हा सगळा एकपात्री प्रयोगच ते करून दाखवत . १९ जून १९६६ साली शिवसेनेची घोषणा झाली तेव्हा बाळासाहेबांच्या बरोबरीने सतेज बांधणारे व सतरंजी टाकणारे व्यक्ती म्हणजे पंढरीनाथ सावंत. गर्दीतून पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख अशी शी .... व .... लांबवत घोषणा देणारी व्यक्ती कोण होती व ती दादर ला कुठे रहता होती इतका नेमका इतिहास त्यांना माहित होता .   

                                    प्रबोधनकारांनी त्यांना मार्मिक सोडून जगाच्या मोठ्या शाळेत पत्रकारिता शिकण्यासाठी मार्मिक बाहेर पड म्हणून सल्ला दिला. त्यानंतर श्री साप्ताहिक , ब्लिट्झ , प्रभंजन , लोकमत नागपूर , लोकमत औरंगाबाद , पुढारी कोल्हापूर असा पत्रकारितेचा मोठा प्रवास केला. श्री , ब्लिट्झ मिळून साप्ताहिकांच्या कव्हर स्टोरीतून महाराष्ट्र हलवण्याचे काम श्याम मोकाशी ( परेश मोकाशी यांचे वडील ) , पुष्पा त्रिलोकेकर , वसंत सोपारकर आणि पंढरीनाथ सावंत या सुवर्ण चतुष्कोनाने केले . मार्मिक मध्ये परतल्यावर शिवसेना , सामना वाढत गेला पण शिवसेनेला जन्म देणारी मार्मिक ही आई कृश होत एका बोळी वजा खोलीत आक्रसून गेली. तेव्हा श्याम मोकाशी आणि वसंत सोपारकर यांना सोबत घेऊन या तिघांनी  करंगळीवर गोवर्धन तोलून धरावा तसा ४० वर्षे मार्मिक जगवला. श्री साठी ७२ चा दुष्काळ कव्हर करण्यासाठी एक क्लिक ३ कॅमेरा घेऊन  पंढरीनाथ यांनी २००० मैल प्रवास केला. बिहार मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या सभा , विद्यापीठ नामांतर चळवळीत पेटलेला महाराष्ट्र , नागपूर अधिवेशनाच्या वेळी शरद जोशींची शरद पवार यांनी हायजॅक केलेली शेतकरी दिंडी या घटना त्यांनी इतक्या जवळून पहिल्या होत्या कि अगदी गेल्या वर्षा पर्यंत ते जसेच्या तसे सांगायचे . 

                                            केवळ राज्य व देशच नव्हे तर जागतिक राजकारण , विविध देशांच्या हेरसंस्था, हिटलरचे मानस शास्त्रीय विश्लेषण , पहिले व दुसरे महायुद्ध या सर्व गोष्टींचे ते एनसायक्लोपिडीया होते . कॉम्रेड डांगे यांच्या ओळखीने त्यांनी इंदिरी गांधींची मुलाखत मिळाली. त्यांचे बाळासाहेबांसोबतचे नाते इतके प्रामाणिक होते की,  इंदिरा गांधी यांच्याशी असलेला स्नेह त्यांनी बाळासाहेबांपासून कधीत लपवला नाही. मुल्याधारित पत्रकारिता, निष्ठा, अभ्यास, नि:स्वार्थी सेवा असे शब्द अर्थहीन ठरत असताना पंढरीनाथ सावंत यांचे जाणे हे अधिकच उदास करणारे आहे. 

डॉ.अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

राजकीय गुन्हेगारीकरणाचे प्रजासत्ताकापुढे आव्हान – डाॅ. अमोल अन्नदाते

दैनिक दिव्य मराठी रसिक पुरवणी

राजकीय गुन्हेगारीकरणाचे प्रजासत्ताकापुढे आव्हान

डाॅ. अमोल अन्नदाते

                                 नुकतेच आमच्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदरच्या वेळी जगाच्या विविध भागांमध्ये स्थायिक झालेले जुने सवंगडी जमले होते. यापैकी काही जण परदेशात उच्चपदस्थ होते. त्यापैकी सिंगापूर आणि आइसलँड इथून आलेले मित्र तिथल्या कायदा - सुव्यवस्थेबद्दल सांगत होते. तिथे आपला ८ वर्षांचा मुलगा किती निर्भयपणे एकटा टॅक्सीने फिरू शकतो, एखादी महागडी वस्तू रस्त्याच्या कडेला सोडून गेलात, तरी दोन दिवसांनी ती तशीच तिथे कशी परत सापडते, याचे कौतुक ऐकवत होते.

भारतातील वातावरण आणि रोज येणाऱ्या गुन्ह्यांच्या बातम्या पाहता, इथे पाऊल ठेवल्यापासून आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत, प्रवासही दिवसाच करत आहोत, असे त्यांनी सांगितल्यावर मात्र भारतीय म्हणून मला त्याचे शल्य वाटले. आइसलँड आणि सिंगापूर हे गुन्हेगारीचे प्रमाण सर्वात कमी असलेले देश आहेत. भारत गुन्हेगारीच्या बाबतीत जगात ७७ व्या क्रमांकावर आहे आणि हे नक्कीच भूषणावह नाही. ही क्रमवारी ठरवताना केवळ नोंदवलेले गुन्हे गृहीत धरण्यात येतात. घडणारा प्रत्येक गुन्हा नोंदवला गेला, तर आपण कोणत्या क्रमांकावर असू, याची कल्पना न केलेली बरी.

भारतातील गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि लोकांच्या मनात सतत दाटलेली भीती हे भारतीय लोकशाहीसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. वाढत्या गुन्हेगारीचा पहिला संदर्भ राजकारण आणि लोकप्रतिनिधींशी जोडला जाणे क्रमप्राप्त आहे. देशात गेल्या काही वर्षांत झालेल्या निवडणुकांचे निकाल बघितले आणि त्यांची सरासरी काढली तर ३४ टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत आणि त्यापैकी २४ टक्के म्हणजे ५ पैकी एका खासदारावर गंभीर स्वरूपाचे व मोठी शिक्षा होऊ शकतील, असे गुन्हे दाखल आहेत. तीनपैकी एका आमदारावर गुन्हे दाखल आहेत. राजकीय आंदोलने , जमावबंदी असे छोटे गुन्हे वगळले तरी खून, अपहरण असे अत्यंत गंभीर गुन्हे असलेले कितीतरी लोक कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून जात आहेत, हा लोकशाहीतील केवढा मोठा विरोधाभास आहे! लोकप्रतिनिधींवरील आरोपाच्या प्रकरणांतील एक टक्क्यांहून कमी प्रकरणे निकालांपर्यंत पोहोचू शकतात. भारतीय न्यायव्यवस्थेच्या गती आणि शक्तीमध्ये प्रजासत्ताकाच्या ७५ वर्षांतही मोठी सुधारणा का होऊ शकली नाही, या सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणात दडले आहे.

न्यायव्यवस्था संथ, कमकुवत राहणे ही सत्ताधारी, विरोधक अशा सर्वांसाठी सोयीचे बनले आहे. निवडणुकांचे बहुतांश अर्थकारण काळ्या पैशावर चालते आणि गुन्हेगारी हा काळ्या पैशाचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पदरी बाळगणे ही राजकारणाची रीत झाली आहे. आता हे संबंध इतक्या हीन पातळीवर गेले आहेत की, राजकीय पक्ष थेट गुन्हेगारांनाच तिकीट देऊ लागले आहेत. मोठ्या गुन्ह्यामध्ये तुरुंगात असूनही प्रचार न करता निवडून आल्याची कितीतरी उदाहरणे आपण पाहतो. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला अशी लोकमान्यता मिळाल्यामुळे खून, दरोडे, खंडणी असे छोटेमोठे गुन्हे दाखल असणे आणि गुंड, दबंग अशी प्रतिमा बनणे ही राजकीय पक्षांना हवीशी वाटणारी ‘पात्रता’ होऊन बसली आहे.

लोकांनाही आपला लोकप्रतिनिधी गुन्हेगार का हवा आहे, हा एक सामाजिक संशोधनाचा विषय आहे. निवडणूक अर्ज भरताना स्वतःची संपत्ती आणि दाखल असलेले गुन्हे जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मग मतदान करताना आपण उमेदवारांचे शपथपत्र उघडून वाचतो का? स्वतःशी संबंधित एखादे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले की आपण आधी लोकप्रतिनिधींकडे धाव घेतो. त्यांनी मदत करावी, अशी आपली अपेक्षा असते. थोडक्यात, आम्ही काही बेकायदेशीर केले तर आम्हाला वाचवा, तुम्ही केले तरी काही हरकत नाही, असा एक अलिखित करार मतदार – लोकप्रतिनिधींमध्ये दिसतो.

सामान्य भारतीय माणूस हा अत्यंत पापभीरू , नियमांना घाबरणारा आहे. न्याय देणारी व्यवस्था कमकुवत आणि सोयी-सुविधा देणारे सरकार असमर्थ असल्याची त्याला जणू खात्रीच पटली आहे. त्यातच जात – धर्म, भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता दिवसेंदिवस अधिकच टोकदार होऊ लागल्याने तो धास्तावला आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एखादा बाहुबली आपल्याला सुरक्षा देऊ शकेल, अशी अपेक्षा कदाचित तो ठेवत असावा. एखादा साधा-सच्चा माणूस निवडून येईल आणि लोकप्रतिनिधी बनून आपले हक्क मिळवून देईल, यावरून सर्वसामन्य मतदाराचा विश्वास उडाला आहे.

एकूणच अशा गोष्टींमुळे लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था कमकुवत होत आहेत. सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाचा केंद्रबिंदू असलेल्या सामान्य जनतेचे या संस्थांवरील नियंत्रण सुटत चालले आहे. ते कायम राहावे आणि आणखी मजबूत व्हावे, म्हणून आपल्या सामाजिक, राजकीय धारणा बदलल्या पाहिजेत. आमिषे, खोटी आश्वासने, फुकटच्या खैराती नाकारत गुन्हेगारीमुक्त प्रजासत्ताकासाठी ठाम आग्रह धरला पाहिजे. हे करू शकणारे नागरिकच लोकशाही वाचवू शकतील.

डाॅ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

पैसे न घेता मतदान हाच लोकशाहीचा नवा धर्म! – डॉ. अमोल अन्नदाते

दैनिक दिव्य मराठी रसिक पुरवणी

पैसे न घेता मतदान हाच लोकशाहीचा नवा धर्म!

डॉ. अमोल अन्नदाते

        भारतीय निवडणुकांमध्ये ‘मतदान विकणे’ हा प्रकार कधी सुरू झाला, हे नेमकेपणे कोणालाच सांगता येणार नाही. पण, अलीकडच्या काळात मत विकत घेण्याचा उच्चांक आणि लोकशाहीच्या अवमूल्यनाचा नीचांक होऊ लागला आहे. लोकप्रतिनिधी मतदान करतात त्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत थेट पैसे देण्याचे प्रारूप अवलंबले जात असल्याचे पूर्वी म्हणजे किमान तीन दशकांपासून ऐकण्यात यायचे. त्यातूनच ‘घोडेबाजार’ हा शब्दप्रयोग जन्माला आला. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच नव्हे, तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही मतांसाठी पैसे दिले - घेतले जाणे, हे एव्हाना ‘ओपन सिक्रेट’ म्हणून रुढ झाले आहे.

अलीकडे झालेल्या निवडणुकीतील तीन ते चार प्रातिनिधिक अनुभव मती गुंग करणारे आणि कुठल्याही विवेकनिष्ठ नागरिकाला काळजी वाटावी असे आहेत. एका मतदारसंघातील विश्लेषण करत एक मतदार सांगत होता – “उमेदवार खूप चांगले होते, निवडून यायला हवे होते; पण त्यांचे पैसे शेवटच्या दिवशी पोहोचलेच नाहीत.” दुसऱ्या प्रसंगात, एक पत्रकार मित्र मतदानासाठी गेला आणि तिथे मदतीसाठी बसलेल्या एका उमेदवाराच्या प्रतिनिधीने मतदानाची स्लीप वगैरे देऊन झाल्यावर खुलेपणाने पैसे देऊ केले. मित्राने ते नाकारल्यावर कार्यकर्त्याने आश्चर्य व्यक्त करत विचारले की, तुम्ही पैसे न घेता मतदान करणार? तिसऱ्या प्रसंगात निवडणूक व्यवस्थापनात सक्रिय असलेल्या एका मित्राने व्हाट्स अॅपवरील मेसेज दाखवत सांगितले – आपण साहित्यात वाचतो आणि आदर्शवादी भाषणात ऐकतो तो शाहू, फुले, आंबेडकरांचा स्वाभिमानी महाराष्ट्र मला निवडणुकीत मतदारांमध्ये कुठेही दिसला नाही. आमच्या कुटुंबात १३ मते आहेत, पण तुमचे पैसे पोहोचले नाहीत, असा मेसेज चाळीस हजार रुपये महिना पेन्शन असलेल्या एका शिक्षित व्यक्तीने पाठवला होता. मतदार आणि उमेदवारांमध्ये होणाऱ्या पैशांच्या थेट आणि मोठ्या रकमेच्या उलाढालीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

दोन मुख्य उमेदवार असल्यास त्यांच्यामध्ये एका मतासाठी कोण किती रक्कम मोजायला तयार आहे, याची चढाओढ लागते. त्यातही कुठल्या उमेदवाराची पैसे वाटण्याची यंत्रणा किती सक्षम आहे, यावर त्याचे यश ठरू लागले आहे. प्रचार सभांमध्ये बऱ्याचदा नेते ‘पैसे कोणाकडूनही घ्या, पण मतदान आम्हालाच करा,’ असे जाहीरपणे सांगतात. निवडणुकांतील गैरप्रकार इतक्या हीन पातळीवर पोहोचले आहेत. प्रत्येक मताची किंमत मोजल्यामुळे आपण मतदारांना उत्तरदायी असल्याची उमेदवाराची भावना संपून जाते. निवडून आलेल्या उमेदवाराने आपल्या मतांच्या जीवावरच हे पैसे कमावले आहेत किंवा पुन्हा निवडून आला तर तोही कमावणारच आहे, म्हणून त्याने दिलेल्या पैशावर आपला अधिकार आहे, असे मतदार मानू लागले आहेत. आणि लोकशाहीसाठी हाच मोठा धोका ठरला आहे. विशेष म्हणजे, उच्चशिक्षित आणि सधन मतदारही मतदानासाठी पैशाचा मोह बाजूला ठेवू शकलेला नाही. पण, पैसे वा अन्य आमिषाला बळी पडून मतदार लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावून बसतातच; शिवाय त्यांच्या भ्रष्टाचारालाही लोकमान्यता देतात.

मतदारांना पैसे वाटण्याच्या अनिष्ट प्रकारामुळे निवडणुकीचा खर्च इतका वाढला आहे की, त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती निवडणूक लढवण्याचा विचारच करू शकत नाही. तिकीट देताना बहुतांश पक्षही उमेदवाराची ‘खर्च करण्याची’ क्षमता तपासूनच तिकीट देतात. म्हणून आर्थिक परिस्थिती हा हल्लीच्या राजकारणात येण्याचा पहिला निकष ठरला आहे. म्हणजे राजकारण हा एका अर्थाने भांडवलशाहीचाच दुसरा चेहरा बनू लागला आहे. मोठे उद्योग समूह राजकीय पक्षांना आर्थिक मदत देऊन स्वतःला हवी ती धोरणे राबवून घेतात, अशी तक्रार केली जायची. आता राजकारण हाच उद्योग होऊन निवडणुका हा कॉर्पोरेट इव्हेंट झाला आहे. ज्या सर्वसामन्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुका होतात, त्यामध्ये त्यांच जागा राहात नसेल, तर ती व्यवस्था त्यांच्या भल्यासाठी उपयोगी पडणार कशी?

एवढे होऊनही मतदार फक्त आणि फक्त पैसे घेऊन आणि त्याला जागून ज्याचे पैसे घेतले त्यालाच प्रामाणिकपणे मतदान करतात का? हाही एक संशोधनाचा विषय बनला आहे. त्यामुळे एखाद्या निवडणुकीत किमान एका तरी मतदारसंघातील सर्वच उमेदवारांनी कुणीही पैसे वाटायचे नाहीत, असे ठरवावे आणि काय जनमत बाहेर येते, ते पाहण्याचा प्रयोग करून बघावा. दुसऱ्या बाजूने, किमान एका तरी मतदारसंघातील मतदारांनी आपला स्वाभिमान जागवत, आम्हाला तुमचा एक रुपयाही नको, त्याशिवाय कोणाला मतदान करायचे हे ठरवू, असा बाणा दाखवायला हवा. एका छोट्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मला भाषणासाठी बोलावले होते. त्यावेळी मी लोकांना एक भावनिक आवाहन केले. ‘आपण देशाला आपली माता मानत असू, तर मत विकणे म्हणजे मातेला विकण्यासारखे आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शपथ घ्या की, येत्या निवडणुकीत आम्ही पैसे घेऊन मत विकणार नाही,’ अशी शपथ लोकांना दिली. त्या गावातील सगळ्यांनी निवडणुकीत उमेदवारांचे पैसे नाकारल्याचे मला नंतर कळले. उमेदवारांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले. पैसे न घेता मतदान करणे हाच लोकशाहीचा नवा धर्म मानून तो घराघरात पोहोचवण्यासाठी देशव्यापी मोहीम हाती घेण्याची वेळ आली आहे. कारण पैसे न घेणारा स्वाभिमानी मतदारच लोकशाहीचे रक्षण करू शकतो.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

वरची सभागृहे खरेच ‘वरिष्ठ’ राहिलीत का? – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

वरची सभागृहे खरेच ‘वरिष्ठ’ राहिलीत का?

डॉ. अमोल अन्नदाते

भारतीय लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा ही थेट लोकांमधून निवडून जाऊन राज्यव्यवस्था चालवण्याची आणि बदलण्याची संधी असते. यासोबत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ हे विभागवार निर्माण करून शिक्षित मतदारांना त्यांचा प्रतिनिधी निवडण्याची संधी देण्यात आली आहे. लोकांमधून निवडून जाण्याव्यतिरिक्त लोकशाही प्रक्रियेच्या मजबुतीसाठी राज्यसभा आणि विधान परिषद अशी वेगळी व्यवस्थाही निर्माण करण्यात आली. सध्या ६ राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. या सभागृहांना वरिष्ठ म्हणजे लोकसभा आणि विधानसभेपेक्षा वरची सभागृहे मानले गेले आहे. पण, गेल्या काही वर्षांत या सभागृहांसाठी सदस्य निवडण्याचे निकष आणि नेमणुकीचे प्रमाण बघता ही खरेच ‘वरिष्ठ’ राहिली आहेत का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

बौद्धिक, वैचारिक, सामाजिक क्षेत्रांबरोबरतच कला, क्रीडा, विज्ञान, वैद्यकीय, अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रांतील पारंगत लोकांच्या सहभागामुळे संसदीय लोकशाही आणि शासन अधिक प्रभावी होईल, या विचारातून ही व्यवस्था निर्माण झाली. ज्या लोकांना निवडणूक लढवणे शक्य नाही, आपापल्या क्षेत्रातील कौशल्य आणि व्यस्ततेमुळे ज्यांना लोकांमधून निवडून जाण्यात राजकीय अडथळे येऊ शकतात, त्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा एक मार्ग म्हणून वरिष्ठ सभागृहांकडे बघितले जायचे. किंबहुना तेथील लोक अधिक ज्ञानी, विचारी म्हणून ते वरचे सभागृह मानले जाऊ लागले. या सोबतच राजकीय संघटनेत आणि पक्षबांधणीमध्ये अनेक वर्षे घालवलेल्यांनाही या सभागृहात काही प्रमाणात संधी मिळणे ही गोष्टही समजण्यासारखी आहे. पण, हे सभागृह पूर्ण राजकीय किंवा कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी निगडीत आणि त्याचे सदस्य असलेल्या, राजकारणात सक्रिय असलेल्यांनीच भरलेले असावे, असा कधीही त्यामागचा हेतू नव्हता.

गेल्या साधारण वीस वर्षांत मात्र या सभागृहांचे स्वरूप बदलत गेले. विधान परिषदेच्या काही जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आणि काही जागांसाठी विधानसभेचे प्रतिनिधी मतदान करतात. या निवडणुका प्रत्येक पक्षाच्या संख्याबळाप्रमाणे जेवढ्या जागा आहेत, तितकेच उमेदवार अशी बिनविरोध झाली नाही तर त्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक खर्चिक होतात. राजकीय संदर्भात ‘घोडेबाजार’ या शब्दप्रयोगाचा वापर सुरू झाला, तो याच निवडणुकांमुळे. मग अशी स्थिती असेल, तर या सभागृहात विचारी, अराजकीय व्यक्ती जाणार कशी? त्यातच राज्यसभा आणि विधान परिषदेच्या अशा जागा म्हणजे पक्षासाठी मागच्या व पुढच्या दाराने निधीचा स्त्रोत असू शकतो, हा शोध पक्षांना लागला. त्यामुळे अनेक पुंजीपतींची वर्णी या सभागृहांमध्ये लागू लागली. पुढे ही सभागृहे पक्षांसाठी राजकीय खरेदी-विक्रीचा बाजार ठरू लागला. काही अराजकीय किंवा राजकारणाच्या वर्तुळातील पण विचारवंत, अभ्यासू लोकांना या सभागृहांमध्ये संधी मिळालीही; मात्र अशी उदाहरणे विरळच होत गेली.

राज्यसभेत राष्ट्रपती नियुक्त आणि विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त सदस्यांचाही समावेश असतो. ही नियुक्ती असल्याने ती राजकारणापासून अलिप्त असणे अपेक्षित असते. पण, यासाठीची नावे मंत्रिमंडळ बैठकीत सत्ताधारी पक्षच ठरवतात आणि या नावांची यादी केवळ स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाते. राज्य सरकार एका पक्षाचे आणि राज्यपाल दुसऱ्या राजकीय पार्श्वभूमीचे असल्यास अशा नियुक्त्यांचे काय होते, हेही महाराष्ट्राने अनुभवले आहे.
एकेकाळी या दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाच्या विषयांवर अगदी मध्यरात्रीपर्यंत चर्चा चालत. पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच सत्ताधारी आणि विरोधी नेते त्यावेळी आवर्जून उपस्थित राहत. या सभागृहांमध्ये मांडलेल्या अनेक प्रश्नांनी देशाच्या आणि राज्याच्या धोरणांना दिशा दिली गेली. वि. स. पागे यांनी १९७२ च्या दुष्काळात सुचवलेली रोजगार हमी योजना, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी खासगी संस्था सुरू करण्याचा निर्णय असे अनेक ऐतिहासिक निर्णय या वरिष्ठ सभागृहांतील चर्चेतून आले. आता मात्र ‘वरच्या’ समजल्या जाणाऱ्या या सभागृहांमध्ये अनेकदा अत्यंत ‘खालची’ भाषा वापरली जाते. दोन्हीकडील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याने त्यांचे निलंबन झाल्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत.

याच सभागृहांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून सदस्य निवडले जातात. पण, या निवडणुका कधी होतात हेही अनेकदा मतदारांना कळत नाही. या निवडणुकांसाठी दर सहा वर्षांनी नव्याने नोंदणी करण्याची सक्ती कशासाठी, हेही न उमगण्यासारखे आहे. एकदा एखाद्या विभागात पदवीधर म्हणून नोंदणी केली की प्रत्येक निवडणुकीत मतदान करता यायला हवे. या निवडणुका त्यांच्या मतदारांपासून इतक्या लांब गेल्या आहेत की, आपला शिक्षक आणि पदवीधर आमदार कोण, हेही त्या मतदारांना माहीत नसते.

लोकशाहीमध्ये लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे महत्त्व आहेच. त्यातून अगदी अल्पशिक्षित व्यक्तीलाही राज्यकर्ता बनण्याची संधी मिळते, हे या व्यवस्थेचे वेगळेपण आहे. पण म्हणून सुशिक्षित वा उच्चशिक्षितांना संधी मिळू नये, असा याचा अर्थ नाही. अशी संधी राज्यसभा आणि विधान परिषदेसारख्या सभागृहांमुळे उपलब्ध होते. राज्यकर्ते आणि कल्याणकारी राज्याची व्यवस्था कशी असावी, हे सांगताना प्लेटो म्हणतो- ‘विचारी, बुद्धिमान आणि तत्त्ववेत्ते राज्यकर्ते बनत नाहीत, तोपर्यंत शहरांची त्रासापासून पूर्ण मुक्तता होणार नाही.’ म्हणून तत्त्ववेत्त्यांना सामावून घेणाऱ्या सभागृहांचे पावित्र्य जपले जाणे आवश्यक आहे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

आपल्या लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक कुठे मिळेल? – डाॅ. अमोल अन्नदाते

दैनिक दिव्य मराठी रसिक पुरवणी

आपल्या लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक कुठे मिळेल?

डाॅ. अमोल अन्नदाते

     विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास काही दिवस उरले असताना राज्यभरातील लोक आपली कामे मार्गी लागण्यासाठी मंत्रालयात आणि विविध शासकीय कार्यालयांमध्ये हजारोंच्या संख्येने गर्दी करत आहेत. ऑक्टोबर हिटमुळे घामाच्या धारा वाहत असतानाही मंत्रालयाच्या दारावर लागणाऱ्या रांगेने उच्चांक केला आहे. सत्ताधारी असो की विरोधक; सर्वसामान्यांना कुणीही उत्तरदायी राहिले नसल्याची भावना या रांगेतील काही जणांकडून व्यक्त होते. अशा स्थितीमुळे लोकप्रतिनिधींना मतदारांप्रति उत्तरदायी कसे बनवायचे, हा एक जटिल आणि संशोधनाचा विषय बनला आहे.

या मागील सर्वात मोठे कारण म्हणजे, जी जनता लोकप्रतिनिधींना निवडून देते, तिला त्यांचे उत्तरदायित्व कसे जोखायचे, हेच माहीत नसते. हॉटेल, रुग्णालय असो वा सनदी लेखापाल, वकिलांसारख्या सेवा; जिथे विशिष्ट शुल्क आकारले जाते, तिथे ती सेवा समाधानकारक, उपयुक्त होती की नाही, हे ठरवण्याची काही मापके तरी असतात. पण, लोकप्रतिनिधीचे काम वा त्याने केलेल्या सेवेचे मूल्यांकन करण्याची बहुतांश मापके भावनिक असतात. मात्र, ती बाजूला सारून आपल्या लोकप्रतिनिधीच्या कामांचे वर्षातून एकदा आणि पाच वर्षानंतर त्याचा कार्यकाळ संपताना वस्तुनिष्ठ मूल्यांकन केले पाहिजे. प्रत्येक तालुक्याने गावात अशी एक अराजकीय समिती बनवायला हवी, जी कोणाचीही बाजू न घेता लोकप्रतिनिधींचे प्रगतीपुस्तक गावाला सादर करेल.

ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत कुठल्या कक्षेत निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची नेमकी जबाबदारी काय आहे, हे आधी त्या लोकप्रतिनिधींना आणि मग मतदारांनाही समजावून सांगितले गेले पाहिजे.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद या मुख्य चार सभागृहांचे कामकाज व त्यात आपल्या लोकप्रतिनिधींचा असलेला सहभाग, तो कुठले प्रश्न मांडतो आहे, कुठले नाही, हे एक महत्त्वाचे मापक आहे. अमुक एक प्रश्न सभागृहात मांडला गेला पाहिजे, असा आग्रह आपण आपल्या आमदार, खासदार किंवा विरोधी पक्ष नेत्यांकडे कधी धरतो का? सभागृहांचे कामकाज या विषयावर ‘संपर्क’ या संस्थेने अभ्यास करून सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे. विधानसभेच्या पाच वर्षांत एकूण १२ अधिवेशने झाली. कोरोना काळामुळे तीन अधिवेशने होऊ शकली नाहीत. विधानसभेत या पाच वर्षांत केवळ १३१ दिवसांचे कामकाज झाले. साधारण असे संकेत आहेत की, एका वर्षात किमान १०० दिवस तरी सभागृहाचे कामकाज चालले पाहिजे. म्हणजे एका वर्षात जेवढे कामकाज व्हायला पाहिजे तेवढे आपल्याकडे पाच वर्षांत झाले आहे. दुसरीकडे, विधिमंडळ समित्यांचे कामच या पाच वर्षात झाले नाही, हेही चिंताजनक आहे. या समित्यांच्या बैठका म्हणजे वर्षभर चालणाऱ्या सर्वपक्षीय आमदारांचे गट असतात, जे एकत्रित अभ्यास करून सरकारला राज्याचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी सल्ला देतात. पण, इतक्या महत्त्वाच्या कामाचे उत्तरदायित्व स्वीकारायला कुणी तयार नाही.
सभागृहात विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप बघितले, तर बालके, आरोग्य अशा कळीच्या मुद्द्यांवर विचारलेल्या प्रश्नांचे प्रमाण ५ ते ७ टक्के एवढे कमी आहे. बऱ्याच प्रश्नांची भाषा बघितली की, लक्षात येते ते विशिष्ट हेतू ठेवून, काही मिटवण्यासाठी विचारले गेले आहेत. विधिमंडळात विचारले जाणारे प्रश्न आणि त्यातील छुपे हितसंबंध हा तर आणखी वेगळा विषय आहे. सामान्यपणे विरोधी पक्षांकडून जास्त प्रश्न विचारले जाणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून तुलनेने कमी प्रश्न उपस्थित केले गेल्याचे दिसते आणि ही अधिक गंभीर बाब आहे. समाज मंदिरे उभारणे, विजेच्या दिव्यांचे खांब उभारणे आणि गावात पेव्हर ब्लॉक बसवणे एवढेच आमदारांचे काम नाही, हेच मतदार म्हणून आपल्याला माहीत नाही. म्हणून राज्यातील २८८ मतदारसंघांशी संबंधित प्रश्नांसाठी पाच वर्षांत विधिमंडळाचे केवळ १३१ दिवस दिले जातात आणि त्यातूनही असंख्य प्रश्न निकाली निघत नाहीत. या स्थितीची आपल्याला मतदार आणि सामान्य नागरिक म्हणून चिंता वाटायला हवी.

आमदार आणि खासदारांना दर वर्षी मतदारसंघाच्या विकासासाठी काही कोटींचा निधी दिला जातो. पण, हा निधी विकासकामांपेक्षा आपल्या कार्यकर्त्यांचे आर्थिक पुनवर्सन करण्यासाठीच वापरला जातो, हे ‘ओपन सिक्रेट’ आहे. कित्येक राज्यसभा खासदारांचा निधी तर वापरलाही जात नाही. लोकशाहीचे बलस्थान म्हणून एकीकडे आपण माहिती अधिकाराच्या गप्पा आपण मारत असतो, पण आमदार-खासदारांचा निधी कसा खर्च झाला? कोणामार्फत खर्च झाला? खर्च झाला नसेल, तर का नाही झाला? याची कुठलीही माहिती उपलब्ध नसते. हजारो कोटींचा निधी दिल्याच्या जाहिराती होतात, होर्डिंग लावले जातात, पण प्रत्यक्षात काम काहीच दिसत नाही आणि आपल्या करामधून गोळा झालेला हा निधी गेला कुठे, हे मतदारांनाही कळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींविषयी अतिलोभ वा अतिद्वेष या दोन्ही प्रकारच्या भावना दूर ठेऊन, ते जनतेप्रति किती उत्तरदायी राहिले? त्यांच्या कामांमुळे आपला तालुका, जिल्हा आणि राज्याने किती विकास केला? या गोष्टींचे मूल्यमापन त्यांचे प्रगतिपुस्तक पाहून नागरिकांनी केले पाहिजे.
……………………………………………………………………………………….
https://www.facebook.com/DrAmolAnand
https://www.instagram.com/dramolanand
https://x.com/DrAmolAnand
www.amolannadate.com

9421516551

MBBS जागा वाढल्या; पण शिक्षणाच्या गुणवत्तेचे काय? – डाॅ. अमोल अन्नदाते

दैनिक लोकमत

MBBS जागा वाढल्या; पण शिक्षणाच्या गुणवत्तेचे काय?

डाॅ. अमोल अन्नदाते

देशात डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या जागा वाढल्या पाहिजेत हे निर्विवाद! पण सुयोग्य नियोजन नसेल, तर आजारापेक्षा उपाय भयानक ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील नव्याने परवानगी मिळालेल्या मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा आणि हिंगोली अशा दहा नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बुधवारी ऑनलाइन उद्घाटन केले. यामुळे राज्यात एमबीबीएसच्या ९०० नव्या जागांची वाढ झाली आहे. पण यामागच्या प्रशासकीय बाबी तपासल्या तर जागा वाढल्याच्या आनंदापेक्षा या महाविद्यालयातील डॉक्टर कुठल्या गुणवत्तेचे असतील याची काळजीच वाटते. 

किमान पात्रता निकष पूर्ण झालेले नाहीत म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने या सर्व महाविद्यालयांना परवानगी नाकारली होती. तरीही किमान पायाभूत सुविधा व शिकवण्यासाठी अध्यापकांचा अभाव असताना ‘हे निकष आम्ही पूर्ण करू’ अशा प्रतिज्ञापत्रावर या महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. यातून रुग्ण व अध्यापकांशिवाय वैद्यकीय शिक्षण, असा वैद्यकीय शिक्षणाचा अजब व घातक ‘महाराष्ट्र पॅटर्न’ जन्माला येतो आहे.

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रशासकीय कामकाजाची सूत्रे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे आहेत. संचालक हंगामी पदावर, तर पूर्ण वेळ संचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक, विभागीय उपसंचालक अशी सर्व पदे रिक्त आहेत; ही या संचालनालयाची सध्याची अवस्था. वाढत्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या लक्षात घेऊन त्यासाठी पुरेशा प्रशासकीय यंत्रणेची व्यवस्था नाही. जुलै महिन्यात उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे आधी अस्तित्वात असलेल्या २५ पैकी १४ वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण वेळ अधिष्ठाता नव्हते. नंतर काही नियुक्त्या झाल्या असल्या तरी बऱ्याच अधिष्ठात्यांकडे दोन महाविद्यालयांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

केईम, जेजे, सायन, नायर, नागपूर या वैद्यकीय महाविद्यालयांची जागतिक कीर्ती ही तिथल्या डॉक्टर शिक्षकांमुळे आहे. आज दहा नवी वैद्यकीय महाविद्यालये सुरू होत असताना सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापकांची एकूण मंजूर पदे ३,९२७ एवढी असून यातील १,५८० पदे (तब्बल ४५ टक्के) रिक्त आहेत. याशिवाय परिचारिका व तंत्रज्ञांची ९,५५३ पदांपैकी ३,९७४ पदे रिक्त आहेत. पुरेशा मनुष्यबळाशिवाय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याचा दुष्परिणाम केवळ वैद्यकीय शिक्षणच नव्हे तर या महाविद्यालयांना संलग्न रुग्णालयातील रुग्ण सेवेवरही होतो. कारण शिकवण्यासाठी व उपचारासाठी असलेले डॉक्टर एकच असतात. त्यातच जुन्या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी आलेले निवासी डॉक्टर तरी रुग्णसेवेची धुरा सांभाळतात. पण नव्याने सुरू होणाऱ्या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणच सुरू झालेले नाही, म्हणून एवढ्या रिक्त जागा असताना इथे रुग्णांवर उपचार करणार कोण?

२ ऑक्टोबर २०२३ रोजी नांदेड येथील शासकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू, तर ठाणे येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका रात्रीत १८ मृत्यू झाल्याची घटना देशभर गाजली. एक वर्षापूर्वी घडलेल्या घटनेनंतरही नव्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या नियोजनात मनुष्यबळ व्यवस्थापनाचा विचार दिसत नाही. वैद्यकीय महाविद्यालये सुरू करताना बरीच जिल्हा रुग्णालये त्यांना संलग्न करण्यात आली आहेत. १९९९ साली आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभाग वेगळा केला तेव्हा रुग्णसेवेची पर्यायी फळी राज्यात निर्माण व्हावी, हा एक हेतू होता. पण आरोग्य विभागाची आधीच गोंधळात असलेली रुग्णालये वैद्यकीय महाविद्यालये वापरणार असतील तर वैद्यकीय शिक्षण विभागाची नवी रुग्णालये उभी राहणार कशी?

एका महाविद्यालयासाठी ४०३ कोटी रुपये देण्यात येतील, असे सांगण्यात येते आहे. प्रत्यक्षात शिक्षकांचे पगार व इतर सर्व बाबींची पूर्तता एवढ्या कमी निधीत होणे शक्य नाही. तसेच महाविद्यालय चालवण्यासाठी येणाऱ्या वार्षिक १५० कोटी खर्चाची तरतूद नाही. वैद्यकीय शिक्षणाला गेल्या ५ वर्षात मिळालेला निधी पाहिल्यास एवढ्या खर्चाची तरतूद येणार कुठून, असा प्रश्न पडतो. एमबीबीएसच्या जागा वाढल्या पाहिजेत, हे निर्विवाद! पण हे करताना सुयोग्य नियोजन नसेल, तर आजारापेक्षा उपाय भयानक अशी अवस्था होईल.
……………………………………………………………………………………………………..
https://www.facebook.com/DrAmolAnand
https://www.instagram.com/dramolanand
https://x.com/DrAmolAnand
www.amolannadate.com

9421516551

‘एक देश – एक निवडणूक’ किती साधक, किती बाधक – डाॅ. अमोल अन्नदाते

amol annadate

‘एक देश – एक निवडणूक’ किती साधक, किती बाधक
(आजच्या दै. दिव्य मराठी रसिक पुरवणीतील माझा लेख)

लोकशाही देशात सतत नवीन कायदे, नियम, विधेयके बहुमताने संमत होत असतात. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर परिणाम करीत असतात. जीएसटी विधेयक मंजूर झाले तेव्हा आपण त्या विषयीचे आपले मत राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, लोकप्रतिनिधी यांना कळवले होते का? आपले मत कळवून काय होणार आहे? आपले मत त्यांनी विचारात घेण्यासाठी आपण तज्ज्ञ आहोत का? असा तुमचा समज असू शकतो. पण, देशाचे नागरिक म्हणून तुम्हाला संसदेत मांडल्या जाणाऱ्या प्रत्येक विधेयकावर मत असायाला हवे. ते आपल्या लोकप्रतिनिधींना भेटून किंवा देशाच्या सरकारमधील शीर्षस्थ नेतृत्वाला पत्र, इ मेल वा समाजमाध्यमाद्वारे कळवायला हवे.

आता ‘एक देश – एक निवडणूक’ हे असेच एक नवे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. देशातील लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अशा सर्व निवडणुका एकाच वेळी घेणे, ही या मागील संकल्पना आहे. ती का गरजेची आहे, या विषयीचा अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकताच सरकारला सादर केला आहे. सध्या देशात वेळोवेळी विविध निवडणुका या त्या सरकारचा वा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपल्यावर घेण्यात येतात. एकाच वेळी निवडणुका घेण्याने त्यावर होणारा यंत्रणेचा खर्च, राजकीय पक्षांचा होणारा खर्च वाचेल, अशी भूमिका मांडली जात आहे. तसेच देशाच्या विविध भागांमध्ये कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या निमित्ताने सतत आचारसंहिता सुरू राहिल्याने विकासाच्या कामांमध्ये खीळ बसते, असाही युक्तिवाद एक देश – एक निवडणुकीच्या संदर्भात केला जातो.

‘एक देश – एक निवडणुकी’विषयी प्रत्येकाने आपण कुठल्या पक्षाचे समर्थक आहोत, हे बाजूला ठेवून देशासाठी हिताचे काय आहे, या विषयी मत बनवायला हवे. त्यासाठी वर्तमानपत्रातील या विषयीचे लेख वाचणे, वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ऐकणे, त्यावर तज्ज्ञांशी बोलणे या गोष्टी करतानाच, एकूणच या संकल्पनेचा आपल्या लोकशाहीवर, देशावर काय परिणाम होणार आहे, हे जाणून घ्यायला हवे. संसदेत वा राज्याच्या विधानसभेत येणाऱ्या प्रत्येक विधेयकाविषयी आपण या प्रकारे आपले मत बनवले पाहिजे. ते बाजूने किंवा विरोधात असू शकते, पण ते असणे महत्त्वाचे आहे.

या संकल्पनेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, हे विधेयक लागू झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा एकाच वेळी सर्व निवडणुका होतील, त्यावेळेपर्यंत ज्या राज्य सरकारांचा पाच वर्षांचा कार्यकाळ आधीच संपला आहे, त्यांना वाट पाहावी लागेल. तर, ज्यांचे कार्यकाळ संपणे बाकी आहे, त्यांच्या विधानसभा विसर्जित करुन पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल. परिणामी प्रशासनाची गती कमी होईल. विकासकामांवर त्याचा परिणाम होईल. या संकल्पनेप्रमाणे निवडणुका झाल्यावर काही दिवसांतच एखाद्या राज्याचे सरकार कोसळले, तर पुन्हा पाच वर्षे निवडणुकीसाठी थांबावे लागेल का आणि त्या स्थितीत तिथे राष्ट्रपती राजवट लागू होऊन कारभार प्रशासनाकडे जाईल का, ही प्रश्नही महत्त्वाचा आहे.

निवडणूक खर्चाचा मुद्दा विचारात घेतल्यास, २०२२ – २३ मध्ये निवडणूक आयोगाला ३२० कोटी रुपये, तर २०२३- २४ मध्ये ४६६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. निवडणूक खर्चात राज्य सरकारेही वाटा उचलतात. देशातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत किमान एवढा खर्च निवडणुकांवर करावाच लागणार. कारण या निवडणुकांवरच लोकशाहीचे अस्तित्व टिकून आहे. राजकीय पक्षांच्या खर्चाबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी निवडणुकीतील अवास्तव खर्च स्वतःवर लादून घेतला आहे. समाजमाध्यमांच्या युगात अवाढव्य खर्च करून, लाखांच्या सभा घेऊन तासन् तास भाषण करण्याचे दिवस आता गेले आहेत, हे वास्तव कुठलाही राजकीय पक्ष स्वीकारायला तयार नाही. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यावर राजकीय पक्ष त्यांना मिळणारा हजारो कोटींचा निधी रस्ते, पूल, शिक्षण, आरोग्य यासाठी देणार आहेत का, हाही कळीचा प्रश्न आहे.

लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवण्यात आधीच कमकुवत असलेल्या देशात किमान वेळोवेळी होणाऱ्या निवडणुकीत लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळते. मतदार बऱ्याचदा केंद्र सरकारच्या धोरणांविषयी राज्याच्या निवडणुकीत व्यक्त होतात. त्यामुळे वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या निवडणुका दोन्हीकडील सत्तांवर अंकुश ठेवण्यास पोषक ठरतात. निवडणूक आयोगाला सहा महिन्यांच्या कालावधीत येणाऱ्या निवडणुका एकत्रित घेण्याचे अधिकार आहेत. हा काळ सहा महिन्यांवरून फार तर एक वर्ष करण्यात येऊ शकतो. शिवाय, एक किंवा दोन महिने चालणाऱ्या निवडणुका १५ दिवसांत एकाच टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात.

‘एक देश – एक निवडणूक’ संकल्पनेत एक धोका आहे तो म्हणजे, राष्ट्रीय पक्षांना याचा काही प्रमाणात लाभ होऊ शकतो. पण, स्थानिक, प्रादेशिक पक्षांचेही लोकशाहीत वेगळे महत्त्व आहे. ते टिकवून ठेवणे हाही लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. एकत्र निवडणूक घेतल्याने सततच्या आचारसंहितेमुळे विकास प्रक्रियेला येणारा अडथळा टळू शकतो, हा मुद्दा मात्र जनतेच्या फायद्याचा आहे. या आणि अशा सर्व साधक-बाधक गोष्टी समोर ठेवून ‘एक देश – एक निवडणूक’ ही संकल्पना आपल्या लोकशाहीला नेमक्या कुठल्या दिशेने घेऊन जाईल, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कारण हा प्रश्न आपल्या मताचा म्हणजे लोकशाहीतील सर्वांत महत्त्वाच्या आयुधाचा आहे.

(या विषयावरील आणि लेखातील माझ्या मतांबाबत तुमची मते कमेंटमध्ये जाणून घ्यायला आवडतील.)

लोकशाहीचा तिसरा स्तंभ किती मजबूत? – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

लोकशाहीचा तिसरा स्तंभ किती मजबूत?

डॉ. अमोल अन्नदाते

कुठल्याही देशातील लोकशाहीच्या सक्षमतेचे सर्वांत महत्त्वाचे मापक ही त्या देशाची न्यायव्यवस्था असते. आपली लोकशाही सक्षम असल्याच्या आपण कितीही गप्पा मारल्या, तरी न्यायव्यवस्थेत निश्चितपणे न्याय मिळतो किंवा मिळाला तर तो वेळेत मिळतो, याच्याशी सगळेच सहमत असू शकत नाहीत. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, स्वातंत्र्याच्या वेळी जी सुधारित न्यायव्यवस्था अमलात आली, ती आज वाढलेली लोकसंख्या आणि गुन्हेगारीच्या तुलनेत अपुरी आहे व ती पुरेशी प्रगतही नाही. आपल्याला निश्चितपणे न्याय मिळू शकतो, ही भावना आणि आत्मविश्वास देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजत नाही, तोपर्यंत भारतीय लोकशाही अपूर्ण आहे, असे म्हणावे लागेल.

न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना गुन्हेगारांवर हल्ले होणे, त्यांची हत्या होणे अशा गोष्टी गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. अलीकडे तर सर्वसामान्य जनता आणि नेतेही, ‘गुन्हेगाराला आमच्या ताब्यात द्या, आम्हीच शिक्षा देतो,’ असे म्हणू लागले आहेत. अशा मागण्या आणि कृत्ये लोकशाहीतील अस्वस्थता दर्शवतात आणि त्या भविष्यातील अराजकाच्या हाका असतात. पण, त्यामागील कारणही तसेच आहे. गेल्या वर्षी प्रयागराज येथे माजी खासदार असलेला कुख्यात गुंड अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांची पोलिस कोठडीत वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना हत्या झाली. त्या अगोदर त्यांची केस वेगवेगळ्या न्यायाधीशांनी ३८ वेळा ‘नॉट बिफोर मी’ म्हणत दुसऱ्या न्यायाधीशांकडे दिली होती. कायदा हातात घेण्याची प्रक्रिया ही अशी न्यायदानाच्या विलंबातून निर्माण होते.

जगभरातील न्यायदानाच्या स्थितीचा अभ्यास केल्यास, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणांची संख्या भारतात असल्याचे लक्षात येते. आज भारतात ३० दशलक्ष प्रकरणे न्यायदानाच्या प्रक्रियेत आहेत. त्यातील ४ दशलक्ष खालच्या कोर्टात, तर ६५ हजार प्रकरणे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. न्यायदानाच्या या संथ प्रक्रियेमुळे गुन्हे दाखल असणाऱ्यांच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या आहेत. सध्या कारागृहांमधील सर्वाधिक कैदी ‘अंडर ट्रायल’ म्हणजे गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा होण्याच्या किंवा सुटकेच्या म्हणजेच न्यायदानाच्या प्रतिक्षेत असलेले आहेत. ही संख्या इतकी जास्त आहे की कैदी ठेवण्यासाठी आज कारागृहेच उपलब्ध नाहीत. स्वातंत्र्यानंतर देशात मोठ्या कारागृहांची निर्मिती झालेली नाही.

दुसरीकडे, न्यायदान उशिरा होत असल्याने गुन्हा सिद्ध होऊ न शकलेले आणि जामिनावर सुटलेले गुन्हेगार पुन्हा तेच ते गुन्हे करत असल्याचे दिसते. अनेक श्रीमंत गुन्हेगार नामवंत वकिलांच्या मदतीने मोठ्या गुन्ह्यातूनही सहज सुटत असल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पण, वकिलांचा आणि एकूणच न्याय मिळवण्यासाठीचा खर्च न परवडणारे अनेक निर्दोष कारागृहात अनेक वर्षे खितपत पडतात. त्यामुळे ‘न्याय’ ही अधिकार म्हणून लोकशाहीत मिळणारी नैसर्गिक गोष्ट नव्हे, तर श्रीमंतांना सहज विकत मिळणारी गोष्ट असल्याची धारणा जनतेमध्ये दृढ होत आहे. त्याचवेळी न्यायाधीशांच्या नेमणुका आणि कामातील पारदर्शकता यावरही वेळोवेळी शंका उपस्थित केल्या जात आहेत. सत्तेतील व्यक्तींनी न्यायव्यवस्थेला प्रभावित करु नये म्हणून लोकशाहीत न्यायालयांची स्वायत्तता टिकवून ठेवण्याची तरतूद करून ठेवली आहे. पण, बऱ्याच प्रकरणांमध्ये सत्तास्थानांकडून झालेल्या चुकांवर अंकुश ठेवण्यास न्यायालये कमी पडत असल्याचे चित्र दिसते.

स्वातंत्र्याच्या आधी या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी सहज वाकवता येईल आणि सर्वसामान्य माणसावर सत्तेचा ताबा राहील, अशा न्यायव्यवस्थेची रचना केली होती. त्यामुळे न्यायाधीशांना समाजामध्ये मिसळण्याची संधी नव्हती. बऱ्याच देशांतील न्यायप्रक्रियेत समाजातील लोकांचाच समावेश आहे. ब्रिटिशकाळापासून सुरू असलेल्या भारतीय न्यायव्यवस्थेत मात्र अशा गोष्टींना स्थान नाही. आज तंत्रज्ञानाच्या नवनवीन साधनांमुळे जग जवळ आले आहे. इंटरनेटवर चालणाऱ्या साधनांमुळे काम साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष भेटींची गरज जवळपास संपली आहे. न्यायदान मात्र या सर्व साधनांच्या मागे आहे. ‘फास्ट ट्रॅक’ हा शब्द गंभीर गुन्ह्यात वापरला जातो, पण सर्वच प्रकरणासाठी न्यायालये ३६५ दिवस चालतील, या दिशेने आजवर कुठलेही पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत नाही.

गेल्या दोन दशकात पुढे आलेल्या सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीच्या प्रकरणांत न्यायदान करताना न्यायव्यवस्था तोकडी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांना कायद्याविषयी भीतीच राहिलेली नाही. कुठलाही देश राहण्यायोग्य आहे की नाही हे ठरवणाऱ्या अनेक घटकांपैकी महत्त्वाचा घटक म्हणजे तिथले न्यायदान होय. आज सिंगापूरसारख्या छोट्या देशांनीही पारदर्शक, जलद न्यायप्रक्रिया राबवून चांगले उदाहरण घालून दिले आहे. पण, भारतासारख्या मोठ्या लोकशाहीतील ‘न्यायपालिका’ हा तिचा तिसरा स्तंभ मजबूत नसणे लोकशाहीच्या इमारतीसाठी धोकादायक आहे.

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

स्त्रियांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांचे राजकारण – डॉ. अमोल अन्नदाते

दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी

स्त्रियांवरील अत्याचार आणि गुन्ह्यांचे राजकारण

डॉ. अमोल अन्नदाते



                    कोलकाता येथील महिला निवासी डॉक्टरची अमानुष अत्याचारानंतर झालेली हत्या आणि बदलापूरमध्ये अवघ्या ४ वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार या दोन घटनांनी सध्या समाजमन ढवळून निघाले आहे. कुठल्याही देशात लहान मुले आणि स्त्रिया हिंसेच्या सर्वाधिक बळी ठरतात. विशेषत: लैंगिक शोषणाचे सगळ्यात जास्त गुन्हे स्त्रिया आणि लहान मुलांच्या बाबतीत घडतात. जे प्रतिकार करू शकत नाहीत, अशांना पहिल्यांदा संरक्षण देणे, हे लोकशाही देशातील राज्यघटनांचे प्राधान्याचे आणि महत्त्वाचे तत्त्व असते. आज आपल्या देशात दरदिवशी बलात्काराच्या सरासरी ८६ घटना घडतात. तसेच ३० टक्के लहान मुलांना कधी ना कधी लैंगिक शोषण आणि या स्वरुपाच्या गुन्ह्यांचा अनुभव येतो.

देशात एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलांच्या विरोधात गुन्हे घडत असतील, त्यांच्या हक्कांचे तत्त्व पायदळी तुडवले जात असेल, तर ही गोष्ट लोकशाहीला निश्चितच शोभणारी नाही. अत्याचाराच्या अशा घटनांनंतर.. ‘बलात्काऱ्यांना भरचौकात फाशी द्या’, “त्यांना आमच्या ताब्यात द्या’, ‘त्यांचे हात-पाय तोडा,’ या प्रकारची वक्तव्ये केवळ समाजातूनच नव्हे, तर नेत्यांकडूनही केली जातात. समाजात कायद्याची भीती नसणे आणि संथ न्यायदान या गोष्टी अशा प्रतिक्रियांना जबाबदार असतातच; पण त्याशिवाय समाजातील ही भीती कमी होण्याला आणखी काही गोष्टी कारणीभूत असतात.

महिला-मुलींवरील अत्याचाराच्या, हत्येच्या प्रत्येक घटनेनंतर.. ‘या घटनेचे राजकारण होते आहे,’ हे असे एक वक्तव्य केले जाते. अशी घटना घडली की, या घटनेचे राजकारण होऊन आपली खुर्ची डळमळीत होईल याचीच सत्तेत असणाऱ्यांना जास्त काळजी असते. त्यातही एखादी घटना अत्यंत क्रूर, अत्याचाराचा कळस गाठणारी असेल, त्या घटनेबद्दल समाजात असंतोषाचा उद्रेक होताच सत्ताधारी आणि विरोधक तिची दखल घेण्यास सरसावतात. म्हणजे एकीकडे अनेक अत्याचार घडत असताना तिकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी यंत्रणा एखाद्या घटनेतील गुन्ह्याच्या तीव्र स्वरूपामुळे हलतात, पण त्या पीडितेची, त्यांच्या कुटुंबाची नव्हे, तर स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी. एका अर्थाने, रोज अन्य लहान-मोठे गुन्हे घडत राहणे आणि त्यावर काही कारवाई न होणे ही गोष्ट जणू सर्वांनी गृहीतच धरली आहे. खरे तर ही भारतीय लोकशाहीची सर्वात जुनी जखम आहे आणि त्यावर तातडीने इलाज करण्याची गरज आहे.

रोज घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांविषयी कायद्याच्या पलीकडे तिथले नागरिक आणि राज्यकर्ते कसा प्रतिसाद देतात, यावरून लोकशाही देशात एक समाजमन आकाराला येत असते. गेल्या काही वर्षांत आपण गुन्ह्यांची आणि त्यातही बलात्कारासारख्या घटनांची जातीवरून, पक्षावरून, सत्तेत कोण आहे, कोण नाही यावरून विभागणी केली आहे. लोकशाही देशात अतिराजकारण होणे किंवा गरज नसलेल्या मुद्द्यांचे अति राजकीयीकरण होणे घातक असते. अशावेळी बलात्कारासारखे गुन्हे त्यापासून दूर ठेवून हे प्रश्न सोडवले पाहिजेत, याचा विसर आपल्याला पडला आहे.

कथुआपासून कोलकात्यापर्यंत आणि हाथरसपासून बदलापूरपर्यंत अशा अनेक घटना सांगता येतील, ज्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन त्या मुळापासून सोडवण्याऐवजी राजकरण करण्यातच धन्यता मानली आहे. महिला-मुली किंवा लहान मुलांवर अत्याचार झाले, त्यांचे लैंगिक शोषण झाले तर त्यावेळी काय भूमिका घ्यायची, ते आपण राजकारणात कुठल्या बाजूचे आहोत? सत्तापक्षाचे समर्थक आहोत की विरोधकांचे पाठीराखे आहोत? अत्याचार पीडित कोण आहेत? ते कुठल्या जाती-धर्माचे आहेत? या गोष्टी बघूनच ठरवले जाते. आणि दुर्दैवाने तशाच प्रकारचा संदेश समाजात सातत्याने जातो आहे.

कोलकाता प्रकरणात सुप्रीम कोर्टाला स्वत:हून दखल घेऊन हस्तक्षेप करावा लागला, ही राज्यघटना मानणाऱ्या लोकशाही देशातील यंत्रणांना मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. आज भारत हा जगाच्या दृष्टीने महिला-मुलींवरील अत्याचाराची, बालकांच्या लैंगिक शोषणाची आणि त्यापुढे जाऊन त्यांच्या अमानुष हत्यांची भूमी ठरतो आहे, ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी जितकी क्लेशदायक तितकीच लांच्छनास्पदही आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपल्या लोकशाहीच्या कायदेमंडळे, न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे या चारही स्तंभांनी आणि त्यांच्या छताखालील भारतीय समाजाने अंतर्मुख होऊन आपल्यात तातडीने सुधारणा केली पाहिजे.

डाॅ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551

डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
9421516551

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते ? – डॉ. अमोल अन्नदाते

Dr amol annadate artical

दैनिक लोकमत

सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते ?

डॉ. अमोल अन्नदाते

         गेल्या अनेक वर्षांपासून स्वाईन फ्लू पासून कोरोना पर्यंत व आता आताच्या झिका , चंदीपुरा अशा अनेक विषाणूंच्या साथी सुरूच आहेत. अनेक संसर्गजन्य आजार हे अधून मधून थोड्या फार फारकत प्रत्येकाला होत असतात. पण साथ पसरते तेव्हा तसे नसते. मानव जातीने आजवर प्लेग, फ्लू , कोलेरा , कोरोना अशा जगातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम केलेल्या महा साथी अनुभवल्या. मानवी जिवाला असलेला धोका लक्षात घेता या साथींची तुलना महायुद्धशीच होऊ शकते. पण हे युद्ध फक्त रुग्णालयातच लढले जात असल्याने त्याची तीव्रता कोणच्याही लक्षात येत नाही. युद्धात जसा देश बेचीरख होऊ शकतो तसा साथीत ही होऊ शकतो. आज ही कोरोनाच्या दुसर्या लाटेची आठवण निघाली तर अंगावर काटा येतो. कोरोना साथीत प्रत्येक व्यक्तीची जवळची तीन तरी व्यक्ती दगावल्याचे एका क्षणात सहज आठवेल. पण तरीही कोरोनाच्या साथीत आपण जे शिकलो ते सगळे स्मशान वैराग्यच ठरले. वेगाने मानवतेवर आदळणार्या साथी पाहता साथींचे शास्त्र हे फक्त डॉक्टरच नव्हे तर सर्व सामन्य लोक व धोरण आखणाऱ्या , राबवणाऱ्या प्रत्येकानेच समजून घेणे आवश्यक आहे. 

                         साथ कुठलीही असो त्याची काही वैशिष्ट्ये असतात. साथ ही न सांगता कधी येत नाही. ती धोक्याची घंटा आधी वाजवते. भारतात कोरोना येण्याच्या सहा महिने आधीच चीन व इतर अनेक देशात ती हाहाकार माजवत असल्याचे अक्खे विश्व पहात होते. साथीत सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट असते कमी वेळेत खूप मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होऊन अपुर्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण येणे. भारतात साथीं मध्ये आधीच मोडकळीला आलेल्या सार्वजनिक व्यवस्थे अजून अधिक ताणली जाणे ही  सर्वात मोठी समस्या असते. साथी टाळण्याचे उपाय हे अत्यंत साधे व आरोग्याच्या साध्या नियमांशी निगडीत असतात. साथी कमी होतात , पण पूर्णतः कधीही संपत नाहीत.  पण गरज सरो वैद्य मरो या वृत्ती प्रमाणे साथीची दाहकता कमी झाली कि सर्व यंत्रणा परत उपाय योजनांच्या बाबतीत सुस्त होते. १९६८ साली साधा सर्दी खोकला म्हणजे फ्लू ची साथ येऊन प्रत्येकाला तो होऊन गेला . पण आज ही जगभरात 7 लाख लोक साध्या फ्लू मुळे मृत्यू मुखी पडतात व यात भारतात ही ५ वर्षां खाली व ६५ वर्षां पुढे अनेक जणांचा फ्लू मुळे मृत्यू होतो. फ्लू टाळणारी उतम लस उपलब्ध असून ही कोणी पैसे खर्च करून ही लस घेत नाही व सार्वजनिक आरोग्य सेवेत ही लस मोफत मिळणे दिवा स्वप्नच आहे.कोरनाची साथ वेगळी होती कारण विषाणू बद्दल व उपाययोजना , उपचारांबद्दल फारशी माहिती नव्हती. पण डेंग्यू , चिकनगुनिया , झिका, फ्लू, न्युमोनिया अशा अनेक साथी आहेत ज्यांच्या उपाययोजना वर्षनुवर्षे माहित आहेत व सिध्द झाल्या आहेत.

               साथींचे प्रमाण वाढते आहे व अनेक नवे विषाणू किंवा आधी फारशे घातक नसलेले विषाणू हे डोके वर काढत आहेत . विषाणू हा सतत स्वतः मध्ये बदल घडवत असतो. ‘सर्वायवल ऑफ द फिटेस्ट’ हा डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत जसा मानवाला लागू आहे तसाच साथ पसरवणाऱ्या विषाणू , जीवाणूंना ही लागू आहे. म्हणून संक्रमित होऊन मानवावर मात करण्यासाठी विषाणू , जीवाणू ही झटत असतात.हवामानात होणारे टोकाचे बदल हे विषाणूंच्या संक्रमणासाठी एक महत्वाचे कारण आहे. २०२४ मधील उन्हाळा हा गेल्या कित्येक वर्षातील तापमानाचा उच्चांक गाठणारा ठरला. पावसाळा आधी सारखा राहिलेला नसून कमी वेळेत ढगफुटी सदृश पाउस पडतो. त्यामुळे साचलेल्या पाण्याचे प्रमाण वाढते. हवामानातील हे सगळे बदल विषाणूंना त्यांच्यात संक्रमण घडवून नव्या साथीच्या रुपात येण्यास पोषक आहेत.  
                   जीवनशैलीतील बदल, कमी झालेली प्रतिकारशक्ती व आहारातील बदल हे साथी आल्यावर जीवितहानी वाढवतात. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच भारता विषयी एक निरीक्षण नोंदवले कि भारतातील ५० % लोक दिवसाच्या किमान हालचालींची गरज पूर्ण करत नाहीत. व्यायाम , हालचालींचा अभाव तुमची प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत असतात  व त्यातून साथीं मधले सोपे सावज निर्माण होतात  . भारतीय आहारत कर्बोदकांचे प्रमाण जास्त व प्रथिनांचे प्रमाण कमी आहे. तसेच भाज्या , फळे यांचा दर्जा घसरल्याने मायक्रोन्युट्रीयंटचे प्रमाण कमी असते.  अधिक साखर व मीठ असलेल्या साठवलेल्या आहाराचे ( अल्ट्रा प्रोसेस्ड फूड ) प्रमाण हे वाढत चालले आहे. प्रत्येक चौकात असलेली परदेशी फास्ट फूड आउटलेट्स हे लठ्ठपणा , मधुमेह , उच्च रक्तदाबाची ब्रंड अॅम्बॅसीडर आहेत. हे सगळे आजार प्रतिकारशक्तीचा बळी घेणारे आहेत. वाघ जेव्हा हरणाच्या कळपाची शिकार करतो तेव्हा त्यातील कमकुवत मागे राहून शिकार होतात. साथी मध्ये शिकार होणारे असे कमकुवत प्रतिकारशक्ती व सह आजार असलेले असतात. नियमित येणाऱ्या साथी ही मानवाच्या आरोग्याची वार्षिक परीक्षा असते. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आरोग्याची मुलभूत तत्वे हाच मुख्य अभ्यासक्रम आहे. 

डॉ. अमोल अन्नदाते

dramolaannadate@gmail.com

9421516551