कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे

कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे

कुणीही  रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे काही शहरांत व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याआधी रॅपीड अँटीजीन टेस्ट सक्तीची केली आहे. या चुकीचे अनुकरण इतर शहरात आणि रहीवाशांकडून होण्याची शक्यता आहे. खाजगी लॅब मध्ये रॅपीड अँटीजीन टेस्टला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांनी स्वतः ची रॅपीड अँटीजीन टेस्ट करणे चुकीचे आहे. ही चाचणी सध्या लक्षणे आलेल्यांसाठी राखून ठेवायला हवी या टेस्ट बद्दल पुढील गोष्टी समजून घ्याव्या.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

१.         ही टेस्ट पॉझीटीव्ह आली तर रुग्ण कोरोना बाधित असल्याची दाट शक्यता आहे पण निगेटिव्ह आली तर मात्र आरटी पीसीआर करून निगेटिव्ह असल्याची खात्री करावी लागते.
२.         तुम्ही आज रॅपीड अँटीजीन टेस्ट करून निगेटिव्ह आहात म्हणजे उद्या तुम्ही व इतरांनी प्रतिबंधाच्या मुलभूत उपाय न वापरल्यास बाहीत होऊ शकता.
३.         तुम्ही व्यापारी असाल किंवा कुठल्या ही व्यवसायात असाल तर तुम्ही रोज दुकान उघडण्या आधी रॅपीड अँटीजीन टेस्ट करून बाधित नसल्याची खात्री करू शकत नाही.
४.         लक्षणे नसताना टेस्ट करून लक्षणे असलेल्या व टेस्टची गरज असलेल्यांना टेस्ट पासून वंचित ठेवत आहात.

रॅपीड अँटीजीन टेस्ट कोणी करावी –
–         आरटी पीसीआर ने निश्चित निदान झालेल्या रुग्नाच्या कुटुंबातील सर्व सदस्य ज्यांचा रुग्णाशी थेट संबंध आला आहे.
–         कामाच्या ठिकाणी अशा व्यक्ती ज्यांचा ३० मिनिटांपेक्षा जास्त थेट संबंध आला आहे.
–         ५० वर्षा पुढील व्यक्ती , गरोदर स्त्रिया , इतर दीर्घकालीन आजार असलेल्या  (को मॉर्बिड) व्यक्ती ज्यांना ताप , सर्दी , खोकला ही फ्लू सदृश लक्षणे दिसत आहेत.
–         कंटेनमेंट झोन मधील कुठल्या ही वयाच्या कुठल्या ही व्यक्तीला  ताप , सर्दी , खोकलाही फ्लू सदृश लक्षणे आहेत.

दुकानदार, व्यापारी यांची स्क्रीनिंग करायचीच असेल तर कुठली टेस्ट वापरावी –
–     कुणीही रॅपीड अँटीजीन टेस्ट वापरणे चुकीचे स्क्रीनिंग साठी रॅपीड अँटीबॉडी टेस्ट वापरण्यास हरकत नाही, यात जे आय जी एम पॉझीटीव्ह आले आहेत त्यांना नुकताच संसर्ग झाला आहे असे समजून त्यांनी पुढील १४ दिवस घरी व लक्षणे असल्यास रुग्णालयात / स्थानिक महानगरपालिकेच्या नियमा प्रमाणे दाखल व्हावे. आय जी जी असल्यास त्यांनी मास्क व सोशल डीस्टन्सिंग पाळत काम करावे.

 काही लाक्षणविरहीत पॉझीटीव्ह सापडले मग हे यश नाही का ?
औरंगाबाद प्रयोगात या टेस्ट चा वापर करून काही लाक्षणविरहीत पॉझीटीव्ह सापडले हा फायदा असला तरी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून याचे महत्व तेव्हाच असेल जेव्हा व्यापारी या एका गटाचा नव्हे तर एकाच वेळी सर्व शहराचे स्क्रीनिंग होईल. मर्यादित टेस्ट हाती असताना पूर्ण लोकसंख्येसाठी टेस्टचे रेशनिंग करणे आवश्यक असते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका सध्या जनतेकडून दोन मोठ्या चुका होत आहेत ज्या टाळल्या पाहिजे

रिपोर्ट येई पर्यंत बाहेर फिरणे व कामावर जाणे
आर टी पीसीआर चा रिपोर्ट येण्यास दोन व काही ठिकाणी चार दिवस लागत आहेत. काही ठिकाणी रॅपीड अँटीजीन टेस्ट सुरु झाली आहे व ती निगेटिव्ह आली तर आर टी पीसीआर टेस्ट केली जाते व तुम्ही निगेटिव्ह असल्याचे निश्चित होण्यास थोडा अवधी लागतो. बर्याच ठिकाणी रुग्णाची तब्येत चांगली असेल तर रीपोर्ट येई पर्यंत रुग्णाला दाखल केले जात नाहीत. अशा वेळी आपण निगेटिव्ह आहोत असे गृहीत धरून काही जन घरा बाहेर पडणे , आपली कामे करत राहणे असे करत आहेत. पण यामुळे इतरांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच रिपोर्ट येई पर्यंत घराबाहेर न पडता घरीच वेगळ्या खोलीत घरातील सदस्यांपासून लांब राहणे गरजेचे आहे . रिपोर्ट येई पर्यंत आपण पॉजिटीव्ह आहोत असे गृहीत धरावे व पुढील गोष्टी कराव्या –

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

  • संबंधित आरोग्य अधिकार्यांना संपर्क करून आपल्याला दाखल होण्याची गरज आहे का याची चाचपणी करावी.
  • होम आयसोलेशनचा सल्ला दिला असल्यास  रोज दोन वेळा स्वतःचे ऑक्सिजन , श्वासाची गती तपासावी.
  • रोज दोन वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करावी.
  • रिपोर्ट निगेटिव्ह आला पण डॉक्टरांना लक्षणांना वरून तरी ही कोरोनाच वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्या प्रमाणे घरातच थांबावे . आरोग्य अधिकारी व डॉक्टर दुसऱ्या टेस्ट विषयी निर्णय घेतील.

उगीचच बेड आडवून ठेऊ नका –

घरात थांबा, उगीच बेड आडवू नका बरेच रुग्ण तब्येत चांगली असताना व निर्देशा प्रमाणे सुट्टीची तारिक असली तरी रुग्णालयात दाखल राहात आहेत. यात इन्श्युरन्स असलेले व १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस दाखल राहणारे श्रीमंत रुग्ण ही आहेत. पण अनेक गंभीर रुग्णांना बेड मिळत नसताना अशा प्रकारे बेड अडवून गरज नसताना दाखल राहणे योग्य नाही. तसेच तब्येत चांगली असताना उगीचच दाखल राहून रुग्णालयातून इतर संसर्गाचा धोका ही असतोच . म्हणून सुट्टी कधी घ्यायची ही गोष्ट इंश्युरंस आहे का ? नातेवाईक व रुग्णाची काळजी यावर ठरवण्यापेक्षा डॉक्टरांना ठरवू द्या

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी

दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी दमा हा दीर्घकालीन आजार असल्याने त्याचे उपचार सतत सुरू ठेवावे लागतात. आकुंचन पावलेला श्वसनमार्ग पूर्ववत होण्यासाठी, म्हणजे प्रसरण पावण्यासाठी पंपाद्वारे उपचार करण्यात येतात. हे उपचार दोन प्रकारचे असतात –
१) तातडीने श्‍वसन मार्ग प्रसरण पावण्यासाठी 
२) श्‍वसनमार्ग अंकुचित होऊ नये या साठी नियमित घेण्याचा पंप 
पंप घेतल्याने याची सवय लागेल या गैरसमजामुळे अनेक पालक हे टाळतात व त्यामुळे आजार बळावत जातो. मात्र, हे दोन प्रकारचे पंप हाच दम्यासाठी मुख्य उपचार असतो. यात श्वास वाढल्यावर ३ ते ५ दिवस घ्यायचा व नियमित घ्यायचा पंप कुठला, हे डॉक्टरांकडून समजून पंपावर लिहून घ्यावे. कारण बरेच रुग्ण वापरताना नेमके उलटे करतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

याशिवाय दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील काळजी घ्यावी 

  • थंड पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, आइस्क्रीम, चिकट-गोड पदार्थ, क्रीम बिस्कीट या गोष्टी पूर्ण टाळाव्या. 
  • आंबट, शिळे, फार तिखट व दाक्षिणात्य पदार्थ टाळावेत. 
  • दह्यापेक्षा पातळ ताक देण्यास हरकत नाही. 
  • सर्दी/दमा वाढलेला असताना डोक्यावरून अंघोळ टाळावी. खांद्याच्या खाली अंघोळ करावी व डोके ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. 
  • गार हवेत व समुद्रकिनाऱ्यासारखे वारे घोंगावते अशी ठिकाणे टाळावीत. 
  • प्रवासात खिडकी उघडी ठेवून बसू नये, रेल्वेमध्ये पंख्याखाली बसू नये, कारण वाऱ्याच्या झोताने दमा वाढतो. 
  • अशा मुलांचा घरात व बाहेर प्राण्यांशी संपर्क टाळावा. 

घरात घ्यायची काळजी 

  • डास विरोधी अगरबत्ती/इलेक्ट्रिक लिक्विड रेपेलंटऐवजी मच्छरदाणी वापरावी. 
  • घरात कोणीही धुम्रपान करू नये. 
  • हिवाळ्यात बरेच दिवस ठेवलेले वुलन कपडे आधी दोन दिवस उन्हात ठेवावेत व मगच वापरायला घ्यावेत. 
  • घर स्वच्छ करत असताना झाडू नये, ओल्या कपड्याने थेट पुसावे. 
  • बेडशीट व उशीचे कव्हर नियमित बदलावे व धुतलेले वापरावे. 
  • शक्यतो पांघरण्यासाठी वुलन चादरी वापरू नये. 
  • अंथरूण किंवा इतर गोष्टी घराऐवजी बाहेर मोकळ्या हवेत झटकाव्यात. 
  • घरात झुरळ असू नये याची काळजी घ्यावी. 
  • संध्याकाळच्या वेळेला दार, खिडक्या बंद ठेवाव्यात. 

इतर काळजी  

  • त्रास नसला तरी दर ४ महिन्यांनी डॉक्टरला दाखवावे. 
  • दर वर्षी फ्लूची लस घ्यावी 
  • दमा डायरी लिहावी व कुठल्या गोष्टीने त्रास झाला याची नोंद ठेवून डॉक्टरांना दाखवावी. 

दमा बरा होतो का

  • दमा, उपचार व प्रतिबंधात्मक काळजी नेहमी उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात नक्कीच राहू शकतो. 
  • लक्षणे १ वर्षाच्या आत सुरू झाल्यास ९० टक्के मुले बरी होतात. 
  • ३ वर्षात लक्षणे सुरू झाल्यास ८० टक्के मुले बरी होतात व ३ वर्षानंतर सुरू झाल्यास ७० टक्के मुले बरी होतात. उर्वरित ३० टक्क्यांमध्ये फुफ्फुसाची क्षमता कशी आहे, यावर कुमारवयापर्यंत बरी होणार की पुढे प्रौढपणी ही दम्याचे रुग्ण असतील हे ठरते. 

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.

कोरोनानंतरचा थकवा

कोरोनानंतरचा थकवा

कोरोनानंतरचा थकवा सध्या कोरोना मधून बरे झालेल्या अनेक जणांना लक्षणां नंतर १४ दिवस संपल्यावर पुढे अजून १५ दिवस ते २ महिन्यांपर्यंत बराच त्रास जाणवतो . बरे झाले तरी कामाचे तास बुडत असल्याने व या थकव्या मुळे माणूस मानसिक दृष्ट्या ही खचून जात असल्याने या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनातून बरे झाल्यावर जाणवणारे त्रास  –

  • दिवस तीव्र स्वरूपाचा थकवा, अंगदुखी, स्नायू दुखणे, पाठदुखी असा.
  • थोडे चालल्यावर किंवा कष्टाचे काम केल्यावर श्वास घेण्यास त्रास होणे.
  • नैराश्य येणे , मानसिक थकवा येणे.
  • वजन कमी होणे व स्नायू कमी होणे. एक दिवस पूर्ण झोपून राहिले कि  १ ते १.५ % स्नायू कमी होतात. ज्यांना १० ते १४ दिवस पडून राहावे लागले त्यांचे २५ % स्नायू कमी होऊ शकतात.
  • बुद्धी क्षमतेच्या कामात रस न येणे किंवा अवघड जाणे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कारणे –
कुठल्या ही व्हायरल आजारा नंतर काही दिवस असा थकवा येतोच पण कोरोना मध्ये बऱ्याचदा उपचारात दिली जाणरे औषधे त्यातच स्टीरॉईड दिले जाते. स्टीरॉईड बंद केल्यावर शरीराचे संप्रेरकांचे संतुलन काही प्रमाणात बिघडते व ते पूर्ववत होण्यास २ ते ४ आठवडे लागतात . पण जीव वाचवण्यासाठी व उपचार म्हणून ही औषधे देणे ही गरजेचे आस्ते.

कोरोना नंतरच्या परिणामावर उपचार –

  • कोरोनानंतरचा थकवा रोज दिवसातून दोन वेळा १ ग्लास नारळ पाणी प्यावे.
  • विटामिन सी ५०० मिलीग्राम ची एक गोळी थकवा असल्यास चालू ठेवावी.
  • कोरोना होण्या आधी विटामिन डी घेतलेले नसेल तर ६०,००० IU दर आठवड्याला एकदा ८ आठवडे
  • रोज उच्च प्रथिने युक्त आहार घ्यावा.
  • सतत पडून राहण्यापेक्षा थोडा वेळ उठून घरात फिरावे , घरातील छोटी मोठी कामे करण्याचा प्रयत्न करावे.
  • रोज हळूहळू ब्रेक घेत १० मिनिटे.
  • फिजियोथेरपिस्टचा ( व्याय्यामाचे डॉक्टर ) सल्ला घेऊन श्वासाचे व्याव्याम करावे. यासाठी वेगळे साहित्य मिळते . उदाहरणार्थ फुकून एका नळीतील बॉल हवेत तरंगत ठेवणे.
  • रोज १० मिनिटे दीर्घ श्वसनाचा व्यायाम करणे.
  • स्नायू दुखत असताना अंगाला तेलाने मसाज करू नये पण झोपताना हाताला व पायाला तिळाचे तेल फक्त लावायला हरकत नाही.
  • रोज झोपताना दोन मुठ खडे मीठ कोमट पाण्यात टाकून घोट्या पर्यंत पाय या पाण्यात १५ मिनिटे बुडवून ठेवावे.
  • जास्त दुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासीटॅमॉलची गोळी काही दिवस घेण्यास हरकत नाही.
  • मानसिक थकव्या साठी रोज ५ मिनटे ध्यान करावे व आपण यातून बरे झालो याबद्दल आभार व्यक्त करून मन कृतज्ञ स्थितीत राहावे . मानसिक स्थिती साठी हा एक उपचार आहे 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय?

सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय? सध्या मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सीरोसर्व्हीलंसचे काम केंद्र शासनातर्फे सुरू आहे. एखाद्या भागात किती लोकसंख्येला आता संसर्ग झाला आहे हे तपासणे म्हणजे सीरोसर्व्हीलंस होय.

हे कसे केले जाते ?
यासाठी बाधित झालेले तसेच न झालेले जनतेतून सहजगत्या कुठला ही व्यक्तींचा समूह निवडला जातो व त्यांच्या शरीरात संसर्ग होऊन गेला आहे हे व प्रतिकारशक्तीचे घटक – अँटिबॉडीचे प्रमाण तपासण्यात येते. त्यामुळे एखाद्या गावात किंवा शहरात किती लोक आता बाधित होऊन गेले आहेत याचा अंदाज येतो. तसेच या अँटिबॉडीचे प्रमाण जास्त आहे की कमी, हेही मोजले जाते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

याचा उपयोग काय होतो?
सीरोसर्व्हिलन्स म्हणजे काय? तीन गोष्टी यावरून समजतात किती टक्के जनता बाधित झाली आहे यावर प्रतिबंधाचे धोरण ठरवता येते.
सर्व समाजाची एकत्रित व बहुतांश लोकसंख्या संसर्गित झाल्याने निर्माण होणारी हर्ड इम्युनिटी म्हणजे सर्वांना सामूहिक प्रतिकारशक्ती बहाल करणारी कळप प्रतिकारशक्ती निर्माण होते आहे कि नाही हे लक्षात येते.
अँटिबॉडीचे प्रमाण किती निर्माण झाले आहे व किती काळ टिकते हे मोजून, एकदा संसर्ग झाल्यावर परत किती काळ संसर्ग होण्याची शक्यता हे लक्षात येते अर्थात पहिला संसर्ग किती काळ पुढच्या संसर्गापासून नैसर्गिक प्रतिकारशक्ती बहाल करतो हे लक्षात येते.
यावरून लस परिणामकारक राहील की नाही हे ही कळते. सीरोसर्व्हीलंसचे निष्कर्ष काय ?
लक्षणविरहीत संसर्ग झालेल्यांमध्ये अँटिबॉडीचे प्रमाण फारसे नाही व ते एक महिन्यापर्यंतच टिकते आहे व सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्यांमध्ये ही अँटिबॉडीचे प्रमाण असले तरी ते तीन महिन्यात कमी होते आहे.

याचा परिणाम काय होऊ शकतो?
सीरोसर्व्हीलंस सुरु असल्याने याचे अंतिम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. पण आतापर्यंतच्या मर्यादित निकालांवरून पहिल्या कोरोना संसगार्तून मिळणारी प्रतिकारशक्ती आयुष्यभर टिकेलच असे खात्रीशीर रित्या सांगता येत नाही. म्हणून संसर्गित झालेले व न झालेले असे दोन्ही गटांना प्रतिबंधाचे सर्व उपाय चालू ठेवणे गरजेचे आहे. अजून
६ महिने ते वर्षभर सीरोसर्व्हीलंसनंतर चित्र अजून स्पष्ट होईल.

सीरोसर्व्हीलंसला सहकार्य करा
काही भागांमध्ये कशासाठी रक्त घेत आहेत, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आम्हाला कुठे घेऊन जातील, अलगीकरण / विलगीकरण करतील अशा गैरसमज व भीतीमुळे नागरिकांना सहकार्य केले नाही व रक्ताचे नमुने देण्यास नकार दिला. पण ही रक्ताची तपासणी तुमच्या आताच्या संसर्गाच्या निदानासाठी नव्हे तर होऊन गेलेल्या संसर्गासाठी आहे. तसेच या चाचणीचा आधार घेऊन कोणालाही बळजबरीने रुग्णालयात दाखल केले जात नाही. म्हणून सर्वांनी शासकीय कर्मचारी येतील तेव्हा सहकार्य करावे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर सध्या अनेक जण मास्क म्हणून रुमाल, ओढणी, साडीचा पदर, गमचे, उपरणे असे घरगुती कपड्याचा तात्पुरता मास्क म्हणून वापर करताना दिसत आहेत. रुग्णालयात येणारे ५० टक्के असेच आत किंवा डॉक्टरसमोर येतात. या गोष्टी संसर्गापासून रक्षण करू शकत नाही.अशा गोष्टी मास्क म्हणून का चालत नाहीत. कुठलाही मास्क हा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी त्याचे तीन पदर असावे लागतात. यातील मधला पदर हा अर्ध सच्छिद्र म्हणजेच सेमीपरमीएबल असायला हवा .

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

उपरणे, ओढणी, पदराचा मास्क म्हणून वापर मधला पदर हा तोंड व नाकातून बाहेर येणारे श्वासकण फक्त रोखतच नाही तर ते पकडून ठेवतो. म्हणजेच ते शोषून घेतो आणि मास्क बाहेरून ओला होऊ देत नाही. बाहेरून ओला झालेला मास्क ही हवेतील धूळ त्यावर बसून त्रासदायक ठरू शकतो. तीन पदरांचे हे तत्त्व रुमाल, ओढणी, साडीचा पदर व अशी कुठलीही गोष्ट तोंडाभोवती बांधल्यास पाळली जात नाही. आम्ही अशा गोष्टीचे तीन पदर बनवून तोंड व नाकाभोवती गुंडाळू असे कोणी म्हणत असल्यास त्याचाही उपयोग होणार नाही. कारण या तीन गुंडाळ्यात मधला पदर अर्धसच्छिद्र नसतो. म्हणून असे घरगुती कपड्याचे मास्क न वापरता व्हाल्व नसलेले तीन पदरी मास्कच वापरावे.रुमाल, गमचे, ओढणी मास्क म्हणून वापरल्यास कामाच्या ठिकाणी, इतरांशी बोलताना रुमाल खाली करावा लागतो व अशी सवय लागते; पण मास्कच्या बाबतीत सहसा असे करावे लागत नाही.मास्क घालून नीट बोलता येते. रुमाल, ओढणी वापरल्यास ती वारंवार अ‍ॅडजस्ट करावी लागते.उपरणे, ओढणी, पदराचा मास्क मास्क आता आपल्या जीवनशैलीचा भाग बनत चालल्याने नियमित वापरल्यास त्याची सवय लागेल. पण रुमाल, ओढणीची सवय लागणे अवघड आहे. मास्कच्या अवतीभवती संसर्गकण बाहेर जाणार नाहीत; पण श्वास घेण्यास थोड्या फार हवेची ये-जा होईल इतकी जागा राहते म्हणून श्वास व हवेसाठी तो वारंवार खाली करावा लागत नाही. घरगुती कपडे घट्ट बांधल्यास अशी हवेची ये-जा होण्यास जागा राहत नाही. नाकाचे वरचे टोक ते हनुवटीच्या खालपर्यंत नाक व तोंड झाकलेले असावे, हे तत्त्व घरगुती कपडे वापरून पाळता येत नाही.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा

पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा सध्या अनेक लोक होम क्वारनटाईन व होम आयसोलेशन मध्ये आहेत. होम आयसोलेशन मध्ये असलेल्यांनी रोज २ वेळा  तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या सौम्य कोरोना रुग्णांनी दिवसातून २ वेळा आणि मध्यम लक्षणांच्या रुग्णांच्या रुग्णांनी दर सहा तासांनी आपली ऑक्सिजनची पातळी तपासून पहावी. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी घटत असल्यास ती लवकर लक्षात येऊन त्याचे उपचार सुरु करता येतात. तसेच या सर्वांनी रोज दोन वेळा ६ मिनिट वॉक टेस्ट करावी.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

     पल्सऑक्सीमीटर कुठल्या बोटाला लावावा पण हे सर्व करत असताना नेमक्या कुठल्या बोटाला पल्सऑक्सीमीटर लावायचा हे माहित असायला हवा. यासाठी जो हात आपण कामासाठी जास्त वापरतो व ज्या हाताने लिहितो, त्या हाताचे मधले बोट वापरायला हवे म्हणजे सर्वात मोठे बोट. पल्सऑक्सीमीटर हे बोटाच्या टोकाला म्हणजे नख व त्या मागच्या भागावर लावून पाहिले जाते. यात मधल्या बोटाला हाताच्या दोन्ही मुख्य रक्त वाहिन्यांचा प्रवाह आसतो . तुलनेने इतर बोटांना कमी असतो. म्हणून लिहिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मधल्या बोटाला सर्वात अचूक पल्सऑक्सीमीटर ची रीडिंग येते.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

कोरोना हवेतून पसरतो का?

कोरोना हवेतून पसरतो का?

कोरोना हवेतून पसरतो का? पूर्वी मानले जायचे की, संसर्गित व्यक्तीतून बाहेर पडणाऱ्या कोरोनाच्या विषाणूचा व्यास हा ५ ते १० मायक्रोमीटर असल्याने तो १ मीटरपेक्षा जास्त जागेत उडत नाही व ३ ते ४ तासांत खाली बसतात. असे होऊ शकते की कोरोनाबाधित व्यक्तीच्या श्वसनातून बाहेर पडणारे काही (५ ते १० टक्के ) संसर्गकण हे ५ मायक्रोमीटरपेक्षा लहान असतील आणि म्हणून ते १ मीटरपेक्षा जास्त अंतरावर उडून लांबवर जातील आणि ८ तासांपर्यंत हवेत तरंगत राहतील.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कोरोना हवेतून पसरतो का? कमी व्यास असलेले संसर्गकण १ मीटरच्या पुढे जाऊन इतरांना संसर्ग करण्याच्या या प्रक्रियेला हवेतून संसर्ग म्हटले आहे.हवेतून संसर्गाची जागतिक आरोग्य संघटनेने शक्यता वर्तवल्याची बातमी आल्यापासून अनेकांचा गैरसमज झाला आहे की, कोरोना काही किलोमीटर दूर व एका गावातून दुसºया गावापर्यंत उडून संसर्ग करू शकतो. पण असे मुळीच नाही. तो हवेतून जात असला तर आधी १ मीटरच्या थोडा पुढे कदाचित ३, ४ किंवा ५ मीटर पुढे जाण्याची शक्यता आहे. ही शक्यता जागा किती बंद आहे यावर अवलंबून आहे.हवेतून संसर्गाची शक्यता असली तरी मुख्य संसर्गाचा स्रोत हा आधी सांगितलेला मोठ्या संसर्गकणांचा म्हणजे १ मीटरच्या अंतरावरच आहे. हवेतून प्रसाराची शक्यता ही कमी जागेत व वारे वाहण्यास फार वाव नाही अशा बंद जागेतच जास्त आहे. तसेच हवेतून संसर्गित होणाºया कणांची संसर्गक्षमता ही १ मीटरच्या आत मोठ्या संसर्गकणांपेक्षा कमी असणार आहे. म्हणून एकमेकांपासून एक मीटरपेक्षा जास्त अंतराने उभे राहून सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व अबाधित राहणार आहे. हवेतून संसर्गाच्या अल्पशा शक्यतेचे महत्त्व काय ?हवेतून संसर्गाची शक्यता ही बंद जागेत जास्त लोक जमल्यावरच असल्याने हे टाळावे व कामाच्या ठिकाणी शक्यतो दार, खिडक्या उघडी ठेवावी. लग्नसमारंभ, धार्मिक स्थळ, बार अशा बंद जागेत जास्त गर्दी होते अशी ठिकाण जाणे टाळावे.हवेतून संसर्गाची शक्यता गृहीत धरली तरी सर्वांनी मास्क वापरल्यास बचाव होईलच. सोशल डिस्टन्सिंग पाळणे सुरू ठेवावे. या गोष्टी पाळल्या तर आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज सध्या दोन वेळा वाफ घेतल्याने तसेच जास्त धोका असल्यास दर दोन तासांनी वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो, असा संदेश मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. पण हा गैरसमज असून दोन वेळा वाफ घेतल्याने कोरोनाला प्रतिबंध होतो, याला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. यावर करायला काय हरकत आहे, फायदा झाला नाही तरी तोटा होणार नाही, अशी अनेकांची भावना असते.पण असा विचार करून चालणार नाही. म्हणून आपण कुठलाही प्रतिबंधक उपाय स्वीकारताना तसेच समाज माध्यमांवर फॉरवर्ड करण्याआधी त्याची सत्य- असत्यता पडताळून पाहावी. अशा खोट्या प्रतिबंधक उपायांचे काही तोटे असतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

दोनदा वाफ घेतल्याने कोरोनाचा प्रतिबंध होतो हा गैरसमज एक तर अशा निरुपयोगी उपायांमुळे उपयोगाच्या प्रतिबंधक उपायांकडे दुर्लक्ष होते. तसेच यामुळे सुरक्षेची खोटी भावना निर्माण होते. तसेच यात कमी खर्च असला तरी या जेव्हा सार्वजनिक पातळीवर अनेक जण हे उपाय स्वीकारतात त्यात एकत्रित राष्ट्रीय व नैसर्गिक संपत्तीचा नाहक अपव्यय होतो.रोज दोन वेळा वाफ घेण्याचा अजून एक दुष्परिणाम असा होऊ शकतो की ही वाफ वाफेच्या मशीनमधून घेत असतील तर घरात प्रत्येकासाठी वेगळे वाफेचे मशीन असणे अशक्य आहे. म्हणून सगळ्यांनी एकच मशीन वापरून कोणाला लक्षणविरहीत संसर्ग असल्यास त्यातून इतरांना संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच एक मीटरपेक्षा जास्त अंतर राखून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे, शक्य तिथे सॅनिटायझरचा वापर व कामासाठी व आवश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडणे या मुलभूत प्रतिबंधक उपायांपासून विचलित होऊ नये.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

बालदमा आणि उपचार

बालदमा आणि उपचार

बालदमा आणि उपचार काही मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे वातावरणातील ॲलर्जीन, फुलांचे परागकण,धूर, हवेतील प्रदूषणकण, गारवा, तीव्र वास व काही विषाणूंमुळे श्वसन मार्ग आकुंचन पावतो व त्याचा व्यास लहान होतो. जन्माच्या वेळी कमी वजन असणे व पहिल्या दोन वर्षांत गंभीर न्युमोनिया व इतर फुफ्फुसाचा संसर्ग व इतर अलर्जीचे आजर असल्यास बालदमा होण्याची शक्यता वाढते.
पुणे लहान मुलांमध्ये श्वसन मार्ग, वातावरणातील घटक जास्त संवेदनशील असल्याने वारंवार आकुंचन पावून छोटा होण्याच्या आजाराला बालदमा म्हणतात. 

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

कारणे 
काही मुलांमध्ये अनुवांशिक कारणांमुळे वातावरणातील ॲलर्जीन, फुलांचे परागकण, धूर, हवेतील प्रदूषणकण, गारवा, तीव्र वास व काही विषाणूंमुळे श्वसन मार्ग आकुंचन पावतो व त्याचा व्यास लहान होतो. जन्माच्या वेळी कमी वजन असणे व पहिल्या दोन वर्षांत गंभीर न्युमोनिया व इतर फुफ्फुसाचा संसर्ग व इतर अलर्जीचे आजर असल्यास बालदमा होण्याची शक्यता वाढते.

दमा सुरू झाल्यावर पुढील गोष्टींमुळे तो वाढतो व या गोष्टींना श्वसनमार्ग संवेदनशील असतो. ते जितके टाळता येतील तितका दमा नियंत्रणात राहतो.

  • घरातील घटक – पाळीव प्राण्यांच्या केसातील कण, घरतील झाडताना उडणाऱ्या धुळीचे कण, झुरळे, थंडीतील लोकरी कपडे अनेक दिवस ठेवल्यावर त्याला लागणारा फंगस.
  • वातावरणातील घटक – फुलांचे परागकण, कॉंग्रेस गवत, झाड, घास यांच्यातून वातावरणात मिसळणारे कण, थंड व कोरडे वारे.
  • हवेतील प्रदूषण कण – सिगारेट , बिडी, तंबाखूचा धूर, ओझोन, लाकूड, कोळसा जाळल्यावर निर्माण होणारा धूर, रस्ताने उडणारी धूळ.
  • तीव्र वास – अत्तर, परफ्युम, डीओडरंट, हेअर स्प्रे, स्वच्छतेसाठी वापरले जाणारे वास असलेले क्लीनर.
  • शेतातील कण  – धान्य उफणताना उडणारे कण.
  • भावनिक / शारीरिक  बदल – व्यायाम, रडणे, जास्त हसणे, तणावामध्ये श्वास वाढणे.
  • औषधे – ॲस्पिरीन, इतर काही वेदनाशामक औषधे.

लक्षणे
– तापाशिवाय वारंवार सर्दी, खोकला. 
– फक्त कोरडा खोकला वारंवार येणे, पहाटे व संध्याकाळच्या वेळी जास्त येणे.
– श्वास घ्यायला त्रास होणे व त्यासोबत शिट्टीसारखा आवाज येणे. 
– शांत झोप न लागणे. 
– थकवा येणे. 

बालदमा आणि उपचार बालदमा नेमका काय आहे, हे पालकांना समजून सांगताना मी माणसाच्या स्वभावाचे उदाहरण देतो. जसा काही जणांचा रागीट स्वभाव असतो तसेच काही कारणाने तुमच्या मुलाचे फुफ्फुस व श्वसनमार्ग थोडे रागीट आहेत. रागीट माणसाला जसे जपावे लागत, कशाने राग येईल हे ओळखून त्या गोष्टी सांभाळाव्या लागतात, तसेच बालदमा असलेल्या मुलाच्या श्वसन मार्गाला राग येऊ नये म्हणून वर दिलेले ट्रिगर्स, म्हणजे दमा वाढवणारे घटक सांभाळावे व नियंत्रणात ठेवावे म्हणजे, दमा नियंत्रणात राहील. जसा रागीट स्वभाव पूर्ण जात नाही, पण तो नियंत्रित करता येतो तसाच बालदमा ही नियंत्रित करता येतो. वय वाढते व प्रगल्भता येते तसा रागीट स्वभाव सौम्य होतो, तसेच वय वाढल्यावर फुफ्फुस प्रगल्भ होते आणि  बालदमा नाहीसा होतो. रागीट स्वभावाचा माणूस नॉर्मल आयुष्य जगतो व सगळे करू शकतो, तसेच दम्याचा रुग्ण हा नॉर्मल आयुष्य जगू शकतो.

सदरील माहिती आपण सकाळ मध्येही वाचू शकता.