‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून…. – डॉ. अमोल अन्नदाते

Dr. amol annadate artical

दै. लोकमत

‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून….डॉ. अमोल अन्नदाते

सदोष रस्ता बांधणी, वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक/आदर नसणारे वाहनचालक, सदोष वाहने, अतिवेगाची नशा, अतिपाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे .

२०३ दिवसांत ४५० अपघात आणि ९७ मृत्यू ही ‘समृद्धी महामार्गाची आकडेवारी, परिस्थिती किती भीषण आहे हे दर्शवणारी आहे. सदोष रस्ता बांधणीबरोबरच वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक / आदर नसणारे वाहनचालक अशा महामार्गावरून चालण्याच्या स्थितीत नसलेली सदोष वाहने, अतिवेगाची नशा आणि अकारण घाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे.

या महामार्गावर सर्वाधिक वेग मर्यादा १२० आहे. पण, भारतीय वाहनचालकांचे गाडी चालवण्याचे सरासरी तारतम्य लक्षात घेता ही कमाल मर्यादा अपघातांमध्ये भर घालणारी ठरते आहे. ही वेगमर्यादा महामार्गाची व वाहनाची आदर्श स्थिती व वाहतुकीचे सर्व नियम पाळले जात आहेत असे गृहीत धरून ठरवलेली असते. पण, ही आदर्श स्थिती क्वचितच जुळून येते. म्हणून ठरवून दिलेली वेगमर्यादा काहीही असली तरी समृद्धीवर १०० वेग मर्यादा न ओलांडणे महत्त्वाचे आहे. ८०. १०० व १२० अशा तीन लेन मार्गिका (लेन्स) महामार्गावर ठरवून दिल्या आहेत. पण, या तीन मार्गिका आणि ओव्हरटेक करण्याची सर्वात उजवी मार्गिका ही शिस्त खूप कमी गाड्या पाळतात. स्वयंशिस्तीने हे नियम पाळणे व वेगमर्यादेवर कठोर व कायदेशीर नियंत्रण आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग बांधताना काही चुका झाल्या आहेत. खालून रस्ता असताना त्याठिकाणी सिमेंटचा रास्ता डांबरी होतो व डांबरीकरण सुरू होते. त्याठिकणी मोठे उंचवटे निर्माण झालेले आहेत.काही ठिकाणी हे उंचवटे एवढे उंच आहेत की १२० किंवा काही वेळा १०० च्या वेगाने गाडी जात असल्यास त्यावरून गतिरोधक असावा,तशी उडते. जास्त वेग असल्यास ती आपली लेन तोडून इतर वाहनांवर आदळण्याची किंवा चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गाच्या कठड्यावर आदळण्याची, प्रसंगी खाली फेकली जाण्याची शक्यता आहे. बरेच अपघात हे पुलावर किंवा पूल ओलांडून गेल्यावर गाडी उडाल्याने झाल्याचे लक्षात येईल. या सर्व पुलांआधी वेग कमी करून तो ८० करण्याचे फलक लावणे व या जोडणीचे उंचवटे कमी करणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्ग हा सरळ एका रेषेत असल्याने व वाहनचालकांना सतत समोर त्याच प्रकारच्या दृश्याकडे बघून बधिरता येते व ते संमोहित होतात. दर दोन तासांनी किमान पाच मिनिटांच्या विश्रांतीसाठी थांबण्याची सोय या महामार्गावर कुठेही नाही. टोलनाके येतात तेही महामार्ग चढल्यावर व उतरताना.

५४,००० कोटी रुपये खर्चून बांधलेल्या महामार्गावर अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी ट्रॉमा सेंटर, नजीकच्या रुग्णालयांपर्यंत जाण्यासाठीची आपत्कालीन सोय, रुग्णवाहिका, त्यात प्रशिक्षित डॉक्टरची उपलब्धता याचे पुरेसे नियोजन नाही. म्हणायला काही रुग्णवाहिका उभ्या असतात. पण, आतापर्यंतच्या अपघातात त्यांचा फारसा उपयोग झालेला नाही. ९ जूनपासून महामार्गाच्या टोलनाक्यांवर टायर्सची तपासणी करण्याचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. पण प्रत्येक वाहनाची अशी तपासणी जिकिरीची आहे. प्रत्येकाने स्वतः आपल्या वाहनाची स्थिती तपासणे हाच त्यावरचा मार्ग होय!

शिर्डी, नाशिक, शनी शिंगणापूर, माहूर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर अशी देवस्थाने व धार्मिक पर्यटनाला जाताना हा महामार्ग वापरणाऱ्यांना विदर्भ आणि मुंबईकडून एका दिवसात भाड्याच्या वाहनाने सकाळी लवकर निघून रात्रीपर्यंत परतण्याची घाई असते. या विचित्र हट्टामुळे ड्रायव्हरवर अतिताण येतो व रात्रभर प्रवासात अपुऱ्या झोपेमुळे अनेक अपघात घडतात. महामार्गावर शक्यतो रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेतला प्रवास टाळायला हवा.

रस्त्यांच्या बाबतीत एक वाक्य नेहमी सांगितले जाते. अमेरिका श्रीमंत आहे म्हणून त्यांच्याकडे चांगले रस्ते आहेत असे नाही तर अमेरिकेमध्ये चांगले रस्ते आहेत म्हणून ते श्रीमंत आहेत. आपल्या ‘समृद्ध अनुभवा नंतर त्यात एक भर घालायला हवी. अमेरिकेकडे (खरेतर बहुतांश प्रगत देशांकडे) चांगल्या रस्त्यांसोबत त्यांचे चांगले नियोजन आहे, लोकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल आदर आहे आणि ते पाळण्याची सवय आहे; म्हणून अमेरिका श्रीमंत आहे. त्यांच्या समृद्धीची वाट रस्त्याने तरी विनाशाकडे जात नाही!

-डॉ. अमोल अन्नदाते
dramolaannadate@gmail.com
www.amolannadate.com

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा?

कुठली लस चांगली याचे उत्तर  “जी उपलब्ध आहे ती”  एवढे सोपे आहे.  म्हणून  “कुठली घ्यावी”  यापेक्षा  “लस घ्यावी”  हेच महत्त्वाचे !

तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून, पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या अनुभवांवरून हा टप्पा जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य व शासन, प्रशासन अशा सर्व पातळ्यांवर काही सुधारणा आवश्यक आहेत. साठीच्या पुढे व इतर आजारांसह पंचेचाळीशीच्या पुढे असलेल्यांचे लसीकरण आता सुरू झाले असले, तरी पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला टप्पा अजून अपूर्ण आहे. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या संख्येपैकी केवळ ५० टक्के लसीकरण झाले आहे. दुसरा डोस अनेकांनी घेतलेला नाही. दुष्परिणामांची भीती व लस घेऊनही कोरोनाची लागण होते या दोन गैरसमजांमुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. लसीकरणानंतर नैसर्गिक कारणांमुळे झालेले मृत्यू व दुष्परिणामांचे संबंधही लसीशी जोडण्यात आल्याने काही आरोग्य कर्मचाऱ्यांनीही लसीकडे पाठ फिरवली. लस पूर्णपणे सुरक्षित आहे व एक दिवसासाठी अंगदुखी, थोडा ताप, थकवा हे तुरळक परिणाम सोडता लसीचे कुठलेही मोठे दुष्परिणाम नाहीत. या लसीमुळे जीवघेण्या दुष्परिणामांची कुठलीही शक्यता मनात न आणता सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

लसीकरणासाठी जाताना प्रत्येकाने आणखी एकाला लसीकरणासाठी प्रेरित करणे, त्याला सोबत घेऊन जाणे, त्याच्या मनात शंका असतील तर त्या दूर करणे हा सध्या देशसेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. पहिल्या टप्प्यात पहिला डोस घेतल्यावर दुसरा डोस घेण्यास काहीजण उत्सुक नव्हते. दोन डोस शिवाय पूर्ण प्रतिकारशक्ती येणे शक्य नाही. दुसरा डोस न घेणे म्हणजे पहिला डोस वाया घालवण्यासारखे आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसची तारीख चुकवून ती उद्यावर ढकललेल्यांचे लसीकरण इच्छा असूनही चालढकल केल्यामुळे राहून गेले असे पहिल्या टप्प्यातले निरीक्षण आहे.  आपल्याला ठरवून दिलेल्या दिवशी लस घेणे हे  सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे प्राधान्य आहे असे ठरवून सकाळच्या सत्रातच लस घेण्याचा निश्चय करावा. एखाद्या साथीच्या रोगावर मात करायची असते तेव्हा कमी वेळात जास्त लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक असते. सध्या देशातील केवळ ०.६ टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाचा वेग संथ आहे. रविवार व सार्वजनिक सुट्ट्यांना लसीकरण बंद ठेवून चालणार नाही. शासनाकडून लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या हालचाली तेव्हाच होतील जेव्हा लसीकरण केंद्रावर मागणी वाढेल. म्हणून आपल्याला ठरवून दिलेली तारीख न चुकविणे गरजेचे आहे. 


पहिल्या टप्प्यातील बॅक लॉग पाहता प्रत्येक टप्प्यावर असाच लस न घेणाऱ्यांचा बॅक लॉग राहिला तर  लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी म्हणजे कळप/सामूहिक प्रतिकारशक्तीच्या मुख्य हेतूपासून आपण वंचित राहू व सर्व मुसळ केरात जाईल. म्हणूनच प्रत्येकाने आरोग्य साक्षरता दाखवत साथ रोखण्यासाठीची  इच्छाशक्ती सिद्ध करण्याची ही वेळ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांनी विचलित होण्याची गरज नाही. लस ही आजारासाठी कवच कुंडले आहेत, पण तो काही अमरत्व देणारा अमृत कलश नाही. म्हणून इतर प्रतिबंधक उपायांचे महत्त्व याने कमी होत नाही. लस घेतल्यावर कोरोनासंसर्ग होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. झाला तरी तो गंभीर स्वरूपाचा नसेल. म्हणजेच लसीचे मुख्य ध्येय हे मृत्यू टाळणे हे आहे हे समजून घ्यावे. 
कुठली लस चांगली याचे उत्तर “जी उपलब्ध आहे ती” एवढे सोपे आहे. दोन्ही लसी शासनाने सखोल वैज्ञानिक चिकित्सेअंति उपलब्ध केल्या आहेत म्हणून “कुठली घ्यावी” यापेक्षा “लस घ्यावी” हेच सध्या प्राधान्य असले पाहिजे. 
शासनाने लसीकरण धोरणात  काही बदल केला तर लसीची परिणामकारकता वाढवता येऊ शकते. सध्या दोन डोसमधील अंतर चार आठवडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ५६ टक्के प्रतिकारशक्ती मिळणार आहे. हे अंतर जर ८ ते १२ आठवड्यांपर्यंत वाढवले तर लसीची परिणामकारकता ८० टक्केपर्यंत वाढू शकते. तसे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेनेही दिले आहेत.  म्हणून पहिला डोस घेणाऱ्यांना चार आठवड्यांनी दुसरा डोस देण्यापेक्षा तो इतर लस न मिळालेल्यांना पहिला डोस म्हणून देता येईल (या धोरण सुधारण्यासाठी सूचना आहेत, पण सर्वसामान्यांनी ठरवून दिलेल्या दिवशी म्हणजे चार आठवड्यांच्या अंतरानेच दुसरा डोस घ्यायचा आहे) 
दुसरा डोस लांबविण्याचा शासकीय पातळीवर फायदा असा होईल की पहिल्या डोस नंतरही काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण होतेच व जास्तीत जास्त जनतेला कमी वेळात पहिला डोस मिळाला तर संसर्गाचे प्रमाण, मृत्युदर व दुसऱ्या लाटेची शक्यता अशा अनेक गोष्टी कमी होतील.  दुसरा डोस लांबल्याने प्रतिकारशक्तीही जास्त प्रमाणात निर्माण होईल. 
दुसरा डोस लांबवून पल्स पोलिओच्या धर्तीवर जास्तीत जास्त लोकांना कमी वेळात पहिला डोस देण्याचा विक्रम प्रस्थापित करणे हा हर्ड इम्युनिटीसाठीचा राजमार्ग ठरू शकतो. यासाठी निश्चित काळ निर्धारित करून देशात उपलब्ध असलेले ८ लाख डॉक्टर व २० ते २५ लाख आरोग्य कर्मचारी सरकारच्या एका हाकेवर हे शिवधनुष्य नक्कीच पेलून धरतील. 


तिसरा टप्पा सुरू : मेरा नंबर कब आयेगा? फ्रान्समध्ये आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना एकच डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण आधी संसर्ग झाल्याने त्यांच्यासाठी पहिला डोस हा काही प्रमाणात दुसऱ्या बुस्टर डोससारखा काम करण्याची वैज्ञानिक शक्यता आहे. याचाही हेतू जास्तीत जास्त लोकांना पहिला डोस कमी वेळात देण्याचाच आहे. 
लसीकरण धोरण राबविताना  आरोग्य यंत्रणा कमकुवत असलेल्या, कमी मनुष्यबळ असलेल्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.  ग्रामीण भागातील  जनता कोविन ॲपवर नोंदणी व प्रवास करून गावातून तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात येईल ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. अगदी गंभीर आजारासाठीही तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची  आर्थिक व मानसिक क्षमता नसलेल्या ‘नाही रे’ वर्गाला लसीकरण मोहिमेत कसे सामावून घेता येईल याचे सूक्ष्म नियोजन अजून आरोग्य खात्याकडे नाही. समाजाच्या या स्तरासाठी लसीकरण गाव-खेड्यात न्यावे लागणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

डॉ. पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने…

Amol Annadate Articles

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातीवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का , यावर अजून चौकशी सुरु आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.

डॉ. पायल तडवी
डॉ. पायल तडवी साठीचा जनआक्रोश

जर डॉ. पायल तडवी च्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे. पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरु असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे टाकणार नाहीत याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्या वरून उभी फुट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रा सारख्या थेट जगण्या मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकरे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्का साठी लढा यातून कधी नव्हे ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते. आरक्षण हवे नको हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत , आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवी सारख्या तरूण डॉक्टरचा जीव जातो तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मा पलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये. तसेच कुठला ही बदल आणताना तो अचानक आणला तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडा ही शासनाने यातून घ्यायला हवा.

Amol Annadate Aticles
डॉ. अमोल अन्नदातेंचे वैद्यकीय क्षेत्रावरील इतर लिखाण वाचण्यासाठी क्लीक करा.

या पलीकडे जाऊन या घटने मध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कांगोरे ही तपासून त्यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. डॉ. पायल तडवीच्या आत्महत्येत जाती चा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला तरी तिच्यावरील ताण ही नाकारला जाऊ शकत नाही. तसेच काहीही कारण असले तरी सोबत काम करणार्या कनिष्ठ , वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले हा सगळ्या कारणां पलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक , शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दर वर्षी केईम, सायन, नायर येथील तीन – चार निवासी डॉक्टरांना टी.बी चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दर वर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणा पायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधून मधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सिनियर – ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी ही भावना असली तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाऱ्या डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातीवाचक शेरे म्हणा, किव्हा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायल सारख्या निरागस डॉक्टरच्या अत्म्हत्यातून कधीतरी समाजा पुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्या मोठ्या डिग्रीची रांग नवा मागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे तर चांगला संवेदनशील माणूस व समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्व ही तयार करायचे आहे हे वूसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे , मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन ही करावे लागणार आहे. तसेच काही ही झाले तरी समोर आलेल्या आपल्या कनिष्ठ – वरिष्ठ, जात – धर्म हे भेदभाव सोडून आपल्या सहकारी डॉक्टरशी प्रेमाने व सह –वेदनेची ( एमपथी ) भावना ठेवून वागण्याचे धडे गिरवावे लागणार आहेत. आपल्या सहकार्यासाठी माणुसकीची भावना हीच रूग्णा साठी प्रेमाची आणी पुढे आपल्या व्यक्तिगत, व्यवसायिक यशाची पहिली पायरी आहे.

आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत डॉ. पायल तडवी सारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच नव्हे तर समाजाचा या क्षेत्रा विषयीचा दृष्टीकोन हि पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचार पूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे. तसेच या वर केवळ तात्पुरत्या मलम पट्ट्या नव्हे तर याच्या मुलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता मानसिक दृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायल च्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे .

सदरील लेख ३० मे, २०१९ रोजी लोकमत च्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

Amol Annadate

डॉ.अमोल अन्नदाते | www.amolannadate.com
reachme@amolannadate.com

आरोग्य मंत्री पद अतिरिक्त कसे असू शकते ?

आरोग्य मंत्री

नुकताच आरोग्य खात्याचा अतिरिक्त भार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे देण्यात आला. खरेतर आरोग्य खात्या सारख्या महत्वाच्या खात्याला अतिरक्त दर्जा देऊन या खात्याला किती कमी लेखले जाते हे पुन्हा सिध्द झाले. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे दोन खाते वेगळे झाल्या पासून राज्याला स्वतंत्र आरोग्य मंत्री नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. केवळ रिक्त मंत्रिपदच नव्हे . गेल्या अनेक महिन्यांपासून आरोग्य संचालकांची दोन पदे ही रिक्त आहेत. आयोध्या , पंढरपूर दौऱ्यातून वेळ काढून किमान या खात्याचा अतिरिक्त भर कोणा कडे तरी द्यायाला पक्षाला वेळ मिळाला हे ही मराठी माणसाचे नशीबच म्हणायचे .

 

गेल्या चार वर्षात ही शिवसेनेकडे असलेल्या आरोग्य मंत्री साहेबानी काहीच भरीव काम झालेले दिसले नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल हेल्थ अकाऊनट्सच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र हे देशातील आरोग्यावर सगळ्यात कमी म्हणजे सकल उत्पन्नाच्या केवळ ०.७ टक्के खर्च करणारे राज्य ठरले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५ टक्के खर्चाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्याने हा खर्च ८ टक्क्यांपर्यंत करणे आवश्यक आहे. एका मंत्र्याकडे अनेक खाती असणे हे नित्याचेच आहे. पण आज महाराष्ट्रातील आरोग्याची स्थिती पाहता नक्कीच भरघोस निधी खेचून आणणारा आणि २४ तास पूर्णवेळ झोकून देऊन काम करणारा आरोग्य मंत्री  आणि दोन पूर्णवेळ संचालकांची आरोग्य खात्याला गरज आहे. खरतर एवढ्या कामाचा भार असलेला , एवढ्या राबवता येण्या सारख्या कल्याणकारी सामाजिक योजना असणारे हे खाते आहे. याचा आवाका एवढा आहे कि एखादा नवीन आरोग्य मंत्री ६ महिने पूर्ण वेळ दिला तरी हे खाते व यातील योजना समजून घेण्यासच लावील . डॉ. दीपक सावंत यांची टर्म संपली व दुसर्यांदा त्यांची वर्णी लागली नाही तेव्हाच हे स्पष्ट होते कि त्यांना मंत्रीपद सोडावे लागणार. तरीही याचे कुठलेही पूर्व नियोजन न करता ऐन वेळेवर एकनाथ शिंदेंना हे खाते देण्यात आले. मुळात हे खात ७० च्या दशकात नगर विकास खात्या पासून आणी पुढे ९५ नंतर वैद्यकीय शिक्षणा पासून वेगळे करण्याचा हेतूच हा होता ही या खात्याला अधिक महत्व मिळावे. पण या खात्याचे अतिरिक्त भार इतर महत्वाची खाती असलेल्या मंत्र्यांकडेच द्यायचा असेल तर मग ही आरोग्य मंत्री हा वेगळ करण्यात अर्थच काय ?

डॉ अमोल अन्नदातेंचे इतर लेख वाचण्यासाठी

आज राज्यातील आरोग्याची स्थिती चिंताजनक आहे. राज्यातील १८१६ प्राथमिक आरोग्य केंद्रे , ४०० हून अधिक ग्रामीण रुग्णालये , ७६ उपजिल्हा रुग्णालय व २३ सिव्हील हॉस्पिटल्स कुठल्याही नियोजना शिवाय कोलमडून पडली आहेत. या ठिकाणी १५,२९४ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. या अनेक रुग्णालयात उपकरणे आहेत तर डॉक्टर नाही आणी डॉक्टर आहेत तर उपकरणे नाहीत अशी स्थिती आहे. राज्यातील विशेषज्ञ डॉक्टरांची ४६६ पदे रिक्त आहेत. सगळ्या शासकीय आरोग्य यंत्रणे मध्ये औषधांचा तीव्र तुटवडा आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेत आज औषधांचा जवळपास शून्य साठा आहे. औषधांच्या तुटवड्या मुळे एका बाळंत झालेल्या स्त्रीने जुलै महिन्यात रुग्णालयाच्या शौचालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरीही औषध खरेदीचा गांभीर्याने विचार करायला सरकार कडे वेळ नाही. आता तर स्वतंत्र मंत्री व दोन संचालक नेमायला ही त्यांना फुरसत नाही. हाफकिन महामांडळाकडे दिलेली औषध खरेदी पूर्णतः फसली आहे. गेल्या वर्षात आरोग्य खात्याच्या निधी मध्ये शासनाने १६८५ कोटींची कपात केली. मिळालेला निधी पैकी ३६ टक्के निधी मार्च २०१८ पर्यंत पडून होता. जो वापरला गेला तो ही कुठल्याही नियोजन व दूरगामी परिणामांचा विचार न करता खर्च केला जातो.

गेल्या तीन वर्षात राज्यात ८० हजार बालकांचा कुपोषणामुळे बळी गेला आहे. याच्या मूळ कारणावर काम करून उपाय योजना करण्यापेक्षा वाटपासाठी शासनाने ३२ कोटींची रेडीमेड खाण्याच्या पॅकेट्सची खरेदी करून विषय संपवला . ऑगस्ट २०१८ पर्यंत गेल्या तीन वर्षात ४९१ मतांचा मृत्यू झाला आहे. समस्यांची आणी मृत्यूंच्या आकडेवारींची जंत्री न संपणारी आहे. पण ती ऐकतोय कोण ? लाखांच्या सभा भरवून धर्म, मराठी अस्मिता, ढाण्या वाघ अशी भाषणे ऐकवली कि मते मिळतात . आरोग्य क्षेत्राचे प्रश्न सोडवून कुठे मते मिळणार आहेत ? ही राजकीय पक्षांना कळणारी गणिते आम्हा सर्व सामन्यांना कळत नाहीत. आरोग्य मंत्री आणि आरोग्य मंत्रालय ही राज्यावर अनेक वर्षांसाठी आपली अमिट छाप सोडण्याचे खाते आहे. ते रिकामे आणी सगळ्यात दुर्लक्षित ठेऊन मात्र महाराष्ट्रात वेगळीच परंपरा निर्माण होते आहे.

सदरील लेख २१ जानेवारी, २०१९ च्या संपादकीयमध्ये,  लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. लोकमत वृत्तपत्रात हा लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

डॉ. अमोल अन्नदाते

आरोग्य मंत्री