भारत व्हावा शतायुषींचा देश

येत्या पंचवीस वर्षांतील देशाच्या आरोग्यासमोरच्या आव्हानांशी लढण्यासाठी प्राधान्याने दोन गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. एक म्हणजे, दुर्लक्षित राहिलेल्या रोगप्रतिबंधक शास्त्राची पुनर्रचना आणि दुसरी म्हणजे, शासनामार्फत सर्वांना परवडणारी, पूर्णवेळ व दर्जेदार आरोग्यसेवा पुरवणे. त्यासोबत आरोग्यावरील खर्च दुप्पट करण्याचेही उद्दिष्ट गाठावे लागेल. तसे झाल्यास स्वातंत्र्याची शताब्दी भारतीयांना शतायुषी करणारी ठरेल.

दे श स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना नागरिकांचा मूलभूत हक्क असलेल्या आरोग्य क्षेत्राच्या प्रकृतीचा अंदाज आवर्जून घ्यावा लागेल. या क्षेत्राने आतापर्यंत किती अंतर कापले आहे, किती बाकी आहे आणि कोरोनासारखी अनपेक्षित संकटे देशाची आर्थिक, सामाजिक वीण कशी उसवून टाकू शकतात याचे वास्तववादी, तितकेच पारदर्शक विश्लेषण राज्यकर्ते, प्रशासन, माध्यमे आणि प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक बनले आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशासमोर मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण, अल्प आयुर्मान, अन्नाची कमतरता आणि संसर्गजन्य आजारांचा कहर या मुख्य समस्या होत्या. भारत स्वातंत्र्यपूर्व काळापासून संसर्गजन्य आजारांची जागतिक राजधानी होता. त्यामुळे कॉलरा, प्लेगसारख्या साथींचे नियंत्रण आणि लसीकरण यासाठी हाफकिन संस्थेच्या माध्यमातून मोठे प्रकल्प त्या काळातच उभे राहिले होते. मुंबईतील जेजे, जीटी, केईएम, कस्तुरबा, टाटा कॅन्सर ही स्वातंत्र्यापूर्वीच, इंग्रजांच्या काळात उभी राहिलेली रुग्णालये. आजही ती केवळ राज्यच नव्हे, तर देशभरातील रुग्णांचा आधार ठरली आहेत.

स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एक हजार मुलांमागे १५० बालकांचा पहिल्या वर्षात मृत्यू होत असे. आज हा आकडा २७.६९ एवढा कमी झाला आहे. १९४७ मध्ये एक लाख जन्मदात्या मातांपैकी दोन हजार मातांचा मृत्यू होत असे. आज हा आकडा १०३ वर आला आहे. मातामृत्यू आणि बालमृत्यूचे प्रमाण हे कुठल्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक विकासाचे वायूभारमापक मानले जातात. म्हणून एक प्रगत आणि सुदृढ राष्ट्र म्हणून जगात ताठ मानेने वावरायचे असेल तर आपल्याला माता आणि बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी अहोरात्र झटायला हवे. स्वातंत्र्योत्तर काळातील आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने सर्वाधिक नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नागरिकांचे वाढलेले आयुर्मान. १९४७ मध्ये देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान ३२ वर्षे होते, ते आज ७०.१९ एवढे म्हणजे दुपटीहून अधिक झाले आहे. पण, स्वातंत्र्यानंतरच्या आर्थिक प्रगतीमुळे सुस्थितीत असलेल्या आजच्या कुठल्याही तरुणाला, सत्तर-ऐंशीच्या दशकात काबाडकष्ट करून आपल्याला मोठे केलेल्या आईवडिलांनाही किमान ७०-७५ वर्षे तरी जगावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी भारतीयांचे सरासरी आयुर्मान विकसित देशांप्रमाणे ९० वर्षे असावे यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात केला पाहिजे.

आज दळणवळणाची अत्याधुनिक साधने, हाय स्पीड इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रसामग्री आणि ड्रोनचा वापर यामुळे सर्व क्षेत्रे ढवळून निघाली असताना आरोग्य क्षेत्रातही या साऱ्या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे. मात्र, तो बहुसंख्य लोक, विशेषत: सर्वसामन्यांच्या आवाक्यात आलेला नाही. ३ टेस्ला एमआरआय, ६४ स्लाइस सिटी स्कॅन, अधिक रिझोल्युशनच्या सोनोग्राफी मशीन्स उपलब्ध झाल्या असल्या तरी त्यांच्या किमती मध्यमवर्गीय डॉक्टरांना परवडणाऱ्या नाहीत. यातील बऱ्याच मशीन जपान, चीन, तैवान, कोरिया या देशांतून आयात केल्या जात असल्याने त्याबाबतच्या आंतरराष्ट्रीय वाणिज्य धोरणाकडे पुरेसे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. डायग्नोस्टिक म्हणजे निदानाच्या क्षेत्रात प्रगती जरूर झाली आहे, पण त्यासाठीचे तंत्र आणि यंत्रसामग्री शेजारी राष्ट्रांकडून उसनवारीवर मिळालेली आणि नागरिकांच्या खिशाला मोठा भुर्दंड देऊन वापरावी लागते आहे. आता भारतातील सिटी स्कॅन, एमआरआयचे रिपोर्ट डॉक्टर जगातील कुठल्याही कोपऱ्यात बसून वाचू शकतो. यात काही प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून डॉक्टरांचे काम अधिक सोपे करता येणे शक्य आहे.

लसीकरणाच्या बाबतीत देश ७५ वर्षांत स्वयंपूर्ण झाला असला आणि काही अपवाद वगळता सर्व लसी आज देशात बनत असल्या तरी त्या देशातील सर्व बालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी ‘हर घर तिरंगा’प्रमाणे भविष्यात ‘हर घर शत -प्रतिशत टीकाकरण’ हे अभियान व्यापकपणे राबवले जायला हवे. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कॅन्सर ही येत्या पंचवीस वर्षांतील देशाच्या आरोग्यापुढची प्रमुख आव्हाने असणार आहेत. त्यांच्याशी लढण्यासाठी दोन गोष्टींवर प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. एक म्हणजे, अलीकडे दुर्लक्ष झालेल्या रोगप्रतिबंधक शास्त्राची पुनर्रचना करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ अर्थात शासनामार्फत सर्वांना परवडणारी, पूर्णवेळ व दर्जेदार आरोग्यसेवा पुरवणे. गेल्या ७५ वर्षांत आरोग्यासाठी सरकार करीत असलेल्या खर्चात वाढ झाली आहे. तथापि, सध्या होत असलेला खर्च दुप्पट करून दरडोई उत्पन्नाच्या २.५ टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट येत्या काही वर्षांत गाठावे लागेल. तसे झाल्यास देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी भारतीयांचे आयुर्मान उंचावून त्यांना शतायुषी करणारी ठरेल यात शंका नाही.

  • डॉ. अमोल अन्नदाते
    dramolaannadate@gmail.com
    www.amolannadate.com

अव्वल असल्याचा आनंद?

The joy of being at the top

-डॉ. अमोल अन्नदाते

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार २०२३ मध्ये भारत चीनला मागे टाकत सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनणार आहे. आज जगाचा भार वाढवणारे पहिले दहा देश अजूनही विकसनशील आहेत. मानवी जगण्याशी निगडीत समस्यांना जन्म देणाऱ्या ४६ राष्ट्रांपैकी भारत हा एक आहे. लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असणारा आदर्श प्रजनन दर २.२ मानला जातो. काही प्रमाणात बालमृत्यू गृहीत धरल्यास एका जोडप्याने सरासरी दोन अपत्यांना जन्म देऊन आपली उणीव भरून काढणारा हा २.२ चा आकडा. गेल्या राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात अनेक दशकांनी हा प्रजनन दर (एक स्त्री किती मुलांना जन्म देते) हा प्रथमच घसरला व तो दोन झाला. यावरून आता आपली लोकसंख्या घसरते आहे व लोकसंख्या ही चिंतेची समस्या राहिलेली नाही असा निष्कर्ष काही जण काढत आहेत. पण या सांख्यिकी जाळ्यात न अडकता लोकसंख्येचे वास्तव समजून घेतल्यास घसरलेला प्रजनन दर केवळ एक आकडा असून समस्या संपल्याचा दाखला नाही, हे लक्षात येईल. भारताची लोकसंख्या स्थिरावणार असली तरी ती खाली जाण्यास २०६४ मध्ये आरंभ होईल व मागील काही दशकात वाढलेली लोकसंख्या कमी जागेत कमी स्तराचे आयुष्य जगेल. अपुऱ्या सोयी व संधीत कोंडलेल्या अतृप्त समूहांना ‘डेमोग्रॅफिक एनट्रॅपमेंट’ म्हणतात. तसेच प्रजनन दर कमी झाला, याचा अर्थ एका टोकाला उच्च शिक्षित व सधन वर्ग एकच मूल जन्माला घालणार व डिंक्स (डबल इन्कम, नो किड्स) जोडपी वाढणार तर दुसरीकडे तीनपेक्षा जास्त मुले जन्माला घालणाऱ्या महिलाही असणार. म्हणून वास्तवात फक्त सरासरी दोनच्या आकड्याने धोरणसुस्तता येईल व लोकसंख्या नियंत्रणाची खरी गरज असलेले दुर्लक्षित राहून गरिबांना अधिक लेकरे होऊन ती अधिक गरीब होत जातील. सामाजिक असमतोल अजून वाढत जाईल. यातून हिंसाचार, गुन्हेगारी वाढून त्याचा फटका समाजातील उच्चभ्रूंनाही बसेल. म्हणून लोकसंख्येची समस्या संपली या भ्रमात कोणी राहू नये.

भारताने १९५० साली लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम सुरू केला. तो तेव्हापासून साचेबद्धपणे सुरू आहे. आता त्याचा झोत व दिशा बदलण्याची गरज आहे. कुठल्याही प्रकारे गृहीत धरले तरी भारतातील दर चौथी व्यक्ती आज गरिबीच्या व्याख्येत मोडते. नेमक्या या व्यक्तीला गर्भ निरोधक साधनांची सगळ्यात जास्त गरज आहे. त्यांनाच पुरेशी माहिती तसेच सुरक्षित गर्भपाताची सुविधा उपलब्ध नाही. म्हणून सरसकट सर्वांना एकच उपाय करून व प्रबोधन करून लोकसंख्या व त्यातून निर्माण होणारा असमतोल संपणार नाही. आजवर प्रत्येक राज्याचे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचे आकडे घेऊन सचिवांच्या बैठका होतात. उद्दिष्टे दिली जातात. आता मात्र जिल्हावार, तालुकावार विशिष्ट वंचित घटकांचे समूह ठरवून त्यांच्यावर लोकसंख्या नियंत्रण व गर्भ निरोधक साधनांचे केंद्रीकरण आवश्यक आहे. ‘नाही रे’ वर्गाला चीनप्रमाणे एक किंवा दोनच मुले हवीत, असे राष्ट्रीय धोरण ठरवणे निरर्थक आहे. आजही देशात बालमृत्यूदर इतका जास्त आहे की मुले वाचण्याची शाश्वती नसताना चांगल्या आरोग्य सुविधा पुरवल्याशिवाय कुठल्या तोंडाने व नैतिक अधिकाराने कमी मुलांचे फायदे सांगणार? शिक्षण व आरोग्य सुविधा हेच सर्वांत मोठे गर्भ निरोधक साधन आहे. मुळात लोकसंख्या नियंत्रण शिक्षण, रोजगार, पोषण, गृहसुविधा, आरोग्य सेवा या पाचही विकासाच्या स्तंभांना स्पर्श करते. नेमक्या या सर्व गोष्टींना निवडणुकीत मोल नसल्याने लोकसंख्येवर थेट परिणाम करणाऱ्या या गोष्टींचे राजकीय पक्ष, नेते व धोरणकर्त्यांना वावडे आहे. उलट लोकसंख्येचा प्रश्न सोयीने धर्माशी जोडून राजकीय पक्ष प्रचार करत राहतात. ज्या राज्यांचे दरडोई उत्पन्न, शिक्षण, आरोग्य सेवा चांगले, तिथे हिंदू व मुस्लिम या दोहोंचा प्रजनन दर कमी झाला आहे तसेच कमी विकास झालेल्या राज्यांमध्ये तो दोन्ही धर्मात सारखा व जास्त आहे. धर्म व लोकसंख्येची चुकीची सांगड घातल्याने जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याची आवाहने दोन्ही बाजूंनी आजही केली जातात, हे दुर्दैवी आहे.

पहिल्या बाळाच्या आधी तसेच एक मूल झाल्यावर व दोन मुले झाल्यावर गर्भ निरोधासाठी आदर्श मार्ग काय, याची परीक्षा घेतली तर त्यात देशातील एक टक्काही नागरिक उत्तीर्ण होणार नाहीत. आणि म्हणून भारताची समस्या ही जास्त मुले जन्माला येणे, एवढीच मर्यादित नाही. सध्याच नको असलेले मूल, अपेक्षेपेक्षा लवकर जन्माला येणे हीदेखील आहे. भारतात जन्माला येणारे दर तिसरे मूल आणि दिवसाकाठी तीस हजार मुले अशी असतात, जी पालकांना हवी होती पण त्या वेळेला ती नको होती. याचाच अर्थ ही मुले जोडप्याची किंवा त्या जोडप्यातील एकाची इच्छा नसताना जन्म घेत असतात. आता हे टाळण्यासाठी काय करावे, हे ज्ञान, त्याकडे बघण्याची निकोप दृष्टी आणि त्याची चर्चा करण्याचा खुलेपणा आपण आजवर समाजात आणू शकलेलो नाही. म्हणूनच इयत्ता आठवी व नववी दरम्यान गर्भ निरोधक साधनांचा छोटा विषय व त्यावरची परीक्षा देशभरातील शाळांमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वर्षानुवर्षे देशाचे गर्भनिरोधक साधनांचे ज्ञान कंडोमच्या पुढे कधी गेलेच नाही. प्रत्येक जोडप्याने पहिले मूल होऊ देणे, हा त्याचा अधिकार आहे; पण पाळणा लांबवणे हे त्या जोडप्याचे कर्तव्य आहे. भारतात मुलांच्या संख्येएवढीच समस्या दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर नसणे, हीदेखील आहे. खरे तर, ही समस्या तीव्र म्हणावी अशी आहे. म्हणून येते वर्ष ‘नो सेकंड बेबी इयर’ म्हणजे दुसरे बाळ टाळण्याचे वर्ष म्हणून राष्ट्रीय पातळीवर पाळले गेल्यास त्याविषयी सामाजिक भान येईल आणि कदाचित भारताचा जगातील लोकसंख्येचा दुसरा क्रमांक तसाच राहून तो पहिला होणार नाही. एक बाळ असणाऱ्यांनी एवढे वर्ष तरी थांबा, अशी राष्ट्रीय घोषणा ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करताना आवश्यक आहे.

आम्ही पन्नास वर्षे सत्तेत राहू असे म्हणणाऱ्यांनी देशाची लोकसंख्या स्थिर होण्यास किमान पन्नास वर्षे अजून लागणार आहेत, हे समजावून घेण्याची आवश्यकता आहे. ‘आम्ही लोकसंख्येचा प्रश्नही सोडवला’ असा फसवा प्रचार कोणी करू नये. कारण तसे करणे हे सत्याला धरून होणार नाही. याउलट, भारतात लोकसंख्या नियंत्रण धोरणाची नव्याने आखणी करण्याची गरज आहे. अव्वल असण्याचा आनंद इतर क्षेत्रांमध्ये चालत असेल. लोकसंख्येत तो चालत नाही, याचे भान बाळगणे आवश्यक आहे.

  • डॉ. अमोल अन्नदाते

Reachme@amolannadate.com
www.amolannadate.com

परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे

Obstacles to going abroad and becoming a 'Doctor'

रशियन आक्रमणाशी झुंजणाऱ्या युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत व एका विद्यार्थ्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून ‘ऑपरेशन गंगा’ राबविले जात आहे.

या विद्यार्थ्यांमध्ये बहुसंख्य वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. गेल्या २ दशकांत रशिया, युक्रेनसह कझाकस्तान, किर्गिझस्तान, फिलिपाइन्स, चीन, व्हिएतनाम, जॉर्जिया, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येने वैद्यकीय शिक्षणासाठी जात आहेत. पण या शिक्षणाचा दर्जा, यातून मिळणारी पदवी, त्यानंतर भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा या गोष्टींची माहिती नसलेले पालक फक्त आपल्या मुलाने डॉक्टर व्हावे या भोळ्या महत्त्वाकांक्षेपोटी मुलांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी पाठवत असतात. म्हणून परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचे सर्व आयाम समजून घेणे गरजेचे आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

Image Source – Pinterest

‘एमबीबीएस’ला शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू न शकलेला व खासगी महाविद्यालयाची फी न परवडणारा एक मोठा वर्ग नीट परीक्षेच्या निकालानंतर डॉक्टर होण्याचे मार्ग शोधत असतो. रशिया, युरोप व सोवियत संघातून विघटीत झालेल्या देशांनी अशा वर्गाला समोर ठेवून नियोजनबद्ध रीतीने वैद्यकीय विद्यापीठांचे जाळे विणले आहे. या विद्यापीठांनी भारतात नेमलेले असंख्य मध्यस्थ इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांकडून व परदेशी विद्यापीठाकडून कमिशन / कन्सल्टंसी फी घेणाऱ्यांनी असे एक स्वतंत्र व्यायसायिक दालनच उभे केले आहे. नीट मध्ये क्वालिफाय असणे सोडून परदेशातील विद्यापीठांमध्ये इतर कुठलेही निकष नसल्याने प्रवेश तसा सोपा असतो. पण, यातील बहुतांश देश थंड वातावरणाचे प्रदेश असल्याने आधी विद्यार्थ्यांना इथल्या हवामानाशी जुळवून घेण्यात काही वेळ जातो. तसेच रशिया, युक्रेन व सोवियत राष्ट्रांमध्ये रशियन भाषाही शिकावी लागते. ही सगळी दिव्ये पार केली, तरी या शिक्षणातील खरी मेख आहे. भारत आणि या देशांमधील आजारांमधील वैविध्य. प्रत्येक देशातील हवामान, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीप्रमाणे तिथल्या आजारांचा एक प्रकार (पॅटर्न) असतो. याबाबतीत भारत व या देशांमध्ये फरक आहे.

या देशांमधील काही मोजकी विद्यापीठे १०० वर्षं जुनी असून, तिथल्या शिक्षणाचा दर्जा चांगला असला, तरी वैद्यकीय ज्ञानासाठी लागणारे प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) ज्ञान देण्या इतपत त्यांच्या रुग्णालयात पुरेशी रुग्णसंख्या नसते. जे असतात ते रुग्ण भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या आजारांचे नसतात. वैद्यकीय शिक्षणाचा आत्मा म्हणजे जास्त रुग्णांना सामावून घेणारी रुग्णालये! म्हणूनच आज जे.जे, केइएम, सायन, नायर.. येथील विद्यार्थ्यांना जगात कुठेही समावून घेण्यास रुग्णालये तयार असतात. परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना भारतात आल्यावर चांगल्या रुग्णालयात काही वर्षं अनुभव घेतल्याशिवाय प्रॅक्टिस करणे जड जाते.

Image Source – APN News Hindi

परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा खरा व सर्वांत अवघड लढा भारतातील ‘फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एन्ट्रन्स एक्झाम’ म्हणजे भारतात वैद्यकीय परवाना मिळवण्यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी प्रवेश परीक्षा. या परीक्षेत पास होण्याचे प्रमाण केवळ १० ते २० % आहे. ही परीक्षा पास होऊ न शकलेले असंख्य विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करूनही वैद्यकीय परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशा हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेची काठिण्य पातळी कमी करून आम्हाला पास करा म्हणून दिल्लीत निदर्शने केली होती. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. मध्यंतरी नॅशनल मेडिकल कमिशनने ही परीक्षा चारच वेळा देता येईल, असा नियम करण्याचा मानस जाहीर केला होता. पण सरासरी विद्यार्थी ६ ते ७ वेळा परीक्षा दिल्यावरच पास होतो, हे गृहीत धरून सध्या तरी केंद्र शासनाने हा निर्णय लांबणीवर टाकला आहे.

 या देशांमध्ये एमबीबीएस नव्हे तर एमडी अशी डिग्री मिळते. पण भारतात एमबीबीएसनंतर कुठलाही विषय निवडून त्यात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावरच, त्या विषयात एमडीची डिग्री मिळते. परदेशातील वैद्यकीय शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा एमडी डिग्री लावतो, तेव्हा तो भारतातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेला डॉक्टर आहे असा सर्वसामान्यांना भास होतो. याविषयी कुठलेही नियमन नाही.

परदेशात जाऊन डॉक्टर होण्याच्या अट्टहासामागे वैद्यकीय क्षेत्र म्हणजे फक्त डॉक्टर हा गैरसमज आहे. एमबीबीएस सोडून इतर अनेक वैद्यकीय अभ्यासक्रम असे आहेत जे आर्थिक, सामाजिक दृष्ट्या डॉक्टर होण्याएवढाच परतावा देणारे आहेत. आश्चर्य म्हणजे, या अभ्यासक्रमाच्या जागा भारतात रिकाम्या राहतात. उदाहरणार्थ फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी! आज त्यासाठी राज्यात बोटावर मोजण्या इतपत प्राध्यापक उपलब्ध आहेत व या क्षेत्रात मनुष्यबळाची तीव्र कमतरता आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

–    डॉ. अमोल अन्नदाते
–    reachme@amolannadate.com
–    www.amolannadate.com

कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरिअंट दारात उभा… आता?

Corona's new Omicron variant standing in the doorway ... nowCorona's new Omicron variant standing in the doorway ... now

२६ नोव्हेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या संक्रमित प्रजातीला ‘व्हेरिअंट ऑफ कन्सर्न’ म्हणजे नोंद घेण्याजोगी प्रजाती म्हणून जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिका व युरोपसह नऊ  देशांमध्ये सध्या या नव्या प्रजातीमुळे नव्याने कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळण्यास सुरुवात झाली आहे. भारतात पहिली लाट ओसरल्यावर कोरोना संपल्याचा उत्सव सुरु होता, तेव्हा डेल्टाचे रुग्ण अमेरिका, इंग्लंड, युरोपमध्ये आढळण्यास सुरुवात झाली व त्यावेळच्या गाफीलतेतून मार्च महिन्यात भारतात दुसरी लाट आली.  आता भारतात काळजी वाऱ्यावर सोडून दिलेली असताना  हा ओमिक्रॉन व्हेरिअंट आला आहे.

कोरोनामध्ये अशी संक्रमणे अपेक्षित असली, तरी ओमिक्रॉनच्या संक्रमणामध्ये काहीसा वेगळेपणा आहे. अल्फा व डेल्टा ही भावंडं निर्माण झाली तेव्हा कोरोना विषाणूमध्ये दोन ते तीन ठिकाणी जनुकीय बदल झाले होते. पण ओमिक्रॉन मध्ये तब्बल ३० ठिकाणी अशी म्युटेशन्स झाली आहेत. त्यामुळे हे संक्रमण आधीपेक्षा जनुकीयदृष्ट्या जास्त घातक आहे. अशा संक्रमणामुळे एक तर विषाणू जास्त लोकांना संक्रमित करण्यास सक्षम होतो आणि लसवंत व्यक्तिलाही संसर्गित करू शकतो. अर्थात, असे होईलच, असेही नाही. कारण संक्रमण घातक ठरेल की, विषाणूला माघार घ्यावी लागेल, हे मानव समूह म्हणून त्याला कसा प्रतिसाद देतो व सार्वजनिक आरोग्याची त्या विरोधात धोरणे कशी असतात, यावरून ठरते.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

अर्धवट लोकसंख्येला कोरोना संसर्गामुळे मिळालेली अर्धवट प्रतिकारशक्ती व अजून सर्व लोकसंख्येचे न झालेले लसीकरण अशा सामूहिक प्रतिकारशक्तीची ‘ ना घर का, ना घाट का’ स्थिती ओमिक्रॉनच्या आक्रमणासाठी एक आदर्श स्थिती आहे. आज देशात केवळ ३१ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. २६ टक्के लोकांनी एक डोस घेतला असून, दुसरा डोस घेणे बाकी आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांपैकी १०० दशलक्ष भारतीयांनी दुसऱ्या डोसची वेळ येऊनही हा डोस घेतलेला नाही. दुसऱ्या डोसची वाट पाहणारे व तारीख उलटूनही न घेणारे हे दोन गट भारताला ओमिक्रॉनच्या तोंडी  देऊ शकतात. अजून लसीकरणच न झालेले ४३ टक्के भारतीय हे तर ओमिक्रॉनसाठी सर्वात सोपे सावज!

संक्रमण कुठलेही व कितीही घातक असो पूर्ण लसीकृत देश हेच त्याला उत्तर असणार आहे. म्हणून लसीकरणाची गती अजून वाढवणे, मुदत उलटून गेलेल्यांना शोधून तो देणे व पहिला डोस झालेल्यांना त्याच तारखेला डोस देणे, यासाठी तीन पातळ्यांवर काम करणारे आरोग्य सेवकांचे गट व स्वतंत्र कृती आराखडे तयार करणे गरजेचे आहे. याशिवाय दुसरा डोस घेऊन सहा महिने होऊन गेलेल्यांना तिसरा बुस्टर डोस देण्याच्या निर्णयालाही काहीसा उशीर होतो आहे. जगात ३६ देशांमध्ये तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ६०पेक्षा जास्त वय असलेले, इतर आजार असलेले व पहिल्या फळीत काम करणारे आरोग्यसेवक या तीन गटांना बुस्टर डोसचा निर्णय सरकारने लवकरात लवकर घ्यावा. ओमिक्रॉनचे अस्तित्व असलेल्या सर्व देशातून भारतात येणाऱ्या लोकांना १४ दिवस ठराविक ठिकाणी (गृह नाही) विलगीकरण, तपासणी अनिवार्य करणे गरजेचे आहे.  कोरोना रुग्णांचे जनुकीय वर्गीकरण वाढवून त्यात ओमिक्रॉन आढळतो का, याची सतत चाचपणी आवश्यक आहे. एवढे नुकसान झाले तरीही, मास्क, हात, धुणे व शारीरिक अंतर  या तीन मूलभूत गोष्टी जीवनशैलीचा भाग बनवण्यास आपण तयार नाही. ओमिक्रॉन अजून किती घातक ठरेल, हे काळच ठरवेल. पण त्यादृष्टीने आरोग्य सुविधांची तत्परता, बंद केलेले कोविड सेंटर्स कधीही सुरु करता येतील, अशी तयारी व औषधांचा पुरेसा साठा या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दुसरी लाट येण्याआधीची गाफीलता व दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या चुका टाळून ओमिक्रॉनचा मुकाबला करावा लागेल.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते

पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार?

how-to-overcome-the-fear-barrier-in-the-minds-of-parents

मुलांना संसर्ग होऊन गेला असेल, तर मग लस कशासाठी? – असा प्रश्न विचारणाऱ्या पालकांना ‘लसवंत मुले म्हणजे सुरक्षित घर’ हे पटवून द्यावे लागेल!

कोव्हॅक्सिन लसी लहान मुलांना देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी  ३५.३ % हिस्सा हा ०- १४ व ४१ % ० ते १८ वयोगटाचा असल्याने कोरोना महामारीचे नियोजन हे लहान मुलांच्या लसीकरणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून लहान मुलांसाठी लसीला परवानगी मिळणे महत्त्वाचे आहे; पण परवानगी मिळणे व देशातील प्रत्येक मुलापर्यंत लस पोहोचणे यातील अंतर मोठे आहे.

लहान मुलांसाठी लसीकरण मोहीम राबविताना सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे – पालकांच्या मनातील भीती दूर करणे. मोठ्या व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरू होऊन १० महिने उलटून गेले; पण अजून मोठ्यांमध्ये भीती व गैरसमजांमुळे लस न घेतलेल्यांची संख्या बरीच आहे. लसीची परिणामकारकता व सुरक्षितता सिद्ध होऊनही अजून लसीच्या भीतीचे  पूर्ण उच्चाटन झालेले नाही. म्हणून बालरोगतज्ज्ञ, शाळा, शिक्षक व राजकीय, सामाजिक नेत्यांना प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याला लस देण्यासाठी प्रेरित करणारी वेगळी सामाजिक मोहीम राबवावी लागणार आहे. सिरोर्व्हेप्रमाणे देशातील ५० ते ६० % लहान मुलांना हा संसर्ग होऊन गेला आहे. मग कोरोना संसर्ग होऊन गेला असताना लस कशासाठी,  असा प्रश्न पालक विचारत आहेत. संसर्ग होऊन गेला असला तरी कोरोना हा कांजण्याच्या आजाराप्रमाणे आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करीत नाही. तसेच नव्या व्हेरियंटस्ने परत संसर्ग होऊ शकतो.  कोरोनाच्या नैसर्गिक संसर्गापेक्षा लस शाश्वत व दीर्घकालीन प्रतिकारशक्ती देते.

५० ते ६० % मुलांना कोरोना होऊन गेला असे म्हटले  तरी ही ५० % मुले कोण हे शोधण्यासाठी प्रत्येकाची रक्त तपासणी करणे जिकिरीचे आहे. लहान मुलांमध्ये कोरोना सौम्य स्वरूपाचा असतो व मृत्युदर अत्यंत कमी आहे; पण तो अगदी शून्य नाही हे लक्षात घेता लहान मुलांना लस आवश्यक आहेच. बालमृत्यूची अनेक कारणे आ वासून उभी असताना त्यात कोरोनाच्या कारणाची भर परवडणारी नाही. लहान मुलांमध्ये कोरोनाचा आजार गंभीर नसला तरी एमआयएससी ही संसर्ग संपल्यावर चार आठवड्यांनी काही मुलांमध्ये होणारी गुंतागुंत जीवघेणी ठरत आहे व याचे उपचारही महागडे आहेत. हे टाळण्यासाठी लसीकरण हाच उपाय आहे. सौम्य आजार असला तरी लहान मुले घरातील इतर मोठ्या व्यक्तींना व त्यातच आजी-आजोबांसाठी संसर्गाचा महत्त्वाचा स्रोत आहे. दुसऱ्या लाटेनंतर मुलांचा घराबाहेर वावर वाढला आहे व  लक्षणविरहित मुले  सुपर स्प्रेडर ठरत आहेत. हे लसीकरण करण्याचे एक मोठे कारण आहे.

‘लसीकृत/लसवंत मुले म्हणजे सुरक्षित घर’ अशी नवी घोषणा आता लहान मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबतीत शासनाने द्यावी. पहिल्या टप्प्यात हृदयाचे आजार, किडनीचे आजार, कॅन्सर, थॅलेसिमियासारखे रक्ताचे आजार, मतिमंद व मानसिकदृष्ट्या विकलांग व दिव्यांग मुलांना प्राधान्य देऊन लसीकरण सुरू करावे. यानंतर गरोदर मातांच्या मुलांना व तिसऱ्या टप्प्यात सर्व मुलांना अशा प्रकारे लसीकरण मोहीम पूर्ण करता येईल. वयोगटाच्या बाबतीत आधी १० ते १८ व त्यानंतर २ ते १० वर्षे असे प्राधान्यक्रम ठरविता येतील. २ ते ७ वर्षे वयोगटाला लस देणे हे बालरोगतज्ज्ञांचे विशेष कौशल्य आहे. या वयोगटासाठी देशभरातील बालरोगतज्ज्ञांची मदत घेत झपाट्याने लसीकरण होऊ शकते. कारण इतर लसीकरणासाठी रोज अनेक बालके बालरोगतज्ज्ञांकडे येतात. त्यावेळी आधी कोरोनाची लस व त्यानंतर इतर लसी अशी विनंती बालरोगतज्ज्ञ  पालकांना करू शकतात. 

लहान मुलांच्या बाबतीत मात्र लसीची किंमत कमी करून जास्तीत जास्त खाजगी बालरोगतज्ज्ञांना या मोहिमेत सामावून घेतल्यास लहान मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण वाढेल. त्यासाठी सध्या खाजगी रुग्णालयाला लसीकरणाची परवानगी व लस साठा मिळविण्याची किचकट प्रक्रिया सोपी करावी लागेल. जोपर्यंत प्रत्येक जण सुरक्षित नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही या तत्त्वाला अनुसरून हर्ड इम्युनिटी मिळविण्यासाठी लहान मुलांचा लसीकरण कार्यक्रम तातडीने राबवावा लागेल.

डॉ. अमोल अन्नदाते
reachme@amolannadate.com
www.amolannadate.com

“नीट’ नेटके करण्यासाठी…

नीट' नेटके करण्यासाठी...

-डॉ. अमोल अन्नदाते

“नीट’ नेटके करण्यासाठी… तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी त्यांच्या राज्यात “नीट’ परीक्षा रद्द करून वैद्यकीय प्रवेशाचे सर्व हक्क हे राज्य सरकारांना देण्याविषयी मोहिम सुरू केली असून बिगर भाजप शासित १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना “नीट’ रद्द करण्याच्या मागणीला पाठींबा देण्याची विनंती केली आहे. हा विषय जसा शैक्षणिक आहे तसाच राजकीय देखील आहे आणि स्टॅलीन यांची भूमिका योग्य की अयोग्य हे समजून घेण्यासाठी “नीट’ ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा सुरु का झाली याबरोबरीने वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीत प्रांतवादाचा इतिहास तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी “नीट’ परीक्षा रद्द करून वैद्यकीय प्रवेशाचे सर्व हक्क हे राज्य सरकारांना देण्याविषयी तमिळनाडूच्या विधानसभेत ठराव संमत करून घेतला आणि बिगर भाजप शासित १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नीट रद्द करण्याच्या मागणीला पाठींबा देण्याची विनंती केली आहे. “नीट’ मुळे ग्रामीण तसेच वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नाही आणि “नीट’ची कठीण्य पातळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळत नसल्याने वैद्यकीय प्रवेशांच्या बाबतीत अन्याय करणारी आहे असा तमिळनाडू सरकारचा दावा आहे. हा विषय जसा शैक्षणिक आहे तसाच राजकीय देखील आहे आणि स्टॅलीन यांची भूमिका योग्य की अयोग्य हे समजून घेण्यासाठी “नीट’ ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा सुरु का झाली याबरोबरीने वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीत प्रांतवादाचा इतिहास तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे.

दक्षिणेकडील राज्ये ही नेहमीच प्रांतवादाचा समर्थन करत आली आहेत. तिथल्या राजकारणाचा गाभाच प्रांतवादाचा आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि तमिळनाडू या चार राज्यांमध्ये आहेत. म्हणूनच दक्षिणेतील राज्य आम्हाला इतर राज्यात प्रवेश नको आणि आम्हीही इतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका आळवत आले आहेत. “नीट’ प्रवेश परीक्षा सुरु होण्याआधी प्रत्येक राज्य त्यांच्या शासकीय प्रवेशासाठी वेगळी परीक्षा तर घेत असतच याशिवाय एम्स, पिजीआय चंडीगड, माहे-मणिपाल, जीपमेर-पॉंडीचेरी, सीएमसी-वेल्लोर, अलीगड मुस्लीम विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज ही देशभर पसरलेली वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जासाठी नावाजलेली विविध शासकीय संस्था वैद्यकीय प्रवेशासाठी त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेत असत. या शिवाय देशभरातील विविध अभिमत विद्यापीठेदेखील त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेत असत. महराष्ट्रात तर यात अजूनच गोंधळ होता. महराष्ट्रातील १२ अभिमत विद्यापीठे त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेताना त्या विद्यापीठांच्या शाखाही परत वेगळ्या परीक्षा घेत असत. म्हणजे डी वाय पाटील विद्यापीठाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर या तीन ठिकाणी असलेल्या कॉलेजसाठी हे विद्यापीठ तीन वेगवेगळ्या परीक्षा घेत. म्हणजे राज्यातील एका विद्यार्थ्याला एका महिन्यात २० ते २५ प्रवेश परीक्षांचा पर्याय होता. तसेच अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा ते स्वतःच घेत असल्याने त्यांच्या पारदर्शकतेवर ही वेळोवेळी शंका उपस्थित होत असे. यामुळे अनेक वर्षे ‘वन नेशन-वन एक्झाम‘ म्हणजेच सर्व प्रवेशांसाठी एकच परीक्षेची मागणी अनेक वर्षे होत होती. ती अखेर “नीट’च्या रूपाने पूर्ण झाली ज्यामुळे किमान विद्यार्थ्यांची अनेक परीक्षा देण्याची धावपळ तरी थांबली.

ज्या दोन प्रश्नांवरून सध्या “नीट’ रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या. “नीट’ रद्द करण्याचा पहिला युक्तिवाद आहे की या राष्ट्रीय परीक्षेमुळे घटनेने राज्य सरकारला दिलेल्या अधिकारांवर गदा येते आहे. परंतू परीक्षा राष्ट्रीय असली तरी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही संबंधित राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचलनालयच करते आणि प्रत्येक राज्यातील ८५ % जागा या त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. केवळ १५ % जागेवर इतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश असल्याने राज्याच्या हक्कांवर फार मोठी गदा येते आहे असे मुळीच नाही. या १५ % जागा ही आम्हाला द्यायच्या नाहीत हे राज्यांनी म्हणणे दुराग्रही आहे कारण त्याने देशभरतील इतर दर्जेदार महाविद्यालयांची दारे आपल्याच राज्याच्या विद्यार्थ्यांना कायमची बंद होणार आहेत. महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर इतर राज्याच्या १५ % कोट्यातूनही बरेच महाराष्ट्रातील विद्यार्थी परत महाराष्ट्रातच प्रवेश मिळवतात तसेच इतर राज्यातही १५ % कोट्यातून प्रवेश मिळवणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या विपुल आहे. म्हणून किमान आपल्या राज्यासाठी तरी “नीट’ फायदेशीर आहे.

“नीट’ नेटके करण्यासाठी… दुसरा महत्वाचा प्रश्न आहे “नीट’ची कठीण्य पातळी आणि यात ग्रामीण-वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान. हे टाळण्यासाठी “नीट’ परीक्षा मराठीसह एकूण १३ स्थानिक भाषेत घेतली जाते. तरीही काही ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षेतील पात्रता असूनही यश मिळवू शकत नाहीत. पण याचा संबंध हा “नीट’ परीक्षेपेक्षाही ग्रामीण भागातील शैक्षणिक संधी व त्याची गुणवत्ता उंचावण्याशी आहे. मी स्वतः माध्यमिक शिक्षण तालुका पातळीवर पूर्ण करून पुढे लातूरसारख्या ग्रामीण भागात निर्माण झालेल्या “लातूर पॅटर्न’मधून बारावीला राज्यात सर्व प्रथम आलो आणि पीसीबी ग्रुप मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवले. यावरून हे सिद्ध होते की ग्रामीण भागात जर शिक्षणाच्या उत्तम संधी निर्माण झाल्या तर कुठलाही विद्यार्थी आर्थिक, स्थानिक, ग्रामीण अशा भेदभावामुळे वंचित राहणार नाही. आज ही लातूरचे विद्यार्थी सातत्याने “नीट’ मध्ये यश मिळवण्यात आघाडीवर आहेत. अहमदपूर, नांदेड, अंदूरचे आलुरे गुरुजी यांचे प्रयोग, हातवळने बंधू -भगिनी या ग्रामीण भागातून प्रथ्म आलेल्यांची यशोगाथा असे कितीतरी दाखले देता येतील. याला दुसरा पर्याय म्हणजे तालुका पातळीवर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला राज्य सरकार त्यांच्या राज्यात काही जागा राखून ठेवू शकतात. पण जागा राखून ठेवणे आणि “नीट’ मधून अंग काढून घेणे हे या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती मलमपट्टी ठरू शकते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ज्ञानगंगा व शैक्षणिक संधी शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणे हेच यावर दूरगामी व शाश्वत उत्तर आहे. “नीट’ मधून अंग काढून आपण वैद्यकीय प्रवेशापुरता प्रश्न मार्गी लावू पण आयआयटी, जेईई, स्पर्धा परीक्षा, प्रदेशातील युएस एमएमई, प्लॅब, इसीएफएमजी, जीआरई या परीक्षांच्या बाबतीत आपण काय भूमिका घेणार आहोत? विद्यार्थ्याला स्वतःच्या राज्यापुरते मर्यादित ठेवून त्याला आपण शैक्षणिक दृष्ट्या संकुचित राहण्याची आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून अंग चोरण्याची सवय लावणार आहोत हे विसरून चालणार नाही.

“नीट’ नेटके करण्यासाठी… जर वैद्यकीय प्रवेशासाठी प्रांतवादाचा मुद्दा रेटायचाच असेल आणि त्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त जागा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यासाठी इतर चांगले व सोपे पर्याय आहेत. राज्यातील १२ अभिमत विद्यापीठात २२०० एमबीबीएसच्या जागा आहेत. या सगळ्या जागा पूर्ण देशातील विद्यार्थ्यांना खुल्या आहेत. त्यापैकी १५ % अनिवासी भारतीय व ८५ % देशातील सर्व विद्यार्थ्यांना खुल्या आहे. यात राज्य सरकारने १२ अभिमत विद्यापीठांच्या पातळीवर चर्चा करून काही टक्के जागा या राज्यासाठी मागून घ्याव्या. सर्व १२ विद्यापीठे सहमत झाली तर त्यांची तशी मागणी केंद्र सरकार मान्य करेल आणि यात त्यांचे कुठेही नुकसान होणार नाही. राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक जागा उपलब्ध होतील. तसेच इतर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या १५ % कोटा व्यवस्थापन स्वत: डोनेशन घेऊन भरू शकते. मी माझ्या नर्सिंग महाविद्यालयाच्या सर्व व्यवस्थापनाच्या वाट्याला आलेल्या डोनेशन घेऊन भरण्याच्या जागा स्वेच्छेने राज्य सरकारकडे सुपूर्द करून टाकल्या आहेत. अगदी असे नाही तर या व्यवस्थापनाच्या १५ % पैकी ५० % म्हणजे एकूण ७.५ % जागा या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना (डोनेशन घेऊनच) देण्याचा समझोता राज्य सरकारने खाजगी महाविद्यालयांशी करावा. अशा प्रकारे “नीट’ मध्ये आपले अस्तित्व ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामावून घेणे, “नीट’च्या माध्यमातून इतर राज्यातही आपले विद्यार्थी कसे जास्त पात्र ठरतील यासाठी प्रयत्न करणे व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, अभिमत विद्यापीठांशी प्रेमपूर्ण समझोता करत त्यांच्या जास्तीत जास्त जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पदरात पाडून घेणे ही भूमिका “नीट’ विरोधापेक्षा जास्त समंजसपणाची आणि फायद्याची ठरेल.

– डॉ. अमोल अन्नदाते
www. amolannadate.com
reachme@amolannadate.com

शाळा पूर्ण वेळ हव्यात

School should be full time

राज्यात शहरी भागात आठवी ते दहावी, तर ग्रामीण भागात पाचवी ते दहावी शाळा सुरु झाल्या असल्या तर हे जस उशिराने सुचलेले शहानपण आहे तसे अर्धवट शहाणपण ही आहे. दुसरी लाट ओसरल्यावर तीन महिन्यांपूर्वी  झालेल्या सिरो सर्वे ( एकूण बाधित झालेल्या लोकांचे सर्वेक्षण ) मध्ये ७० ते ८० % मुले बाधित झाल्याचे निष्कर्ष हाती आले. या आधारावर शाळा सुरु करण्याचे निर्देश आयसीएमआरने तेव्हाच दिले होते. उशीरा का होईना शाळा सुरु झाल्या पण या  धोरणात एका महत्वाच्या शास्त्रीय निरीक्षणाकडे कानाडोळा करण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग सौम्य स्वरूपाचा असतो हे स्पष्ट झाले आहे पण या सोबत जितक कमी वय तितका संसर्ग अधिक सौम्य हे निरीक्षण ही महत्वाचे आहे. त्यामुळे शाळा सुरु करताना आधी बालवाडी पासून ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरु होणे अपेक्षित आहेत. पण नेमके हेच वर्ग व ज्या वयोगटाला सगळ्यात कमी धोका त्यांचेच वर्ग बंद ठेवण्याचे सध्याचे धोरण अनाकलनीय आहे. आता खर तर काही निश्चित मार्गदर्शक तत्वे अनुसरून शहरी व ग्रामीण असं कुठला ही भेदभाव न करता सरसकट राज्यातील सर्व शाळांचे सर्व वर्ग उघडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सरसकट सर्व शाळा उघडण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे संशोधनात हे आता सिद्ध झाले कि शाळे मुळे लहान मुलेच नव्हे तर त्यांच्या मुळे घरातील मोठ्या व्यक्तीना होण्यार्या संसार्गात अशी कुठलीही विशेष भर पडताना दिसत नाही. अनलॉक नंतर शाळा बंद असल्या तरी पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे , मॉल अशा सर्व गर्दीच्या ठिकणी लहान मुलांचा मुक्त संचार सुरु आहेच. तो मोठ्यांचा ही असल्याने त्यांना संसर्ग व्हायचाच तर याही ठिकाणी होऊ शकेल. म्हणून शाळा पूर्ण व सर्व वर्ग न उघडण्यासाठी घरातील ज्येष्ठांच्या संसर्गाचे कारण फसवे व वैद्यकीय दृष्ट्या न पटणारे आहे. तसेच अनेक ठिकाणी काही मुले शाळेत व काही ऑनलाईन अशी पद्धतीने शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना संपण्याचा मुहूर्त शोधत अर्धवट ऑनलाईन शिक्षण देणाऱ्यांनी आता एकदाचे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे पूर्ण विसर्जन करणे गरजेचे आहे.
            कुठले ही सार्वजनिक आरोग्याचे धोरण राबवताना त्याचे रिस्क – बेनीफिट रेशो तपासावे लागते. म्हणजेच शाळा बंद ठेवण्याची जोखीम विरुद्ध फायदा हा हिशोब मांडणे गरजेचे असते .  शाळेचे सर्व वर्ग व पूर्णवेळ सुरु होण्याचे व त्यातच प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु होण्याचे तोटे सध्या जास्त आहेत व लहान मुलांच्या मानसिक व शैक्षणिक आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. शाळेतील अक्षर ओळख हा पहिल्या ५ वर्षात फक्त शैक्षणिकच नव्हे तर मानसिक वाढीचा व शाळेत सवंगड्यांसोबत खेळणे , रमणे , जुळवून घेणे हा सामाजिक  वाढीचा महत्वाचा टप्पा असतो. सध्या ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या आयुष्यातून  हा टप्पा पूर्णपणे वगळला गेला असल्याने आता अजून त्याला उशीर करणे हे दिवसागणिक अधिक घातक ठरणार आहे. तसेच ही मुले शाळेत परततील तेव्हा त्यांच्या मानसिक जडणघडणी साठी विशेष व वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या दोन वर्षात ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये शाळा बंद असल्याने मानसिक समस्या , मानसिक कारणे असलेल्या शारीरिक समस्या ( सायको – सोमॅटीक आजार ) अति चंचलता, स्व मग्नता , टी व्ही व मोबाईल स्क्रीनचे व्यसन असे अनेक आजार कधी नव्हते एवढे वाढीस लागले आहेत. या पैकी कुठल्या ही आजारावर आम्हा बालरोगतज्ञांकडे निश्चित असे औषध नसले तरी शाळेचे सर्व वर्ग सुरु करणे हे यावर प्रभावी औषध ठरू शकते.
                जेवढा उत्साह शाळा सुरु करण्यासाठी गरजेचा आहे त्या पेक्षा दुप्पट उत्साह हा कोरोना प्रतिबंधाची मार्गदर्शक तत्वे तयार करून ती राबवण्यास आवश्यक आहे. जरी लहान मुलां मध्ये कोरोना सौम्य असला व त्यानंतर काही आठवड्यांनी होणाऱ्या एमआय एस्सी या काहीशा गंभीर गुंतागुंतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी ही कोरोना प्रतिबंधाला शाळेत सर्वोच्च प्राधान्य द्यावेच लागणार आहे. कारण अशी एकही केस पालक व विद्यार्थ्यांचे मनोधर्य खच्ची करणारी ठरू शकते. या साठी शाळेत साधा सोपा कोरोना प्रतिबंधाचा ७ कलमी कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. १. सर्व मुलांना व शाळेतील शिक्षकांना  फ्लू चे लसीकरण अनिवार्य करावे २. शाळेतील सर्व शिक्षकांचे व सर्व मुलांच्या घरातील मोठ्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण झालेले असावे ३. मधल्या सुट्टीत मुलांना एकत्रित बसून न जेवण्याची सक्ती असावी 4. मुलांना मास्कच्या योग्य वापरा विषयी शिकवून शाळेत मास्कचा वापर अनिवार्य असावा ५. मुलाला सर्दी, खोकला, ताप असेल किंवा घरी कोणीही कोरोनाचा रुग्ण असेल तर त्याला १० दिवस शाळेत पाठवू नये ६. सर्व मुलांना विटामिन डी ६०,००० IU दर आठवड्याला या प्रमाणे ६ आठवडे विटामिन डी द्यावे ७. मुलांचे इंडियन अॅकॅडमी ऑफ पिडायट्रीक्स या बालरोगज्ञांच्या संघटनेने सुचवलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रका प्रमाणे सर्व लसीकरण पूर्ण झालेले असावे. ही तत्वे काटेकोरपणे पाळल्यास शाळेतून कोरोना संसर्गाचे प्रमाण शून्यावर येणे सहज शक्य आहे.
                अनेक वर्षां पासून राज्यात स्कूल हेल्थ प्रोग्राम म्हणजे शालेय आरोग्य कार्यक्रम हा केवळ कागदावरच अस्तितवात आहे. आता कोरोना साथीच्या युगात मात्र या कार्यक्रमाने कात टाकून , त्यात कोरोनाच्या दृष्टीने बदल करून तो राबवण्याची वेळ आली आहे. कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांचे निदान व उपचार हे शाळेतच शक्य आहेत. म्हणून आता शालेय आरोग्य केंद्र प्रत्येक शाळेने विकसित करून एका बालरोग तज्ञाला या कार्यक्रमात समावून घेतल्यास कोरोनाची भीती अजून कमी होण्यास मदत होईल. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या तरी पालक मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत. पण शाळा पूर्णवेळ व सर्व वर्ग सुरु करायच्या असतील तर शाळाच नव्हे तर प्रशासन व पालक या दोन्ही घटकांनी भीती मनातून काढून टाकायल हवी.  आरोग्य शिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी अनेक वर्षे होते आहे. कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य शिक्षणाचा समावेश अभ्यासक्रम करून चांगले आरोग्य संस्कार असलेली पिढी पुडे येईल.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते
reachme@amolannadate.com
www.amolannadate.com

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

अमेरिका, जपान, सिंगापूरसह इतर २० देशांनी काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने १२ वर्षांपुढील कुमारवयीन मुलांचा समावेश असला तरी या देशांमध्ये २ वर्षांच्या पुढच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. फायजरसारख्या  लसींच्या इतर देशांतील लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण झाल्या असल्या तरी  भारतात या ट्रायल्स अजूनही सुरू आहेत. भारतातील पालक लहान मुलांसाठी कोरोना लस कधी उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा साहजिक असली तरी सहज करता येतील व उपलब्ध आहेत त्या गोष्टी लहान मुलांसाठी करायच्या राहून गेल्या आहेत. जी लस उपलब्ध आहे ती फक्त शास्त्रीय प्रयोग पूर्ण झालेले नाहीत म्हणून लहान मुलांना देता येत नाही. अशा लसीला ‘ऑर्फन व्हॅक्सिन’ किंवा ‘अनाथ लस’ असे म्हणतात. भारतात उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तिन्ही लसी अशाच लहान मुलांसाठी अनाथ ठरत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या लहान मुलांमधील शास्त्रीय प्रयोगांचा आढावा घ्यायचा झाल्यास फायजर, मॉडर्ना व सायनोफार्म या तीन लसींचे १२ ते १८ वर्षे वयोगटात प्रयोग यशस्वी झाले असून, त्यांची लहान मुलांमधील परिणामकारकता व सुरक्षितता ही मोठ्या व्यक्तींमध्ये आहे तेवढीच असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रायलमध्ये तर फायजर लसीचे प्रयोग हे ६ महिने ते १८ वर्षे या वयोगटात सुरू आहेत. म्हणूनच २० देशांत १२ वर्षांच्या पुढे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फायजरचे लहान मुलांसाठी ६ महिने वयाच्या पुढे प्रयोग शेवटच्या टप्प्यात आहेत व लवकरच पूर्ण होणार असल्याने तीही लस सर्वच लहान मुलांसाठी वापरता येईल, असे सांगितले जाते आहे.

भारतात सध्या ३ वर्षे ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीच्या वापराच्या प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसरा भाग नागपूर येथे सुरू आहे. यात मुलांना दुसरा डोस देऊन एक महिना झाला आहे. या प्रयोगाचे अधिकृत निकाल अजून जाहीर झाले नसले तरी या प्रयोगात सहभागी डॉक्टरांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे अजून कुठल्याही मुलावर कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. तसेच पहिल्या डोसनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी समाधानकारक आढळून आली आहे. हा अभ्यास पूर्ण होऊन त्याचे अंतिम निष्कर्ष जाहीर होण्यास तीन ते चार महिने व ते प्रकाशित होण्यास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता आहे. 
कोविशिल्डच्या लहान मुलांमधील ट्रायल्स इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आल्या होत्या; पण काही कारणास्तव त्या थांबविण्यात आल्या. स्पुतनिक या लसीच्या लहान मुलांसाठीच्या ट्रायल्स अजून कुठेही सुरू झालेल्या नाहीत.
– म्हणजे सध्या फक्त कोव्हॅक्सिनकडूनच लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. पण, या लसीचे उत्पादन खूप कमी आहे व ते अजून मोठ्या व्यक्तींनाच पुरेनासे झाले आहे. 

हान मुलांमध्ये कोरोनाचा आजार खूप सौम्य आहे म्हणून लसीकरणाची घाई करण्याची गरज नाही, असा केंद्र सरकारचा होरा आहे. लहान मुलांमध्ये आजार सौम्य असला तरी १५ वर्षांपुढील मुलांमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत आढळून आली आहे. तसेच इतर सर्व वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यावर चार ते सहा आठवड्यांनी एमआयएससी ही जीवघेणी गुंतागुंत दिसून येत आहे. मुलांमध्ये कोरोना व त्यानंतर गुंतागुंतीत मृत्युदर कमी असला तरी तो शून्य नाही. तसेच लहान मुले  लक्षणविरहित व सौम्य असल्याने घरातील इतर ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वांत मोठे स्रोत (सुपर स्प्रेडर) ठरतात. 

हर्ड इम्युनिटी (समूह / कळप प्रतिकारशक्ती)साठी देशातील ७० ते ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हावे लागते. देशात ० ते १४ या वयोगटात ३५.३ % व १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटात ४१ % लोकसंख्या आहे. या ४१ % लोकसंख्येच्या लसीकरणासाठी घाई न करता हर्ड इम्युनिटीचे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य आहे. 
‘सर्व जण सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही’ हे कोरोना लसीकरणाचे मुख्य सूत्र आहे. या ‘सर्व जण’चा महत्त्वाचा घटक असलेल्या लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याबाबतच्या हालचालींचा अत्यंत संथ वेग कोरोनाविरोधात सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

डॉक्टर की वेठबिगार

वेळेवर वेतन न मिळाल्याने एका प्राथमिक आरोग्य केंद्रातच डॉ गणेश शेळके या डॉक्टरने नुकतीच आत्महत्या केली. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने आरोग्य खात्यातील रिक्त जागा भरण्याचे आदेश देऊनही, अजून याबाबतीत यंत्रणेला जाग आल्याचे दिसत नाही. कोरोना साथीची तयारी म्हणून रुग्णालये, कोविड सेंटर उभारण्यापासून ते व्हेंटिलेटर खरेदीपर्यंत उपाययोजना शासनाने केल्या, पण या यंत्रणेचा आत्मा असलेले मनुष्यबळच नसेल, तर या रुग्णालयांचा व यंत्रसामग्रीचा विनियोगच होणार नाही. हा साधा प्रश्न आज आरोग्य खात्याला पडत नाही. जे मनुष्यबळ आहे, त्यांचेही नैतिक खच्चीकरण होत असून मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांनी आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या निवेदनाची साधी नोंदही कोणी घेण्यास तयार नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

आज राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसह विविध १८,६२९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच मंजूर पदांपैकी ३३ टक्के पदे रिक्त आहेत. वरिष्ठ पदांपैकी संचालक, आरोग्य संचालक, सह. संचालक, विशेषज्ज्ञ अशी विविध ३५५७ म्हणजेच ३२ टक्के पदे रिक्त आहेत. ही आकडेवारी मंजूर पदांप्रमाणे असली तरी, जी पदे मंजूर आहेत त्यातही मोठा गोंधळ आहे. मुळात लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय रुग्णालयात किती पदे असावीत, यावरून मंजूर पदांची संख्या काढूनही आता मोठा काळ उलटून गेला. रुग्णालय उभारणी व आरोग्य खात्यातील इतर काम हे १९९१ च्या बृहत्‌ आराखड्याप्रमाणे सुरू आहे. इतर सर्व खात्यात सरकारी नोकरीचे अप्रूप असताना, आरोग्य खात्यात मात्र डॉक्टर शासकीय सेवेत जाण्यास इच्छुक नाहीत. मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या बाबतीत घडत असलेल्या चुकाच त्याला कारणीभूत आहेत.

कोरोनासाठी साथीच्या काळात पदे भरण्यासाठी शासनाच्या तसेच विविध महानगरपालिकांच्या जाहिराती निघाल्या. यातील बऱ्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याच्या जाहिराती होत्या. काही ठिकाणी एम.डी. पदवीधर डॉक्टर तीन ते सहा महिने किंवा महामारी संपेपर्यंत, असा उल्लेख होता. उच्चशिक्षित एम.डी .डॉक्टर तीन ते सहा महिने किंवा अगदी वर्षभरासाठीही येणे अशक्य आहे. वैद्यकीय खात्यातील बऱ्याच जागा या ११ महिने कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरला आपल्या भवितव्याचा काहीही ठावठिकाणा शासकीय सेवेत दिसत नाही. एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर शिक्षणानंतर शासकीय सेवेचा करार म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरने बऱ्याचदा जागा व्यापलेल्या असतात. यापैकी एम.बी.बी.एस. डॉक्टर हा पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत असतो व पदव्युत्तर झालेला डॉक्टर आपल्या पुढील नियोजनात व्यस्त असल्याने त्याचेही सेवेत मन नसते. याउलट जे खरेच शासकीय सेवेसाठी इच्छुक असतात, अशांना नियुक्ती मिळणे अवघड असते. मिळाली तरी ती कायमस्वरूपी असेल, याची खात्री नसते. कमी व वेळेवर न मिळणारे वेतन हेदेखील शासकीय वैद्यकीय सेवेत न जाण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

आज एम.बी.बी.एस. होऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत. अशा मोठ्या बौद्धिक समूहाला त्यांची वैचारिक बैठक बदलण्याचे उपदेश करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून त्यांना सेवेकडे कसे आकर्षित करता येईल याच्या क्लुप्त्या योजणे जास्त शहाणपणाचे आहे. एम.बी.बी.एस. डॉक्टरला ५० ते ६० हजार, कायम असणाऱ्याला ८० हजार व एम.डी., एम.एस. डॉक्टरला एक लाखाच्या आसपास पगार! कोरोनाकाळात स्वतःच्या प्राणांची बाजी लावण्याची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवता येणार नाही. त्यातच कित्येक डॉक्टरांच्या कुटुंबांना पाच लाखाचा विमाही मिळालेला नसताना व काहींची कुटुंबं रस्त्यावर आलेली असताना, हा पगार व त्या प्रमाणात जीव गमावण्याची जोखीम पाहता, तिसाव्या वर्षी शिक्षण संपलेला तरुण डॉक्टर शासकीय सेवेत मिळणाऱ्या पगाराकडे आकर्षित होईल हे मानणे, कुठल्याच मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या तत्त्वात बसत नाही.

पगार हा मुद्दा बाजूला ठेवला तरी, एका चांगल्या डॉक्टरला प्रभावीपणे काम करण्यासाठी जे वर्क कल्चर व पोषक वातावरण लागते, त्याचाही शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात अभाव आहे. शासकीय सेवेत बराच वेळ बैठका, कार्यालयीन कामे, राजकीय नेत्यांची मनेे सांभाळणे यात खर्ची पडतो. बुद्धिवान व निष्णात डॉक्टरला इथे आपली हुशारी गंजून जाणार हे दिसत असते. प्रामाणिकपणे काम करणारे अनेक डॉक्टर शासकीय सेवेत आहेत. पण प्रत्येकाची व्यवस्थेने कशी परवड केली, याची वेगळी कहाणी आहे. केवळ एम.बी.बी.एस.च नव्हे, तर आयुष डॉक्टर, परिचारिका असे इतर घटकही शासकीय सेवेत समाधानी नाहीत. आयुष डॉक्टर गेली १० ते १२ वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करत असून एवढ्या वर्षात त्यांचे पगार १५ हजारांवरून ३३ हजार करण्यात आले आहेत. भरारी पथकातील मानसेवी डॉक्टरांचे वेतन २४ हजारांवरून ४० हजार करण्याचा निर्णय गेल्यावर्षी झाला, पण अजून त्याची अंमलबजावणी नाही. एकीकडे डॉक्टर आदिवासी व ग्रामीण भागात जात नाहीत म्हणून कंठशोष करायचा आणि दुसरीकडे तुटपुंजा पगारावर, कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांना वेठबिगारी पद्धतीने राबवून घ्यायचे, अशा भूमिकेने ग्रामीण भागात डॉक्टरांच्या अनुपलब्धतेचा प्रश्न कधीच सुटणार नाही.

अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांची ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आज मोठ्या प्रमाणावर भारतीय डॉक्टरांनी व परिचारिकांनी पेलून धरली आहे. याचे कारण फक्त आर्थिक नसून, त्यात असे कामासंबंधीचे अनेक घटक आहेत. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. तिसऱ्या लाटेच्या चर्चा सुरू असताना, रिक्त जागा भरताना शासनाला केवळ हंगामी नव्हे, तर व्यावहारिक आणि वास्तववादी दूरगामी उपाययोजना करावी लागणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

भारतावर लसीची भीक मागण्याची वेळ का?

भारतावर लसीची भीक मागण्याची वेळ का?

‘चीनने जगाला विषाणू दिलाय पण भारताने जगाला लस दिली’ अशी वाक्ये टाळ्या देत असली तरी, ‘लसी’चे वास्तव देशाच्या जिवाशी खेळणारे आहे!

सध्या सर्वांत उत्सुकतेचा विषय ठरलेली कोरोनाची लस सर्वसामान्य माणसाच्या दंडात टोचली जाण्यापूर्वी त्यामागे खूप मोठे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारण, अर्थकारण दडलेले असते.  भारतात स्वतःची एक लस, देशात उत्पादित होणारी दुसरी शिवाय एका परदेशी लसीला परवानगी दिली असली तरी  धोरण लकव्यामुळे लसीकरणाचा वेग खूप कमी आहे. गेल्या आठवड्यात तर हा आलेख खाली येताना दिसला. भारताच्या लसीकरण धोरणावर  आंतरराष्ट्रीय अर्थकारण, निर्णयांचा प्रभाव आहे. 

जागतिक पातळीवर  सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून  आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन ॲण्ड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन कार्यरत असते. मागास  राष्ट्रांनाही लस मिळावी हा या संस्थेचा मुख्य व  उदात्त हेतू आहे. यासाठी ‘गावी’ संस्थेला बिल ॲण्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून निधी मिळतो. यावरून लगेचच या निधी देणाऱ्या संस्थांच्या हेतूबद्दल शंका घेऊन टोकाची कन्सपायरसी थेअरी (कटाचा युक्तिवाद) मांडण्यात अर्थ नसला, तरी श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे  हे गणित नसते. गावी तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा भारतासारख्या देशाला लस निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा  एखाद्या कंपनीच्या लसीला जास्त अनुकूलता, शासनाला एखाद्या लसीची खरेदी करण्यासाठी मेहेरनजर करायला लावणे आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे व अलिखित हेतू असतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 कोरोनाच्या लसीसाठी ‘गावी’ने सीरम इन्स्टिट्यूटला आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरम इन्स्टिट्यूटने  कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०० दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार केला आहे. ‘गावी’व्यतिरिक्त सीरम इन्स्टिट्यूटला  भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. ‘गावी’च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले आहेत. आश्चर्य म्हणजे या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. ‘चीनने जगाला विषाणू दिला पण भारताने जगाला लस दिली,’ अशी वाक्ये  पंतप्रधान मोदींना देशात व परदेशात टाळ्या मिळविण्यासाठीही  बरी आहेत; पण यामागचे आर्थिक व धोरणात्मक वास्तव देशाच्या जीवाशी खेळणारे आहे. ते कसे हे समजून घेऊ. 


आज सीरम इन्स्टिट्यूट व भारताला लसीकरण धोरणाच्या बाबतीत ‘गावी’ या सावकाराला कुर्निसात करावे लागत आहेत. भारताच्या लसीकरण धोरणावर ‘गावी’चा अंमल असतो. अमेरिका, इंग्लंड, चीन, रशिया यांनी लस निर्मितीच्या बाबतीत वेगळे धोरण अवलंबिले आहे. “सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,” असे ‘गावी’ म्हणत असताना अमेरिका व इंग्लंडने नोव्हेंबरमध्येच लस बनवणाऱ्या  कंपन्यांना –  त्यातही फायजर, मॉडर्ना व जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी डॉलर्स देऊन बहुतांश डोस ‘प्री बुक’ केले.  रशिया, चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज जगात  १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील ८५ % लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५० % व इंग्लंडने ६० % लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे.  सरसकट लसीकरणाला झालेला उशीर ‘गावी’च्या कर्जाखाली दबल्यामुळे अप्रत्यक्षपणे होतो आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर टोचणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी माघारी परतताना दिसत आहे. लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची रोखलेली निर्यात   अमेरिकेने काही प्रमाणात खुली केली, हा त्यातल्या त्यात दिलासा!- अशा परिस्थितीत भारताने नेमकी काय भूमिका घ्यावी? ‘गावी’मध्ये आपली उपस्थिती ठेवण्यावाचून सध्या गत्यंतर नाही. पण, आता अडकलो तसे गावीच्या करारात भारताने अडकू नये.  

स्वतःची लस जास्तीतजास्त स्वतः वापरणे, परदेशी लसीच्या वेगाने खरेदीपासून सर्वच लसीकरण धोरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रभावातून भारताला बाहेर पडावे लागेल. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लसनिर्मितीतील सहभाग आज  केवळ १० % आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी ‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली बहुतांश निधी हा खाजगी कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे. मुळात हाफकिन इन्स्टिट्यूट – मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट – कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट – कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट – चेन्नई या भारत सरकारच्या लस बनवणाऱ्या संस्थांचा आपल्याला पूर्ण विसर पडला आहे.  

भारताने  या संस्थांचे पुनरुज्जीवन केले तर धोरण ठरवताना व लस मिळवताना देशाला कोणाच्या पाया पडण्याची गरज भासणार नाही. तसेच निधी व धोरण निश्चितीसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि ‘गावी’वरचे अवलंबित्व कमी होईल.   भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना त्यांनी डॉ. हाफकिन यांना कॉलराची लस बनविण्यासाठी खास भारतात बोलावून घेतले होते. आज इंग्रज त्यांच्या देशात हे करत आहेत; पण भारत मात्र स्वतंत्र होऊनही लसीच्या बाबतीत अद्याप पारतंत्र्यातच आहे. 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.