“नीट’ नेटके करण्यासाठी…

नीट' नेटके करण्यासाठी...

-डॉ. अमोल अन्नदाते

“नीट’ नेटके करण्यासाठी… तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी त्यांच्या राज्यात “नीट’ परीक्षा रद्द करून वैद्यकीय प्रवेशाचे सर्व हक्क हे राज्य सरकारांना देण्याविषयी मोहिम सुरू केली असून बिगर भाजप शासित १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना “नीट’ रद्द करण्याच्या मागणीला पाठींबा देण्याची विनंती केली आहे. हा विषय जसा शैक्षणिक आहे तसाच राजकीय देखील आहे आणि स्टॅलीन यांची भूमिका योग्य की अयोग्य हे समजून घेण्यासाठी “नीट’ ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा सुरु का झाली याबरोबरीने वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीत प्रांतवादाचा इतिहास तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी “नीट’ परीक्षा रद्द करून वैद्यकीय प्रवेशाचे सर्व हक्क हे राज्य सरकारांना देण्याविषयी तमिळनाडूच्या विधानसभेत ठराव संमत करून घेतला आणि बिगर भाजप शासित १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नीट रद्द करण्याच्या मागणीला पाठींबा देण्याची विनंती केली आहे. “नीट’ मुळे ग्रामीण तसेच वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नाही आणि “नीट’ची कठीण्य पातळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी मिळत नसल्याने वैद्यकीय प्रवेशांच्या बाबतीत अन्याय करणारी आहे असा तमिळनाडू सरकारचा दावा आहे. हा विषय जसा शैक्षणिक आहे तसाच राजकीय देखील आहे आणि स्टॅलीन यांची भूमिका योग्य की अयोग्य हे समजून घेण्यासाठी “नीट’ ही राष्ट्रीय प्रवेश परीक्षा सुरु का झाली याबरोबरीने वैद्यकीय प्रवेशाच्या बाबतीत प्रांतवादाचा इतिहास तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे.

दक्षिणेकडील राज्ये ही नेहमीच प्रांतवादाचा समर्थन करत आली आहेत. तिथल्या राजकारणाचा गाभाच प्रांतवादाचा आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक वैद्यकीय महाविद्यालये ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आणि तमिळनाडू या चार राज्यांमध्ये आहेत. म्हणूनच दक्षिणेतील राज्य आम्हाला इतर राज्यात प्रवेश नको आणि आम्हीही इतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका आळवत आले आहेत. “नीट’ प्रवेश परीक्षा सुरु होण्याआधी प्रत्येक राज्य त्यांच्या शासकीय प्रवेशासाठी वेगळी परीक्षा तर घेत असतच याशिवाय एम्स, पिजीआय चंडीगड, माहे-मणिपाल, जीपमेर-पॉंडीचेरी, सीएमसी-वेल्लोर, अलीगड मुस्लीम विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज ही देशभर पसरलेली वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जासाठी नावाजलेली विविध शासकीय संस्था वैद्यकीय प्रवेशासाठी त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेत असत. या शिवाय देशभरातील विविध अभिमत विद्यापीठेदेखील त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेत असत. महराष्ट्रात तर यात अजूनच गोंधळ होता. महराष्ट्रातील १२ अभिमत विद्यापीठे त्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेताना त्या विद्यापीठांच्या शाखाही परत वेगळ्या परीक्षा घेत असत. म्हणजे डी वाय पाटील विद्यापीठाच्या पुणे, मुंबई, कोल्हापूर या तीन ठिकाणी असलेल्या कॉलेजसाठी हे विद्यापीठ तीन वेगवेगळ्या परीक्षा घेत. म्हणजे राज्यातील एका विद्यार्थ्याला एका महिन्यात २० ते २५ प्रवेश परीक्षांचा पर्याय होता. तसेच अभिमत विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा ते स्वतःच घेत असल्याने त्यांच्या पारदर्शकतेवर ही वेळोवेळी शंका उपस्थित होत असे. यामुळे अनेक वर्षे ‘वन नेशन-वन एक्झाम‘ म्हणजेच सर्व प्रवेशांसाठी एकच परीक्षेची मागणी अनेक वर्षे होत होती. ती अखेर “नीट’च्या रूपाने पूर्ण झाली ज्यामुळे किमान विद्यार्थ्यांची अनेक परीक्षा देण्याची धावपळ तरी थांबली.

ज्या दोन प्रश्नांवरून सध्या “नीट’ रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या. “नीट’ रद्द करण्याचा पहिला युक्तिवाद आहे की या राष्ट्रीय परीक्षेमुळे घटनेने राज्य सरकारला दिलेल्या अधिकारांवर गदा येते आहे. परंतू परीक्षा राष्ट्रीय असली तरी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ही संबंधित राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचलनालयच करते आणि प्रत्येक राज्यातील ८५ % जागा या त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. केवळ १५ % जागेवर इतर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश असल्याने राज्याच्या हक्कांवर फार मोठी गदा येते आहे असे मुळीच नाही. या १५ % जागा ही आम्हाला द्यायच्या नाहीत हे राज्यांनी म्हणणे दुराग्रही आहे कारण त्याने देशभरतील इतर दर्जेदार महाविद्यालयांची दारे आपल्याच राज्याच्या विद्यार्थ्यांना कायमची बंद होणार आहेत. महाराष्ट्राचाच विचार करायचा झाला तर इतर राज्याच्या १५ % कोट्यातूनही बरेच महाराष्ट्रातील विद्यार्थी परत महाराष्ट्रातच प्रवेश मिळवतात तसेच इतर राज्यातही १५ % कोट्यातून प्रवेश मिळवणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांची संख्या विपुल आहे. म्हणून किमान आपल्या राज्यासाठी तरी “नीट’ फायदेशीर आहे.

“नीट’ नेटके करण्यासाठी… दुसरा महत्वाचा प्रश्न आहे “नीट’ची कठीण्य पातळी आणि यात ग्रामीण-वंचित घटकांच्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान. हे टाळण्यासाठी “नीट’ परीक्षा मराठीसह एकूण १३ स्थानिक भाषेत घेतली जाते. तरीही काही ग्रामीण भागातील विद्यार्थी या परीक्षेतील पात्रता असूनही यश मिळवू शकत नाहीत. पण याचा संबंध हा “नीट’ परीक्षेपेक्षाही ग्रामीण भागातील शैक्षणिक संधी व त्याची गुणवत्ता उंचावण्याशी आहे. मी स्वतः माध्यमिक शिक्षण तालुका पातळीवर पूर्ण करून पुढे लातूरसारख्या ग्रामीण भागात निर्माण झालेल्या “लातूर पॅटर्न’मधून बारावीला राज्यात सर्व प्रथम आलो आणि पीसीबी ग्रुप मध्ये ९९.९ टक्के गुण मिळवले. यावरून हे सिद्ध होते की ग्रामीण भागात जर शिक्षणाच्या उत्तम संधी निर्माण झाल्या तर कुठलाही विद्यार्थी आर्थिक, स्थानिक, ग्रामीण अशा भेदभावामुळे वंचित राहणार नाही. आज ही लातूरचे विद्यार्थी सातत्याने “नीट’ मध्ये यश मिळवण्यात आघाडीवर आहेत. अहमदपूर, नांदेड, अंदूरचे आलुरे गुरुजी यांचे प्रयोग, हातवळने बंधू -भगिनी या ग्रामीण भागातून प्रथ्म आलेल्यांची यशोगाथा असे कितीतरी दाखले देता येतील. याला दुसरा पर्याय म्हणजे तालुका पातळीवर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला राज्य सरकार त्यांच्या राज्यात काही जागा राखून ठेवू शकतात. पण जागा राखून ठेवणे आणि “नीट’ मधून अंग काढून घेणे हे या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती मलमपट्टी ठरू शकते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ज्ञानगंगा व शैक्षणिक संधी शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाणे हेच यावर दूरगामी व शाश्वत उत्तर आहे. “नीट’ मधून अंग काढून आपण वैद्यकीय प्रवेशापुरता प्रश्न मार्गी लावू पण आयआयटी, जेईई, स्पर्धा परीक्षा, प्रदेशातील युएस एमएमई, प्लॅब, इसीएफएमजी, जीआरई या परीक्षांच्या बाबतीत आपण काय भूमिका घेणार आहोत? विद्यार्थ्याला स्वतःच्या राज्यापुरते मर्यादित ठेवून त्याला आपण शैक्षणिक दृष्ट्या संकुचित राहण्याची आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून अंग चोरण्याची सवय लावणार आहोत हे विसरून चालणार नाही.

“नीट’ नेटके करण्यासाठी… जर वैद्यकीय प्रवेशासाठी प्रांतवादाचा मुद्दा रेटायचाच असेल आणि त्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना जास्त जागा उपलब्ध करून द्यायच्या असतील तर त्यासाठी इतर चांगले व सोपे पर्याय आहेत. राज्यातील १२ अभिमत विद्यापीठात २२०० एमबीबीएसच्या जागा आहेत. या सगळ्या जागा पूर्ण देशातील विद्यार्थ्यांना खुल्या आहेत. त्यापैकी १५ % अनिवासी भारतीय व ८५ % देशातील सर्व विद्यार्थ्यांना खुल्या आहे. यात राज्य सरकारने १२ अभिमत विद्यापीठांच्या पातळीवर चर्चा करून काही टक्के जागा या राज्यासाठी मागून घ्याव्या. सर्व १२ विद्यापीठे सहमत झाली तर त्यांची तशी मागणी केंद्र सरकार मान्य करेल आणि यात त्यांचे कुठेही नुकसान होणार नाही. राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक जागा उपलब्ध होतील. तसेच इतर खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या १५ % कोटा व्यवस्थापन स्वत: डोनेशन घेऊन भरू शकते. मी माझ्या नर्सिंग महाविद्यालयाच्या सर्व व्यवस्थापनाच्या वाट्याला आलेल्या डोनेशन घेऊन भरण्याच्या जागा स्वेच्छेने राज्य सरकारकडे सुपूर्द करून टाकल्या आहेत. अगदी असे नाही तर या व्यवस्थापनाच्या १५ % पैकी ५० % म्हणजे एकूण ७.५ % जागा या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना (डोनेशन घेऊनच) देण्याचा समझोता राज्य सरकारने खाजगी महाविद्यालयांशी करावा. अशा प्रकारे “नीट’ मध्ये आपले अस्तित्व ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढवत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामावून घेणे, “नीट’च्या माध्यमातून इतर राज्यातही आपले विद्यार्थी कसे जास्त पात्र ठरतील यासाठी प्रयत्न करणे व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये, अभिमत विद्यापीठांशी प्रेमपूर्ण समझोता करत त्यांच्या जास्तीत जास्त जागा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पदरात पाडून घेणे ही भूमिका “नीट’ विरोधापेक्षा जास्त समंजसपणाची आणि फायद्याची ठरेल.

– डॉ. अमोल अन्नदाते
www. amolannadate.com
reachme@amolannadate.com

शाळा पूर्ण वेळ हव्यात

School should be full time

राज्यात शहरी भागात आठवी ते दहावी, तर ग्रामीण भागात पाचवी ते दहावी शाळा सुरु झाल्या असल्या तर हे जस उशिराने सुचलेले शहानपण आहे तसे अर्धवट शहाणपण ही आहे. दुसरी लाट ओसरल्यावर तीन महिन्यांपूर्वी  झालेल्या सिरो सर्वे ( एकूण बाधित झालेल्या लोकांचे सर्वेक्षण ) मध्ये ७० ते ८० % मुले बाधित झाल्याचे निष्कर्ष हाती आले. या आधारावर शाळा सुरु करण्याचे निर्देश आयसीएमआरने तेव्हाच दिले होते. उशीरा का होईना शाळा सुरु झाल्या पण या  धोरणात एका महत्वाच्या शास्त्रीय निरीक्षणाकडे कानाडोळा करण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग सौम्य स्वरूपाचा असतो हे स्पष्ट झाले आहे पण या सोबत जितक कमी वय तितका संसर्ग अधिक सौम्य हे निरीक्षण ही महत्वाचे आहे. त्यामुळे शाळा सुरु करताना आधी बालवाडी पासून ते पाचवी पर्यंतचे वर्ग सुरु होणे अपेक्षित आहेत. पण नेमके हेच वर्ग व ज्या वयोगटाला सगळ्यात कमी धोका त्यांचेच वर्ग बंद ठेवण्याचे सध्याचे धोरण अनाकलनीय आहे. आता खर तर काही निश्चित मार्गदर्शक तत्वे अनुसरून शहरी व ग्रामीण असं कुठला ही भेदभाव न करता सरसकट राज्यातील सर्व शाळांचे सर्व वर्ग उघडण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सरसकट सर्व शाळा उघडण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे संशोधनात हे आता सिद्ध झाले कि शाळे मुळे लहान मुलेच नव्हे तर त्यांच्या मुळे घरातील मोठ्या व्यक्तीना होण्यार्या संसार्गात अशी कुठलीही विशेष भर पडताना दिसत नाही. अनलॉक नंतर शाळा बंद असल्या तरी पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे , मॉल अशा सर्व गर्दीच्या ठिकणी लहान मुलांचा मुक्त संचार सुरु आहेच. तो मोठ्यांचा ही असल्याने त्यांना संसर्ग व्हायचाच तर याही ठिकाणी होऊ शकेल. म्हणून शाळा पूर्ण व सर्व वर्ग न उघडण्यासाठी घरातील ज्येष्ठांच्या संसर्गाचे कारण फसवे व वैद्यकीय दृष्ट्या न पटणारे आहे. तसेच अनेक ठिकाणी काही मुले शाळेत व काही ऑनलाईन अशी पद्धतीने शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना संपण्याचा मुहूर्त शोधत अर्धवट ऑनलाईन शिक्षण देणाऱ्यांनी आता एकदाचे ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे पूर्ण विसर्जन करणे गरजेचे आहे.
            कुठले ही सार्वजनिक आरोग्याचे धोरण राबवताना त्याचे रिस्क – बेनीफिट रेशो तपासावे लागते. म्हणजेच शाळा बंद ठेवण्याची जोखीम विरुद्ध फायदा हा हिशोब मांडणे गरजेचे असते .  शाळेचे सर्व वर्ग व पूर्णवेळ सुरु होण्याचे व त्यातच प्राथमिक शाळेचे वर्ग सुरु होण्याचे तोटे सध्या जास्त आहेत व लहान मुलांच्या मानसिक व शैक्षणिक आयुष्यावर दूरगामी परिणाम करणारे आहेत. शाळेतील अक्षर ओळख हा पहिल्या ५ वर्षात फक्त शैक्षणिकच नव्हे तर मानसिक वाढीचा व शाळेत सवंगड्यांसोबत खेळणे , रमणे , जुळवून घेणे हा सामाजिक  वाढीचा महत्वाचा टप्पा असतो. सध्या ३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांच्या आयुष्यातून  हा टप्पा पूर्णपणे वगळला गेला असल्याने आता अजून त्याला उशीर करणे हे दिवसागणिक अधिक घातक ठरणार आहे. तसेच ही मुले शाळेत परततील तेव्हा त्यांच्या मानसिक जडणघडणी साठी विशेष व वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या दोन वर्षात ३ ते १० वर्षे वयोगटातील मुलांमध्ये शाळा बंद असल्याने मानसिक समस्या , मानसिक कारणे असलेल्या शारीरिक समस्या ( सायको – सोमॅटीक आजार ) अति चंचलता, स्व मग्नता , टी व्ही व मोबाईल स्क्रीनचे व्यसन असे अनेक आजार कधी नव्हते एवढे वाढीस लागले आहेत. या पैकी कुठल्या ही आजारावर आम्हा बालरोगतज्ञांकडे निश्चित असे औषध नसले तरी शाळेचे सर्व वर्ग सुरु करणे हे यावर प्रभावी औषध ठरू शकते.
                जेवढा उत्साह शाळा सुरु करण्यासाठी गरजेचा आहे त्या पेक्षा दुप्पट उत्साह हा कोरोना प्रतिबंधाची मार्गदर्शक तत्वे तयार करून ती राबवण्यास आवश्यक आहे. जरी लहान मुलां मध्ये कोरोना सौम्य असला व त्यानंतर काही आठवड्यांनी होणाऱ्या एमआय एस्सी या काहीशा गंभीर गुंतागुंतीचे प्रमाण अत्यल्प असले तरी ही कोरोना प्रतिबंधाला शाळेत सर्वोच्च प्राधान्य द्यावेच लागणार आहे. कारण अशी एकही केस पालक व विद्यार्थ्यांचे मनोधर्य खच्ची करणारी ठरू शकते. या साठी शाळेत साधा सोपा कोरोना प्रतिबंधाचा ७ कलमी कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे. १. सर्व मुलांना व शाळेतील शिक्षकांना  फ्लू चे लसीकरण अनिवार्य करावे २. शाळेतील सर्व शिक्षकांचे व सर्व मुलांच्या घरातील मोठ्या व्यक्तींचे कोरोना लसीकरण झालेले असावे ३. मधल्या सुट्टीत मुलांना एकत्रित बसून न जेवण्याची सक्ती असावी 4. मुलांना मास्कच्या योग्य वापरा विषयी शिकवून शाळेत मास्कचा वापर अनिवार्य असावा ५. मुलाला सर्दी, खोकला, ताप असेल किंवा घरी कोणीही कोरोनाचा रुग्ण असेल तर त्याला १० दिवस शाळेत पाठवू नये ६. सर्व मुलांना विटामिन डी ६०,००० IU दर आठवड्याला या प्रमाणे ६ आठवडे विटामिन डी द्यावे ७. मुलांचे इंडियन अॅकॅडमी ऑफ पिडायट्रीक्स या बालरोगज्ञांच्या संघटनेने सुचवलेल्या लसीकरणाच्या वेळापत्रका प्रमाणे सर्व लसीकरण पूर्ण झालेले असावे. ही तत्वे काटेकोरपणे पाळल्यास शाळेतून कोरोना संसर्गाचे प्रमाण शून्यावर येणे सहज शक्य आहे.
                अनेक वर्षां पासून राज्यात स्कूल हेल्थ प्रोग्राम म्हणजे शालेय आरोग्य कार्यक्रम हा केवळ कागदावरच अस्तितवात आहे. आता कोरोना साथीच्या युगात मात्र या कार्यक्रमाने कात टाकून , त्यात कोरोनाच्या दृष्टीने बदल करून तो राबवण्याची वेळ आली आहे. कोरोनाच नव्हे तर इतर अनेक आजारांचे निदान व उपचार हे शाळेतच शक्य आहेत. म्हणून आता शालेय आरोग्य केंद्र प्रत्येक शाळेने विकसित करून एका बालरोग तज्ञाला या कार्यक्रमात समावून घेतल्यास कोरोनाची भीती अजून कमी होण्यास मदत होईल. काही ठिकाणी शाळा सुरु झाल्या तरी पालक मुलांना शाळेत पाठवण्यास घाबरत आहेत. पण शाळा पूर्णवेळ व सर्व वर्ग सुरु करायच्या असतील तर शाळाच नव्हे तर प्रशासन व पालक या दोन्ही घटकांनी भीती मनातून काढून टाकायल हवी.  आरोग्य शिक्षणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी अनेक वर्षे होते आहे. कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य शिक्षणाचा समावेश अभ्यासक्रम करून चांगले आरोग्य संस्कार असलेली पिढी पुडे येईल.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता.

डॉ. अमोल अन्नदाते
reachme@amolannadate.com
www.amolannadate.com

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

लहान मुलांना लस देणे का गरजेचे आहे?

अमेरिका, जपान, सिंगापूरसह इतर २० देशांनी काही महिन्यांपूर्वीच लहान मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने १२ वर्षांपुढील कुमारवयीन मुलांचा समावेश असला तरी या देशांमध्ये २ वर्षांच्या पुढच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार आहे. फायजरसारख्या  लसींच्या इतर देशांतील लहान मुलांवरील क्लिनिकल ट्रायल्स पूर्ण झाल्या असल्या तरी  भारतात या ट्रायल्स अजूनही सुरू आहेत. भारतातील पालक लहान मुलांसाठी कोरोना लस कधी उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा साहजिक असली तरी सहज करता येतील व उपलब्ध आहेत त्या गोष्टी लहान मुलांसाठी करायच्या राहून गेल्या आहेत. जी लस उपलब्ध आहे ती फक्त शास्त्रीय प्रयोग पूर्ण झालेले नाहीत म्हणून लहान मुलांना देता येत नाही. अशा लसीला ‘ऑर्फन व्हॅक्सिन’ किंवा ‘अनाथ लस’ असे म्हणतात. भारतात उपलब्ध असलेल्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक या तिन्ही लसी अशाच लहान मुलांसाठी अनाथ ठरत आहेत.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

सध्या जगभरात उपलब्ध असलेल्या कोरोना लसीच्या लहान मुलांमधील शास्त्रीय प्रयोगांचा आढावा घ्यायचा झाल्यास फायजर, मॉडर्ना व सायनोफार्म या तीन लसींचे १२ ते १८ वर्षे वयोगटात प्रयोग यशस्वी झाले असून, त्यांची लहान मुलांमधील परिणामकारकता व सुरक्षितता ही मोठ्या व्यक्तींमध्ये आहे तेवढीच असल्याचे सिद्ध झाले आहे. इस्रायलमध्ये तर फायजर लसीचे प्रयोग हे ६ महिने ते १८ वर्षे या वयोगटात सुरू आहेत. म्हणूनच २० देशांत १२ वर्षांच्या पुढे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. फायजरचे लहान मुलांसाठी ६ महिने वयाच्या पुढे प्रयोग शेवटच्या टप्प्यात आहेत व लवकरच पूर्ण होणार असल्याने तीही लस सर्वच लहान मुलांसाठी वापरता येईल, असे सांगितले जाते आहे.

भारतात सध्या ३ वर्षे ते १८ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीच्या वापराच्या प्रयोगाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसरा भाग नागपूर येथे सुरू आहे. यात मुलांना दुसरा डोस देऊन एक महिना झाला आहे. या प्रयोगाचे अधिकृत निकाल अजून जाहीर झाले नसले तरी या प्रयोगात सहभागी डॉक्टरांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे अजून कुठल्याही मुलावर कुठलेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. तसेच पहिल्या डोसनंतर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजची पातळी समाधानकारक आढळून आली आहे. हा अभ्यास पूर्ण होऊन त्याचे अंतिम निष्कर्ष जाहीर होण्यास तीन ते चार महिने व ते प्रकाशित होण्यास आणखी तीन महिने लागण्याची शक्यता आहे. 
कोविशिल्डच्या लहान मुलांमधील ट्रायल्स इंग्लंडमध्ये सुरू करण्यात आल्या होत्या; पण काही कारणास्तव त्या थांबविण्यात आल्या. स्पुतनिक या लसीच्या लहान मुलांसाठीच्या ट्रायल्स अजून कुठेही सुरू झालेल्या नाहीत.
– म्हणजे सध्या फक्त कोव्हॅक्सिनकडूनच लहान मुलांच्या लसीकरणाच्या दृष्टीने अपेक्षा आहेत. पण, या लसीचे उत्पादन खूप कमी आहे व ते अजून मोठ्या व्यक्तींनाच पुरेनासे झाले आहे. 

हान मुलांमध्ये कोरोनाचा आजार खूप सौम्य आहे म्हणून लसीकरणाची घाई करण्याची गरज नाही, असा केंद्र सरकारचा होरा आहे. लहान मुलांमध्ये आजार सौम्य असला तरी १५ वर्षांपुढील मुलांमध्ये काही प्रमाणात गुंतागुंत आढळून आली आहे. तसेच इतर सर्व वयोगटातील लहान मुलांमध्ये कोरोना होऊन गेल्यावर चार ते सहा आठवड्यांनी एमआयएससी ही जीवघेणी गुंतागुंत दिसून येत आहे. मुलांमध्ये कोरोना व त्यानंतर गुंतागुंतीत मृत्युदर कमी असला तरी तो शून्य नाही. तसेच लहान मुले  लक्षणविरहित व सौम्य असल्याने घरातील इतर ज्येष्ठांसाठी संसर्गाचा सर्वांत मोठे स्रोत (सुपर स्प्रेडर) ठरतात. 

हर्ड इम्युनिटी (समूह / कळप प्रतिकारशक्ती)साठी देशातील ७० ते ८० टक्के लोकसंख्येचे लसीकरण व्हावे लागते. देशात ० ते १४ या वयोगटात ३५.३ % व १८ वर्षांपर्यंतच्या वयोगटात ४१ % लोकसंख्या आहे. या ४१ % लोकसंख्येच्या लसीकरणासाठी घाई न करता हर्ड इम्युनिटीचे उद्दिष्ट साध्य होणे अशक्य आहे. 
‘सर्व जण सुरक्षित नाहीत, तोपर्यंत कोणीच सुरक्षित नाही’ हे कोरोना लसीकरणाचे मुख्य सूत्र आहे. या ‘सर्व जण’चा महत्त्वाचा घटक असलेल्या लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्याबाबतच्या हालचालींचा अत्यंत संथ वेग कोरोनाविरोधात सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

डॉक्टर की वेठबिगार

वेळेवर वेतन न मिळाल्याने एका प्राथमिक आरोग्य केंद्रातच डॉ गणेश शेळके या डॉक्टरने नुकतीच आत्महत्या केली. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने आरोग्य खात्यातील रिक्त जागा भरण्याचे आदेश देऊनही, अजून याबाबतीत यंत्रणेला जाग आल्याचे दिसत नाही. कोरोना साथीची तयारी म्हणून रुग्णालये, कोविड सेंटर उभारण्यापासून ते व्हेंटिलेटर खरेदीपर्यंत उपाययोजना शासनाने केल्या, पण या यंत्रणेचा आत्मा असलेले मनुष्यबळच नसेल, तर या रुग्णालयांचा व यंत्रसामग्रीचा विनियोगच होणार नाही. हा साधा प्रश्न आज आरोग्य खात्याला पडत नाही. जे मनुष्यबळ आहे, त्यांचेही नैतिक खच्चीकरण होत असून मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांनी आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या निवेदनाची साधी नोंदही कोणी घेण्यास तयार नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

आज राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसह विविध १८,६२९ पदे रिक्त आहेत. म्हणजेच मंजूर पदांपैकी ३३ टक्के पदे रिक्त आहेत. वरिष्ठ पदांपैकी संचालक, आरोग्य संचालक, सह. संचालक, विशेषज्ज्ञ अशी विविध ३५५७ म्हणजेच ३२ टक्के पदे रिक्त आहेत. ही आकडेवारी मंजूर पदांप्रमाणे असली तरी, जी पदे मंजूर आहेत त्यातही मोठा गोंधळ आहे. मुळात लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय रुग्णालयात किती पदे असावीत, यावरून मंजूर पदांची संख्या काढूनही आता मोठा काळ उलटून गेला. रुग्णालय उभारणी व आरोग्य खात्यातील इतर काम हे १९९१ च्या बृहत्‌ आराखड्याप्रमाणे सुरू आहे. इतर सर्व खात्यात सरकारी नोकरीचे अप्रूप असताना, आरोग्य खात्यात मात्र डॉक्टर शासकीय सेवेत जाण्यास इच्छुक नाहीत. मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या बाबतीत घडत असलेल्या चुकाच त्याला कारणीभूत आहेत.

कोरोनासाठी साथीच्या काळात पदे भरण्यासाठी शासनाच्या तसेच विविध महानगरपालिकांच्या जाहिराती निघाल्या. यातील बऱ्याच ठिकाणी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्याच्या जाहिराती होत्या. काही ठिकाणी एम.डी. पदवीधर डॉक्टर तीन ते सहा महिने किंवा महामारी संपेपर्यंत, असा उल्लेख होता. उच्चशिक्षित एम.डी .डॉक्टर तीन ते सहा महिने किंवा अगदी वर्षभरासाठीही येणे अशक्य आहे. वैद्यकीय खात्यातील बऱ्याच जागा या ११ महिने कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात. त्यामुळे अशा पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरला आपल्या भवितव्याचा काहीही ठावठिकाणा शासकीय सेवेत दिसत नाही. एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर शिक्षणानंतर शासकीय सेवेचा करार म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टरने बऱ्याचदा जागा व्यापलेल्या असतात. यापैकी एम.बी.बी.एस. डॉक्टर हा पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत असतो व पदव्युत्तर झालेला डॉक्टर आपल्या पुढील नियोजनात व्यस्त असल्याने त्याचेही सेवेत मन नसते. याउलट जे खरेच शासकीय सेवेसाठी इच्छुक असतात, अशांना नियुक्ती मिळणे अवघड असते. मिळाली तरी ती कायमस्वरूपी असेल, याची खात्री नसते. कमी व वेळेवर न मिळणारे वेतन हेदेखील शासकीय वैद्यकीय सेवेत न जाण्याचे महत्त्वाचे कारण आहे.

आज एम.बी.बी.एस. होऊन बाहेर पडणाऱ्या डॉक्टरच्या आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या आहेत. अशा मोठ्या बौद्धिक समूहाला त्यांची वैचारिक बैठक बदलण्याचे उपदेश करण्यापेक्षा त्यांच्याशी जुळवून त्यांना सेवेकडे कसे आकर्षित करता येईल याच्या क्लुप्त्या योजणे जास्त शहाणपणाचे आहे. एम.बी.बी.एस. डॉक्टरला ५० ते ६० हजार, कायम असणाऱ्याला ८० हजार व एम.डी., एम.एस. डॉक्टरला एक लाखाच्या आसपास पगार! कोरोनाकाळात स्वतःच्या प्राणांची बाजी लावण्याची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवता येणार नाही. त्यातच कित्येक डॉक्टरांच्या कुटुंबांना पाच लाखाचा विमाही मिळालेला नसताना व काहींची कुटुंबं रस्त्यावर आलेली असताना, हा पगार व त्या प्रमाणात जीव गमावण्याची जोखीम पाहता, तिसाव्या वर्षी शिक्षण संपलेला तरुण डॉक्टर शासकीय सेवेत मिळणाऱ्या पगाराकडे आकर्षित होईल हे मानणे, कुठल्याच मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या तत्त्वात बसत नाही.

पगार हा मुद्दा बाजूला ठेवला तरी, एका चांगल्या डॉक्टरला प्रभावीपणे काम करण्यासाठी जे वर्क कल्चर व पोषक वातावरण लागते, त्याचाही शासकीय सेवेत मोठ्या प्रमाणात अभाव आहे. शासकीय सेवेत बराच वेळ बैठका, कार्यालयीन कामे, राजकीय नेत्यांची मनेे सांभाळणे यात खर्ची पडतो. बुद्धिवान व निष्णात डॉक्टरला इथे आपली हुशारी गंजून जाणार हे दिसत असते. प्रामाणिकपणे काम करणारे अनेक डॉक्टर शासकीय सेवेत आहेत. पण प्रत्येकाची व्यवस्थेने कशी परवड केली, याची वेगळी कहाणी आहे. केवळ एम.बी.बी.एस.च नव्हे, तर आयुष डॉक्टर, परिचारिका असे इतर घटकही शासकीय सेवेत समाधानी नाहीत. आयुष डॉक्टर गेली १० ते १२ वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करत असून एवढ्या वर्षात त्यांचे पगार १५ हजारांवरून ३३ हजार करण्यात आले आहेत. भरारी पथकातील मानसेवी डॉक्टरांचे वेतन २४ हजारांवरून ४० हजार करण्याचा निर्णय गेल्यावर्षी झाला, पण अजून त्याची अंमलबजावणी नाही. एकीकडे डॉक्टर आदिवासी व ग्रामीण भागात जात नाहीत म्हणून कंठशोष करायचा आणि दुसरीकडे तुटपुंजा पगारावर, कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांना वेठबिगारी पद्धतीने राबवून घ्यायचे, अशा भूमिकेने ग्रामीण भागात डॉक्टरांच्या अनुपलब्धतेचा प्रश्न कधीच सुटणार नाही.

अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांची ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आज मोठ्या प्रमाणावर भारतीय डॉक्टरांनी व परिचारिकांनी पेलून धरली आहे. याचे कारण फक्त आर्थिक नसून, त्यात असे कामासंबंधीचे अनेक घटक आहेत. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही. तिसऱ्या लाटेच्या चर्चा सुरू असताना, रिक्त जागा भरताना शासनाला केवळ हंगामी नव्हे, तर व्यावहारिक आणि वास्तववादी दूरगामी उपाययोजना करावी लागणार आहे.

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

भारतावर लसीची भीक मागण्याची वेळ का?

भारतावर लसीची भीक मागण्याची वेळ का?

‘चीनने जगाला विषाणू दिलाय पण भारताने जगाला लस दिली’ अशी वाक्ये टाळ्या देत असली तरी, ‘लसी’चे वास्तव देशाच्या जिवाशी खेळणारे आहे!

सध्या सर्वांत उत्सुकतेचा विषय ठरलेली कोरोनाची लस सर्वसामान्य माणसाच्या दंडात टोचली जाण्यापूर्वी त्यामागे खूप मोठे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय राजकारण, अर्थकारण दडलेले असते.  भारतात स्वतःची एक लस, देशात उत्पादित होणारी दुसरी शिवाय एका परदेशी लसीला परवानगी दिली असली तरी  धोरण लकव्यामुळे लसीकरणाचा वेग खूप कमी आहे. गेल्या आठवड्यात तर हा आलेख खाली येताना दिसला. भारताच्या लसीकरण धोरणावर  आंतरराष्ट्रीय अर्थकारण, निर्णयांचा प्रभाव आहे. 

जागतिक पातळीवर  सर्वच लसींचे समान वाटप व्हावे व लसीकरणाचे प्रमाण वाढून  आजारांचे उच्चाटन व्हावे म्हणून GAVI (ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन ॲण्ड इम्युनायजेशन) ही शिखर संस्था जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न होऊन कार्यरत असते. मागास  राष्ट्रांनाही लस मिळावी हा या संस्थेचा मुख्य व  उदात्त हेतू आहे. यासाठी ‘गावी’ संस्थेला बिल ॲण्ड मिलिंडा गेट्स फाउंडेशनसारख्या अनेक बलाढ्य सेवाभावी संस्थांकडून निधी मिळतो. यावरून लगेचच या निधी देणाऱ्या संस्थांच्या हेतूबद्दल शंका घेऊन टोकाची कन्सपायरसी थेअरी (कटाचा युक्तिवाद) मांडण्यात अर्थ नसला, तरी श्रीमंत देशांनी निधी दिला आणि गरीब राष्ट्रांना लसी मिळाल्या एवढे सोपे  हे गणित नसते. गावी तसेच निधी पुरवठा करणाऱ्या संस्था जेव्हा भारतासारख्या देशाला लस निर्मितीसाठी निधी देतात तेव्हा  एखाद्या कंपनीच्या लसीला जास्त अनुकूलता, शासनाला एखाद्या लसीची खरेदी करण्यासाठी मेहेरनजर करायला लावणे आणि अविकसित, मागास देशातील लसीकरण कार्यक्रम ठरवताना तो श्रीमंत व विकसित राष्ट्रांना कसा फायदेशीर ठरेल हे पाहणे असे छुपे, न दिसणारे व अलिखित हेतू असतात.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

 कोरोनाच्या लसीसाठी ‘गावी’ने सीरम इन्स्टिट्यूटला आगाऊ खरेदीची हमी म्हणून ३०० अब्ज डॉलर्सचे अर्थसाहाय्य दिले आहे. त्याबदल्यात सीरम इन्स्टिट्यूटने  कमी उत्पन्नाच्या ९२ देशांना जूनपर्यंत १०० दशलक्ष डोसेस देण्याचा कायदेशीर करार केला आहे. ‘गावी’व्यतिरिक्त सीरम इन्स्टिट्यूटला  भारत सरकारकडून ३ हजार कोटींचे अर्थसाहाय्य मिळाले आहे. ‘गावी’च्या कराराअंतर्गत ७६ देशांना ६०.४ दशलक्ष डोसेस आजवर सीरमने दिले आहेत. आश्चर्य म्हणजे या लसी दिलेल्या देशांमध्ये सौदी अरेबियासारखे श्रीमंत आखाती देशही आहेत. ‘चीनने जगाला विषाणू दिला पण भारताने जगाला लस दिली,’ अशी वाक्ये  पंतप्रधान मोदींना देशात व परदेशात टाळ्या मिळविण्यासाठीही  बरी आहेत; पण यामागचे आर्थिक व धोरणात्मक वास्तव देशाच्या जीवाशी खेळणारे आहे. ते कसे हे समजून घेऊ. 


आज सीरम इन्स्टिट्यूट व भारताला लसीकरण धोरणाच्या बाबतीत ‘गावी’ या सावकाराला कुर्निसात करावे लागत आहेत. भारताच्या लसीकरण धोरणावर ‘गावी’चा अंमल असतो. अमेरिका, इंग्लंड, चीन, रशिया यांनी लस निर्मितीच्या बाबतीत वेगळे धोरण अवलंबिले आहे. “सगळी श्रीमंत व गरीब राष्ट्रे मिळून एकत्रित लस खरेदी करू,” असे ‘गावी’ म्हणत असताना अमेरिका व इंग्लंडने नोव्हेंबरमध्येच लस बनवणाऱ्या  कंपन्यांना –  त्यातही फायजर, मॉडर्ना व जॉन्सन ॲण्ड जॉन्सन या तीन मुख्य कंपन्यांना अब्जावधी डॉलर्स देऊन बहुतांश डोस ‘प्री बुक’ केले.  रशिया, चीनने स्वतःच्या बळावर देशी लसी बनविल्या. यामुळे आज जगात  १४ % लोकसंख्या असलेल्या देशांकडे जगातील ८५ % लससाठा उपलब्ध आहे. अमेरिकेने ५० % व इंग्लंडने ६० % लोकसंख्येला पहिला डोस दिला आहे.

भारतात एक डोस मिळालेल्यांचे प्रमाण ५.२ % व दोन्ही डोस मिळालेल्यांचे प्रमाण १ % एवढे कमी आहे.  सरसकट लसीकरणाला झालेला उशीर ‘गावी’च्या कर्जाखाली दबल्यामुळे अप्रत्यक्षपणे होतो आहे. ज्या देशातून जी मिळेल ती लस खरेदी करणे आणि प्रत्येकाला शक्य तितक्या लवकर टोचणे आवश्यक असताना, भारतात लसीकरण केंद्रांवरून अनेक जण लसीअभावी माघारी परतताना दिसत आहे. लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची रोखलेली निर्यात   अमेरिकेने काही प्रमाणात खुली केली, हा त्यातल्या त्यात दिलासा!- अशा परिस्थितीत भारताने नेमकी काय भूमिका घ्यावी? ‘गावी’मध्ये आपली उपस्थिती ठेवण्यावाचून सध्या गत्यंतर नाही. पण, आता अडकलो तसे गावीच्या करारात भारताने अडकू नये.  

स्वतःची लस जास्तीतजास्त स्वतः वापरणे, परदेशी लसीच्या वेगाने खरेदीपासून सर्वच लसीकरण धोरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रभावातून भारताला बाहेर पडावे लागेल. भारत बायोटेक या काही अंशी देशी संस्थेचा लसनिर्मितीतील सहभाग आज  केवळ १० % आहे. भारताने १० हजार कोटी रुपये हे अर्थसंकल्पात लसीसाठी निश्चित केले आहेत. पण यापैकी ‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली बहुतांश निधी हा खाजगी कंपन्या व परदेशी लसी खरेदीसाठी खर्ची पडणार आहे. मुळात हाफकिन इन्स्टिट्यूट – मुंबई, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट – कसौली, पाश्चर इन्स्टिट्यूट – कुन्नूर, किंग इन्स्टिट्यूट – चेन्नई या भारत सरकारच्या लस बनवणाऱ्या संस्थांचा आपल्याला पूर्ण विसर पडला आहे.  

भारताने  या संस्थांचे पुनरुज्जीवन केले तर धोरण ठरवताना व लस मिळवताना देशाला कोणाच्या पाया पडण्याची गरज भासणार नाही. तसेच निधी व धोरण निश्चितीसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि ‘गावी’वरचे अवलंबित्व कमी होईल.   भारतावर ब्रिटिशांचे राज्य असताना त्यांनी डॉ. हाफकिन यांना कॉलराची लस बनविण्यासाठी खास भारतात बोलावून घेतले होते. आज इंग्रज त्यांच्या देशात हे करत आहेत; पण भारत मात्र स्वतंत्र होऊनही लसीच्या बाबतीत अद्याप पारतंत्र्यातच आहे. 

सदरील माहिती आपण लोकमत मध्येही वाचू शकता.

रेमडेसिव्हिर गायब का होते?

रेमडेसिव्हिर गायब का होते

रेमडेसिव्हिर गायब का होते? रेमडेसिव्हिर हे औषध लाल फितीत अडकत चालले आहे. रुग्णांना ज्या पहिल्या नऊ दिवसांत किंवा डॉक्टरांचा निर्णय झाल्यावर त्वरित मिळणे अपेक्षित आहे, नेमके तेव्हा ते मिळत नाही. गैरव्यवस्थापन, काळा बाजार व प्रशासकीय खाक्यामुळे हे औषध देण्याचा सुवर्णकाळ हातून निसटतो आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण व नातेवाइकांना ज्या गोष्टींमुळे मानसिक-आर्थिक मनस्ताप झाला, त्यापैकी एक म्हणजे रेमडेसिव्हिरचा तुटवडा व काळाबाजार. ‘लवकरच रेमडेसिव्हिर मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल,’ हे सरकारने सांगूनही आता काही महिने झाले. रेमडेसिव्हिरच्या आधी दोन लाख ६९ हजार व नंतर चार लाख ३५ हजार कुप्या मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभारही मानले. एवढे होऊनही सरकारने ठरवून दिलेल्या किमान ९०० ते कमाल ३५०० रुपये या किमतीत ते किती रुग्णांना मिळाले? अनेकांना ते ‘काळ्या बाजारात’ २५ हजारांपासून ते एक लाखापर्यंत प्रती व्हायल इतक्या चढ्या दराने घ्यावे लागत आहे.

गरज असलेल्या रुग्णांपैकी केवळ पाच टक्के रुग्णांना रेमडेसिव्हिर मूळ किमतीत मिळते आहे, उर्वरित ९५ टक्के ग्राहकांना काळ्या बाजारात चढ्या दराने घ्यावे लागते आहे. तीन महिने उलटूनही सरकारला या औषधाची विक्री सुरळीत का करता आली नाही, काळ्या बाजाराची पाळेमुळे का खणून काढता आली नाही, या प्रश्नांच्या उत्तरातच दुसरा प्रश्न उपस्थित होतो, रेमडेसिव्हिर मिळणे दुरापास्त झाले, की मुद्दाम तसे केले गेले?

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रेमडेसिव्हिर गायब का होते? रेमडेसिव्हिरच्या तुटवड्यावर सरकारने दोन तोडगे शोधले. पहिला, नेहमीप्रमाणे अन्न व औषध प्रशासन आयुक्तांची बदली. ‘गरज नसलेल्या रुग्णांना हे लिहून दिले जाते आहे,’ हे कारण सांगत सरकारने यावर अजब शक्कल लढवली. औषध कंपन्यांकडून मिळणारे सर्व रेमडेसिव्हिर हे अन्न व औषध प्रशासनाने ताब्यात घेतले. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून थेट रुग्णालयांना पुरवठा सुरू झाला. त्यानंतरही काळा बाजार थांबला नाही; कारण रुग्णालयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मागणी केलेली संख्या व त्यांना कार्यालयाकडून मिळणाऱ्या कुप्यांची संख्या यात मोठी तफावत असल्याने मागणी व पुरवठा यातील अंतर वाढले व काळा बाजार कायम राहिला. रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात मागणी व पुरवठा असमतोल का निर्माण झाला, हे समजून घेणेही गरजेचे आहे. एकीकडे राज्य सरकार व टास्क फोर्सने ठरवून दिलेल्या उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मध्यम व तीव्र, म्हणजे ढोबळपणे ऑक्सिजनची पातळी ९४च्या खाली असल्यास रेमडेसिव्हिर सुरू करण्याचे निर्देश आहेत. याशिवाय ठरवून दिलेल्या पाच प्रमुख स्थितीतच रेमडेसिव्हिर वापरावे, असे निर्देशही डॉक्टरांना आहेत. सध्या राज्यातल्या सहा लाख ९८ हजार ३५४ रुग्णांपैकी २० ते ३० टक्के रुग्णांना प्राणवायू व मार्गदर्शक तत्त्वांनुसार रेमडेसिव्हिर देणे आवश्यक ठरते. सध्या गंभीर व मध्यम स्वरूपाचे रुग्णच रुग्णालयात दाखल आहेत. यातील बहुतेकांना रेमडेसिव्हिर देणे आवश्यक आहे; पण अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला, रुग्णालयात दाखल असलेल्या सक्रिय रुग्णांपैकी दहा टक्के रुग्णांसाठी प्रत्येकी एक व्हायल देण्याचा आदेश दिला आहे. बऱ्याचदा यापेक्षाही कमी व्हायल मिळतात. दाखल रुग्णांपैकी १० टक्के रुग्णांना रेमडेसिव्हिर हे सूत्र उपचारांच्या मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत तर नाहीच; पण सौम्य रुग्ण कोव्हिड केअर सेंटरला आणि मध्यम; तसेच गंभीर रुग्ण डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालयात या आरोग्य खात्याने ठरवलेल्या धोरणाचा संपूर्ण विसर अन्न-औषध प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयांना पडलेला दिसतो.

आरोग्य खात्याने ठरवून दिलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर नाकारून, सरकारने त्याच्या काळ्या बाजाराला एक कारण मिळवून दिले. सध्या सौम्यच काय, मध्यम व गंभीर रुग्णांनाही कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यास जागा नाही. यावरून रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण रेमडेसिव्हिरची गरज असलेले की नसलेले, हा किमान सोपा अंदाज तरी सरकारने बांधावा. गरजेपेक्षा कमी रेमडेसिव्हिर मिळाल्यानंतर घडणारे प्रकार जास्त संतापजनक आहेत. ‘तुमच्या रुग्णासाठी आमच्याकडे रेमडेसिव्हिर नाही,’ असे रुग्णालयाने सांगितल्यावर, ज्यांच्या ओळखी आहेत ते आपले संपर्कजाळे वापरून जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळवतात, असे दिसून आले आहे. अशा प्रकारे कमी गरज असलेल्यांची नावे रेमडेसिव्हिर मिळालेल्यांच्या ‘गुणवत्ता यादीत’ कधी कधी झळकतात व तातडीची गरज असलेल्या रुग्णाचे नाव यादीत नसते. सर्व रेमडेसिव्हिर जर सरकारच्या व अन्न-औषध प्रशासनाच्या ताब्यात असेल, तर ते काळ्या बाजारात येते कुठून? गळती कुठे आहे, हे अनाकलनीय आहे. काळा बाजार करणाऱ्यांचे फोन नंबर, संपर्क खुलेआम उपलब्ध असणे, ५० टक्के रेमडेसिव्हिर काळ्या बाजारात विकले जात असूनही त्याचा कुठेही मोठा साठा जप्त न होणे, हे सगळे प्रकार कमालीचे संशयास्पद आहेत. ते मिळणे दुरापास्त झाले की केले गेले, हा प्रश्न विचारणे म्हणूनच भाग पडत आहे.

‘रेमडेसिव्हिरने मृत्यूदरात काहीही फरक पडत नाही, हे क्लिनिकल ट्रायल्समध्ये समोर आले आहे, तरीही डॉक्टर उगाच रेमडेसिव्हिर लिहून देतात,’ असा प्रचार हे एकच वैज्ञानिक अर्धसत्य वापरून केला जातो. रेमडेसिव्हिरच्या तुटवड्याबाबत, ते लिहून देणाऱ्या डॉक्टरांकडे बोट दाखवून पळ काढता येणार नाही. रेमडेसिव्हिर पूर्णपणे निरुपयोगी असते, तर ते सरकार व टास्क फोर्सच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भाग राहिले नसते. या औषधाने अतिदक्षता विभागातील एक व वॉर्डमधील तीन दिवस कमी होतात, हे काहींबाबत सिद्ध झाले आहे. असा कमी झालेला प्रत्येक दिवस रुग्णाच्या मृत्यूची शक्यता कमी करतो. शिवाय, आज रुग्णशय्यांचा तीव्र तुटवडा असताना व रुग्ण प्राणवायूच्या प्रतीक्षेत रस्त्यावर प्राण सोडत असताना, रोज ६० हजार रुग्णांचे पाच दिवस कमी झाले, तर प्रतीक्षा रांगेतील हजारो रुग्णांना खाटा मिळतील आणि त्यांचे प्राण वाचतील. हा या औषधाचा व्यापक परिणाम आहे. रेमडेसिव्हिर हे रामबाण नसले, तरी गंभीर रुग्णांच्या उपचारातील महत्त्वाचा बाण जरूर आहे. हा उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा व्यावहारिक अनुभव दुर्लक्षून चालणार नाही. काही विशिष्ट रुग्णांना याचे चांगले परिणाम अनुभवास येत आहेत.

म्हणूनच सध्या कुठल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर द्यायचे या विषयी, अन्न-औषध प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवला पहिजे. हे औषध सरकारी खाक्याप्रमाणे लाल फितीत अडकत चालले आहे; त्यामुळे रुग्णांना ज्या पहिल्या नऊ दिवसांत किंवा हे औषध देण्याचा डॉक्टरांचा निर्णय झाल्यावर लवकरात लवकर मिळणे अपेक्षित आहे, नेमके तेव्हा मिळत नाही. रेमडेसिव्हिर उपलब्ध असूनही गैरव्यवस्थापन, काळा बाजार व प्रशासकीय खाक्यामुळे हे औषध देण्याचा सुरुवातीचा सुवर्णकाळ अनेकदा हातून निसटतो. शिवसेनेसारखा आक्रमक बाण्याचा, रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या असलेला व राष्ट्रवादी काँग्रेससारखा चाणाक्ष, प्रशासकीय खाचाखोचा माहिती असलेला पक्ष सत्तेत असूनही, एका साध्या औषधाचा काळा बाजार सरकार थोपवू शकत नाही, हे आश्चर्य आहे.

सदरील माहिती आपण महाराष्ट्र टाईम्स मध्येही वाचू शकता.

कोरोना संसर्गाचे ‘पंढरपूर आणि पश्चिम बंगाल मॉडेल’

कोरोना संसर्गाचे ‘पंढरपूर आणि पश्चिम बंगाल मॉडेल’

पंढरपूर मध्ये जंगी प्रचारसभा झाल्यावर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, तेथील सभा ऐकून नेत्यांच्या भाषणात टाळ्या शिट्या वाजवणारी सर्व सामान्य जनता, सध्या मोठ्या प्रमाणावर ‘कोरोना संसर्गि’त होऊन रूग्णालयात बेड शोधत फिरते आहे. त्यांचे नातेवाईक रेमडिसीवीर साठी छाती फुटेस्तोवर भटकंती करत आहेत. हीच स्थिती पश्चिम बंगाल मध्येही आहे , तिथले आकडे अजून पुरेसे बाहेर येताना दिसत नाहीत. मात्र तिथेही आतली खरी स्थिती कळल्यावर निवडणूक आयोगाने काही निर्बंध लादले. या प्रचारसभा सुरु असताना राज्यात व देशात अनेक ठिकाणी ‘कडक निर्बंध’ अशी एक नवीन संज्ञा निर्माण केली गेली. मुंबईत मुख्यमंत्र्यांचे ‘कडक निर्बंध’ वाले फेसबुक लाईव्ह सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे नेते जाहीर कार्यक्रम , उद्घाटने यांचे फेसबुक लाईव्ह करत होते. मुख्यमंत्री इकडे कडक निर्बंध जाहीर करतात , दुसरीकडे एका सत्ताधारी मुख्य असे मंत्री सांगतात – “ त्या ठिकाणी निवडणूक आहे तिथे नियम सैल असायला हवे “. पश्चिम बंगालमध्ये मास्क शिवाय काढलेल्या रॅली विषयी भाजपचे एक राष्ट्रीय नेते म्हणाले कि ‘आम्हाला वाटत नाही रॅली मुळे संसर्ग वाढला आहे’. परत एकमेकांकडे बोट दाखवत ते शेण खाताय आम्हीही खाऊ म्हणत हात झटकायला मोकळे. प्रचार सभा गाजवताना प्रेतांसाठी स्मशानभूमी कमी पडते आहे याचे कोणाला ही भान राहिले नाही. सर्वच पक्षांचे नेते दुसऱ्या लाटेत असा प्रचार करत होते की जणू काही कोरोनाने निवडणूक आयोगाला निवेदन देऊन ‘आम्ही या भागात जाणार नाही’ असे जाहीर केले आहे.

हातावर पोट असलेला फेरीवाला , चहाची टपरी चालवणारे, शेतकरी यांना मात्र, कोरोनाचे कारण दाखवून औषध , बेड शिवाय घरात उपाशी बसवणारे ‘जीआर’ मात्र रोज काढले जात होते. लोकांच्या बेशिस्तीचे समर्थन करता येणार नाही, पण दुसऱ्या लाटेत हजारांच्या सभा भरवणारे हेच नेते सांगणार – काय करणार, जनता बेजबाबदारपणे वागत असल्यावर लॉकडाउन लावावाच लागणार. चुकून नेत्यांना त्यांच्याच सभा वगैरे घेण्याबदल प्रश्न विचारले की ‘तुम्हाला एवढंच दिसत का? ’ म्हणून चिडायचं किंवा ‘आम्ही कुठे बोलावलंय लोकांना, ते स्वतःच आले.’ सर्वसामान्य जनता एवढे होऊनही सभांना गर्दी करतच होती. आपण कोरोनाच्या गर्दीच्या सापळ्यात अडकून मरणार आहोत ही साधी गोष्टही न कळणारे सर्वसामान्य परत कोरोनाने गेलेल्यांच्या श्रद्धांजलीच्या बोर्डावर याच नेत्यांचे फोटो टाकतात. दुसरी लाट सुरु झाली तेव्हा पंढरपूर आणि पश्चिम बंगाल दोन्ही निवडणुकीचे प्रचार वेगळ्या पद्धतीने होतील असे वाटले होते. पण कोण जास्त थोर – मूर्ख बनवणारे की मुर्खात निघणारे, असे सगळीकडे चित्र होते. स्वतःला मोठे नेते म्हणवून घेणाऱ्या या नेत्यांचा मोठेपणा नेमका कोणत्या खात्यात लिहायचा तेच कळत नाही. आवडत्या लोकनेत्यांनी एकमेकांना दिलेली  टोपणनावे, शिव्या मतदार इतके गर्दी करून ऐकत होते की या शिव्यांच्या दर्जावरच जणू काही कोणाला निवडून द्यायचे हे ते ठरवणार आहेत. हा प्रचाराचा मनोरंजनाचा खेळ चघळत असताना, हेच कार्यकर्ते किंवा मतदार आजारी पडल्यावर जेंव्हा त्यांना बेड मिळणार नाही तेव्हा या लोकनेत्याच्या घरी गेले तर या नेत्यांच्या बंगल्यावरची कुत्री त्यांना आतमध्ये तरी शिरू देईल का? हा साधा प्रश्न ही या सर्व सामान्य जनतेच्या मनात येत नाही.

पंढरपूर , बंगाल मध्ये जे झाले ते उद्या आपल्या गावातही होऊ शकते. आपल्या गावात कोरोना नको असेल तर आधी एक करा – आमच्या गावात एक वर्षभर कोरोनाचा एकही रुग्ण सापडत नाही  व गावात प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मिळत नाही तो पर्यंत एकही सभा घेण्यास परवानगी नाही,  असे फलक गावात वेशीवर लावा. असे करायचे नसेल तर ही दुसरी लाट इतकी भयानक आहे की गावात ‘भावपूर्ण श्रद्धांजली’चे किती बोर्ड्स तयार ठेवावे लागतील याचा हिशोब करत बसा.   

  • डॉ. अमोल अन्नदाते

बावीस गेले, अजून किती?

बावीस गेले, अजून किती?

बावीस गेले, अजून किती ?

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक

२२ जीव गेले , द्या ना पाच लाख प्रत्येकी

प्रेतं जाळायला सरपण कमी पडू देणार नाही

किंबहुना प्रेतांना सरपण मिळायलाच हवं, मिळेलच , का मिळू नये ?

ऑक्सिजन पाहिजे ? लष्कराचं विमान येईल ना

ऑक्सिजन प्लांट लावा , ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घ्या म्हणताय ?

घेऊ ना लवकरच,

आधी कॅबिनेट बैठक संपू द्या

मग अधिकाऱ्यांची मीटिंग ,

मग टेंडर ,

मग खरेदी

तो पर्यंत किती बरे झाले?

ते पण एकदा बघा ना

रेमडीसिवीर?

अरे आहे ना

काळ्या बाजारात मिळतंय की हवं तेवढं

बेड मिळत नाही?

मग लॉकडाऊन लावू या ना

पंढरपूर निवडणुकीची सभा तर संपू द्या

बेडसाठी कडक निर्बंध लावू ना

आयसीयू बेड वाढवायचे ?

कशासाठी ? अरे हा मर्दांचा महाराष्ट्र आहे …

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरायच्या ?

स्मशानजोग्यांच्या ही भरुया …

किंबहुना भरायलाच हव्या

बोलूया ना फेसबुक लाइव्ह मध्ये

अॅम्बुलन्सची कमतरता

तोच अभ्यास करायला तर आमदारांना मोफत लॅपटॉप दिले

भूमिपूजन , झालं ना … पुतळा तर कधीच झाला ..

कोरोना मृतांचं स्मारक त्याहून मोठं करू

ऑक्सिजन अभावी गेलेल्यांना त्यात विशेष जागा देऊ

निवडणूक या मुद्द्यावर होईल असं वाटत नाही

बराच वेळ आहे अजून

तोपर्यंत घडेल काही तरी मुद्द्यांचं , तेव्हा ठरवू काही करायचं का …

नाशिक ऑक्सिजन मृतांच्या

जाती बघायच्या राहिल्या

पत्रकार परिषदेत तोच मुद्दा उचला

पॉलिटिकल नॅरेटिव्ह एवढ्या वर्षात कसा कळत नाही तुम्हाला

अहो हा शाहू, फुले, आंबेडकर , शिवरायांचा महाराष्ट्र आहे

ऑक्सिजन , बेड , रेमडीसीवीर येईल कि दुसऱ्या राज्यातून

“लवकरच”

तोपर्यंत तीन नियम विसरू नका

निर्लज्जपणाचा मास्क लावा , जमेल तस दुसर्या लाटेत वारंवार हात धुवून घ्या, समाज,

समस्या आणि उपायांपासून सामाजिक अंतर पाळा

बाकी चालू द्या…

ए स्कोर काय झाला रे?

आज आयपीएलच्या दोन मॅच आहेत ना??

डॉ अमोल अन्नदाते

रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही

रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही

रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही सध्या रेमडीसिवीरचा तुटवडा , यासाठी मेडिकल समोर रांगा आणि या औषधा साठी दाही दिशा धावणारे नातेवाईक असे चित्र आहे. डॉक्टरांनी द्यायला सांगितलेले हे औषध मिळवण्याचा प्रयत्न जरूर करा पण या विज्ञानिक गोष्टी समजून घ्या.

   रेमडीसिवीरचा उपयोग हा लक्षणे सुरु झाल्यावर पहिल्या १० दिवसात केल्यास प्रयोगांमध्ये असे दिसून आले आहे कि याचा मृत्यू दर कमी करण्यावर काही विशेष परिणाम नाही पण रुग्णालयातले दिवस ३ ते ५ दिवस  व लक्षणे कमी करण्यास मात्र उपयोग आहे. मग मृत्यू टळणार नसेल तर डॉक्टर हे औषध का देत आहेत? कुठल्या ही मेडिकल ट्रायलच्या निकालांचे विश्लेषण करण्याची एक पद्धत असते. मृत्यूचा कमी होणारा आकडा सांख्यिकी दृष्ट्या कमी आहे व नोंद घेण्या जोगा नाही असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे मनसेचा किंवा शेकापचा विधानसभेत एकच आमदार आहे अरे पण एक तरी आहे ना असा हा अर्थ समजावून सांगता येईल. म्हणजे रेमडीसिवीरने  कदाचित ६ वाचत असतील पण ६० वाचत नाहीत. पण जसे १०० पैकी कुठल्या ३ लोकांचा कोरोनाने मृत्यू होणार हे निश्चितपणे सांगता येत नाही, तसेच कुठले ६ रेमडीसिवीरने वाचणार हे ही निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यातच ज्या रुग्णांचे वय जास्त आहे, ज्यांना डायबेटीस , उच्च रक्तदाब, हृदयरोग आहे त्यांना वाचवण्यात दिलेल्या प्रत्येक गोष्टीची मदत होते. त्यापैकी रेमडीसिवीर आहे. हे औषध अर्ध्या हळकुंडात पिवळे असले तरी सध्या रेमडीसिवीर, टोकलीझुमॅब, स्टीरॉईड असे अनेक अर्धे अर्धे पिवळे करणारे हळकुंडाचे  तुकडे एकत्र करून रुग्ण व उपचार शक्य तितके पिवळे – यशस्वी करण्याची प्रयत्नांची शर्थ डॉक्टर करत आहेत. यातला ३ ते ५ दिवस लक्षणे कमी करण्याचा फायदा अशा साथीत कसा होतो ते समजून घ्या. आज बेड शिवाय व ऑक्सिजन शिवाय लोक रस्त्यावर तडफडून मरत असताना १००० रुग्णांचे ३ ते ५ दिवसांनी लक्षणे कमी होऊन ती घरी गेली कि पुढील प्रतीक्षेत असलेल्या १००० रुग्णांसाठी बेड उपलब्ध होतो आणि त्यांना लवकर उपचार सुरु झाल्या मुळे ते वाचतात. तुम्हाला वाटेल त्यांना वाचवायला मी कशाला रेमडीसिवीर घेऊ ? कारण तो रुग्ण तुमचा भाऊ , वडील , बायको , मुल कोणीही असू शकत. मागचा रुग्ण रेमडीसिवीर घेऊन ३ दिवस लवकर घरी गेला म्हणून तुम्हाला / तुमच्या नातेवाईकाला बेड मोकळा झाला हे विसरता येणार नाही.

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

रेमडीसिवीरची ५ मुख्य इंडीकेशन्स आहेत –

  • सिटी स्कॅन स्कोर ८ पेक्षा जास्त
  • सिटी स्कॅन स्कोर ८ पेक्षा कमी पण फुफुसाचा काही भाग कडक होणे. – कोंसॉलीदेशन
  •  न्युमोनिया
  • ऑक्सिजन न लावता ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा कमी असणे.
  • वयोवृद्ध रुग्णात इतर आजारासह १०१ च्या पुढे ताप आहे.

ही मुख्य ५ कारणे सोडून यातल्या काही गोष्टींची सरमिसळ किंवा आजार झपाट्याने वाढत असल्याची किंवा कुठली एखादी तपासणी तीव्रता दर्शवत असल्यास सहाव कारण हे डॉक्टरांच्या सिक्स्थ सेन्स साठी सोडाव लागत.

सध्या रुग्णांची संख्याच जास्त असल्याने मुख्य ५ कारणांमध्ये बसणाऱ्या रुग्णांची संख्याच जास्त आहे ही डॉक्टरांची बाजू रुग्णांनी समजून घ्यावी व खाजगी रुग्णालयात उगीचच फायदा नसताना रेमडीसिवीर देत आहेत हा गैरसमज मनातून काढून टाकावा.

रेमडीसिवीर बद्दल अंतिम सत्य – रेमडीसिवीर बहोत कुछ है लेकीन सब कुछ नही सध्या अत्यवस्थ कोविड रुग्ण वाचवण्यासाठी ऑक्सिजन , लो मोल्युकेलार वेट हिपॅरीन, स्टीरॉईड, रेमडीसिवीर, टोकलीझुमॅब हे आम्हा डॉक्टरांच्या भात्यातील ५ मुख्य बाण आहेत. यातले कुठले ही रामबाण नाही पण त्या त्या परिस्थितीत तो तो बाण उपयोगी पडतो. बाहुबलीच्या पोस्टरमधील देवसेना व बाहुबली एकत्रित पकडलेला तीन बाणांचा धनुष्य तुम्हाला आठवत असेल. असेच आम्हा डॉक्टरांच्या हातातल्या धनुष्यातील ५ बाण एकत्रित  किंवा कुठलेही तीन बाण सोडल्यास किमान काही रुग्णांना वाचवण्यात आम्हाला यश येते आहे. आज प्रेतांच्या अंत्य संस्काराला सरणपण ही मिळत नसल्याची भयानक परिस्थिती काही ठिकाणी असताना काहीही करा पण रुग्ण वाचवा अशी डॉक्टरांची मनस्थिती आहे आणि म्हणून रेमडीसिवीरचा वापर डॉक्टरांना अपरिहार्य आहे. पुढच्या क्षणाला रेमडीसिवीर मिळाल नाही तर रुग्ण लगेच दगावेल का ? नाही पण तो अशा स्थितीत आहे कि रेमडीसिवीर दिल्याने तो वाचण्याची शक्यता वाढेल. हा शब्दांचा खेळ नाही , वैज्ञानिक सत्य आहे. मग आपण काय करायचे ? डॉक्टरांवर विश्वास ठेवून रेमडीसिवीर आणायला सांगितले तर प्रयत्न करायचे , मिळाले नाही तर सगळे संपले अशी भावना मनात आणून मुळीच हतबद्ध व्हायचे नाही, खचून जायचे नाही , कुठे रे रेमडीसिवीरचा काळा बाजार सुरु असेल तर तो उघड्यावर आणायचा व त्या विषयी दाद मागायची, शासनाकडे रेमडीसीवर मुबलक प्रमाणात मिळावे म्हणून जनरेटा वाढवायचा.

डॉ. अमोल अन्नदाते

डॉ. अमोल अन्नदाते यांचे लेख वाचा

तारतम्याचा लॉकडाऊन

तारतम्याचा लॉकडाऊन

तारतम्याचा लॉकडाऊन राज्यात कोरोनाची दुसरी लाट ऐन भरात असताना कोरोना सोबत लॉकडाऊनची ही साथ झपाट्याने पसरत चालली आहे. शनिवार, रविवार बंद, रात्रीची संचारबंदी, सात ते ९ दिवसांचे लॉकडाऊन, जिल्हाबंदी, स्थानिक पातळीवर ठरवली जाणारी कितीही दिवसांचे लॉकडाऊन अशा विविध स्वरूपात कोरोना संसर्ग रोखण्याचे अवैज्ञानिक प्रयोग सुरु आहेत. या सर्व लॉकडाऊनचा फोलपणा, यामागील वैद्यकीय सत्ये आणि जगभर झालेले संशोधन, प्रयोग लक्षात न घेता अशी अनागोंदी शासन प्रशासनाने माजवणे थांबवून कोरोना उपाययोजनेत तारतम्याचा लॉकडाऊन रोखण्याचा संकल्प साथीच्या वर्ष पूर्तीच्या निमित्ताने करायला हवा.

       आता लॉकडाऊन  हा शब्द शासन व प्रशासनाने आपल्या शब्दकोशातून काढण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे या जटील शब्दाची जागा घेण्यासाठी आपल्या हाती ‘लस’ हा साधा, सोपा, प्रभावी शब्द उपलब्ध आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या दोन्ही लसी या कोरोना व गंभीर आजार टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी असताना लसीकरणाची गती ही अत्यंत संथ व वैशिष्टपूर्ण सरकारी कार्यालयीन गतीने सुरु आहे. याउलट लॉकडाऊन  मात्र रामबाण उपाय असल्यासारखे तत्परतेन जाहीर केले जात आहेत. या धोरणातील विरोधाभास म्हणजे लॉकडाऊन चा लसीकरणावर दुष्परिणाम होतो आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना लस देणे हे दुसऱ्या लाटेला प्रभावी उत्तर असू शकते. पण लॉकडाऊन  असलेल्या ठिकाणी लसीकरण केंद्रांवर ही सामसूम असते. मुळात आपल्याला लॉकडाऊन ची सवय झाल्या मुळे जगात साथ सुरु झाली तेव्हा व भारतात ही पहिले लॉकडाऊन  केले गेले तेव्हा लॉकडाऊन चा मूळ हेतू काय होता हेच आपण विसरून गेलो आहोत. आजार नवीन आहे म्हणून उपचार नीट माहित नाहीत व संकट नीट माहित नाही म्हणून तयारी करण्यासाठी थोडा वेळ मागून घेण्यास व अचानक खूप रुग्ण वाढल्यास तेवढे आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत या कारणामुळे मागच्या वर्षी पहिल्या लॉकडाऊन चे समर्थन योग्य होते. आज एक वर्ष उलटूनही राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. राज्यात येत्या आठवड्यात ३ लाख सक्रीय केसेस असतील अशी शक्यता आहे. साधाराण कोरोनाचे ८ % रुग्ण यांना आयसीयूची व १ % रुग्णांना व्हेंटीलेटरची गरज पडू शकते. पण राज्यात केवळ ४२,१९५ ऑक्सिजनचे बेड आहेत. तसेच केवळ १४,१९४ आयसीयू बेड व ६७९८ व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. ही पायाभूत सुविधांची तुट न भरून काढता लॉकडाऊन  जाहीर करणे म्हणजे बारावीला अभ्यास न झाल्याने परीक्षा न देता पुढीलवर्ष भर उनाडक्या करत पुढच्या परीक्षेत नापास होण्यासारखे आहे. नागपूर मध्ये आजच्या घडीला १९,९५६ साधे बेड, ४२५० ऑक्सिजनचे बेड , १८० आयसीयू बेड व ४४६ व्हेंटीलेटरची गरज आहे. हीच ठाण्यातील तातडीने गरज असलेली संख्या ५३७० साधे बेड, ११८० ऑक्सिजनचे बेड , ९५० आयसीयू बेड एवढी मोठी आहे. यासोबत राज्यात डॉक्टरांची व पॅरामेडील स्टाफची कमतरता आहेच. अनेक तालुका पातळीवरील उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची उपलब्धता नाही. जेव्हा तुम्ही कमी महत्वाच्या उपाययोजनेचा आधार घेता व त्यात उर्जा वाया घालवता तेव्हा तुम्ही महत्वाच्या उपाययोजनां आपोआपच कानाडोळा करता. एक वर्षा नंतर प्रभावी लस व उपचारासाठी चांगली औषधे व मार्गदर्शक तत्वे उपलब्ध असताना लॉकडाऊन ही काम न करण्यासाठीची प्रशासकीय सोय व आपली कर्तुत्वशून्यता लपवण्यासाठी एक शासकीय व्यवस्था होऊन बसली आहे.

         एक वर्ष उलटून ही कोरोना रोखण्यासाठीचे वैद्यकीय लॉकडाऊन कसे असावे हे कोणाला ही उमगत नाही हे वैज्ञानिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. साखळी तोडण्यासाठी आवश्यक असलेला लॉकडाऊन हा किमान १४ ते १५ दिवसांचा व अर्धवट नव्हे तर पूर्ण लॉकडाऊन असावा लागतो. याचे साधे कारण आहे कोरोना संसर्गाची साखळी १४ दिवसांची असते. लोक भाजी पाला, धान्य, दुधाची पावडर यासह सर्व गोष्टी घरात ठेवून या कुठल्या ही गोष्टी साठी बाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. सध्याच्या अर्धवट  लॉकडाऊन  मुळे त्या आधी व नंतर बाजारत प्रचंड गर्दी उसळते व सासर्गात अजून भर पडते. शनिवार, रविवार बाधित होणारी व्यक्ती सोमवारी बाहेर पडणारच, रात्रीच्या संचारबंदीत बाहेर न पडणारी सकाळ उजाडल्यावर पडणारच व हेच १४ दिवसांपेक्षा कमी दिवसांच्या लॉकडाऊनला लागू आहे. म्हणूनच तीव्र मानसिक, समाजिक, आर्थिक दुष्परिणाम असलेले व केवळ काही काळसाठी पहिल्या स्टेज मध्ये पॉज बटन म्हणून असलेले लॉकडाऊनचे बटन किती काळ उगीचच दाबून आजचे मरण उद्यावर ढकलायचे याचा तारतम्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते

reachme@amolannadate.com

www.amolannadate.com